वल्लरी प्रकाशनच्या ‘गुलबक्षी’ प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे : मनात दाटलेले कागदावर उमटते तेव्हा रिते वाटते, हे रितेपण समाधान घेऊन येते, ही अनुभूती कविता लिहिल्यावर येते. उत्तम काव्याची निर्मिती होण्यासाठी परिश्रम घ्यायला हवेत, मनाची चांगली मशागत व्हायला हवी, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले.

वल्लरी प्रकाशनतर्फे ‘गुलबक्षी’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी महाळंक बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, कवयित्री कांचन सावंत, मानसी चिटणीस, यशदाचे अधिकारी व्यंकटेश कल्याणकर उपस्थित होते.

‘गुलबक्षी’मध्ये सुरेखा मिसाळ, रत्नाकर खरोटे, माधवराव देशमुख, प्रितम गाडगीळ, तुषार देशमुख, रेखा बारी, पूजा बोटे, अर्चना पाटील, डॉ. चैताली भिडे, पौर्णिमा चिकणे, निर्मला गिरासे अशा अकरा कवींचा समावेश आहे. यावेळी सह्याद्री नॅशनल स्कूलचे विद्यार्थी आर्या जगदाळे, गणेश कळसे आणि माया कल्याणकर यांनीही कवितांचे सादरीकरण केले. समारंभाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर यांनी केले.

महाळंक पुढे म्हणाल्या, ‘‘कविता हे व्रत आहे. कवीच्या अंतरंगात, मनात उमटणारा भावनांचा उत्स्फूर्त, सशक्त अविष्कार म्हणजे कविता होय. गेल्या काही वर्षात कवींचे पीक आले आहे, असे सातत्याने म्हटले जाते, पण या कवींमध्ये किती कस आहे हे तपासून पाहायला हवे. येत्या काळात स्वत:ला कवी म्हणवणाऱ्या प्रत्येकाने अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. गझलकार म. भा. चव्हाण यांनी यावेळी विविध धाटणीच्या गझल, कविता सादर केल्या.

कांचन सावंत म्हणाल्या, स्वत:चे भावविश्व रसिकांसमोर उलगडणे म्हणजे कविता सादर करण्याची प्रक्रिया होय. कविता लिहिणाऱ्यांनी शब्दांच्या पलिकडचे वाचायला शिकले पाहिजे. यमकाचा अभ्यास, छंद, शब्द, लय यांचे भान कवीला असायला हवे. रियाजाने कविता चांगली होत जाते, त्यामुळे कवितेचा रियाज आवर्जून करायला हवा.

व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविकात वल्लरी प्रकाशनाची भूमिका सांगितली. ते म्हणाले, मागील ३ वर्षातील हा २२वा कविता संग्रह असून महाराष्ट्राच्या विविध भागांतील कवींना चांगले व्यासपीठ निर्माण करून देणे हे आमचे ध्येय आहे. हृदयातून उमटते आणि हृदयापर्यंत पोहोचते ती खरी कविता असते. साहित्याला जेव्हा ममतेचा स्पर्श होतो तेव्हा ती कलाकृती खऱ्या अर्थाने उत्तम होते. मराठी साहित्यिक बरेचदा स्वप्नरंजनात अडकतात. मात्र वास्तववादी आणि रसिकांना आवडेल अशा साहित्याची निर्मिती व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मानसी चिटणीस यांनी कविता संग्रहाची प्रक्रिया सांगून कवितांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संपादिका प्रज्ञा कल्याणकर यांनी केले.
साहित्याच्या क्षेत्रातील ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तींचा मला सहवास लाभला. व. पु. काळे यांनी मला बोलते केले तर सुरेश भट यांच्यामुळे मी लिहिता झालो. या दोन व्यक्तींमुळे मी खऱ्या अर्थाने घडलो.
– म. भा. चव्हाण

