-स्थानिक व्यावसायिकांना जाणीवपूर्वक स्पर्धेतून बाहेर काढल्याचा आरोप
पुणे-महापालिकेने शहराचे उत्पन्न वाढवण्यासाठी आखलेले नवीन जाहिरात धोरण आणि त्यासाठी काढलेली निविदा वादात सापडली आहे. या धोरणामुळे उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नसून, उलट शहराचे विद्रुपीकरण होण्याची भीती माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र लिहून या ‘अविचारी’ धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेने जाहिरात धोरणासाठी काढलेल्या निविदेत एक जाचक अट टाकली आहे. ज्या ठेकेदाराची गेल्या पाच वर्षांतील उलाढाल १०० कोटी रुपये आहे, तोच या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. या अटीमुळे स्थानिक आणि मध्यम आकाराच्या व्यावसायिकांना स्पर्धेतून बाद करून केवळ मोठ्या कंपन्यांचे हित जपले जात असल्याचा आरोप होत आहे. एकाच ठेकेदाराला संपूर्ण शहराचे ‘निर्विवाद अधिकार’ देणे हे स्पर्धात्मक वातावरणाच्या दृष्टीने घातक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रस्तावित धोरण ‘प्रॉफिट शेअरिंग’च्या (३० टक्के हिस्सा) तत्त्वावर आधारित आहे. मात्र, यात मोठी त्रुटी अशी की, जर ठेकेदाराला उत्पन्न मिळाले नाही, तर तो पालिकेला किमान किती रक्कम देणार, याचे कोणतेही स्पष्टीकरण निविदेत नाही. याचाच अर्थ, ठेकेदाराला सर्व मालमत्ता वापरण्याचे अधिकार मिळतील, पण पालिकेच्या खजिन्यात निश्चित किती रक्कम जमा होईल, याची कोणतीही खात्री नाही. हे धोरण पालिकेच्या आर्थिक हिताचे नसून केवळ गृहीतकांवर आधारित असल्याचा दावा केसकर कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केला आहे.“हे धोरण तयार करताना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोणताही सखोल अभ्यास केल्याचे दिसत नाही. जाहिरातीसाठी जागांची पाहणी करणे आणि त्यांचे निश्चितीकरण करणे ही प्राथमिक जबाबदारी होती; मात्र ती पार पाडली गेलेली नाही,” अशी टीका पत्राद्वारे करण्यात आली आहे. केवळ उत्पन्नाच्या नादात शहराचे विद्रुपीकरण होऊ नये, यासाठी आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पारदर्शक निर्णय घ्यावा, अशी विनंती ‘आपले पुणे, आपला परिसर’ या माध्यमातून करण्यात आली आहे. येत्या २१ तारखेला या निविदा उघडल्या जाणार असून, त्यापूर्वी प्रशासन या तक्रारींची दखल घेते का, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पुणे, दि.१२: सामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” तसेच “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” या विषयांवर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, येरवडा, पुणे येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मा सुतार, गृहप्रमुख, शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी होत्या. या कार्यक्रमास नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका शीतल सावंत, माजी उपमहापौर श्री सिद्धार्थ धेंडे, समाजकल्याण अधिकारी माधुरी वाघमोडे, व्याख्याते पुष्पा घोडके, वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या वृषाली रणधीर, मामासाहेब मोहळ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या मेघना भोसले आणि जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रतिनिधी श्रीमती सुपेकर उपस्थित होत्या.
श्रीमती धेंडे सामाजिक समता सप्ताह व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
श्रीमती घोडके यांनी “संविधान जागर” या विषयावर मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार, शिक्षण, कायदेशीर संरक्षण, तसेच समानतेचे हक्क मिळवून देण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अधोरेखित केले.
श्रीमती रणधीर यांनी “महिला सक्षमीकरण” या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतिगृहांचे गृहप्रमुख व गृहपाल तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती भोईटे गृहपाल यांनी केले. त्यांनी सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उषा कांबळे समतादूत, बार्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शीतल बंडगर प्रकल्प व्यवस्थापक, समतादूत प्रकल्प, बार्टी यांनी केले.
पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग स्पर्धेत सारडा स्टॅलियनवर मात
पुणे : धीरज मंत्रीच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर प्रारव पँथर्स संघाने पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ (जिल्हा युवा समिती) यांच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा माहेश्वरी प्रीमियर लीग (बेहडे पीएमपीएल) क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढतीत सारडा स्टॅलियन संघावर आठ गडी राखून मात केली आणि विजेतेपद पटकावले. यानंतर मास्टर स्मॅशर्स संघाने हाय-बाइट चॅलेंजर्स संघावर पाच गडी राखून मात केली आणि तिसरा क्रमांक पटकावला.
नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा झाली. अंतिम लढतीत सारडा स्टॅलियन संघाने मुकुल जाजूच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित १६ षटकांत ३ बाद १४६ धावा केल्या. मुकुलने २५ चेंडूंत ११ चौकारांसह ५४ धावा केल्या. मुकुलने रोहित राठीने सहा षटकांत ६३ धावांची सलामी दिली. यानंतर मुधुसुदन कलंत्री (५) आणि करण सारडा (१) झटपट बाद झाले. यानंतर रोहितने यश लढ्ढाच्या साथीने ६८ धावांची नाबाद भागीदारी रचली. रोहितने ४१ चेंडूंत सहा चौकारांसह नाबाद ४७, तर यशने १७ चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या.
प्रारव पँथर्स संघाने विजयी लक्ष्य १४.१ षटकांत दोन गडींच्या मोबदल्यात सहज साध्य केले. विजयाचा शिल्पकार ठरला तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज धीरज मंत्री. नितीश मनियार (९) बाद झाल्यानंतर धीरजने हर्ष दरकच्या साथीने ९६ धावांची भागीदारी रचली. हर्ष २७ चेंडूंत चार चौकारांसह ३५ धावा करून बाद झाला. यानंतर धीरजने गोविंद राठीच्या साथीने प्रारव पँथर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धीरजने ३६ चेंडूंत सहा चौकार व चार षटकारांसह नाबाद ७९ धावा केल्या.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार बूब, बेहडे ग्रुपचे निशांत बेहडे, मेटारोल ग्रुपच्या राधिका बिर्ला, क्रीडा अध्यक्ष नीरज धूत, क्रीडा सचिव गितेश झंवर, युवा अध्यक्ष रोनक झंवर, युवा सचिव मनीष मणियार, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश सोमानी, गणेश भुतडा आदी उपस्थित होते.
अभय करवा, राकेश लद्दड, संतोष जाजू, अभय जाजू, भूषण भट्टड, सचिन चांडक, मनोज डागा, राहुल भुतडा, अजय झंवर, नवल भुतडा, प्रद्युमन भूतडा, शुभम मंत्री, स्वप्नील बांगड, पियुष भुतडा, गोविंद डागा, हिमांशू सोनी, शुभम डाल्या, चिराग मुंदडा, नरेश बाहेती यांसह युवा च्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेचे आयोजन केले. योगेश मुंदडा, प्रतीक कालिया, भूषण मानधने, पार्थ लाहोटी यांनी स्पर्धेदरम्यान संपूर्ण निवेदन केले.
स्पर्धेसाठी बेहडे बिल्डकॉन एलएलपी निशांत बेहडे व परिवार हे मुख्य प्रायोजक होते, त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेला पाठिंबा दिला. मेटारोल श्रीमती राधिका बिर्ला हे को-टायटल स्पॉन्सर होत्या. बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. हे व्हेन्यू स्पॉन्सर, जीबी ग्रुप गणेश भुतडा ट्रॉफी स्पॉन्सर, तर मॅजेस्टिक लँडमार्क कैलाश मुंदडा जर्सी स्पॉन्सर व युट्युब लाईव्ह स्पॉन्सर मेहुल शाह म्हणून सहभागी आहेत. याशिवाय डीडब्ल्यू रिअल्टर्स अँड लॉ फर्म, स्वनिती, तिरुपती सेल्स एम्पोरियम आणि अरुणकुमार अँड कंपनी हे असोसिएट स्पॉन्सर्स म्हणून सहभागी झाले होते.
धावफलक : सारडा स्टॅलियन – १६ षटकांत ३ बाद १४६ (मुकुल जाजू ५४, रोहित राठी नाबाद ४७, यश लढ्ढा नाबाद ३१, गोविंद राठी ४-०-१७-२) पराभूत वि. प्रारव पँथर्स – १४.१ षटकांत २ बाद १५२ (धीरज मंत्री नाबाद ७९, हर्ष दरक ३५, गोविंद राठी नाबाद १९, सागर कारवा २-०-१७-१, रोहित राठी २-०-२२-१). मॅन आॅफ दि मॅच – धीरज मंत्री
तिसऱ्या क्रमांकाची लढत : हाय-बाइट चॅलेंजर्स – १२ षटकांत ८ बाद ११० (मधुर जेठलिया ६७, कन्हैया लढ्ढा १२, केदार बजाज ३-०-२८-२, नयन भन्साली ३-०-२४-२, कपिल धूत २-०-११-२) पराभूत वि. मास्टर स्मॅशर्स – १०.३ षटकांत ५ बाद ११४ (केदार बजाज ५१, अखिल तपाडिया १८, सुदर्शन हरकुट ३-०-२६-२).
पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांचे आदेश; गुंडांवर गावठी दारू विक्री, जुगार आणि इतर गंभीर गुन्हे पुणे-पुणे शहर आणि जिल्ह्यातून गंभीर गुन्हे करणाऱ्या दहा गुंडांना तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिले आहेत. गावठी दारू विक्री, जुगार आणि इतर गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये अभिजित संजय जाधव (वय २९), साईनाथ विठ्ठल पाटोळे (वय २७), अविनाश मुरलीधर मेटे (वय ३६), गगन तानाजी शिंदे (वय २४), संकेत अमोल बांदल (वय २७), मच्छिंद्र शंकर पवार (वय ३८), सचिन भीमराव मातंग (वय २५), आदित्य बापू शिंदे (वय २५), बिरा रामदास श्रीराम (वय ३८) आणि मालती संतोष मलके (वय ४५) यांचा समावेश आहे. या आरोपींविरुद्ध चंदननगर, लोणीकंद आणि वाघोली पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुंडांना तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, ज्याला मंजुरी मिळाल्यानंतर उपायुक्त मुंडे यांनी हे आदेश दिले.
पुणे पोलिसांच्या परिमंडळ सातमध्ये लोणीकंद, वाघोली, खराडी, चंदननगर, लोहगाव, विमानतळ आणि येरवडा ही पोलिस ठाणी येतात. गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी या परिमंडळातून १०० गुंडांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. तडीपार केलेले गुंड शहरात दिसल्यास नागरिकांनी जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, पुणे शहरातील धनकवडी परिसरात दहशत माजविणाऱ्या एका गुंडाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या कारवाईचे आदेश दिले असून, त्यानुसार गुंडाला यवतमाळ कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
कारवाई करण्यात आलेल्या गुंडाचे नाव रोहन राजेंद्र रोंगे (वय २१, रा. गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी) असे आहे. रोंगे याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी रोंगेविरुद्ध एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे आणि उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंजुरी दिल्यानंतर रोंगेची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली
रेस्क्यू फाउंडेशनमधून 12 महिला पळाल्या पुणे-पुण्यातील मोहम्मदवाडी येथील ससाणे वस्तीमधील रेस्क्यू फाउंडेशनमधून १२ बांगलादेशी महिला पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ मार्च रोजी पहाटे ही घटना घडली असून, केअरटेकर महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत या महिलांनी पलायन केले. विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल २० दिवस दडपून ठेवण्यात आला होता.पळून गेलेल्या १२ महिलांपैकी दोघींना त्याच दिवशी सय्यदनगर परिसरातून पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, उर्वरित दहा महिला अजूनही फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या सर्व महिला २३ ते ३३ वयोगटातील आहेत.
या महिलांना शहरातील विविध ठिकाणी वेश्याव्यवसायावर केलेल्या कारवाईतून वाचवण्यात आले होते. दिघी, फरासखाना, देहूरोड, जेजुरी आणि कोंढवा पोलीस ठाण्यांनी केलेल्या कारवाईनंतर त्यांना रेस्क्यू फाउंडेशनमध्ये आश्रय देण्यात आला होता.न्यायालयाने १८ मार्च रोजी या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी दूतावासाशी समन्वय साधण्याचे काम सुरू असतानाच, फाऊंडेशनच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
२३ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता एका बांगलादेशी महिलेने पोटदुखीचे नाटक करत महिला केअरटेकरला औषध मागण्यासाठी बोलावले. औषध देण्यासाठी आलेल्या केअरटेकरवर तिने मैत्रिणीच्या मदतीने झडप घातली. तिचे तोंड दाबून, हात-पाय बांधले आणि त्यानंतर सर्व महिलांनी मिळून मुख्य गेटचे कुलूप उघडून पळ काढला.रेस्क्यू फाउंडेशनकडून वारंवार पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती, परंतु ती पुरवण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून, यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिहू नृत्य, होजगिरी नृत्य व संगीताची मंत्रमुग्ध करणारी मेजवानी
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि असोमी यांच्यावतीने आयोजन
पुणे : वेगवान लय, हातांच्या तालबद्ध हालचाली, पारंपरिक वाद्यांचा सुरेल नाद आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे बिहू नृत्य खुलले. अस्सल सादरीकरणातून प्रेक्षकांना आसामच्या सांस्कृतिक वैभवाची झलक अनुभवता आली.
ईशान्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा ‘रोंगाली बिहू’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. आसाममधील नामांकित नृत्यांगना आणि गायक-गायिकांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणातून पुणेकर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक बिहू नृत्याबरोबरच सुरेल आसामी संगीताची मेजवानी अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि ‘असोमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडवण्यातील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू शिवाजीराव कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, नृत्य विभाग प्रमुख डॉ. देविका बोरठकूर, असोमीचे राजीव बोरकटाटी, मौसमी बोरा उपस्थित होते.
कार्यक्रमात रुमा रुलिका भुयान, हिमाश्री मेधी कलिता, अप्सरा गोगोई, निहारिका बोर्गोहैन, जाह्नोबी गोगोई आणि प्रियाक्षी कटक्य या पुरस्कारप्राप्त नृत्यांगनांनी बहारदार सादरीकरण केले. तन्वी गोखरे, आर्या घाटे, खानंडका या पुण्यातील मुलीनी सादर केलेले त्रिपुरा राज्यातील होजगिरी लोकनृत्याने सर्वांचे मन जिंकले.
आसाममधील सुप्रसिद्ध गायक-गायिका निहारिका हजारिका, ध्रुव ठाकुरिया आणि रिपुंजीत यांनी आपल्या सुरेल आवाजाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या सादरीकरणातून पारंपरिक आणि आधुनिक आसामी संगीताचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
प्रा. शारंगधर साठे म्हणाले, आसाम आणि महाराष्ट्राच्या परंपरा व कला प्रकारांमध्ये अनेक साम्य आहेत. आसाममधील वैष्णव परंपरा आणि महाराष्ट्रातील परंपरा यामध्येही साम्य आढळते. या दोन संस्कृतींमध्ये संवाद आणि आदानप्रदान व्हावे, यासाठी दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये सत्रीय नृत्याचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुणे महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर या महापुरूषांच्या काळात देखील फार मोठी प्रतिकुल परिस्थिती होती. त्याला तोंड देत सामाजिक आंदोलने उभी राहीली व परिवर्तन घडले. सामाजिक चळवळी दडपण, दबावाला न जुमानता, सामाजिक न्यायासाठी वारंवार निर्माण होतच राहतील, असा विश्वास गांधी दर्शन शिबीरात व्यक्त करण्यात आला. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर विशेष व्याख्याने गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे रविवार दि. १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. गांधी विचार दर्शन मालिकेतेतील या ३०व्या पुष्पात ‘महात्मा फुले यांच्या कार्याची सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी’ या विषयावर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे विश्वनाथ शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक दृष्टीकोन’ या विषयावर मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य, प्राध्यापक प्रा. पी. विठ्ठल आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भूमी अधिकार’ या विषयावर युवा भारत आंदोलनचे सल्लागार शशी सोनावणे यांचे व्याख्यान झाले.
विश्वनाथ शिंदे म्हणाले की, महात्मा फुले यांच्या काळात पुरोहित सांगतील तो धर्म, न्याय मानला जायचा. धर्मग्रंथांना कायद्याचे स्वरूप आले होते. त्या विरोधात बोलणे म्हणजे परमेश्वरा विरोधात बोलण्यासारखे होते. धर्माच्या नावाखाली भोंदूगिरी सुरू होती. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक दृष्ट्या समाज निकृष्ट अवस्थेत पोहोचला होता. अशा काळात महात्मा फुले यांनी विविध प्रकारच्या चळवळी उभ्या केल्या. त्या सगळ्यांच्या पाठीमागे सत्यान्वयी दृष्टिकोन होता. विश्वनाथ शिंदे पुढे म्हणाले की, जनतेचा, सुधारकांचा आवाज बंद करायचे धोरण राज्यकर्ते करत आहेत. एकहाती सत्ता असावी असे राज्यकर्त्यांना वाटते. लोक मूग गिळून गप्प बसतात तो पर्यंत हे असेच चालू राहणार. पण पुन्हा चळवळी न्यायासाठी आवाज उठवतील. संघटितपणे लोक एकत्र येऊन चुकीच्या धोरणांना विरोध करतील.
प्रा. पी. विठ्ठल म्हणाले की, शिक्षण सर्वांसाठी खुले असावे अशी महात्मा फुले यांची धारणा होती. तोच विचार बाबासाहेबांनी पुढे नेला. समाज शिक्षित झाला तरच समाज पुढे जाईल. म्हणून समतेवर आधारित शिक्षण असावे. शिक्षणामुळे माणूस स्वाभिमानी होतो. तर्कशूध्द आचरण करतो. जाती रचना हा समाजातील मोठा दोष आहे. मुक्ती साधायची असेल तर बुध्द धर्मात प्रवेश करा असा संदेश बाबासाहेबांनी दिला होता. आत्ताच्या पिढीने महापुरुषांशी नाते सेल्फी काढण्यापुरते जोडले आहे. शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही याचे भान सर्वांनी ठेवायला हवे.
शशी सोनवणे की, जमीनीचे राष्ट्रीयीकरण करणे, सुधारणा, फेर वाटप हा मुद्दा 1918 साली बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केला होता. सामाजिक समतेकडे जायचे असेल तर जमिनीचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे. सर्व समाजाच्या हाती नैसर्गिक संसाधनांची मालकी राहिली पाहिजे. जातीय उतरंड, शोषणाची उतरंड त्यातून दूर केली जाऊ शकते. असे त्यांचे मत होते. जमिनीवरचा अधिकार प्रस्थापित करण्याचे मोठे संघर्ष भारतात झाले. प्रा. शशी सोनवणे पुढे म्हणाले की, भारतातील मुलभूत उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करावे असे आम्हाला वाटते. भांडवलशाही हे संकट आहे. नैसर्गिक संसाधनांवर कब्जा मिळवून भांडवलदार सत्ता गाजवतात.
लक्ष्मिकांत देशमुख म्हणाले की, सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण दिले पाहिजे असे हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी मांडले. तोच आग्रह बाबासाहेबांनी धरला. विवेकाचे अधिष्ठान असलेला समाज निर्माण झाला पाहिजे. शिक्षणातून समानता निर्माण झाली पाहिजे या ध्येयापासून आपण खूप दूर आहोत. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्या पासून वंचित असलेल्या समाजासाठी लढायचे यावर आम्ही युक्रांदमध्ये चर्चा करायचो, अशी आठवण सांगत अन्वर राजन म्हणाले की, समाजात जेव्हा न्याय असतो, तेव्हा शांतता असते. आपली समाज रचना विषमतावादी आहे. त्यामुळे शांतता नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गांधी, आंबेडकर यांनी आंदोलने केली. आत्ताच्या वातावरणात देखील ठामपणे उभे राहण्याची युक्रांदची भुमिका आहे. गांधीजींच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल. लक्ष्मिकांत देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तेजस भालेराव यांनी सुत्रसंचलन केले. सुरज कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रविण सप्तर्षी यांनी आभार मानले. कार्यक्रमात गानकोकिळा आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुणे- कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गती देण्यात आली असून १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौ.मी. क्षेत्राचे भू-संपादन सुरु करून पहिला टप्पा आता पुर्णत्वाला येणार आहे .
दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक असलेल्या कात्रज–कोंढवा रस्त्याचे वाढते वाहतूक महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने या प्रकल्पासाठी भू-संपादनाकरिता विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रकल्पाला गती देण्यात येत आहे.सध्या या मार्गावर ताशी सुमारे १५,००० पेक्षा अधिक वाहनांची वर्दळ असून, त्यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. PMR रिंग रोड तसेच कात्रज–खडी मशीन–वडकी बायपास मार्ग अद्याप उपलब्ध नसल्यामुळे बोपदेव घाट व दिवे घाटमार्गे ये-जा करणारी वाहने याच मार्गावर अवलंबून आहेत.याशिवाय परिसरात वेगाने वाढणारा निवासी व व्यावसायिक विकास, तसेच मोठ्या प्रमाणावर उभारलेली गोदामे यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत असून, जून २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
प्रस्तावित ८४ मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील (DP) रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखालील भू-संपादन विभागामार्फत आवश्यक कार्यवाही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
मंगळवार दि.७ एप्रिल २६ पासून प्रत्यक्ष जागेवर बॉण्ड्री मार्किंग तसेच फळझाडे व इतर झाडांची मोजणी करण्याचे काम विविध विभागांच्या समन्वयातून सुरू करण्यात आले आहे. एकूण ३.५ किमी लांबीच्या रस्त्यासाठी हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौ.मी. क्षेत्राचे भू-संपादन केले जाणार आहे.
आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून, भू-संपादन प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जात आहे. अंतिम निवाडा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, लवकरच मंजुरी अपेक्षित आहे.
या प्रकल्पासाठी शासनाकडून सुमारे ₹१४० कोटी निधी , त्याचबरोबर महापालिकेमार्फत प्रथमच भू-संपादनासाठी सुमारे ₹३०० कोटींची भरीव तरतूद करण्यात येऊन रक्कम भूसंपादन साठी 100 % रक्कम जमा करण्यात आली आहे, यामुळे प्रकल्पाला आवश्यक आर्थिक बळ मिळाले आहे.
“कात्रज–कोंढवा रस्ता हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या प्रकल्पासाठी भू-संपादन प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन समन्वयाने काम करत आहेत. नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल.” — आयुक्त नवल किशोर राम
या प्रक्रियेत अतिरिक्त आयुक्त (विशेष) श्री ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त (भू-संपादन) श्री निखिल मोरे तसेच विशेष भू-संपादन अधिकारी श्रीमती दारुणकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत कार्यवाही अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचवली आहे.
५० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामामध्ये मुख्य रस्ता, दोन्ही बाजूंना सर्विस रस्ते, पावसाळी वाहिनी (U-ड्रेन), तसेच माऊली नगर येथे ग्रेड सेपरेटरचा समावेश आहे. तर ८४ मीटर रुंदीच्या अंतिम आराखड्यात मुख्य रस्ता, सर्विस रस्ते, पार्किंग, फूटपाथ, सायकल ट्रॅक, युटिलिटी डक्ट, पावसाळी वाहिनी आणि मलवाहिनी यांचा समावेश असेल.
“भू-संपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती यांना प्राधान्य देत, संबंधित सर्व प्रशासकीय टप्पे वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.भूसंपादन पूर्ण करून प्रकल्पाला गती देण्यात येईल.” — जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी
सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकात या कामासाठी ₹८५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे ३२% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पूर्णत्वास जाण्यासाठी शहर अभियंता श्री पावसकर पथ विभागाचे मुख्य अभियंता श्री बनकर आणि सर्व संबंधित अधिकारी सातत्याने कार्यरत आहेत.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत उभारण्यात येणारा उड्डाणपूल राजस चौक येथे सुमारे २६० मीटरपर्यंत येत आहे. या उड्डाणपुलाच्या उतारासाठी विद्यमान वाहतूक वळविणे आवश्यक असल्याने सुमारे ४०० मीटर लांबीचे सर्विस रस्ते विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी काही भाग पूर्ण झाला असून उर्वरित काम सुरू आहे.
महापालिका व शासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कात्रज–कोंढवा रस्ता प्रकल्पाच्या भू-संपादन प्रक्रियेला वेग आला असून, यामुळे वाहतूक सुलभता वाढण्याबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे-सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार असल्याचेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच भोंदू अशोक खरात प्रकरण असेच बाहेर आलेले नाही तर ठरवून आणले गेले असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार ट्विट करत म्हणाले, भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असेच बाहेर आलेले नाही तर ठरवून आणले गेले असून ही फक्त सुरुवात असल्याचे पवार म्हणाले.
पुढे रोहित पवार म्हणाले, आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणेच उचित राहील, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरू असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हे वृत्त खुद्द एकनाथ शिंदे यांनीच फेटाळून लावले होते. अशी कोणतीही बैठक झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
एकनाथ शिंदे म्हणाले होते की, गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. उबाठाच्या खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही. अशी कोणतीही बैठक झाली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
सातारा- कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसला कराड तालुक्यातील शेणोली स्थानकाजवळ लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. चोरट्यांनी चक्क रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून गाडी थांबवण्यास भाग पाडले आणि त्यानंतर प्रवाशांचे दागिने व मोबाईल लंपास केले. याप्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सह्याद्री एक्सप्रेस मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील शेणोली स्थानकाजवळ आली होती. यावेळी चोरट्यांनी रेल्वेच्या आऊटर सिग्नलवर लाल कापड टाकून तो बंद पाडला. तांत्रिक बिघाडामुळे सिग्नल ‘लाल’ झाल्याचे समजून रेल्वे चालकाने गाडी आऊटरलाच थांबवली. गाडी थांबताच अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या ४ चोरट्यांनी डब्यांच्या खिडकीतून हात घालून प्रवाशांना लुटण्यास सुरुवात केली.
या लुटीमध्ये मिरज येथील रहिवासी मीना विकास उमापती आणि त्यांच्या सहप्रवासी आशा नारायण पवार यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरट्यांनी खिडकीतून हात घालून जबरदस्तीने खेचून नेल्या. तसेच रंजन दयानिधी साहू या प्रवाशाचा मोबाईलही चोरट्यांनी हिसकावून घेतला. काही प्रवाशांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत सर्वांना गप्प केले आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. मिरज पोलिसांत गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, सोलापूरचे रवींद्र गायकवाड आणि मिरज लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. या घटनेमुळे सह्याद्री एक्सप्रेस बराच वेळ घटनास्थळी उभी होती, त्यानंतर ती पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आली.
याप्रकरणी मीना विकास उमापती (रा. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मिरज रेल्वे पोलिसांनी चार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक फौजदार मुर्ढे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी थेट छेडछाड करून अशा प्रकारे रेल्वे लुटल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः आऊटर सिग्नलवर रेल्वे थांबते तेव्हा प्रवाशांच्या संरक्षणासाठी कोणती खबरदारी घेतली जाते, याबाबत आता संताप व्यक्त होत आहे.
खरातवर तब्बल 16 गुन्हे, पैकी 8 बलात्काराचे मुंबई-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा सरकारचा माणूस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाने अद्याप कुणावरही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणात काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.
भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होते आहेत. खरातशी संबंध आल्यामुळे रुपाली चाकणकर यांना आतापर्यंत राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले आहे. आता त्यांच्यामागे एसआयटी चौकशीचा ससेमिरा लागण्याचीही शक्यता आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक नेत्यांची नावे आली आहेत. पण तूर्त तरी एसआयटीने या प्रकरणी एकाही नेत्याला चौकशीसाठी बोलावले नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी उपरोक्त आरोप करत या प्रकरणाच्या एकूण चौकशीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नाना पटोले रविवारी म्हणाले, अशोक खरात हा सरकारचाच माणूस आहे. या प्रकरणात SIT चौकशी लावण्यात आली होती, मात्र त्या SIT कडून अद्याप कोणावरही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. भोंदू अशोक खरात तसेच त्याच्यासोबत असलेल्या काही राजकारणी आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरू असल्याचे दिसून येत आहे. दररोज या प्रकरणाशी संबंधित नवनवीन माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणात सरकार राजकारण करत आहे. नाशिकसारख्या पवित्र स्थळी ही घटना घडली, परंतु सरकारकडून अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही चिंतेची बाब आहे.
एसआयटीने शुक्रवारी अशोक खरातच्या कार्यालयाची पुन्हा एकदा झडती घेतली. त्यात अधिकाऱ्यांनी अनेक गोष्टी जप्त केल्यात. यात अशोक खरात आपल्या भक्तांना देत असलेल्या विशिष्ठ औषधाची बाटली, कुजलेले पेढे, सॅनेटायझरची बाटली आदींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंसह कार्यालयाच्या दरवाजाच्या आतील कडीवर खरातच्या हातांचे ठसे आढळले आहेत. खरात याच वस्तूंचा वापर करून पीडित महिलांना आपण सांगू ते करण्यास भाग पाडत होता, असा संशय आहे. या वस्तूंवर पीडित महिलांच्या हातांचे ठसे आढळले नाहीत. पण खरातने पीडितांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे अन्य काही पुरावे एसआयटीच्या हाती लागलेत. हेच पुरावे अशोक खरातला दोषी ठरवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील असा दावा केला जात आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे भोंदू अशोक खरातवर शिर्डी, सिन्नर, नाशिक आदी वेगवेगळ्या भागांत तब्बल 16 गुन्हे दाखल झालेत. यात लैंगिक अत्याचाराशी संबंधित तब्बल 8 गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्या खरात पोलिस कोठडीत आहे. त्याची कोठडी सोमवारी संपणार असल्यामुळे त्याला उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याचे काळे कारनामे पाहता त्याच्याभोवती चौकशीचा फास घट्टपणे आवळला जावा, यासाठी तपास यंत्रणेने अधिक खबरदारी घेतली आहे.
दुसरीकडे, अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार आहे. गत 10 दिवसांपासून पोलिस तिचा शोध घेत आहेत. पण अद्याप ती हाती लागली नाही. पोलिसांनी या प्रकरणी कल्पनाच्या माहेरी जाऊन विचारपूस केली. तसेच तिच्या नातलगांचीही झाडाझडती घेतली. पण तिचा कोणताही थांगपत्ता अजून लागला नाही. त्यामुळे फरार कल्पना कुठे आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, त्यांनी घालून दिलेली सामाजिक न्यायाची सांगड आजही अत्यंत महत्वाची आहे. महात्मा ज्योतीबा फुलेंचा विचार पुढे घेऊन जायची गरज आहे व काँग्रेस पक्ष त्याचा विचारातून वाटचाल करत आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
सत्यशोधक चळवळीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे येथील महात्मा फुले वाड्याला भेट देवून अभिवादन केले. यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस भानुदास माळी, नगरसेवक प्रशांत जगताप, माजी आमदार दीप्ती चौधरी, शहर उपाध्यक्षा प्राची दूधाने, अविनाश बागवे, राज अंबिके तसेच काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतीबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु करून महिलांना शिक्षणाची दारे उघडून महिला सक्षमीकरणाचे एक महत्वाचे पाऊस उचलेले. या क्रांतीकारी निर्णयाला मात्र मनुवादी विचारांनी तीव्र विरोध करत सावित्रीबाईंना प्रचंड त्रास दिला, त्यांचा छळ केला. मनुवादी विचारांना काँग्रेसचा विरोध यातूनच आहे आणि सावित्रीबाईंना छळणाऱ्या विचारांचे लोक आज सत्तेत आहेत असे सपकाळ म्हणाले.
महात्मा ज्योतीबा फुलेंच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविणार..
२०२६ हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्म द्वीशताब्दी वर्ष विविध उपक्रम आणि सत्यशोधक विचारांचा जागर करण्याची विशेष मोहीम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राज्यभर वर्षभर राबविली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महात्मा फुले उत्सव समिती स्थापन केली आहे. या समितीची नियोजन बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष भानुदास माळी, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, किशोर कान्हेरे, भाई नगराळे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चौधरी, वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे मनपा गटनेते चंदूशेठ कदम, नगरसेवक प्रशांत जगताप, सुनील शिंदे, सुनील मलके, प्रदेश सरचिटणीस सीमा गुट्टे, आमिर शेख, यशराज पारखी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवर महायुती सरकार गप्प का?
बारामती पोटनिवडणुकीच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सर्वांच्या विनंतीचा विचार करून अजित पवारांसाठी सहानुभूती म्हणून अर्ज माघारी घेतला आहे. परंतु कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, असे असले तरी काँग्रेस पक्षाची भूमिका कायम आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा गुन्हा दाखल करावा यासाठी काँग्रेस पक्ष आजही आग्रही आहे. महाराष्ट्रात गुन्हा दाखल केला नाही मात्र काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात गुन्हा दाखल केलेला आहे व त्याचा पाठपुरावा काँग्रेस करत आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी आम्ही चर्चा करून लक्ष घालण्याची विनंती केली, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे आमदार रोहित पवार तातडीने बंगळुरूला गेले, त्यांच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी भेट घेऊन पाठपुरावा करण्याची विनंती केली. तसेच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशीही अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीसाठी आम्ही चर्चा केली पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या एनसीपी पक्षातील मंत्री व नेते यावर काहीच बोलत नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
पुणे मेट्रोच्या लाईन ४ आणि ४ एचे कोथरुडकरांसमोर सादरीकरण
पुढील चार वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा मेट्रोचा संकल्प
पुणे:२०१६ रोजी पुण्यात मेट्रो प्रकल्प आला, तेव्हा हे अनेकांना दिवास्वप्न वाटत होते. मात्र मेट्रोच्या वर्तमान स्थिती मुळे मेट्रो पुणेकरांच्या जीवनाचा भाग बनली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. हिंजवडी मेट्रो मार्गिका ही लवकर सुरु व्हावी; अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर व वारजे परिसराला जोडणाऱ्या मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्पाच्या प्रस्तावित आराखड्यास नुकतीच मंजुरी मिळाली असून, सदर प्रकल्पाची माहिती स्थानिक नागरिकांना व्हावी, यासाठीचे सादरीकरण पुणे मेट्रोच्या वतीने आज करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, नगरसेवक राजाभाऊ बराटे, पुनीत जोशी, नगरसेविका मंजुषा खर्डेकर, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, शिवरामपंत मेंगडे, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी पुणे मेट्रोचा विकास, सद्यस्थिती आणि प्रस्तावित मेट्रो ४ आणि ४ एचे विस्तृत सादरीकरण केले. पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी, तसेच कुटुंबासोबत योग्य वेळेची उपलब्धता वाढवणं ही मेट्रोच प्राथमिकता आहे. ‘लास्ट माईल कनेक्टिविटी’साठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये सुरु असलेल्या शटल बससेवा आणि प्रीपेड रिक्षाचेही हर्डिकर यांनी कौतुक केले.
तसेच, प्रस्तावित मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्प आगामी चार वर्षांत पूर्ण करण्याचा मेट्रोचा संकल्प असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच, प्रस्तावित मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्पाबाबत नागरिकांच्या शंकांचेही निरसन केले.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी या सर्व सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त केले. २०१६ मध्ये पुण्यात मेट्रो प्रकल्प आला, तेव्हा हे अनेकांना दिवास्वप्न वाटत होते. मात्र मेट्रोच्या वर्तमान स्थिती मुळे मेट्रो पुणेकरांच्या जीवनाचा भाग बनली आहे. मेट्रोच्या यशस्वीततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भरीव आर्थिक पाठबळ दिल्याने आज पुण्याच्या मेट्रोचे टप्पे पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहेत.
ते पुढे म्हणाले की, मेट्रो ४ आणि ४ ए हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कोथरुडकरांचा वेळ, पैसा वाचण्यासोबतच वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, पुण्यातील आयटीयन्ससाठी हिंजवडी मेट्रो मार्गिका देखील लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुणे: शहरातील गजबजलेल्या फर्गसन रस्ता ते आपटे रस्त्याला जोडणाऱ्या रँग्लर परांजपे रस्त्यावर, (हॉटेल वैशाली कॉर्नरवर) गेल्या महिनाभरापासून रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पादचारी मार्गावरच भूमिगत वाहिन्या दुरुस्तीसाठी केलेल्या मोठा खड्डा उघडा पडलेला असून त्याभोवती तुटलेल्या फरशा आणि मातीचे ढिगारे दिसत आहेत. या ठिकाणी भूमिगत वाहिन्यांचे काम सुरू असल्याचे दिसते, मात्र काम अपूर्ण अवस्थेतच सोडण्यात आले आहे.
या भागात दिवसभर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर होते.स्थानिक नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या समस्येकडे लक्ष वेधत प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा कामांकडे दुर्लक्ष होऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन रस्ता पूर्ववत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुंबई – ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्या हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल होते.
आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले म्हणाले, माझी आई आशा भोसले यांचे निधन झाले आहे. उद्या सकाळी 11 ते 2 या वेळेत त्या जिथे राहायच्या तिथे त्यांचे दर्शन घ्यावे आणि उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कला अंतिम संस्कार होणार आहेत.
12,000 हून अधिक गाणी गायली
आशा भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीत 12,000 हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांची “दम मारो दम”, “पिया तू अब तो आजा” आणि “चुरा लिया है तुमने” यांसारखी गाणी आजही सदाबहार आहेत. आशा भोसले यांच्यासाठी संगीताचा प्रवास इतका सोपा नव्हता.आशा भोसले या प्रसिद्ध नाट्यअभिनेते आणि शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि महान गायिका लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण आहेत. जेव्हा त्या फक्त 9 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते, ज्यामुळे त्यांनी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत कुटुंबाला आधार देण्यासाठी गायनाला सुरुवात केली होती.
16 वर्षांच्या असताना आशा भोसले यांनी मोठी बहीण लता यांच्या 31 वर्षांच्या सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्यासोबत पळून जाऊन लग्न केले होते. लताजी आणि त्यांचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. यामुळे त्यांनी आशासोबत बराच काळ बोलणे बंद केले होते. लग्नानंतर आशा भोसले यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि त्या घरगुती हिंसाचाराच्या बळीही ठरल्या. त्या आयुष्यात इतक्या निराश झाल्या होत्या की त्यांना स्वतःला संपवायचे होते. 1960 मध्ये त्या पहिल्या पतीपासून वेगळ्या झाल्या.
जेव्हा आशा भोसले यांचे पहिले लग्न तुटले आणि त्या आपल्या तीन मुलांसह (हेमंत, वर्षा आणि आनंद) पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परतल्या, तेव्हा हळूहळू दुरावा कमी होऊ लागला.
आर.डी. बर्मन यांच्या आईने म्हटले होते की लग्न माझ्या मृतदेहावरच होईल
आशा भोसले यांनी संगीतकार आरडी बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले होते. त्यांची पहिली भेट 1956 मध्ये झाली होती. त्यांची घट्ट मैत्री आणि संगीताचा प्रवास ‘तिसरी मंझिल’ (1966) या चित्रपटादरम्यान सुरू झाला. नंतर, एकत्र काम करत असताना त्यांची चांगली मैत्री हळूहळू प्रेमात बदलू लागली. एक दिवस आरडी बर्मन यांनी संधी साधून आशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आशानी लगेच होकार दिला, पण बर्मनच्या आईने लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यांनी बर्मनला सांगितले की, ‘हे लग्न होणार असेल तर ते माझ्या मृतदेहावरच होईल.’ बर्मनच्या आईने नकार दिला कारण आशा त्यांच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठ्या होत्या आणि 3 मुलांची आई होत्या.
तेव्हा बर्मनने आईचे म्हणणे शांतपणे ऐकले. मात्र, जेव्हा बर्मनचे वडील एस.डी. बर्मन यांचे निधन झाले, तेव्हा आईची मानसिक स्थिती बिघडली. अशा परिस्थितीत आईच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी बर्मनने 1980 मध्ये आशा भोसले यांच्याशी लग्न केले होते.
आशा भोसले यांनी 50 ते 90 च्या दशकात ओ.पी. नय्यर, आर.डी. बर्मन, खय्याम आणि बप्पी लहरी यांसारख्या अनेक संगीतकारांसोबत काम केले. अनेक सदाबहार गाणी गायली. मात्र, एक वेळ अशीही होती, जेव्हा याच आवाजाला खराब सांगून रेकॉर्डिंग स्टुडिओतून परत पाठवण्यात आले होते.
आरजे अनमोल यांच्यासोबतच्या संभाषणात आशा भोसले यांनी सांगितले होते की, आवाज खराब असल्याचे सांगून त्यांना आणि किशोर कुमार यांना रेकॉर्डिंग स्टुडिओतून बाहेर जाण्यास सांगितले होते.
त्यांनी सांगितले होते की, 1947 मध्ये त्या किशोर कुमार यांच्यासोबत जे.बी. रूंगटा यांच्या प्रसिद्ध स्टुडिओमध्ये राज कपूर आणि नर्गिस अभिनीत ‘जान पहचान’ चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करण्यासाठी गेल्या होत्या. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश होते. आजकाल स्टुडिओ वातानुकूलित (एयर-कंडीशन्ड) असतात आणि त्यात अनेक मशीन असतात. त्या दिवसांत दोन ट्रॅकच्या मशीन असायच्या. एक ट्रॅक संगीतकारासाठी आणि दुसरा गायकासाठी असायचा. माइकही एकच असायचा आणि गायकांना त्याच्यासमोर उभे राहून गावे लागत असे.
आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गाणे सुरू केले. त्यानंतर साउंड रेकॉर्डिस्ट रॉबिन चटर्जी यांनी बंगालीमध्ये सांगितले होते की, तुमच्या लोकांचा आवाज माइकमध्ये चांगला येत नाहीये. किशोर कुमार समजले कारण त्यांना बंगाली येत होती. त्यांनी आशा भोसले यांना सांगितले की, काहीतरी गडबड आहे. आशा काहीच बोलल्या नाहीत. रॉबिन चटर्जी यांनी संगीत दिग्दर्शक खेमचंद प्रकाश यांना सांगितले की, तुम्ही दुसरे गायक आणा. यांचा आवाज गाण्यालायक नाहीये. त्यानंतर दोघेही स्टुडिओतून निघून गेले होते.
१९४३ मध्ये मिळाला पहिला ब्रेक
८ सप्टेंबर १९३३ रोजी आशा भोसले यांचा जन्म ब्रिटिशकालीन भारतातील सांगली येथे झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे रंगमंच कलाकार होते. आशा अवघ्या ९ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. अशा परिस्थितीत लतांनीच संघर्ष करून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि बहिणींचे संगोपन केले. कुटुंब आधी पुणे आणि नंतर मुंबईत येऊन स्थायिक झाले. येथे अवघ्या 10 वर्षांच्या वयात आशा भोसले यांनी गाणे सुरू केले. त्यांना पहिला ब्रेक मराठी चित्रपट ‘माझा बाळ’ (१९४३) मधील ‘चला चला नाव बाळा’ या गाण्याने मिळाला. आशा फक्त १५ वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांना हिंदी चित्रपट ‘चुनरिया’ मधील ‘सावन आया’ हे गाणे गाण्याची संधी मिळाली.
गझल, अभंग, भावगीते, भूपाळी ते अगदी पाश्चात्य ढंगाची ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांती ओम’ सारखी सुपरहिट गाणी… आशाताईंनी प्रत्येक प्रकारच्या संगीतात आपल्या आवाजाची जादू निर्माण केली. केवळ गायनच नाही, तर संगीतात नवनवीन प्रयोग करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना ‘बॉलिवूडची सर्वात वर्सटाईल गायिका’ म्हणून ओळखले गेले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वडिलांकडे संगीताचे धडे गिरवणाऱ्या आशाताईंनी आपल्या आयुष्यातील ८० हून अधिक वर्षे या कलेला समर्पित केली होती.
आशा भोसले यांना शनिवारी (११ एप्रिल) सायंकाळी प्रचंड थकवा आणि फुफ्फुसांच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी ‘मल्टी ऑर्गन फेल्युअर’मुळे (सर्व अवयव निकामी झाल्याने) त्यांची प्राणज्योत मालवली. आशाताईंचे पार्थिव उद्या, सोमवारी सकाळी ११ ते २ या वेळेत त्यांच्या लोअर परळ येथील ‘कासा ग्रांडे’ निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.