पुणे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज कलेक्टर कचेरी जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘डॉ. आंबेडकरांचा हा दिमाखदार जीवन प्रवास, त्यांच्या अभ्यासू आणि कृतिशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतो. सर्वात प्रथम, त्यांनी अर्थशास्त्र, राजकारण, कायदा, तत्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान संपादन केले. शिक्षण घेताना त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण त्यांनी आपले आयुष्य केवळ वाचन-अभ्यास आणि ग्रंथालयात व्यतीत केले नाही. त्यांनी आकर्षक पगाराची उच्च पदे नाकारली, कारण ते शोषित वर्गातील आपल्या बधुंना विसरले नाहीत. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित केले. पिचलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
त्यांचा जीवन इतिहास पाहिल्यावर, त्यांचे मुख्य योगदान आणि त्यांची प्रासंगिकता अभ्यासणे आणि त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आणि योग्य आहे. एका मतप्रवाहानुसार तीन मुद्दे आजही अधिक महत्त्वाचे आहेत. भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय समाज आजही अनेक आर्थिक, सामाजिक समस्यांना तोंड देत आहे. या समस्या सोडवण्यामध्ये, डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कृती आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
यावेळी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, रफिक शेख, मेहबुब नदाफ, प्राची दुधाने, ॲन्थोनी जेकब, राज अंबिके, फिरोज शेख, अभिजीत महामुनी, सिमा सावंत, सुंदर ओव्हाळ, विशाल जाधव, अकबर शेख सुरेश नांगरे, फैय्याज शेख, मनोहर गाडेकर, नितीन वायदंडे, मुन्ना खंडेलवाल, विनोद चौरे आदी उपस्थित होते.







