Home Blog Page 31

पुण्यातील विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीरपणे दखल

कुटुंबाशी फोनवर संवाद साधत दिला धीर

पुणे.दि.१३: पुण्यातील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (बीएसआय) या केंद्र सरकारच्या संस्थेत पीएचडी संशोधन करणाऱ्या ३० वर्षीय विद्यार्थिनीने लैंगिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन (५०) यांना पिंपरी-चिंचवड (भोसरी एमआयडीसी) पोलिसांनी अटक केली असून, त्याने लैंगिक छळ केल्याची कबुलीही दिली आहे.

दरम्यान, विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी विद्यार्थिनीच्या आई-वडिलांशी फोनवरून सविस्तर संवाद साधला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “मी स्वतः अतिशय व्यथित झाले आहे. मुलीला संशोधक बनवण्यासाठी पालक आयुष्य समर्पित करतात आणि अशा वेळेला मुलींच्या वाट्याला या गोष्टी येत असतील तर खरोखर असे नराधम कुठल्याच प्रकारच्या नोकरीत राहण्याच्या लायकीचे नाहीत.”

या विद्यार्थिनीला, डॉ. बिन्नियमिनकडून अनैतिक वर्तन, लैंगिक छळ, अंगावर हात टाकणे आणि मानसिक त्रास दिल्याने तीला मानसिक धक्का बसला व त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. तसेच तिचा संशोधनाचा डेटा वारंवार डिलीट करण्यात येत होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी कुटुंबीयांना पूर्ण सहकार्य दिल्याचे त्यांनी डॉ. गोऱ्हे यांना सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी यावरून शैक्षणिक संस्थांमधील लैंगिक शोषण रोखण्यासाठीच्या समित्या कितपत कार्यान्वित आहेत, याची तपासणी करण्याची गरज व्यक्त केली. “केंद्र सरकारची जरी ही संस्था असली तरी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी, उच्च शिक्षण विभागाने, महिला-बालविकास विभागाने वारंवार जीआर काढून स्पष्ट केले आहे की प्रत्येक शैक्षणिक संस्थेत स्थानिक तक्रार समित्या (लोकल कंप्लेंट कमिटी) असल्या पाहिजेत. परंतु त्या समित्यांकडे माहिती पोहोचते की नाही, याची तपासणी होत नाही. विद्यार्थिनींपर्यंत जागृती आणि माहिती पोहोचवण्यातही कमतरता दिसते,” असे त्यांनी सांगितले. ही विद्यार्थिनी केंद्र सरकारच्या संस्था सुरक्षित आहेत म्हणूनच इथे पीएचडीसाठी आली होती. पण घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले.

वनस्पती शास्त्र संशोधन संस्था , केंद्र सरकार यांनी आरोपीवर तात्काळ कारवाई करून त्याला बडतर्फ करावे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच पीडित कुटुंबाला सक्षम सरकारी वकील मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे त्यांनी आश्वासन दिले.

इराण भारतीय जहाजांना होर्मुझ पार करण्यास मदत करणार:अमेरिकेला म्हटले- होर्मुझवर हल्ला केला तर आखातातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही

इराणवर अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी सुरू-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लादलेली सागरी नाकेबंदी सुरू झाली आहे. हा निर्णय आज संध्याकाळी ७:३० वाजता (अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता) अंमलात आला.या निर्णयानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला थांबवून त्याची तपासणी केली जाईल. इराणला टोल भरलेल्या जहाजांवर विशेष लक्ष दिले जाईल.ट्रम्प यांनी काल सांगितले होते की, इराणला बेकायदेशीर टोल देणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही. यामुळे इराणच्या आर्थिक सामर्थ्याला धक्का बसेल.दरम्यान, इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फताहली यांनी सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल आकारण्यात आलेला नाही. इराण भारतीय जहाजांना त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मदत करेल.

वॉशिंग्टन डीसी-इराणने म्हटले आहे की, तो होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षितपणे जाण्यासाठी मदत करेल. इराणचे भारतातील राजदूत, मोहम्मद फताहली यांनी सांगितले की, या विषयावर इराण आणि भारत यांच्यात चांगली चर्चा सुरू आहे.ते म्हणाले की, सध्याचा तणाव असूनही भारतीय जहाजांना या मार्गावरून कोणत्याही अडचणींशिवाय प्रवास करता यावा, अशी इराणची इच्छा आहे. त्यामुळे, इराण नवी दिल्लीला मदत करण्यास तयार आहे.यापूर्वी, इराणने अमेरिकेला इशारा दिला होता की, जर होर्मुझची सामुद्रधुनी आणि तेथील बंदरांना लक्ष्य केले गेले, तर पर्शियन आखात आणि ओमानच्या समुद्रातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही.

इराणचे सैन्य आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) यांनी म्हटले आहे की, या प्रदेशातील सागरी सुरक्षा ही सर्व देशांची सामायिक जबाबदारी आहे. जर सुरक्षा सर्वांची नसेल, तर ती कोणाचीच नसेल.
दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जाहीर केले आहे की, अमेरिका सोमवारी संध्याकाळी ७:३० वाजल्यापासून इराणची बंदरे आणि किनारपट्टीच्या भागांवर नाकेबंदी लादण्याची तयारी करत आहे. याअंतर्गत, इराणी बंदरांमधून ये-जा करणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांवर निगराणी ठेवली जाईल आणि त्यांना थांबवले जाऊ शकते.


होर्मुझच्या नाकेबंदीला इस्रायलचा पाठिंबा
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, त्यांचा देश इराणवरील अमेरिकेच्या सागरी नाकेबंदीला पाठिंबा देतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय योग्य असून इस्रायल या मुद्द्यावर अमेरिकेसोबत मिळून काम करत आहे.

एका बैठकीत नेतन्याहू म्हणाले की, पाकिस्तानमध्ये झालेल्या शांतता चर्चेच्या नियमांचे इराणने उल्लंघन केल्यामुळे ट्रम्प यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले.
रशियाचा ‘हॉर्मुझ सामुद्राधुनी’तील नाकेबंदीला विरोध
रशियन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या ‘क्रेमलिन’ने, अमेरिकेच्या अशा एका निर्णयावर टीका केली आहे; ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘हॉर्मुझ सामुद्राधुनी’ची नाकेबंदी करण्याची घोषणा केली होती. क्रेमलिनचे म्हणणे आहे की, या कृतीचा जागतिक बाजारपेठांवर विपरीत परिणाम होईल.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी नमूद केले की, ट्रम्प यांच्या या आदेशातील अनेक पैलू अद्याप अस्पष्ट आहेत.

अमेरिकन लष्कराच्या माहितीनुसार, ही नाकेबंदी वॉशिंग्टनच्या वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता) अंमलात येईल. या उपाययोजनेअंतर्गत, इराणच्या बंदरांकडे जाणारी आणि तिथून परतणारी जहाजे रोखली जातील.

एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे : कृषी क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ची जोड देऊन उत्पादनवाढ साधता येईल आणि त्या उत्पादनाला सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतीचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता, नवतंत्रज्ञानाचा स्वीकार आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर भर देत कृषी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.

पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा ३८ वा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार (ता. १३) रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी शेतीत तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत मोहिते, प्रा. डॉ. जनार्दन कदम, कृषीचे माजी सचिव नानासाहेब पाटील, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. महानंद माने, सचिव अतुल मारणे, अनिल महामुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांना ‘कृषी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच प्रा. डॉ. रामचंद्र साबळे, नांदेड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रमोद देशमुख आणि सचिन भालिंगे यांना ‘कृषी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

आपल्या भाषणात श्री.भरणे म्हणाले की, ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मॉन्सूनबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही बाब आशादायी ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी चांगल्या पावसावर शेतकऱ्यांची स्वप्ने अवलंबून असल्याचे नमूद केले. योग्य पर्जन्यमान झाल्यास पीक उत्पादन आणि फळबागांची वाढ साध्य होते; मात्र पावसाअभावी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी विभाग आणि शेतकरी यांचे अतूट नाते असल्याचे सांगताना भरणे यांनी कृषी शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली. “शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतात. त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली पाहिजे,” असे ते म्हणाले. स्वतःचा प्रवास सांगताना त्यांनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते विविध महत्त्वाच्या पदांपर्यंतचा प्रवास हा संधी आणि कर्तृत्वाच्या बळावर घडल्याचे सांगितले.

दिवंगत नेते अजित पवार यांनी व्यक्तीमधील गुण ओळखून संधी दिल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला, असेही त्यांनी नमूद केले. सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हीच आपली कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी नवीन वाण आणि तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ५५-५६ वर्षांत विद्यापीठाने ३२० पेक्षा अधिक पिकांचे सुधारित वाण आणि ५५ नवीन कृषी यंत्रे विकसित केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर गायकवाड यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ

पुणे, दि.१३: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली.

यामध्ये महसूल विभागाच्यावतीने २ हजार १५०, पंचायत समितीअंतर्गत ६३७, पशुसंवर्धन विभाग ४०, आरोग्य विभाग १३४, कृषी विभाग ३८२, महावितरण १८२, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ ३, भूमी अभिलेख २ आणि पुरवठा विभागाअंतर्गत ३६० याप्रमाणे एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये नागरिकांच्या महसूल विषयक विविध समस्यांचे तात्काळ निराकरण करून, ७/१२ उतारे, फेरफार, ७/१२ दुरुस्ती, विविध दाखले तसेच विविध विभागाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात, या शिबारात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती कोलते-पाटील यांनी केले आहे.

नाशिक येथे कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतरण व लैंगिक शोषण झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईच्या सूचना — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १३ एप्रिल २०२६ : नाशिक शहरात उघडकीस आलेल्या कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतरण व लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांना सविस्तर निवेदन देत सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची सूचना दिली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, या प्रकरणामुळे समाजामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक सलोखा, महिलांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतर व लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर बाबी समोर येत असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविल्या आहेत. प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून (SIT) संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी करून त्यामागील संभाव्य सूत्रधार व संघटित जाळ्याचा शोध घेण्याचे निर्देश द्यावेत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल चॅट्स, आर्थिक व्यवहार यांसारख्या तांत्रिक पुराव्यांची तपासणी करून दोषींची साखळी उघड करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, असेही त्यांनी नमूद केले. यासोबतच पीडितांना तत्काळ पोलीस संरक्षण, मोफत कायदेशीर मदत, समुपदेशन व मानसिक आधार सेवा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी सर्व खासगी व कॉर्पोरेट संस्थांमध्ये अंतर्गत तक्रार समित्या प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील आयटी कंपन्या व इतर संस्थांमध्ये नियमित सुरक्षा ऑडिट व अचानक तपासण्या करून अशा प्रकारांना आळा घालण्याचे आवाहन त्यांनी केले.

धर्मांतराच्या नावाखाली कोणतेही बेकायदेशीर प्रकार घडत असल्यास त्यावर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याशिवाय महिला सुरक्षा व कायदेशीर हक्कांविषयी पोलीस विभागामार्फत व्यापक जनजागृती मोहीम राबवून समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

या संपूर्ण प्रकरणात तत्काळ आणि प्रभावी कार्यवाही करून न्याय मिळवून देण्याची सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

पुण्याच्या अगोदर ‘पीएमआरडीए’ची कारवाई सुरु; अनधिकृत होर्डिंगवर हातोड्यावर हातोडे !

  • पीएमआरडीए हद्दीत आजपासून अनधिकृत होर्डिंगविरोधात जोरदार कारवाई सत्र सुरू!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम उघडली आहे. सोमवारी (दि.१३) हिंजवडी येथील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करत प्रशासनाने ते जमीनदोस्त केले.

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अनधिकृत बांधकामे आणि होर्डिंगवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही मोहीम तीव्र केली आहे. हिंजवडी (ता. मुळशी) येथील गट क्रमांक २०६ मधील अंदाजे १२५० चौरस फूट क्षेत्रावर उभारण्यात आलेले होर्डिंगचे लोखंडी सांगाडे (फ्रेम) नियमबाह्य असल्याचे पाहणीत आढळले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

‘पीएमआरडीए’ने बजावलेल्या नोटिशीनुसार, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ ते ५६ अन्वये ही कारवाई करण्यात आली. संबंधित होर्डिंगसाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर अशा अनधिकृत होर्डिंगमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नोटिशीकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६ (जीवितास धोका निर्माण करणे) आणि कलम ४२० अन्वये गुन्हे दाखल होऊ शकतात.

“अनधिकृत होर्डिंगप्रकरणी एक महिना ते तीन वर्षांपर्यंत कारावास आणि पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. संबंधित धारकांनी स्वतःहून आपली अनधिकृत होर्डिंग काढून घ्यावीत, अन्यथा प्राधिकरणाकडून होणाऱ्या कारवाईचा खर्च आणि दंड वसूल केला जाईल,” असा इशारा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रभारी सहआयुक्त हिंमत खराडे यांनी दिला आहे.

ही कारवाई महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रभारी सहआयुक्त हिंमत खराडे, तहसीलदार आशा होळकर आणि तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्या पथकाने पार पाडली. ज्या होर्डिंगधारकांकडे रितसर परवानगी नाही, त्यांनी तातडीने अर्ज करून प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा येत्या काळात संपूर्ण पीएमआर हद्दीत अशीच धडक कारवाई सुरू राहील, असेही ‘पीएमआरडीए’ प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

“शहर परिवर्तन समिती” आणि “MISSION ३२” समस्यामुक्त शहर करण्यासाठी प्रशासन सज्ज

पुणे-वाहतूक, रस्ते, ड्रेनेज ,पाणी ,पार्किंग, डोक्यावरच्या केबल्स ,पाण्याच्या टाक्या ,मोबाईल अॅप्स, आवश्यक तेवढे समन्वयक अशा विविध प्रश्नांवर चर्चा करून सह्ह्र समस्यामुक्त करण्यासाठी पुणे शहर परिसरातील आय ए एस , आय पी एस , अधिकारी, वर्ग १ चे अधिकारी , असे सर्व प्रशासन हातमिळवणी करून साज होत असून याचाच भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत “शहर परिवर्तन समिती” स्थापन करण्यात आली आणि तातडीने “MISSION ३२” हाती घेण्यात आले व इतरही अनेक निर्णय घेतले गेले.

पुणे शहरा समोरील वाढती विविध स्वरूपाची शहरी आव्हाने प्रभावीपणे हाताळण्या साठी तसेच विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी “शहर परिवर्तन समिती” स्थापन करण्यात आली आहे. पुणे शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक सुरळीत करणेच् असे प्रश्न, शासकीय विभागांमध्ये समन्वय वाढविणे, रस्ते चांगले करणे, शहर स्वच्छ आणि सुंदर करणे यावर उपाय योजने बाबत शहर परिवर्तन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याची दुसरी बैठक आज दिनांक १३/०४/२०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली.


सदर बैठकीमध्ये यापूर्वी दि.०५/०२/२०२६ रोजी झालेल्या शहर परिवर्तन कक्षाचे बैठकीचे अनुषंगाने आढावा घेण्यात आला . पुणे शहरातील १२मिसिंग लिंक रस्त्यांचे विकसन बाबत मिसिंग लिंकच्या कामांकरिता भूसंपादन, अतिक्रमण, मोजणी या अनुषंगाने अडचणी ठरत असणाऱ्या बाबींवर चर्चा करण्यात आली असून यामध्ये बाणेर – पाषाण लिंक रोड, वाकड ते कस्पटे वस्ती रोड, आंबेडकर चौक ते राजाराम ब्रिज रस्ता व वारजे येथील रोजरी स्कूल ते तिरुपती नगर येथील मिसिंग लिंक वर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली यामधील भूसंपादन प्रक्रियेमध्ये अडथळा ठरणाऱ्या बाबी जसे कि, मोजणी ,अतिक्रमण काढण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली असून जि-ल्हाधिकारी यांनी संबंधित शासकीय विभागाला वेळेत काम पूर्ण करण्याबाबत आदेश दिले आहेत.


सदर ३२ रस्त्यांच्या फुटपाथवर अडथला ठरणारे फीडर पिलरचे सादरीकरण करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांनी MSEDCL च्या मुख्य अभियंता यांनी सदर फीडर पीलर चे डिझाईन Approve करून तातडीने शिफ्ट करण्याचे आदेशित करण्यात आले आहेत. तसेच पुणे शहरांमधील प्रमुख ३२रस्त्यांचे “MISSION ३२”चे अंतर्गत सदरील कामे युद्ध पातळीवर करणे बाबत महापालिका आयुक्त यांनी पुणे मनपाच्या पथ, प्रकल्प, ड्रेनेज, पाणीपुरवठा विभागास आदेश दिले. पुणे महानगरपालिके मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आर.पी. रस्त्यानुसार प्रत्येक गावनिहाय एक रस्ता याप्रमाणे ३२ गावांमधील पोलीस विभागांच्या समन्वयाने निश्चितीनुसार ३२ प्रमुख रस्त्याच्या विकसनाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त यांनी आजच्या बैठकीमध्ये दिल्या आहेत.
सदर रस्त्यांमधील जागा ताब्यात घेण्यासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी यांचे मंजुरीसाठी सादर करणेबाबत सूचित केले व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील रस्त्यांसाठी ताब्यात आलेल्या जागांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
नागरिकांचे सोयीसाठी पुणे महानगरपालिकेमार्फत ६ मोबाईल ॲप्लिकेशन्स तयार करण्यात आले असून नागरिकांनी त्यांचे रस्त्या संबंधित तक्रारी साठी सदर ॲप्लिकेशन्सचा वापर करून तक्रार निवारण करणे बाबत आदेश दिले आहेत. तसेच पोलीस विभागामार्फत तयार करण्यात आलेले PTP (Pune city Traffic Police) हेॲप्लिकेशन्स पुणे महानगरपालिकेच्या ६ मोबाईल ॲप्लिकेशन्स ला लिंक झाल्यास एकत्रितपणे रस्ते व वाहतुक सुरळीत होणार याबाबत चर्चा झाली.
पोलीस उपायुक्त वाहतूक यांनी रस्ते खोदाईबाबत NOC तात्काळ देण्यात येईल असे सूचित करून परिपूर्ण माहिती असणारे अधिकारी यांनी त्यासाठी संपर्क केल्यास निर्णय घेणे सोयीचे होईल. असे सूचित केले.
पुणे मनपामार्फत विविध रस्त्यांवर पावसाळ्यामुळे वॉटर लॉगिंग चे ठिकाणे निश्चित करण्यात आले असून त्यानुसार प्रत्येक परिमंडळ निहाय वॉटर लॉगिंग एरिया करिता टेंडर प्रकिया पूर्ण करून काम करून सुरू करणे येत आहे.
भूसंपादन करतेवेळी वनविभागामुळे अडथळा ठरणाऱ्या ठिकाणाबाबत चर्चा करण्यात आली असून वन विभागाच्या संबंधित अधिकारी यांचेकडे पुणे महानगरपालिके मार्फत सादर करण्यात आलेल्या वन विभागाचे ताब्यातील जागांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणेबाबत सूचित केले.
जिल्हाधिकारी यांनी पोलीस उपायुक्त वाहतूक पोलीस यांना MISSION ३२ अंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यावरील रिक्षा थांबा ठिकाणे प्रत्यक्ष जागेवर मार्किंग करून निश्चित करणे व बेवारस वाहने उचलणे याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच पुणे शहरातील महत्त्वाचे ५ रस्त्यांवर पे & पार्क बाबत कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
पाणीपुरवठा विभागाकडील पाण्याच्या टाक्या उभारण्या साठी आवश्यक असलेल्या सरकारी जागांचे मोजणी व भूसंपादनाचे अनुषंगाने सदरचे प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करणे बाबत आदेश दिले असून यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सदर बैठकीमध्ये स्पष्ट केले.
वाहतुकीच्या मुख्य ३२ रस्त्यांसाठी मनपाद्वारे ३२ आणि पोलीस विभागाद्वारे ३२ अधिकारी समन्वयक म्हणून नियुक्त करून त्यांनी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबींवर सर्व संबधित विभागांशी समन्वय ठेवून कामाच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांनी देवून पुढील बैठकीपूर्वी सर्व मुद्द्यांवर अनुपालन सादर करण्याचे आदेश दिले.

या बैठकीला उपस्थित असलेले अधिकारी त्यांची नावे –

• नवल किशोर राम, महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका
• जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी,पुणे
• पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका
• प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), पुणे महानगरपालिका
• ओमप्रकाश दिवटे , अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), पुणे महानगरपालिका
• अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता, पुणे महानगरपालिका
• मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे
• अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL)-
• भूमी अभिलेख विभाग
• दूरसंचार सेवा प्रदाते• महामेट्रो
• पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML)
• पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)
• वन विभाग अधिकारी
• प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे (RTO)
• पुणे महानगरपालिका विभाग – पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, प्रकल्प, विद्युत, पथ, बांधकाम परवानगी आणि अतिक्रमण निर्मुलन विभाग, उपआयुक्त परिमंडळ क्र.१ ते ५

‘पीएमआरडीए’चा आशियाई विक्रम! अवघ्या ९५ दिवसांत उभी राहिली १४ मजली इमारत!

  • स्वकर्तृत्वाचा १०० दिवसांचा विक्रम मोडीत
  • ‘आशिया’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद; सेक्टर १२ मधील प्रकल्पात प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा चमत्कार!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गृहनिर्माण आणि अभियांत्रिकी क्षेत्रात जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा नवा झेंडा फडकावला आहे. चिखली येथील ‘सेक्टर १२’ गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत उभी करण्याचा भीमकाय पराक्रम ‘पीएमआरडीए’ने केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये या विक्रमाची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ‘पीएमआरडीए’ने यापूर्वीचा आपलाच १०० दिवसांचा जुना विक्रम मोडीत काढत बांधकामाचा नवा मापदंड प्रस्थापित केला. मंगळवारी चिखली येथील प्रकल्पस्थळी आयोजित दिमाखदार सोहळ्यात ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे परीक्षक अशोक अदाक यांनी अधिकृत प्रमाणपत्र व पदक देऊन ‘पीएमआरडीए’चा गौरव केला. प्राधिकरणाच्यावतीने मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी हा बहुमान स्वीकारला.

‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मैलाचा दगड गाठण्यात आला. हे अशक्यप्राय काम पूर्ण करण्यासाठी ‘बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी’ या कंपनीच्या सुमारे ९ हजार कामगारांनी तीन शिफ्टमध्ये अहोरात्र काम केले. अत्याधुनिक ‘प्रीकास्ट आरसीसी’ तंत्रज्ञानामुळे (३-एस सिस्टिम — Safety, Strength and Speed) गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता ही इमारत विक्रमी वेळेत पूर्ण झाली. ही वास्तू पूर्णपणे भूकंपप्रतिरोधक असून शाश्वत नागरी विकासाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

यापूर्वी मार्च २०२६ मध्ये ‘पीएमआरडीए’ने १०० दिवसांत इमारत बांधून विक्रम केला होता. मात्र, अवघ्या एका महिन्यात पुन्हा स्वतःचेच रेकॉर्ड सुधारत ९५ दिवसांचे नवे लक्ष्य गाठले आहे. यापूर्वी बांधकाम क्षेत्रातील दिग्गज ‘एल अँड टी’ कंपनीच्या नावावर ९६ दिवसांत १२ मजली इमारत बांधल्याची नोंद होती; त्यावर आता ‘पीएमआरडीए’ने मात केली आहे.

दृष्टिक्षेपात विक्रमी बांधकाम :

  • इमारत : १४ मजली निवासी इमारत (डी-३) LIG
  • एकूण क्षेत्रफळ : ९४,७२२ चौरस फूट
  • सदनिका : ११२ (२ बीएचके)
  • कालावधी : केवळ ९५ दिवस
– तंत्रज्ञान : प्रीकास्ट आरसीसी (इंडस्ट्रियलाइज्ड ३-एस सिस्टिम)

‘हे यश म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार’ – रिनाज पठाण

“पीएमआरडीएच्या सेक्टर-१२ येथील गृहनिर्माण प्रकल्पात आम्ही ‘मिशन ९५ डेज’ हे मोठे आव्हान स्वीकारले होते. अभियांत्रिकी कौशल्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर १४ मजली ‘डी-३’ LIG इमारत केवळ ९५ दिवसांत पूर्ण करून आम्ही हा टप्पा गाठला आहे. ही यशस्वी अंमलबजावणी प्रामुख्याने ‘३-एस प्रीफॅब टेक्नॉलॉजी’ (3S Prefab–Precast Technology), ‘झिरो लॅग शेड्युलिंग’ आणि अहोरात्र चालणाऱ्या ‘थ्री-शिफ्ट वर्किंग’ मॉडेलवर आधारित आहे. या प्रकल्पात फॅक्टरी-मेड प्रीकास्ट घटकांचा वापर केल्यामुळे बांधकामाचा वेग वाढला, तसेच गुणवत्तेतही कमालीची समानता राखली गेली आणि साहित्याची नासाडी (wastage) कमी झाली. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर कडक गुणवत्ता नियंत्रण (QA/QC), सुरक्षा मानके आणि डिजिटल पाळत (digital surveillance) ठेवण्यात आली. हा प्रकल्प केवळ विक्रम प्रस्थापित करण्यापुरता मर्यादित नसून, भविष्यातील मोठ्या प्रमाणावरील परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी हे एक ‘स्केलेबल मॉडेल’ ठरणार आहे. गुणवत्तेचा दर्जा राखून सर्वसामान्यांना विक्रमी वेळेत हक्काची घरे उपलब्ध करून देणे हाच आमचा मुख्य उद्देश असून, आगामी काळातही अशा तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांना प्राधिकरणाचे प्राधान्य राहील.”

— रिनाज पठाण (मुख्य महानगर अभियंता, पीएमआरडीए)
यावेळी मुख्य वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, बांधकाम परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, कार्यकारी अभियंता विद्याधर शिंदे, उपअभियंता रश्मी पाटील, शिर्के ग्रुपचे उपाध्यक्ष वाय. पी. काजळे, उपमुख्य अधिकारी एन. एम. कदम, सहमहाव्यवस्थापक जे. सी. राक्षे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता भिडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एन. एम. कदम यांनी मानले.

प्रति शिधापत्रिका ३ लिटर केरोसीन,४५ दिवसांत उचलणे बंधनकारक

केरोसीन वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर

पुणे, दि. १३ : माहे मार्च २०२६ कालावधीसाठी केरोसीन (रॉकेल) वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रति शिधापत्रिका ३ लिटर केरोसीन देण्यात येणार आहे. अंत्योदय
व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना प्राधान्य देण्यात येणार असून, उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक, शिधापत्रिका नसलेले कुटुंब (ग्रामपंचायत दाखल्यासह) तसेच स्थलांतरित मजूर यांनाही वितरण केले जाईल.

केरोसीनचा संपूर्ण कोटा वाटप दिनांकापासून ४५ दिवसांत उचलणे बंधनकारक असून, उर्वरित साठा पुढे नेण्यात येणार नाही.
वितरण प्रक्रिया तेल कंपन्यांचे वितरक, किरकोळ परवानाधारक/रास्तभाव दुकानदार, लाभार्थी अशा टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यास ३ लिटर प्रमाणे वाटप करणे आवश्यक असून, दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले राहतील.

तेल कंपन्यांनी पुरवठा नियमित ठेवावा, तसेच ८५% केरोसीन पहिल्या पंधरवड्यात उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुका स्तरावर तहसीलदारांच्या देखरेखीखाली वितरण होणार असून, गैरवापर टाळण्यासाठी संयुक्त तपासणी पथक (तहसीलदार, पुरवठा अधिकारी, पोलीस) नियुक्त करण्यात येणार आहे. केरोसीनचा वापर फक्त घरगुती कारणासाठीच करता येणार असून, भेसळ किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

तरी सर्व संबंधितांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुणे प्रार्थना समाजात संगीतोपासनेतून भक्तिरसाची अविस्मरणीय अनुभूती

पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने चैत्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित संगीतोपासनेचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यंदा हरी मंदिर प्रवेशाला ११७ वर्षे पूर्ण होत असल्याने या वर्षीचा उत्सव विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या संगीतोपासनेतून उपस्थितांना अध्यात्मिक शांततेचा आणि अंतर्मुखतेचा अनोखा अनुभव मिळाला.

संगीतोपासनेत विश्वजीत मेस्त्री आणि सानिका सोमण यांनी सुरेल व भावपूर्ण गायन सादर केले. त्यांना दिग्विजय देशमुख (तबला) आणि संगमेश्वर तडलगी (हार्मोनियम) यांनी  साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन नमिता मुजुमदार यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात उपनिषदांतील पवित्र श्लोकांच्या उच्चारांनी झाली. ‘स्वर ही परमेश्वराशी जोडणारी अतूट साखळी आहे’ या भावनेतून सादर झालेल्या गायनाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. मंगल गजराने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आणि त्यानंतर भजनामृताचा रसिकांनी मनोभावे आस्वाद घेतला.

‘जगन्नाथ मंगला जय जय परब्रह्म वत्सला’ यांसारख्या भक्तिगीतांनी वातावरण अधिकच पवित्र केले. कलाकारांनी स्वरांच्या माध्यमातून सर्वत्र व्यापून असलेल्या परमेश्वराची अनुभूती अत्यंत प्रभावीपणे साकारली. यानंतर सादर झालेल्या भजनाने श्रोत्यांना स्वरांच्या सावलीत विसावण्याचा एक अद्वितीय, समाधानकारक अनुभव दिला, आणि ‘प्रीती प्रभुसे जोडरे मन’ यासारख्या रचनांनी कार्यक्रमाला उंची आणि आध्यात्मिक गाभा प्राप्त करून दिला.

कार्यक्रमाच्या पुढील भागात विश्वजीत मेस्त्री यांनी सादर केलेला अभंग ‘आनंददाता आनंद दीजे’ याच्या माधुर्यपूर्ण, सुरेल आणि हृदयस्पर्शी सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भक्तिरसात तल्लीन झाले. या अभंगाच्या लयबद्धतेने आणि भावगर्भ अभिव्यक्तीने उपस्थित श्रोत्यांच्या मनावर अमिट छाप उमटवली. यानंतर विचारप्रवर्तक अभंगांची प्रभावी मांडणी सादर करण्यात आली. सानिका सोमण यांनी ‘क्षण एका चित्त करुनी निवांत’ आणि ‘मना मनन माझिया’ हे अभंग मनोज्ञ रीतीने सादर केले, तर विश्वजीत मेस्त्री यांनी ‘विष्णुमय जग’ या अभंगातून अध्यात्मिक चिंतनाची अनुभूती घडवली. शेवटी ‘हरी भजनाविण काळ घालवू नको रे’ या अभंगाने संगीतोपासनेची अत्यंत समाधानकारक, प्रसन्न आणि भावपूर्ण सांगता झाली.

निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई१३ एप्रिल २०२६: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘भागूबाई’ या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत दिसणार असून आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ग्रामीण महाराष्ट्राच्या रंगतदार पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट २४ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘भागूबाई’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ‘भागूबाई’ या खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया पाहायला मिळते. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये नाक खुपसत ती गावात गोंधळ माजवते आणि साध्या घटनांना मोठं रूप देत नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करते. पण या सगळ्या विनोदामागे एक गंभीर सत्य दडलेलं असल्याची झलकही ट्रेलरमध्ये दिसते.

या चित्रपटाचा गाभा म्हणजे निर्मिती सावंत यांची मुख्य भूमिका. त्यांच्या खास कॉमिक टायमिंगसोबतच भावनिक अभिनयाची झलक यात पाहायला मिळते. ‘सुपर डुपर’ मधील यशानंतर त्या पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपलंसं वाटेल अशी, मातीशी जोडलेली व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

चित्रपटात भार्गवी चिरमुले, शशांक शेंडे, मंगेश देसाई, विजय पाटकर, नागेश भोंसले आणि निखिल चव्हाण यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

भागुबाई चित्रपटाची कथा एका अशा बाई भोवती फिरते, जिला गावातल्या गप्पा आणि कुचाळक्या करण्यात विशेष आनंद मिळतो. मात्र तिच्या आयुष्यात घडणारी एक अनपेक्षित घटना सगळंच चित्र बदलून टाकते. त्या घटनेनंतर तिच्या आयुष्यात आणि गावात काय बदल होतात हे या चित्रपटात पाहायला मिळेल.

या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय अमर यांनी केलेलं असून वास्तवाशी जोडलेली आणि भावनिक स्पर्श असलेली ही कथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल, तर निर्माती श्रद्धा पटेल यांनी ही कथा प्रेक्षकांपर्यंत भावनिक पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

हास्य, नाती आणि लपलेलं सत्य यांचा सुरेख मेळ साधणारा ‘भागूबाई’ हा चित्रपट एक वेगळा आणि मनोरंजक अनुभव देण्याचं आश्वासन देतो.

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद

पुणे, दि.१३ – अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुरातत्त्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व दुरुस्ती कामांमुळे सदर मंदिर दिनांक १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून मंदिरातील मुख्य रचना तसेच परिसरातील जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा ठराव घेतला असून, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनीही त्यास मान्यता देत संबंधित आदेश जारी केले आहेत.

या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री महागणपती यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहणार आहेत. मात्र, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. तसेच बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथील विकासकामे ही दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असल्याने ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या कामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक तसेच रांजणगाव देवस्थान विश्वस्तांनी केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन

0

पुणे -श्रमिक पत्रकार संघाचे आणि पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय 60 रा. कोथळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. प्रकाश भोईटे यांनी पुढारी, देशदूत, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये वार्तांकन केले. सध्या ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते.
त्यांच्या पार्थिवावर रात्री नऊ वाजता कोथळे गाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

धुरंधर 2 ने 25 दिवसांत ₹1712 कोटी कमावले

रणवीर सिंग अभिनित ‘धुरंधर द रिवेंज’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 26 दिवस झाले आहेत आणि चौथ्या आठवड्यानंतरही त्याची कमाई मजबूत आहे. सॅकनिल्कनुसार, हा चित्रपट आता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रूल’ च्या जगभरातील कमाईचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

25व्या दिवसापर्यंत धुरंधर 2 चे जगभरातील एकूण कलेक्शन 1,712.98 कोटी रुपये झाले आहे. पुष्पा 2 चे लाइफटाइम जगभरातील कलेक्शन 1,742.10 कोटी रुपये आहे. हा विक्रम मोडण्यासाठी चित्रपटाला आता 30 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची गरज आहे.तिकिटांच्या विक्रीच्या बाबतीत ‘धुरंधर 2’ सध्या ‘पुष्पा 2’ पेक्षा मागे आहे. बुकमायशोच्या आकडेवारीनुसार, धुरंधर 2 ची आतापर्यंत 1.71 कोटी तिकिटे विकली गेली आहेत. तर पुष्पा 2 ची 1.92 कोटी तिकिटे विकली गेली होती. भारतातील कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, पुष्पा 2 ने 1,234.10 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले होते. धुरंधर 2 ने आतापर्यंत फक्त 1,083.67 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच, देशांतर्गत बाजारात चित्रपट अजूनही 150.43 कोटी रुपये मागे आहे.धुरंधर 2 ची सर्वाधिक कमाई हिंदी पट्ट्यातून होत आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनचा 94% हिस्सा म्हणजे 1,017.79 कोटी रुपये फक्त हिंदी मार्केटमधून आले आहेत. तुलना केली तर पुष्पा 2 ला दक्षिणेसोबतच हिंदी पट्ट्यातून (812.14 कोटी) देखील मोठा पाठिंबा मिळाला होता. मात्र, धुरंधर 2 ला तेलुगु मार्केटमधून फक्त 41.85 कोटी रुपयेच मिळाले आहेत. याच कारणामुळे चित्रपट इंडिया नेट कलेक्शनमध्ये पुष्पा 2 च्या मागे आहे.
धुरंधर 2 च्या वर्ल्डवाइड रेकॉर्डजवळ पोहोचण्याचे सर्वात मोठे कारण त्याचे परदेशी कलेक्शन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या चित्रपटाने पुष्पा 2 ला खूप मागे टाकले आहे. धुरंधर 2 ने परदेशात 415.50 कोटी रुपये कमावले आहेत, तर पुष्पा 2 चे परदेशी कलेक्शन 259.50 कोटी रुपये होते. परदेशातून झालेल्या 156 कोटींच्या अधिक कमाईने भारतातील कलेक्शनमधील फरक कमी केला आहे.

ईको कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक:कारमधील 11 जण जागीच ठार

पुणे-कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा एक भयंकर अपघात झाला आहे. या घटनेत तब्बल 11 प्रवाशी ठार झाले असून, 2 जण गंभीर जखमी झालेत. मृतांत 3 महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळी अंगावर काटा आणणारे दृश्य निर्माण झाले होते.यासंबंधीच्या माहितीनुसार, कल्याण – नगर मार्गावर सोमवारी सकाळी एक ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात ईको कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे त्यातील 11 प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ते जागीच ठार झाले. या घटनेत इतर 2 जणही गंभीर जखमी झालेत. त्यांना लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांत 8 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील गोविली गावालगतच्या रायता पुलावर सकाळी 10.45 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त ईको कार कल्याण ते मुरबाड अशी प्रवाशी वाहतूक करते. ती आज सकाळी प्रवाशी घेऊन कल्याणहून मुरबाडच्या दिशेने निघाली होती. अपघात घडला तेव्हा त्यात चालकासह 11 ते 12 जण प्रवास करत होते. या कारला समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक झाली. त्यात कारमधील एकाही व्यक्तीला बाहेर पडण्याची संधी मिळणार नाही. ट्रकच्या धडकेने कारमधील 8 जण जागीच ठार झाले, तर इतर 1 जण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी लगतच्या उल्हासनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी ही माहिती दिली.
या भीषण अपघातामध्ये ठार झालेल्या 6 जणांची ओळख आतापर्यंत पटली आहे. उर्वरित 5 जणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातामुळे कल्याण – नगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरुळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सर्वच मृतदेह पुढील सोपस्कारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवलेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रीय महामार्ग 61 वर कल्याणजवळ दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहोत, असे ते म्हणालेत.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अपघाताबाबत निवेदन जारी करताना म्हणाले की, आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10:45 वाजण्याच्या सुमारास कल्याण – मुरबाड – माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरील नव्या पुलावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (क्र. MH-05 GA-0529) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिक्सर (क्र. MH-12 TV-3660) यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.या अपघातात ओम्नी कारमधील 11 निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अतिशय वेदनादायी बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहनाची अधिकृत क्षमता 5+1 असताना त्यामध्ये 11 प्रवासी प्रवास करत होते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.राज्याचा मोटार परिवहन विभाग अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करत आहे. मात्र, अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणे टाळावे, तसेच सुरक्षित आणि नियमबद्ध प्रवासाला प्राधान्य द्यावे, ही विनंती.

————————————————————————————————————————