Home Blog Page 32

जिद्द,कष्टातून उभा राहिला स्वावलंबनाचा नवा आदर्श

यशकथा

ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचे असेल, तर केवळ योजना पुरेशा नसतात; त्यासाठी लागते जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि संधीचा योग्य उपयोग करण्याची तयारी. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील चार महिलांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज स्वावलंबन, आत्मविश्वास आणि नेतृत्वाच्या उंच शिखरावर पोहोचला असून, त्यांच्या यशोगाथा ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत.

ग्रामीण महिलांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे मोठे कार्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) करत आहे. स्वयं-साहाय्य गटांच्या माध्यमातून महिलांना बचत, कर्जसुविधा, कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाते. या सर्व घटकांचा योग्य संगम साधला गेला, की महिलांच्या आयुष्यात केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक परिवर्तन घडते…याचे जिवंत उदाहरण म्हणजे या ‘उमेद रणरागिणी’.

श्रीमती आशा विश्वास गायकवाड यांची कहाणी ही परंपरेला आधुनिकतेची जोड देणारी आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असला, तरी त्यातून मिळणारे उत्पन्न मर्यादित असल्याची जाणीव त्यांना झाली. मात्र, त्यांनी परिस्थितीवर नाराजी व्यक्त करण्याऐवजी त्यातून मार्ग शोधला. PMFME योजना अंतर्गत मिळालेल्या अनुदानाचा उपयोग करून त्यांनी डिहायड्रेशन प्रकल्प उभारला. सुरुवातीला तांत्रिक ज्ञानाचा अभाव, बाजारपेठेची अनिश्चितता आणि आर्थिक जोखीम यांसारखी आव्हाने होती; पण ‘उमेद’च्या प्रशिक्षणामुळे त्यांनी या सर्व अडचणींवर मात केली. शेवगा, बीटरूट, केळी यांसारख्या पिकांपासून नैसर्गिक पावडर तयार करून त्यांनी ‘रसायनमुक्त उत्पादन’ ही ओळख निर्माण केली. आज त्यांच्या उत्पादनांना स्थानिक तसेच बाहेरील बाजारपेठेत मागणी असून, त्यांनी इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या यशामुळे ‘शेतीपूरक उद्योग’ ही संकल्पना गावपातळीवर रुजत आहे.

श्रीमती पुजा नितीन मारगडे यांची यशोगाथा ही संकटातून संधी निर्माण करण्याची प्रेरणा देते. कोविड-१९ लॉकडाऊनच्या काळात रोजगाराचे सर्व मार्ग बंद झाले असताना त्यांनी हार मानली नाही. ‘उमेद’कडून मिळालेल्या ४० हजार रुपयांच्या बीजभांडवलातून त्यांनी घरातूनच केक बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ग्राहक मिळवणे, उत्पादनाची गुणवत्ता राखणे आणि बाजारपेठेत टिकून राहणे ही मोठी आव्हाने होती. मात्र, त्यांच्या चिकाटीमुळे आणि सातत्यामुळे व्यवसाय हळूहळू वाढत गेला. आज त्यांच्या नेतृत्वाखाली ४४ महिला बचत गट कार्यरत असून, चकली, मसाले, बेकरी उत्पादने अशा विविध गृहउद्योगांच्या माध्यमातून महिलांना नियमित उत्पन्न मिळत आहे. पूजाताईंच्या कार्यामुळे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

श्रीमती मनीषा राजाराम कुंजीर यांनी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून सामाजिक नेतृत्वाचे वेगळे उदाहरण निर्माण केले आहे. अनेक वेळा शासकीय योजना उपलब्ध असतात, परंतु त्याची माहिती किंवा प्रक्रिया यामुळे गरजूंपर्यंत लाभ पोहोचत नाही. ही दरी भरून काढण्याचे काम मनीषाताईंनी केले. महसूल विभागाच्या सहकार्याने त्यांनी विविध शिबिरे आयोजित करून महिलांना उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड, इतर आवश्यक कागदपत्रे त्वरित मिळवून दिली. त्यांच्या पुढाकारामुळे दिव्यांग, अल्पभूधारक शेतकरी आणि वंचित घटकांना शासकीय योजनांचे कवच मिळाले. त्यांनी गावपातळीवर ‘प्रशासन तुमच्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली, ज्यामुळे महिलांचा शासन व्यवस्थेवर विश्वास अधिक दृढ झाला.

श्रीमती संध्या नितीन वारघडे यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजना आणि बालसंगोपन योजनांच्या माध्यमातून त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणास हातभार लागत आहे. संध्या आणि त्यांच्या मुलांना जगण्याचे बळ मिळाले आहे, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

या महिलांच्या यशामागे एक समान धागा आहे—‘उमेद’ अभियानाचे सक्षम मार्गदर्शन आणि जिल्हा प्रशासनाचे सातत्यपूर्ण सहकार्य. वित्तीय समावेशन, कौशल्यविकास, आधुनिक साधनसामग्री, बाजारपेठेची उपलब्धता आणि सततचे मार्गदर्शन या सर्व घटकांचा परिणाम म्हणून महिलांनी ‘गृहिणी’पासून ‘उद्योजिका’ होण्याचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

आज या महिलांच्या उत्पन्नामुळे त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत आहेत, आरोग्याची काळजी घेतली जात आहे आणि भविष्याबाबतची असुरक्षितता कमी झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी इतर महिलांनाही स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आहे, ज्यामुळे गावपातळीवर सामूहिक विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

“उमेदने आम्हाला केवळ आर्थिक बळ दिले नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवले. आज आम्ही स्वतः उभ्या राहिलो आहोत आणि इतर महिलांनाही उभे करत आहोत,” अशी भावना व्यक्त करत या ‘उमेद रणरागिणी’ ग्रामीण परिवर्तनाचे सशक्त प्रतीक बनल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील या यशोगाथा केवळ चार महिलांच्या संघर्षाची कथा नसून, त्या ग्रामीण भारतातील बदलत्या वास्तवाचे द्योतक आहेत. योग्य संधी, मार्गदर्शन आणि जिद्द यांच्या बळावर महिला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात, याचा ठोस पुरावा या ‘उमेद’ रणरागिणी देत आहेत.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

समाधान शिबिराचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते लोणीकंद येथे उद्घाटन

‘विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपुर्तीकरिता शासन प्रयत्नशील-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शासनाचे नागरिकांच्या कल्याणाकरिता लोकाभिमूख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय

पुणे, दि.१३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत-२०४७’ करण्याच्या संकल्प करण्यात आलेला आहे; ‘विकसित महाराष्ट्राच्या’ माध्यमातून या संकल्पपुर्तीच्यादृष्टीने समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध लोककल्याणकारी योजना राबवित आहे. त्याअनुषंगाने राज्यशासनाच्यावतीने लोकाभिमूख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय घेण्यात येत आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लोणीकंद येथे आयोजित समाधान शिबारात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे सदस्य किरण साकोरे, हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शी प्रशासन होते, या त्रिसुत्रीची प्रेरणा घेऊन अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर असे नाव दिले आहे. या शिबीरात जवळपास २० गावांचा यामध्ये समावेश आहे. वेगवेगळ्या विभागाच्या ४५ सेवा उपलब्ध करुन देण्यात आहेत, येत्या काळात सर्व सामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडविण्यास मदत होणार आहे. आगामी काळातही अशा प्रकारचे शिबीराचे आयोजन करावे.

या शिबाराच्या माध्यमातून राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात ४० हजार फेरफार दुरुस्ती, २० हजार सातबारा दुरुस्ती, १ लाख ५० संगणकीकृत सातबाऱ्याचे वाटप, ७५ हजार ८ अ नोंदीचे वाटप, १ लाख ७५ हजार विविध प्रकारचे प्रमाणपत्राचे वाटप, ३४ हजार एक खिडकी योजनेच्या माध्यमातून प्रमाणपत्र वाटप, २ हजार कमी जास्त पत्रक तयार केले, ५०० गावातील दस्तावेज दुरुस्ती करण्यात आले आहे, पुणे जिल्ह्यात १३ हजार ३३ दाखल्याचे वितरण करण्यात आले. एकूणच सुमारे ५ लाख परिवाराला शिबाराचा लाभ देण्यात आला असून खऱ्या अर्थाने मागील दोन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसं काम राज्य शासनाच्यावतीने केले आहे.

नागरिकांच्या जीवनात महसूल आणि गृहखात्याचे महत्वाचे आहेत, त्यादृष्टीने इतरखातेही पुढे नेण्याचे काम सुरु आहे. २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अधिकाराचे विकेंद्रीकरण करून राज्यातील एकही नागरिक बेघर राहणार नाही, याबाबत नियोजन करण्यात आले आहे. बाजार मूल्य भावामध्ये वाढ न करण्याचा निर्णय, खासगी सर्व्हरची नेमणूक, भुमि अभिलेख अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समोवश, शेतजमीन अकृषक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. महसूल विभागातील पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्यात आला. महसूल विभागाला बळकटीकरण करण्याच्यादृष्टीने महसूल विभाग, नोंदणी व मुंद्राक विभाग आणि भुमि अभिलेख विभागाचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता हवेली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वेगळी ग्रामसभा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन केले. हा निर्णय राज्यात लागू करुन ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा लागू करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून येत्या ५ वर्षात सर्व शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहे.

येत्या काळात ‘पीएमआरडीए’ क्षेत्रात तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत लवकरात लवकर बैठक घेवून सूचना देण्यात येईल. भामा-आसखेडसंदर्भात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेली शेरे कमी करण्याबाबत लवकरच पुनर्वसन मंत्री, विभागीय आयुक्त यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल. देवस्थानाच्या नावे असलेल्या इनाम जमिनीबाबत येत्या अधिवेशनात कायदा करण्यात येईल. हवेली तालुक्यातील लोणीकंदला स्वामित्व योजनेत आणून भूमिअभिलेख विभागाच्यावतीने ड्रोन सर्वेक्षण करण्यात करावे आणि मालमत्ता पत्रक आणि सनद देण्यात यावे. याकरीता खासगी सर्व्हर तातडीने नेमणूक करुन गतीने मोजणी करावी. लोकोपयोगी कामे करण्यासाठी सलोखा योजनेमध्ये १५० हेक्टर जागेचा प्रस्ताव तयार करुन सादर करावा, याप्रस्ताव जमीन देण्यात येईल.

ग्रामपंचायतीने लोकोपयोगी कामांबाबत महसूल विभागाकडे सादर करावे, त्यासही मंजुरी देण्यात येईल. कार्यक्रमात मागणी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन अडीअडचणी सोडविण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे म्हणाले.

नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नवसखी योजनेअंतर्गत २ हजार २०० महिला बचत गटांना एक लाख रुपये फिरते भांडवल देण्यात येत आहे. याप्रमाणे अशा प्रकारची योजनांची पुणे विभागात अंमलबजावणी करण्याची विभागीय आयुक्तांना मंत्री श्री. बावनकुळे यांनी सूचना केली.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महसूल विभाग शासनाचा कणा म्हणून ओळखले जाते. आपत्तीच्या काळात सर्व संबंधित विभागाना सोबत घेवून नागरिकांना दिलासा देण्याचे कामे करण्यात येते. नागरिकांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यतची सर्व प्रकारचे दस्ताऐवज महसूल विभागाशी निगडित आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुखकर व्हावे, त्यांना जलदगतीने सेवा देण्याकरिता गेल्या काळात विभागाच्यावतीने विविध क्रांतीकारी आणि लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले आहेत. नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासह योजनांची माहिती होण्यासाठी अशा प्रकारचे शिबीरे उपयुक्त आहेत. जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनःरीक्षण कार्यक्रम, भारतीय जनगणना-२०२६, शेतकरी ओळखपत्र काढण्याच्या कामात नागरिकांनी सक्रीयपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पुलकुंडवार यांनी केले.

श्री. राऊत यांनी महाराजस्व अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याबद्दल विभागाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली.

श्री. कंद म्हणाले, हवेली तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनांची कामे प्रगतीपथावर आहे. ही योजना यशस्वी करयाकरिता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून जोमाने कामे करण्यात येत आहे.महसूल विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवांबाबत समाधान व्यक्त करत येत्या काळात तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी मार्गी लावण्याची सूचनाही श्री. कंद यांनी केल्या.

श्री. साकोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.

श्री. माने यांनी प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित समाधान शिबीरात हवेली उप विभागात देण्यात आलेल्या लाभाबाबत माहिती दिली. नियमित कामे करण्यात महसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी काळातही यापुढेही अशाच प्रकारचे कामे नागरिकांना सेवा देण्यात येईल, असेही श्री. माने म्हणाले.

कार्यक्रमात महसूल विभागाचा आकृतिबंध मंजूर केल्याबद्दल मंत्री श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. श्री. बावनकुळे यांच्या हस्ते मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरुपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. तसेच महसुली सेवांची माहिती देणाऱ्या क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्री. बावनकुळे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉल भेट देवून माहिती घेतली.

श्री. बावनकुळे यांच्या हस्ते विविध विभागाच्या पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभ देण्यात आले.

अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी:SIT आता चौथ्या गुन्ह्यात घेणार ताबा,ईडीची नाशिक, पुणे, शिर्डीत छापेमारी

नाशिक -महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू अशोक खरातला आज कोर्टाने 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने त्याच्यावर दाखल तिसऱ्या गुन्ह्यात त्याला ही कोठडी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आता त्याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहेत. सरकारी वकिलांनी या प्रकरणी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे.दरम्यान ईडीने या प्रकरणी अशोक खरातच्या नाशिक येथे 5, पुण्यात 3 व शिर्डी परिसरातील 3 ठिकाणांवर छापेमारी केली आहे.

अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी त्याच्यावर तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत. विशेष तपास पथक या सर्वच प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आज त्याची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून कोर्टापुढे हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात होताच, न्यायाधीशांनी खरातला त्याचे नाव विचारले. त्यानंतर पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का? अशी विचारणाही केली. त्यावर खरातने हात जोडत नकार दर्शवला.

यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीनंतर कोर्टाने तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सरकारी पक्षाने तिसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीचा हक्क अबाधित राखून खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची परवानगी मागितली. त्यावर कोर्टाने वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा ताबा घेण्याची सूचना केली. त्यानुसार, आता वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा उद्या त्याला कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याही त्याला आजच्यासारखेच ऑनलाईन पद्धीतने कोर्टापुढे हजर केले जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, ईडीने या प्रकरणी अशोक खरातच्या नाशिक येथे 5, पुण्यात 3 व शिर्डी परिसरातील 3 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. नाशिकच्या तृप्ताबाला निवासस्थानीही ईडीने छापेमारी केली आहे. तिथे खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. शिर्डी परिसरातील समता पतसंस्थेच्या राहता येथील शाखेत ईडीचे अधिकारी पोहोचलेत. ते तिथे अशोक खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची चौकशी करत आहेत. या खात्यांमधून तब्बल 60 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे.

बिल्डरांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू:एसआयटीच्या चौकशीने बिल्डर लॉबी हादरली

मुंबई-नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात उघड झालेल्या कथित म्हाडा घोटाळ्याने राज्यभरात खळबळ उडवली असून आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील बिल्डर लॉबीमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, शहरातील 49 नामांकित बिल्डरांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नियमांनुसार, चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये 20 टक्के जागा किंवा घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) राखीव ठेवणे बंधनकारक आहे. ही घरे किंवा जमीन म्हाडाकडे वर्ग करणे आवश्यक असते. मात्र, काही विकासकांनी प्रकल्पाचे क्षेत्र कागदोपत्री कमी दाखवून किंवा नियमांतील पळवाटा वापरून ही जबाबदारी टाळल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे.

या गैरप्रकारामुळे शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप आहे. जे घरकुल गरजूंना मिळायला हवे होते, तीच घरे विकासकांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकरणामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनावरही टीका होत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक मानले जात आहे.

या पार्श्वभूमीवर गठीत करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती तयार करण्यात आली असून त्यात जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, नाशिक पोलिस आयुक्त, नगररचना संचालक आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या पथकाला सर्व कागदपत्रांची तपासणी करून संपूर्ण घोटाळ्याचा तपशील उघड करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या विकासकांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. इतकेच नव्हे तर या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा बिल्डरांना मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरही कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि विकासक या दोघांवरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, या एसआयटीला एका महिन्याच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील मोठ्या बिल्डरांची नावे पुढे येऊ शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात निर्माण झालेल्या या वादाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

रिक्षाचालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावरून बिष्णोई गँगची RTO अधिकाऱ्याला धमकी

मुंबई-मुंबईत रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या प्रस्तावामुळे निर्माण झालेला वाद आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे जाहीर केल्यानंतर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर आता गुन्हेगारी जगतातील बिष्णोई गँगने थेट हस्तक्षेप करत मिरा-भाईंदरमधील RTO अधिकाऱ्याला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर येथील वाहतूक विभागातील अधिकारी नलावडे यांना अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून धमकी देण्यात आली. ही धमकी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. बिष्णोई गँग अमराठी रिक्षाचालकांच्या बाजूने उभी राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या घटनेमुळे प्रशासनात आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की, मुंबईत रिक्षा चालवायची असल्यास चालकाला मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात येईल. मराठी भाषा न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचाही इशारा त्यांनी दिला होता. या वक्तव्यामुळे विविध स्तरांवरून प्रतिक्रिया उमटल्या आणि भाषिक वाद पुन्हा चर्चेत आला.

या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंदी भाषिक विभागाचे प्रमुख मनीष दुबे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, रिक्षाचालक हे मुंबईच्या वाहतुकीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. अनेक चालकांनी कर्ज काढून रिक्षा घेतली असून ते लाखो प्रवाशांना सेवा देतात. अशा परिस्थितीत अचानक भाषिक अट लादणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.मनीष दुबे यांनी पुढे सुचवले की, मराठी भाषा शिकण्यास विरोध नाही, मात्र त्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्यांनी सांगितले की, जर सरकारने एक वर्षाचा कालावधी दिला आणि 1 एप्रिल 2027 पर्यंत मराठी शिकण्याची अट ठेवली, तर त्याला समर्थन देता येईल. पण अल्प कालावधीत सक्तीचा निर्णय घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात बिष्णोई गँगच्या धमकीने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. प्रशासनाने या धमकीची दखल घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही उपाययोजना करण्यात येत आहेत. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

एकूणच, मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून सुरू झालेला वाद आता राजकीय आणि गुन्हेगारी अशा दोन्ही पातळ्यांवर पोहोचला आहे. पुढील काळात सरकार या मुद्द्यावर काय भूमिका घेते आणि तपास यंत्रणा या धमकीप्रकरणी काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील भाषिक समतोल राखताना प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुणे महानगरपालिकेत प्रथमच महापौरांच्या पुढाकारातून पुस्तक वितरण उपक्रम

पुणे महानगरपालिका यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यंदा प्रथमच महापौरांच्या पुढाकारातून पुस्तक वितरणाचा अभिनव व स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत अकरावीच्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनकार्य व विचारांवर आधारित पुस्तके वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमास महापौर मंजूषा नागपुरे प्रमुख उपस्थित होत्या. तसेच विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, आरपीआय गटनेते हिमाली कांबळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण राजवाडे, नगरसेविका स्वप्नाली पंडित व अर्चना जगताप तसेच शिक्षण विभाग उपायुक्त वसुंधरा बारवे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते ॲड. क्षितिज गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व, शिक्षणाचे स्थान आणि सामाजिक बांधिलकी याबाबत प्रेरणादायी भाषण केले.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, तसेच समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जाणीव अधिक दृढ करणे हा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या अभिनव उपक्रमाचे शहरभर स्वागत होत असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक, शैक्षणिक व सामाजिक जागरूकता वाढविण्याचा मानस महानगरपालिकेने व्यक्त केला आहे.

पुण्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’

राज्य व केंद्रातील मान्यवरांची उपस्थिती; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य ‘संयुक्त अभिवादन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात राज्य व केंद्र सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत.

या सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, पार्थ पवार, मेधा कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा हे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय विविध पक्षांचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (काँग्रेस), धिरज घाटे (भाजप), सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस), गजानन थरकुडे (शिवसेना उ.बा.ठा.), रवींद्र धंगेकर (शिवसेना) आणि श्रीकांत पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) हेही उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे नियोजन उपमहापौर परशुराम वाडेकर, अध्यक्ष राहुल डंबाळे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अविनाश साळवे आणि बाळासाहेब जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पुणे शहर व परिसरातील नागरिकांनी या अभिवादन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

युवा नेते जय पवार यांच्या या कृतीनं अजितदादांची आठवण; अजान सुरु होताच थांबवलं भाषण..

बारामती : अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणुक होत आहे..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ युवा नेते जय पवार हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करत आहेत.. स्थानिक पातळीवरील समस्या समजून घेतानाच ग्रामस्थांशी ते संवाद साधत आहेत.. आज सिद्धेश्वर निंबोडी येथे गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार हे ग्रामस्थांशी संवाद साधत असताना अजान सुरु झाली.. त्यावेळी जय पवार यांनी आपलं भाषण थांबवलं.. अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली.. त्यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणींनाही उजाळा दिला.. जय पवार यांची ही कृती उपस्थितांना अजितदादांची आठवण करुन देणारी ठरली.. दरम्यान, गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं संवाद साधताना जय पवार हे अजितदादाच्या आठवणीत भावूक झाल्याचं पहायला मिळालं..

शरद मोहोळ खून :आरोपींना मदत केल्याचा आरोप असलेल्या वकील संजय उधाणचा जामीनअर्ज फेटाळला

पुणे–पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपी असलेल्या वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी संजय उधाण याने गुन्ह्याच्या कटकारस्थानात सहभाग घेतला होता, तसेच गुन्ह्यानंतर आरोपींना मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले.संजय उधाण असे या वकिलाचे नाव आहे. विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप सिंग राजपूत यांनी, तसेच मूळ फिर्यादीचे वकील ॲड. खेतराम सोलंकी, ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव आणि ॲड. तेजस सावंत यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध केला.

घटनेनंतर लगेचच आरोपी संजय उधाण यांचा मुख्य आरोपी नामदेव कांगुडे याच्याशी फोनवर संपर्क झाला होता. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार करणारे साहिल पोळेकर, नामदेव कांगुडे आणि चंद्रकांत शेलके यांना आपल्या गाडीतून पळून जाण्यास मदत केली, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.

उधाण यांनी सहआरोपी वकील रवी पवार यांच्याशी संपर्क साधून इतर आरोपींना गाडीतून हलविण्याची व्यवस्था केली. तसेच, सहआरोपींना सिम कार्ड नष्ट करण्याचा सल्ला दिला गेला आणि खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ नवीन सिम कार्ड पुरविण्यात आले. आरोपीने नवी मुंबई क्राईम ब्रांचमधील अधिकाऱ्याशी संपर्क साधून आत्मसमर्पणाबाबत चर्चा करण्याचाही प्रयत्न केला होता, यावरून त्यांना गुन्ह्याची पूर्वकल्पना असल्याचे दिसून येते, असे ॲड. राजपूत आणि सोलंकी यांनी जामीनाला विरोध करताना सांगितले.

बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, संजय उधाण हे व्यवसायाने वकील असून आरोपी त्यांचे पूर्वीचे पक्षकार होते. त्यांच्याशी झालेला संपर्क केवळ व्यावसायिक स्वरूपाचा होता. तसेच, सहआरोपी रवी पवार यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने समानतेच्या तत्त्वावर त्यांनाही जामीन द्यावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली.

न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावताना नमूद केले की, रवी पवार यांची भूमिका मर्यादित होती आणि त्यांचा थेट शूटरांशी संपर्क नव्हता. उलट, संजय उधाण यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत करणे, त्यांच्या हालचालींचे समन्वय करणे आणि आत्मसमर्पणाबाबत प्रयत्न करणे यावरून त्यांचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग प्रथमदर्शनी दिसून येतो. न्यायालयाने ‘कायदेशीर सल्ला’ या बचावालाही नाकारले.

अमेरिका आजपासून होर्मुझ स्ट्रेटवर नाकेबंदी करणार

:ट्रम्प म्हणाले- इराणी नौदल नष्ट, 158 जहाजे उद्ध्वस्त केली; कच्च्या तेलाची किंमत पुन्हा 100 डॉलर पार
वॉशिंग्टन डीसी-अमेरिका आजपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी लागू करत आहे. यूएस सेंट्रल कमांडनुसार, इराणी बंदरांकडे ये-जा करणारी जहाजे भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजल्यापासून रोखली जातील.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणला तेल विक्री करण्यापासून रोखणे हा या नाकेबंदीचा उद्देश आहे. ट्रम्प यांच्या मते, या प्रयत्नात इतर अनेक देश अमेरिकेला पाठिंबा देत आहेत. ट्रम्प यांनी दावा केला की, इराणच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे नौदल अक्षरशः नष्ट झाले आहे. त्यांनी सांगितले की १५८ जहाजे नष्ट झाली आहेत.

नाकेबंदी जाहीर झाल्यापासून जागतिक तेलाच्या किमती वाढल्या असून, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट प्रति बॅरल १०४ डॉलर आणि ब्रेंट क्रूड १०२ डॉलरच्या वर पोहोचले आहे.

दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार, पाकिस्तानमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर अमेरिका इराणवर आणखी एका लष्करी हल्ल्याचा विचार करत आहे. व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे की सर्व पर्याय खुले आहेत आणि पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेतले जातील.
चीनचे आवाहन- ट्रम्प यांच्या नाकेबंदीच्या धमकीला प्रतिसाद म्हणून सर्व पक्षांनी संयम बाळगावा
ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्याची धमकी दिल्यानंतर, चीनने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित, स्थिर आणि खुली ठेवणे हे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समान हिताचे आहे.

या महत्त्वाच्या सागरी मार्गात कोणताही व्यत्यय आल्यास त्याचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा चीनने दिला असून, ऊर्जा सुरक्षा आणि पुरवठा कायम राखण्यासाठी सर्व पक्षांसोबत काम करण्यास आपण तयार असल्याचेही म्हटले आहे.

अनोळखी लिंकवर क्लिक, मोबाईल केला हॅक;अन आठ लाखांची ऑनलाइन फसवणूक


पुणे:एका ज्येष्ठ नागरिकास मोबाईलवरील अनोळखी लिंक उघडणे चांगलेच महागात पडले. सायबर चोरट्यांनी या लिंकद्वारे त्यांचा मोबाईल ‘हॅक’ करून बँक खात्यातून सात लाख ९६ हजार रुपयांची रक्कम परस्पर लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एरंडवणे परिसरातील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडलेला आहे. काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून एक लिंक पाठवली. ज्येष्ठ नागरिकाने ती लिंक उघडताच सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर तांत्रिकदृष्ट्या ताबा मिळवत बँक खात्यातून चोरट्यांनी परस्पर सात लाख ९६ हजार रुपयांची रोकड लांबविली. बँक खात्यातून अचानक एवढी मोठी रक्कम कमी झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकास फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

महिलेवर लैंगिक अत्याचार:पुण्यात आणखी एका भोंदू बाबावर गुन्हा दाखल

पुणे: पती-पत्नीतील मतभेद दूर करून पुन्हा एकत्र आणण्याचं आमिष दाखवत एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी ४२ वर्षीय महिलेनं स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार २७ मे २०२१ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचं पोलीसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत:ला ‘देवऋषी’ असल्याचं भासवून महिलेला तिच्या वैयक्तिक अडचणी सोडवून देण्याचं आश्वासन दिलं. विशेषतः पतीशी असलेले मतभेद दूर करून दोघांना एकत्र आणण्याचं आमिष दाखवत त्याने तिचा विश्वास संपादन केला. ओळख वाढवल्यानंतर आरोपीने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केला.
यानंतर आरोपीने लोणेरे, उतेखोल आणि माणगाव आदी ठिकाणी वारंवार तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. याचदरम्यान आरोपीने नोकरी लावून देण्याचं, बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करून जादा परतावा मिळवून देण्याचं, तसेच बंगला घेऊन देण्याचं आमिष दाखवत महिलेची फसवणूक केली. फिर्यादी महिलेचा एकटेपणा ओळखून आरोपीने तिच्याशी जवळीक साधली आणि वेळोवेळी तब्बल ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. तसेच दारूच्या नशेत तिच्या घरी जाऊन शिवीगाळ, दमदाटी करून जबरदस्तीने अत्याचार केल्याचाही आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील करत असून, आरोपीविरुद्ध फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू

आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार
मुंबई, दि.12 : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नावीन्य पूर्ण रुग्णस्नेही बदल करण्याचे काम सुरु आहे. त्याचाच एक भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली असणार आहे. रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. त्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, गेल्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी 6 लाख 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यामुळे आता अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचे अधिकृत उद्घाटन लवकरच होणार असून, त्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गरजू रूग्णांनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

आमन तांबे :- आधुनिक तमाशा सृष्टीचा ‘बादशाह’

0

लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख आहे. या परंपरेला आपल्या प्रतिभेने समृद्ध करणाऱ्या कलावंतांमध्ये आमन तांबे पुणेकर यांचे तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय असे आज ही नाव घेतले जाते. गोड आवाज, प्रभावी सूत्रसंचालन आणि अभिनयाची अफाट ताकद या तिन्ही गुणांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत होता.

आमन तांबे हे केवळ कलाकार नव्हते, तर ते लोककलेचे खरे जतनकर्ते होते. त्यांच्या आवाजातली मधुरता आणि भावस्पर्शी सादरीकरणामुळे प्रत्येक कार्यक्रमाला एक वेगळीच उंची लाभत असे. सूत्रसंचालन करताना त्यांच्या ओघवत्या शैलीतून कार्यक्रमाला रंगत येत असे, तर अभिनयाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना हसवत, रडवत आणि विचार करायला भाग पाडत.
लोकनाट्य तमाशा या पारंपरिक कलेत त्यांनी दिलेले योगदान नोंद घेण्यासारखी होती.. त्यांनी परंपरेचा गाभा जपत आधुनिकतेची जोड दिली आणि ही कला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. गावोगावी जत्रा, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती म्हणजे कार्यक्रमाची शान समजली जायची.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात साधेपणा, जिद्द आणि कलेप्रती अपार प्रेम होते. सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याने वागणारा, नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणारा आणि रसिकांशी आत्मीयतेने जोडला जाणारा हा कलाकार सर्वांच्या मनात घर करून गेला.
त्यांची कौटुंबिक पार्शवभूमी पाहिली तर अहमद फकीर मोहम्मद तांबे यांनी 1921 साली पुण्यात आर्यभूषण थिएटरची स्थापना केली.हे थिएटर म्हणजे तमाशा कलावंतांची कर्मभूमी होती.येथे अनेक लोककलावंत घडले.
म्हणूनच पूर्वी पुण्याला लोककलेचे माहेर घर सुद्धा म्हणायचे. अहमद शेठ यांनी सुद्धा काही कालावधीनंतर आपला स्वतःचा सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांच्या नावाने तमाशाचा फड काढला.आणि महाराष्ट्राभर हा तमाशा फिरविला.पारंपारिक नामांकित तमाशा म्हणून हा फड नावारुपाला आला.

एकेदिवशी सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांच्या तमाशाच्या रंगमंचावर सोळा वर्षाचा गुबगुबीत, सतत स्मित हास्य करणारा मुलगा रंगमंचावर चढला अन आपल्या गोड आवाज गाणी म्हणून लागला.चित्रपटाच्या विविध गाण्यावर नाचू लागला.तमाशातील अभिनय करून लागला.अशा या मुलाचे नाव होते. आमन अहमदशेठ तांबे.त्यांचा जन्म पुण्यातील गणेश पेठेतील जुन्या घरी दिनांक 03मार्च 1960 रोजी झाला. खरं तर अनेकांना प्रश्न पडतो. आमनशेठ हे मुस्लिम समाजाचे आहेत,तर त्यांचे आडनाव तांबे कसे..! असा अनेकांना प्रश्न पडतो. मुळात अहमदशेठ तांबे यांची कुळ- वंशावळ ही कोकणातील आहे. त्यांचे पूर्वज हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालधोल (ता.चिपळूण ) या गावचे रहिवाशी होते.अन कोकणात बहुतेक मुस्लिम समाजातील आडनावं ही मराठीत असतात.किंवा त्यांच्या गावावरून असतात.

आमन शेठ केवळ एक कलाकार नव्हते , तर एक बहुआयामी कलावंत होते. त्यांच्यात विविध कलेचे पैलू होते. त्यांच्या आवाजातली गोडी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी होती, तर सूत्रसंचालन करताना ते कार्यक्रमाला एक वेगळीच उंची दयायचे. त्यांच्या शब्दांमध्ये ओघवती शैली आणि प्रसंगानुरूप विनोदबुद्धी असल्यामुळे प्रेक्षकांशी त्यांचा सहज संवाद साधला जायचा. दादा कोंडके आणि निळू फुले यांचा आवाज ते काढायचे.त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी वाहून घेण्याचे ठरविले.
म्हणूनच एके दिवशी आमन तांबे पुणेकर सह सरस्वती कोल्हापूरकर असा तमाशाचा बोर्डावर आणि तमाशाच्या गाड्यावर झळकला. अन खऱ्या अर्थाने आपल्या कलागुणांनी आमन तांबे महाराष्ट्रातील लोककला क्षेत्रात नावारुपाला आले.

अभिनयाच्या क्षेत्रातही आमन तांबे यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती. विविध भूमिकांमध्ये ते सहजपणे रंगून जायचे. त्यांची अभिनयशैली ही नैसर्गिक आणि प्रभावी असल्यामुळे प्रेक्षकांना ती आपलीशी वाटत होती. विशेषतः लोकनाट्य तमाशा सारख्या पारंपरिक कलेत त्यांनी केलेले काम हे उल्लेखनीय असायचे. प्रत्येक जिल्ह्यातील गावातील कला रसिकांना काय हवं आहे.यांची जाण त्यांना चांगलीच ठाऊक होती.म्हणून प्रत्येक गावात ते तमाशा बदलून करायचे.रंगमंचावर आल्यावर कला रसिकांना आपलसं करून घेण्याची त्यांची एक आगळी वेगळी पद्धत होती.आमन तांबे थेट रंगमंचावरून खाली बसलेल्या प्रेक्षकांमध्ये उतरायचे. “जव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, निसर्ग राजा ऐक सांगतो, जीवा शिवाची बैल जोडी, माझ्याकडे बघती गालत हसती, बांगो.. बांगो.. सारा जमाना हसीने का दिवाना, जीले ले जीले आयो आयो जीले ले..! अशा गाण्यावर त्यांनी रसिकांना थिरकायला लावायाचे. विशेष म्हणजे एलईडी लाईटचा ड्रेस घालून ते रंगमंचाच्या खाली लोकांमध्ये मिसळायचे.हिंदी मराठी गीतांचा तो एक काळ त्यांनी गाजविला. शिर्डीच्या साई बाबाचे ते एक आपल्या गोड आवाजात साईबाबा बोलो..! हे भक्तीगीत अत्यंत भक्तिमय स्वरात गात असायचे. या भक्ती गीताला लोकं टाळ्या वाजवायचे. अगदी जमलेले प्रेक्षक अगदी भक्ती रसात बुड्यायचे, असे हे आमन तांबे साई बाबांची वेशभूषा परिधान केल्यावर तर अनेक वेळा ओळखू सुद्धा यायचे नाही.येवढा प्रभाव त्यांनी या गाण्यात निर्माण केला होता.मात्र त्यांच्या तमाशाचे एक वैशिष्ट दिसते की, कधी ही थिल्लर मुलांनी कोणत्या गाण्यासाठी तमाशा बंद पाडला नाही.कारण अमन तांबे आपल्या मधुर आवाजाने रसिकांना ताब्यात ठेवत होते.त्यांनी कधी प्रेक्षकांच्या हातात आपला तमाशा जावून दिला नाही.असे सांगितलं जाते.

परंपरेचा सन्मान राखत आधुनिकतेचा स्पर्श देण्याची त्यांची इतरांपेक्षा एक वेगळी हातोटी होती. अन यामध्ये अमन तांबे यांचा कोणी हात धरू शकत नव्हता. एखाद्या हिंदीतील चित्रपट अभिनेत्यासारखा त्यांचा एक रुबाब असायचा.मराठवाड्यात, कोकणातील रायगड पट्ट्यात त्यांच्या भेटीसाठी तमाशाचा प्रेक्षक मागे लागायचे. असा त्यांनी आपला एक दबदबा निर्माण केला होता. कोणी त्यांना ज्युनिअर अमिताभ बच्चन म्हणत, तर कोणी त्यांना ज्युनिअर मिथुन चक्रवती म्हणायचे. असे म्हणतात की, 80 आणि 90 च्या दशकात तमाशाला आधुनिकतेचे स्वरूप त्यांनी दिले. एलईडी ड्रेस त्याला आपण लाईट अप कॉसच्यूम म्हणतो. (light up costume ) हा तमाशात पहिला प्रकार अमन तांबे यांनी आणला. इको साउंड सिस्टीम,मिरर बॉल,स्टॉपर लाईट,कलावंतांच्या ग्रुप डान्समध्ये एक सारखे ड्रेसिंग आणि तमाशा सृष्टीत रंगबाजीचा ड्रॉप पडदा. प्रथमच त्यांनी आपल्या तमाशा वापरला.
सूत्रसंचालन करताना आमन तांबे कार्यक्रमाची सूत्रे इतक्या प्रभावीपणे हाताळायाचे की, प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहायचा. कार्यक्रमाचा प्रत्येक भाग सुसंगत आणि रंगतदार ठेवण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. त्यामुळे ते केवळ सूत्रसंचालक नसून कार्यक्रमाचे आत्मा बनला होता.
लोककलेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. गावोगावी होणाऱ्या जत्रा, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती म्हणजे कार्यक्रमाची शान मानली जायची.एक काळ असा होता की,त्यांच्या तमाशाला आठ -आठ मॅनेजर काम करीत असायचे.त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात त्यांच्या फडाला चांगली बुकिंग होत होती.

अभिनयचा बुलंद आवाज..!

​आमन तांबे यांची खरी ओळख त्यांच्या पहाडी आवाजात आणि डोळ्यांतील जाज्वल्य अभिनयात होती. ‘संताजी घोरपडे’ या वगनाट्यात त्यांनी साकारलेला ‘औरंगजेब’ आजही रसिकांच्या स्मरणात जिवंत आहे. जेव्हा ते रंगमंचावर औरंगजेबाच्या वेशात उभे राहत, तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येत असत. क्रूरता, अगतिकता आणि दरारा यांचा असा त्रिवेणी संगम त्यांच्या अभिनयातून उमटत असे.त्यांची काही गाजलेली वगनाट्ये म्हणजे लोककलेच्या इतिहासातील सोनेरी पाने आहेत. शौर्याची गाथा मांडणारे पाच तोफाची सलामी, प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा भावूक वगनाट्य आईचं काळीज, अस्सल मराठी मातीचा संघर्ष सांगणारा दख्खनचा मराठा, खंडोबाची चोरी,, अशा वगनाट्यात त्यांनी जीव ओतून केलेल्या अभिनयला पाच तोफाची सलामी दयावी. अशा भूमिका त्यांनी साकारल्या.

आपला गावच्या रागड्या तमाशा बरोबर त्यांची चित्रपट क्षेत्राकडे ही एक वेगळी ओढ होती.त्यामुळे चित्रपट सृष्टीत जे काही नवीन लाईट सिस्टीम आली की,हे जर आपल्या तमाशात आणले तर…. असा प्रश्न लगेच त्यांना पडायचा.म्हणून त्या काळात जेवढी लाईट सिस्टीम एखाद्या चित्रपटात आपण बघितली की ,पुढच्या तमाशा सिझनला ती लाईट सिस्टीम आपल्याला अमन तांबे यांच्या तमाशात हमखास दिसायची. त्यामुळे आमन तांबे पुणेकर यांनी तमाशा आणि चित्रपट सृष्टीतील मनोरंजनाचा मिलाप अगदी पद्धतशीरपणे जुळवला होता.त्यातून कुठेही तमाशाच्या परंपरेला धक्का न लावता, त्यांनी आपली एक वेगळी कलाकृती निर्माण केली होती.
हिंदी मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांशी त्यांचे जवळचे संबंध होते.हिंदी चित्रपट अभिनेता राकेश रोशन,जॉनी लिव्हर,गोविंदा धर्मेद्र,हेमा मालिनी, मराठी चित्रपट सृष्टीतील दादा कोंडके,लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक दिग्गज कलावंतांचे त्यांचे घरोब्याचे संबंध होते.अनेक अभिनेते त्यांच्या घरी जेवून जायचे.परंतु त्याचा कधीच गाजावाजा केला नाही. अगदी दुबई,सिंगापूर, लंडन,मॉरीशस या ठिकाणी त्यांनी आपला कार्यक्रम नेवून महाराष्ट्राची पारंपारिक लावणी,बतावणी तिथल्या रसिकांना दाखविल्या.गोवा,गुजरात,कर्नाटक,राजस्थान,मध्यप्रदेश या राज्यात त्यांनी आपला कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर केला.त्यांचे हिंदीवर चांगले प्रभुत्व असल्याने अनेक शेरशायरी ते स्वतः तयार करीत होते. त्यामुळे इतर राज्यातील कला रसिक अमन तांबे यांच्या तमाशाला विशेष उपस्थिती लावून त्यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचे.
आमन तांबे यांनी पंढरीची वारी या चित्रपटात जेष्ठ लावणी सम्रादयी मोहना म्हाळुंगेकर यांची सखी बहिण चंदाबाई यांच्यासोबत जेजुरी गडावर शूटिंग झालेल्या एका गाण्यावर छान नृत्य ही केले आहे. कार्यकर्ता नावाचा चित्रपटात ही त्यांनी महत्वाच्या भूमिका केली आहेत.अल्फा मराठी चॅनेलवर सोंगाड्या बाज्या या सिरीयलमध्ये त्यांनी विजय कदम आणि उषा नाईक यांच्या सोबत भूमिका केली.
सुप्रसिद्ध नांदेड जिल्ह्यातील घोडे माळेगावच्या यात्रेत तर त्यांनी तीन वेळा पहिला क्रमांक पटकवला होता.एकदा तर त्यांनी ज्युनिअर दादा कोंडके यांना रंगमंचावर आणले.अन संपूर्ण गर्दी आपल्याकडे ओढून घेतली होती.
2010 ते 2012 या कालावधीत आमन तांबे सह ईश्वर बापू पिंपरीकर,(बारामती) 2012 ते 2013 या काळात छाया खिल्लारे आणि 202014- 2015 या काळात काळू नामू वेळवंडकर, यांच्यासोबत तमाशाचा फड त्यांनी गाजविला.
नंतर पुन्हा स्वतंत्र फड सुरु केला.मात्र 2016मध्ये सुप्याच्या यात्रेत अचानक आमन तांबे यांची तबेत बिघडली. अन तेथून त्यांच्या तमाशाला उरतील कळा लागली.मात्र त्यांचे चिरंजीव राहिल तांबे यांनी पुन्हा आपल्या वडीलांचा फड सावरण्यासाठी पुढाकार घेतला. 2017 मध्ये सिनेस्टार आमन तांबे पुणेकर यांचे चिरंजीव राहिल तांबे पुणेकर हा पुन्हा नव्याने तमाशा जोमाने उभा केला.रंगमंचावर वडीलांची अनुपस्थिती त्याला सतावत होती. पण तो हरला नाही. अन एकेदिवशी त्याने स्वतः रंगमंचाचा ताबा घेतला.
आता तो एक उत्कृष्ट नावाजलेला डान्सर म्हणून रंगमंचावर काम करतोय.

जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, अनेक वेळा घोडे माळेगावला आमचा शेजारी तमाशा असला की,आमन आधी माझ्या पाया पडून मग आपल्या तमाशाच्या बोर्डावर चढायचा.येवढा गुणी कलावंत होता.त्यांचे वडील अहमदशेठ तांबे यांनी आम्हाला खूप मदतीचा हात दिला.जेव्हा जेव्हा आर्य भूषणला आमचा तमाशा असायचा तेव्हा अहमद शेठ हे आजची बारी छान झाली.असं कौतुक करून कलाकारांना पाठबळ दयायचे.
जेष्ठ तमाशा कलावंत आतांबर तात्या शिरढोणकर यांनी म्हटले आहे की,तमाशाला आधुनिकतेची कलाटणी अमन तांबे यांनी दिली.त्यांना आम्ही ज्युनिअर मिथुन चक्रवती म्हणायचो.सरस्वतीबाई कोल्हापूरकर ह्या पारंपारिक तमाशा कलावंत होत्या.अन आमनशेठ हे उत्कृष्ट गायक,सूत्रसंचालन करणारा कलावंत होता. उत्तम हिंदी त्यांना यायचे. त्यामुळे दोघांच्या कष्टाने या तमाशाला चांगली सांगड घालली गेली.

ईश्वर बापू पिंपरकर यांना सुद्धा त्यांचा सहवास लाभला होता.त्यांनी ही या आठवणीला उजाळा दिला. आमन तांबे कलावंतांच्या पोटाचा पोटमारा कधी करत नव्हते.कोणाचे दोन पैसे त्यांनी कधी थकविले नाही. पुण्याचे गणपती,मुंबईची दिवाळी,बारामतीचे डोले,आणि साताऱ्याचे शिलांगण कधी चुकवू नये असे म्हणतात.कारण पुण्यातील गणपतीचे डेकोरेशन हे लाईट सिस्टीममुळे बघण्यासारखं असतात. मग तिच लाईट सिस्टीम कितीही महागडी असो.अमन शेठ आपल्या तमाशात आणायचे अन तमाशा रंगीत संगीत करायचे.एका सिझनला तर खोपोली येथील बोबल्या विठोबाच्या यात्रेला आमन तांबे यांनी साई बाबांची वेशभूषा परिधान केले होते..मात्र काही मिनिट त्यांच्या पत्नीला आणि मला सुद्धा आमनशेठ ओळखू आले नाही.असे ईश्वर बापू यांनी त्यांच्या बद्दल आठवणी सांगत होते.

दिवाळीच्या काळात पूर्वी मुंबईला नामांकित तमाशाचे फड यायचे.अन त्यांचे कार्यक्रम लालबागच्या हनुमान थिएटर,शिवडीच्या प्रबोधनकार ठाकरे मैदान,घाटकोपर,मानखुर्द, अशा विविध ठिकाणी तमाशाचे फड रंगायचे.एकदा एका मोठ्या इंग्रजी दैनिकाच्या वृत्तपत्राच्या एका जेष्ठ पत्रकाराला तमाशा फड मालकाची मुलाखत घ्यायची होती. ऐन दिवाळीत आमन तांबे यांचा तमाशा प्रबोधन ठाकरे मैदानात आला होता.तेथे दोघांची भेट झाली.आमन शेठ यांनी तमाशा सृष्टीतील परिस्थितीची माहिती दिली.मग एका रविवारच्या अंकात त्यांच्या इंग्रजी दैनिकात स्पेशल संडे पुरवणीमध्ये आमन तांबे यांच्यावर फोटो सह एक मोठी मुलाखत आली.अन त्यांच्या मुलाखतीची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली होती.

त्यांनी पन्नास वर्षं लोककलेची सेवा केल्याबद्दल शाहीर पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुरस्कार देवून सन्मान केला.पण राज्य सरकारला अशा लोककलावंतांची यापूर्वी दखल घ्यावीशी वाटली नाही.आमन तांबे यांनी कधी ही आपला तमाशा हाताबाहेर जावून दिला नाही.कधी ही आपल्या तमाशाची अप्रतिष्ठा केली नाही.

दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी आमन तांबे यांच्या निधनाने लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे. मात्र, त्यांच्या कलेच्या आठवणी, त्यांनी दिलेला आनंद आणि त्यांनी जपलेली परंपरा यांमुळे ते सदैव रसिकांच्या मनात जिवंत राहतील.
या निमित्याने त्यांचा एक गाजलेला शेर आठवतो.तो शेर नेहमी रंगमंचावर आल्यावर ते बोलायचे.

“दूर से देखा तो विरान था
सामने देखा तो कब्रिस्तान था
चलते चलते पैरों तले एक हड्डी दबी उस हड्डी का यह बयान था
कि यह चलने वाले चलना जरा संभल कर
किसी जमाने में
मैं भी एक इंसान था..!

असा हा “स्वर, शब्द आणि अभिनय यांचा सुरेल संगम असलेला हा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्याची कला आणि आठवणी कायम जिवंत राहतील.”

लेखक – खंडूराज शं.गायकवाड
khandurajgkwd@gmail.com
मो.9819059335

भारतीय नौदलाची पहिली कमांडर परिषद 2026 नवी दिल्लीत

नवी दिल्ली-

भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक कमांडर परिषद 2026 ची पहिली आवृत्ती 14 एप्रिल ते 16 एप्रिल 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत नवी दिल्लीतील नौसेना भवन येथे आयोजित करण्यात येणार आहे. ही सर्वोच्च स्तरावरील परिषद राष्ट्रीय सागरी हितांचे संरक्षण करण्यासाठी नौदलाच्या कार्यात्मक स्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी, क्षमता विकासासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टांशी धोरणात्मक समन्वय साधण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि भारतीय महासागर क्षेत्रात बहुराष्ट्रीय दलांची उपस्थिती लक्षात घेता, भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी जलद नौदल तैनातीच्या संदर्भात या आवृत्तीला विशेष महत्त्व आहे. ‘आॅपरेशन सिंदूर’ नंतर नौदलाच्या कार्यपद्धती, आंतरसेवा समन्वय आणि तंत्रज्ञानाधारित प्रतिसाद यंत्रणा यांची पुनर्पुष्टी करण्यासाठीही ही परिषद महत्त्वपूर्ण ठरते.

या परिषदेत संरक्षण दल प्रमुख आणि गृहमंत्रालयाचे सचिव यांची भाषणे होणार असून वरिष्ठ नौदल नेतृत्वासोबत सखोल चर्चा होणार आहे. या संवादांद्वारे परस्पर कार्यक्षमतेत आणि संयुक्ततेत वाढ करण्याबरोबरच राष्ट्रीय स्थैर्य, सुरक्षा रचना आणि भविष्यातील सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहयोगी दृष्टिकोन यावर व्यापक विचारमंथन केले जाईल. ही परिषद राष्ट्रीय नेतृत्वासोबत घनिष्ठ संवाद साधण्यासाठी आणि नौदलाच्या योजनांसाठी धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

नौदल प्रमुख, कार्यकारी कमांडर आणि वरिष्ठ नौदल नेतृत्व यांच्यासह, सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत बहुआयामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच्या योजनांचा यावेळी आढावा घेतील आणि त्यांचे मूल्यमापन करतील. सुरक्षा गरजांबरोबरच, निर्णायक कार्यात्मक यश मिळवणे, महासागरी कार्यक्षमता वाढवणे, प्रशिक्षण, मनुष्यबळ व्यवस्थापन, शाश्वत देखभाल पद्धती, मानवरहित प्रणालींचा प्रभावी वापर, संचालनात्मक रसद व्यवस्था आणि लढाऊ तयारीसाठी आवश्यक इतर घटकांवर यामध्ये चर्चा केली जाईल. तसेच, संपूर्ण नौदलासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कृती आराखड्याची अंमलबजावणी आणि डेटा-आधारित तंत्रज्ञानाचा वापर यावरही यात चर्चा नियोजित आहे.

विस्तृत दृष्टीकोनातून, भारतीय सागरी सिद्धांतामध्ये (आयएमडी) नमूद केलेल्या भारतीय नौदलाच्या चार भूमिकांनुसार, सरकारच्या निर्देशानुसार लष्करी यश मिळवण्यासाठीची एकूण तयारी वरिष्ठ नेतृत्वाद्वारे या परिषदेत तपासली जाईल. यामध्ये सातत्यपूर्ण कार्यवाही, आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विस्तार, तसेच भारत सरकारच्या  प्रदेशांमधील सुरक्षेसाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती ( महासागर) या दृष्टिकोनाला चालना देणे आणि स्वदेशीकरण व नवोन्मेष यावर भर देणे यांचा समावेश असेल. परिषदेदरम्यान झालेल्या चर्चांमुळे भारतीय नौदलाला आयओआर आणि हिंद प्रशांत प्रदेशात पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून प्रस्थापित करण्यास निश्चितच मदत होईल.