पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’ ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन
पुणे : सृष्टीचे चलन आवर्तनातूनच होत असते. कलाकार हा संस्कृतीचा प्रतिनिधी असतो; निधीपती नव्हे. त्या निधीला सुंदर रूपात प्रस्तुत करण्याचे कार्य तो करतो. भूतकाळातून ज्ञानकलश, ज्ञानमोती शोधले जातात तेव्हा कलेची उन्नती साधली जाते. लेखणी कागदावर अंकित होत नाही तोपर्यंत ती कल्पना असते. जेव्हा ती कागदावर उतरते तेव्हा त्याचा ग्रंथ बनतो, इतिहास रचला जातो, असे प्रतिपादन संगीत नाटक अकादमीचे माजी संचालक, ज्येष्ठ कलावंत पद्मश्री शेखर सेन यांनी केले.

तालयोगी आश्रम, आवर्तन गुरुकुल आणि अभिजात अकादमीतर्फे तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर लिखित ‘आवर्तन’ या ग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन आज (दि. १२) शेखर सेन यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावर, डॉ. सदानंद बोरसे, पुस्तकाच्या अनुवादक विद्याहरि देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मयूर कॉलनीतील एमइएस ऑडिटोरियम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ज्ञान ग्रहण करण्यासाठी ग्रंथाची आवश्यकता असते हा मुद्दा अधोरेखित करून पद्मश्री शेखर सेन पुढे म्हणाले, संगीत क्षेत्रातील भ्रामक संकल्पनांना पंडित सुरेश तळवलकर यांच्या लेखणीतून दूर सारले जाईल. ते पुढे म्हणाले, कला प्रवाहित ठेवण्याचे कार्य कलाकार निरंतरपणे करत असतो. संगीत कलेच्या माध्यमातूनच निराशा, आत्म्यातील मलिनता दूर केली जाऊ शकते. निरंतर कला साधनेतून परंपरेत योग निर्माण करणाऱ्याला तालयोगी म्हटले जाते. मृत चर्मात प्राणप्रतिष्ठा करण्याचे कार्य तालयोगी पंडित सुरेश तळवलकर करीत आहेत, असे त्यांनी गौरवाने नमूद केले.

गुरूंचे विचार देशात प्रसृत होतील : पंडित सुरेश तळवलकर…
पुस्तक लेखानाविषयी बोलताना पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, ‘आवर्तन’ हे पुस्तक माझ्या हातून लिहिले गेले असले तरी यातील संकल्पना, विचार हे बुजुर्गांचेच आहेत. हे विचार, संकल्पना मला पहायला, ऐकायला, अनुभवायला मिळाल्या हे माझे भाग्य आहे. ‘आवर्तन’ म्हणजे पुनरावृत्ती नव्हे तर पूर्णत्व झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन सुरुवात होय. गुरू शिष्याला शिकवतात परंतु त्यावर अनेक वर्षांची साधना झाल्यानंतरच त्यातील अर्थ गवसतो. या पुस्तकाच्या माध्यमातून गुरूंचे विचार संपूर्ण भारतात प्रसृत होतील.

पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर म्हणाले, भारतीय अभिजात संगीताचा प्रसार संपूर्ण जगभरात झालेला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून संगीत क्षेत्राकडे कसे पहावे, पुढे जाण्यासाठी काय करावे याविषयी मार्गदर्शन मिळेल.
डॉ. सदानंद बोरसे म्हणाले, ‘आवर्तन’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाच्या वाट्याला आलेला अनमोल जडावाचा दागिना आहे. पंडित सुरेश तळवलकर यांचे तबला-डग्ग्याइतकेच त्यांच्या वाणी व लेखणीवर प्रभुत्व आहे. या पुस्तकाची मांडणी सुबोध शैलीत केलेली असून यातील आठवणी-किस्स्यांमधून सांगीतिक विचारच पोहोचविले जात आहेत. मराठीतील विचारधन सीमित राहू नये, त्याचा परिघ मोठा व्हावा या हेतूने हिंदी आवृत्तीची निर्मिती झाली आहे.

अनुवादक विद्याहरि देशपांडे म्हणाल्या, अनुवाद करताना लेखकाचे विचार दुसऱ्या भाषेत आणावे लागतात. तेव्हा त्यांचे रूप बदलता येते परंतु विचार बदलले जात नाहीत. ‘आवर्तन’ पुस्तकाचा अनुवाद करताना पंडितजींचे शब्द गुरुवाणीप्रमाणे माझ्या कानात गुंजत होते. गुरू समिप असल्याची भावना सातत्याने जाणवत होती. ‘आवर्तन’ या पुस्तकातील विचारधन त्यांनी अभिवाचनाच्या माध्यमातून ऐकविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीनिवास राव यांनी केले. मान्यवरांचे स्वागत शिरीष कौलगुड, सुरेंद्र मोहिते, सुनील देशपांडे यांनी केले.
पुस्तक प्रकाशन समारंभानिमित्त तालवाद्य प्रस्तुतीचा अनोखा कार्यक्रम सावनी तळवलकर (तबला), ईशान परांजपे (काहोन), ऋतुराज हिंगे (कलाबाश), अमेय बिच्चू (संवादिनी) यांनी सादर केला.


