Home Blog Page 34

नदीच्या पात्रातून कचरा अन मेट्रोचे भंगार पावसाळ्यापूर्वी काढून सफाई कधी होणार ?

पुणे- नाल्यांची सफाई नेहमीच माध्यमांतून गाजते पण नदी जीला पवित्र देखील मानले जाते अशा नदीच्या सफाईसाठी कोणी भल्या जोरदार दमदार पावसाचीच आणि धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होण्याचीच जणू वाट पाहत आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी स्थिती नेहमी असते . याच पार्श्वभूमीवर आज क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी काही फोटो सह महापालिका आयुक्तांकडे गाऱ्हाणे गायले आहे. पहा वाचा त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे….

मा. नवलकिशोर राम,
आयुक्त, पुणे मनपा.
विषय –
1) पावसाळ्यापूर्वी नदीपात्राच्या सफाई बाबत.
2) बाबा भिडे पुलाचे काम अजून किती वर्ष चालणार ?
मा. महोदय,
शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून त्याची पावसाळ्यापूर्वी सफाई होणे आवश्यक आहे अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने करत आहे.
विशेषतः डेंगळे पूल ते म्हात्रे पूल पर्यंत चा नदीपात्राचा भाग हा अत्यंत अस्वच्छ असून सोबत बाबा भिडे पुलाशेजारील काही छायाचित्र जोडत आहे.सदर कचरा नं हलविल्यास अवकाळी पावसाने किंवा ऐन पावसाळ्यात हा कचरा पुनःश्च नदीतून वहात जातो व शेजारील गावातून वाहताना तेथे अडकतो. याचे एक उदाहरण म्हणजे कवडीपाट येथे ह्या अडकलेल्या कचऱ्यामुळे तेथे येणारे परदेशी स्थलांतरित पक्षी कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे.
तसेच येथे नदीपात्रात मेट्रो चे साहित्य पडलेले असून ते देखील पावसाळ्यापूर्वी हलविणे गरजेचे आहे.
बाबा भिडे पुलाचे काम अनेक वर्ष सुरूच असून अनेकदा हा पूल वाहतुकीस बंद करून देखील येथे काम अपूर्ण असल्याचे दिसून येते. तरी मेट्रो व्यवस्थापनाशी चर्चा करून ह्या पुलाचे काम कधी पूर्ण होईल व येथील बॅरिकेड कधी काढले जातील याची माहिती जाहीर करावी.
आपण ह्या बाबत तत्परतेने कारवाई कराल अशी खात्री वाटते.
आपला,
संदीप खर्डेकर.

‘माजी रणजीपटू’ निघाला सायबर चोर,32 लाखांच्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी 7 जण जेरबंद

मुंबई-क्रिकेटचे मैदान गाजवणारा माजी रणजीपटू ऋषी तुषार आरोठे सायबर गुन्हेगारीच्या ‘पिच’वर फसवणुकीची बॅटिंग करत असल्याचे उघड झाले आहे. गोरेगावमधील एका ज्येष्ठ महिलेला ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याची’ भीती दाखवून ३२.७० लाखांना लुटणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर सेलने पर्दाफाश केला. पोलिसांनी गुजरात आणि नांदेडमधून एकूण ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याची’ भीती दाखवून ३२.७० लाखांना लुटणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर सेलने पर्दाफाश केला. पोलिसांनी गुजरात आणि नांदेडमधून एकूण ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मास्टरमाईंड ऋषी आरोठे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबई, गुजरात आणि बंगळुरूतही गुन्हे दाखल आहेत. कमी वेळात श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी त्याने फसवणुकीच्या पैशांसाठी ‘म्युल अकाउंट्स’ (भाड्याची बँक खाती) पुरवण्याचे जाळे विणले. विशेष म्हणजे, ऋषीचे वडील आणि क्रिकेट प्रशिक्षक असलेले तुषार आरोठे हेदेखील काही वर्षांपूर्वी क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणात अडकले होते. कोट्यवधींच्या रोकड जप्तीप्रकरणी त्यांनाही अटक झाली होती.

पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देणार ,त्यांचे सर्व प्रश्न सोडविणार -महापौर

पुणे-महापालिका हद्दीतील प्रत्येक पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देणार असून अशा अधिकृत व्यवसायिकांना संरक्षण देण्यात येईल अशी घोषणा आज येथे महापौर मंजुषा नागपुरे यांनी केली आहे.

शहरातील पथारी व्यवसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसायाला शिस्तबद्ध व कायदेशीर स्वरूप देण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.याबाबत त्या म्हणाल्या,’शहरातील सर्व पथारी व्यवसायिकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्यात येणार असून, या माध्यमातून त्यांना अधिकृत परवाना (लायसन्स) प्रदान करण्यात येईल. या बारकोडमध्ये संबंधित व्यवसायिकाची संपूर्ण माहिती, व्यवसायाचा प्रकार व परवानगीची जागा यांचा समावेश असेल.या उपक्रमामुळे अनधिकृत पथारी व्यवसायावर नियंत्रण येऊन अधिकृत व्यवसायिकांना संरक्षण मिळणार आहे, तसेच शहरातील व्यवस्थापन अधिक सुसूत्र होण्यास मदत होणार आहे.तसेच, पथारी व्यवसायिकांच्या संघटनेने महानगरपालिकेस लेखी अनूमोदन देत पुढील बाबींची हमी दिली आहे की, ते रस्त्यावर कचरा टाकणार नाहीत, स्वच्छता राखतील, महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करतील तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतील.

या संदर्भात आपण संबंधित सर्व विभागांना या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, या माध्यमातून शहरातील पथारी व्यवसाय अधिक शिस्तबद्ध, स्वच्छ व नियमनबद्ध करण्याचा उद्देश आहे.असेही महापौर नागपुरे यांनी म्हटले आहे.

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी ​मुळा-मुठा नदीला प्रदुषणाच्या विळख्यातून मुक्त करण्याच्यादृष्टीने
आज मुंढवा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र तसेच भैरोबा नाला सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसराची पाहणी केली; मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

श्रीमती मुंडे म्हणाल्या, मुळा-मुठा नदीला प्रदूषणातून मुक्त करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहणार असून प्रदूषणाचे मूळ शोधून त्यावर तांत्रिक आणि प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलावीत. मुळा-मुठा नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

पुण्यातील सांडपाणी प्रक्रियेची गती वाढवण्यासाठी भैरोबा नाला येथील प्रकल्पाचा संबंधित अधिकाऱ्यांच्या कडून आढावा घेतला. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारचीच नाही, तर आपलीही जबाबदारी आहे. नदीत कचरा टाकणे थांबवूया, पुण्याचे वैभव वाचवूया, असे आवाहन मंत्री मुंडे यांनी पुणे करांना उद्देशून केले.

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी – केजीपी12 (Gamini – KGP12) या भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला आहे. ही मादी चित्ता गामिनीच्या पहिल्या वितातील (First Litter – पहिल्यांदा जन्म दिलेल्या पिल्लांच्या समूहातील) दुसरे पिल्लू असून, तिचे वय 25 महिने आहे. ही घटना भारताच्या चित्ता संवर्धनाच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या घटनेसंदर्भातली माहिती, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमावर सामायिक केली असून, ही घटना कुनो राष्ट्रीय उद्यान आणि देशाच्या वन्यजीव संवर्धन प्रयत्नांमधील  मैलाचा दगड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गामिनीची भारतात जन्मलेली मादी चित्ता, गेल्या एक वर्षांपेक्षा जास्त काळापासून इथल्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात वावरत आहे. या मादी चित्त्याने नैसर्गिक वातावरण आणि स्थितीत यशस्वीपणे चार बछड्यांना जन्म दिला. ही घडामोड चित्ता पुनर्वसन कार्यक्रमातील एक मोठा टप्पा ठरला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

चित्त्यांचे भारतातील अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी 2022 मध्ये भारतात  चित्ता पुनर्वसनाला सुरूवात झाल्यापासून, चित्त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नोंदवला हा पहिलाच जन्म आहे, यासोबतच भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याच्या बाबतीतीलही ही अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात अधोरेखित केले आहे. भारतातील नैसर्गिक परिस्थितीत चित्त्यांचे अस्तित्व टिकवणे आणि त्यांचे प्रजनन होत राहील हे सुनिश्चित करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असून, ही उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक मोठे यश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या यशस्वी घटनेतून भारतीय पर्यावरणीय परिस्थितीसोबत जुळवून घेण्याच्या दृष्टीने चित्त्यांमधील वाढती क्षमता दिसून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासोबतच या घटनेतून कुनो राष्ट्रीय उद्यानातील संवर्धन आणि विज्ञाननिष्ठ व्यवस्थापनासाठी केल्या जात असलेल्या शाश्वत प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही यातून दिसून येते असेही त्यांनी म्हटले आहे.

समाज माध्यमावरील आपल्या संदेशातून केंद्रीय मंत्री मंत्री भूपेंद्र यादव यांनी चित्ता संवर्धन कार्यक्रमात सहभागी असलेले वन्यजीव व्यवस्थापक, पशुवैद्यक आणि क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या समर्पित आणि अथक परिश्रमांचीही प्रशंसा केली आहे. ही घटना देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यासोबतच त्यांनी या प्रकल्पाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले आहे.

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :
भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत घर यादी गट व घर गणना ही प्रक्रिया दिनांक १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने आज Field Trainers च्या (Batch १, २,३ व ४ बॅच) प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष field work देखील पार पाडण्यात आले.याप्रसंगी १४७ fild ट्रेनर उपस्थित होते.

महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी नवल किशोर राम आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) .ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त विजय लांडगे तसेच शहर जनगणना कार्यालयाच्या माध्यमातून सदर प्रशिक्षणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती.
या उपक्रमांतर्गत शहरातील विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांची Field Trainer म्हणून निवड करण्यात आली ., Master Trainer म्हणून महा सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे,निवासी नायब तहसीलदार मावळ, गणेश तळेकर,निवासी नायब तहसीलदार शिरूर स्नेहा गोसावी,निवासी नायब तहसीलदार बारामती नामदेव काळे यांनी अतिशय सोप्या, ओघवत्या भाषेत सर्व जनगणणेबाबत संकल्पना, digital जनगणना करतानाचे माध्यमे, त्याचा वापर, आणि नागरिकांशी प्रत्यक्ष प्रगणक आणि पर्येंवेक्षक यांनी साधावायचा संवाद, निर्धारित केलेली प्रश्नावलीचे अचूक ज्ञान, आणि ती भरताना घ्यायची विशेष काळजी, आणि भारत सरकार, आणि जनगणना संचालनालायकडून वेळीवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करुन विहित वेळेत घर गणना गट आणि गणना घरे यांची प्रथम टप्प्यातील नोंदणी कार्याबाबतीतील प्रशिक्षण प्रधान जनगणना आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर जनगणना कार्यालयच्या वतीने यशस्वीपणे पार पडले गेले.
सर्व field trainers यांनी प्रशिक्षणबाबत विशेष समाधान व्यक्त केले.राष्ट्रीय कर्तव्य करण्याची ही संधी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
पुणे शहरासाठी १४७ field trainers नियुक्त केले आहेत.

या प्रसंगी आयुक्त यांनी Field Trainers यांना मार्गदर्शन करताना नागरिक, गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी (Chairman), शाळा, महाविद्यालये तसेच सर्व संबंधित घटकांनी घर यादी गट व घर गणना प्रक्रियेस उत्स्फूर्त सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच, यंदाच्या जनगणनेत नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या स्व-गणना (Self Enumeration) या पर्यायाचा जास्तीत जास्त वापर करावा, असेही आवाहन केले.जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, प्रत्येकाने यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून प्रगणकांना सहकार्य करावे.असे ते म्हणाले.

नागरिकांसाठी आवाहन –

महापालिका आयुक्त व अतिरिक्त महापालिका आयुक्त
पुणे महानगरपालिका
आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी नवल किशोर राम आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी जनगणना २०२७ या राष्ट्रीय कर्तव्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
आयुक्त यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया असून शासनाच्या विविध योजना, धोरणे आणि संसाधनांचे योग्य नियोजन यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने प्रगणकांना अचूक आणि संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे.
अतिरिक्त आयुक्त यांनीही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, यंदाच्या डिजिटल जनगणनेमध्ये स्व-गणना (Self Enumeration) हा सुलभ पर्याय उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून जनगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्था आणि सर्व घटकांनी प्रगणकांना आवश्यक सहकार्य करावे.
दोन्ही मान्यवरांनी एकमुखाने नमूद केले की,
“जनगणना ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून, देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान असलेले राष्ट्रीय कर्तव्य आहे. चला, आपण सर्वजण मिळून या महत्त्वपूर्ण कार्यात सहभाग नोंदवूया.”

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली.

पुणे, दि. 10 — उंड्री (ता. हवेली) परिसरातील रेडिमिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. बांधकाम विकास विभाग, झोन-१च्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली असून, सुमारे २७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडण्यात आली.

या कारवाईत अनधिकृत शेड, स्ट्रक्चर्स, यंत्रसामग्रीसाठी उभारलेली बांधकामे तसेच परवानगीशिवाय उभारण्यात आलेले विविध घटक हटविण्यात आले. संबंधित प्रकल्पांनी आवश्यक परवानग्या न घेता काम सुरू ठेवले असल्याचे निदर्शनास आल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.

अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे आणि कार्यकारी अभियंता सुरेश साखळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संदीप शिंदे व राहुल सोरटे, तसेच कनिष्ठ अभियंता ऋतुजा चिलकेवार, राजेंद्र फुंडे, सागर शिंदे व किरण आहिरराव यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ (बिगारी) तसेच दोन जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला.

यावेळी एकूण ७ RMC प्लांट्सवर कारवाई करण्यात आली. संबंधित प्रकल्पांविरुद्ध पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाहीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच महावितरण (MSEB) यांना कळविण्यात आले आहे. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणांच्या सहकार्याने ही कारवाई सुरळीत पार पडली.

नियमबाह्य RMC (रेडिमिक्स काँक्रीट) प्लांट व बांधकामांवर तात्काळ कारवाई करून ते पाडण्यात येतील. परवानगीशिवाय प्रकल्प चालविणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. RMC प्लांट सुरू करण्यापूर्वी पुणे मनपा, MPCB व MSEB यांच्या आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक आहे.

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ

सिंधुदुर्ग, दि. 11 एप्रिल
नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात नवनवीन माहिती समोर येते आहे. आज उत्खनन स्थळाची राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी पाहणी करुन कामकाजाचा आढावा घेतला.

माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुडाळ येथील पंचायत समिती कार्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले.

यावेळी आमदार निलेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत कुडाळमधील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी सर्व विधी पदवीधरांशी संवाद साधून, त्यांचे अभिनंदन केले. विधी शिक्षणात उत्तम दर्जा जपल्याबद्दल कॉलेज व्यवस्थापनाचे आणि शिक्षकांचे कौतुक केले.

यावेळी आमदार निलेश राणे, पुण्याच्या डी.ई.एस. नवलमल फिरोदिया, लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुनीता आढाव, म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक डॉ. तारक आरोलकर, व्हिक्टर डांटस फाउंडेशनचे अध्यक्ष व्हिक्टर एफ. डांटस कॉलेजच्या प्राचार्य शिल्पा मार्गज, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे आणि कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर उपस्थित होत्या.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित आधार किट वाटप उपस्थित राहून सेवा केंद्राचे वितरण केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सीताराम तेली, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, सांस्कृतिक विभाग अजय पाटील, दिग्दर्शक दिपक कदम, तहसीलदार सचिन पाटील आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी कट्टा येथील शतक महोत्सवी कट्टा पंचक्रोशीत शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले त्यांच्या हस्ते कला दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

मनःशांती- विश्वशांतीसाठी भारतीय योग व सूर्यनमस्कार दिशादर्शक

पोलंडचे तज्ञ डॉ. क्रिश्टॉफ स्टेक यांचे विचार
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांच्या निवासस्थानी घडला हृद्य संवाद

पुणे, ११ एप्रिल ः सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शारीरिक स्वास्थ, योग चिकित्सा, मनःस्वास्थ आणि पर्यायाने समाज स्वास्थ साध्य करणे आजच्या वैश्विक अशांतीच्या काळात गरजेचे आहे, असे विचार वॉर्सा, पोलंड येथील शारीरिक शिक्षण शास्त्रातील तज्ञ प्राध्यापक डॉ. क्रिश्टॉफ स्टेक यांनी व्यक्त केले.

भारत भेटीवर आले असतांना ते थोर शिक्षण तज्ज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा कराड यांच्या विश्वशांती क्षेत्रातील कार्याने प्रभावीत होऊन  त्यांना भेटायला कोथरुड येथील त्यांच्या निवासस्थानी आले. यावेळी निमंत्रतासाठी एक स्नेहमेळावा आयोजीत करण्यात आला होेता.

या  प्रसंगी डॉ. स्टेक यांना मानाची शाल आणि जगतातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

 आपली भावना व्यक्त करताना डॉ. क्रिश्टॉफ स्टेक म्हणाले, भारतीय संस्कृती ही नुसती एक जीवनशैली नसून ती जीवनाचे एक संपूर्ण तत्वज्ञान आहे. विविध धर्म, कला, संगीत, संस्कार आणि परंपरा यांचे संगम असलेली भारतीय संस्कृती केवळ भारताच नव्हे तर संपूर्ण जगभर आदर्श मानली जाते. त्याची सुंदरता, विचार आणि त्याची संस्काराधारा हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा आधार बनतात.  विविधता, अध्यात्म आणि वसुधैव कुटुंबकम या तत्वावर आधारित आध्यात्मिक व नैतिक मूल्ये, योग व आयुर्वेद यांचे मानवाच्या विकासात योगदान तसेच मानवतेची शिकवण देते.

विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी भावना व्यक्त केली की सध्याच्या युद्ध जन्य परिस्थितीमध्ये जेव्हा जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, अशा वेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध स्थगितीची घोषणा करुन जगाला एका मोठ्या संकटापासून वाचविले आहे. त्याबद्दल राष्ट्रपती ट्रम्प आणि इराणचे सरकार यांचे आभार.  
डॉ. क्रिश्टॉफ स्टेक यांच्या भेटीच्या निमित्ताने जगात शांतता आणि सद्भाव पसरविण्याचा संदेश  दिला जावा अशी आशा ही डॉ. कराड यांनी व्यक्त केली. विश्वगुरु भारताची ही स्वत्वाचा बोध घेणारी मालिका कायम सुरू राहिली पाहिजे असे त्यांनी उपस्थितांना संबोधिले.

माईर्स चे  रजिस्ट्रार डॉ. रत्नदीप जोशी यांनी सांगितले की, डॉ. स्टेक यांनी पोलंड येथील यान युनिव्हर्सिटीमधून शारीरिक शिक्षणात पीएचडी केली आहे. ते गेल्या ५० वर्षापासून भारतात येऊन येथे त्यांनी  कैवल्य धाम योगसंस्था, बनारस हिदू युनिव्हर्सिटी इ. संस्थामधून संस्कृत आणि योगविषयी संशोधन केले आहे. भारतीय संस्कृतीचे वैश्विक वैचारिक दर्शन सर्व जगाला घडविण्यासाठी युरोप पासून सर्व खंडांमध्ये डॉ स्टेक करीत असलेले कार्य भारतमातेचे गौरवशाली महात्म्य वर्णन करते.

या प्रसंगी प्रा.डॉ. कराड सर यांच्या प्रेरणादायी जीवनयात्रेवर आधारित डॉ. संजय उपाध्ये यांनी रचलेल्या निवडक गीतांचे सांगीतिक सादरीकरण प्रा. शशांक दिवेकर यांनी केले. प्रा. शशांक दिवेकर यांनी या गीतांना श्रवणीय चाली बाधले आहेत. पाश्चात्य आणि पौर्वात्य संस्कृतींचे ऋणानुबंध घट्ट करून वसुधैव कुटुम्बकम या तत्वाचे सर्वांना स्मरण करून देणारा हा हृदय संवाद उपस्थित निमंत्रित सर्वांना खूपच भावला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ट मान्यवर या ज्ञान चर्चासत्रासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समतेचा विचार घराघरात पोहोचवूया! मंत्री चंद्रकांतदादा पाटलांचा संकल्प

पुणे: सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त (द्विशताब्दी वर्ष) राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कोथरूड येथील निवासस्थानी महात्मा फुले यांना अभिवादन केले. महात्मा फुले यांचा समतेचा विचार केवळ भाषणात नाही, तर कृतीत आणणे आपली सर्वांचे कर्तव्य आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ते म्हणाले की, “महात्मा फुलेंनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली आणि समतेचा विचार समाजात रुजवला. त्यांचे कार्य आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अनुसरून महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.”

या कार्यक्रमात केवळ राजकीय पदाधिकारीच नव्हे, तर कोथरूडमधील सामान्य नागरिक, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.

राजर्षी शाहू महाराजांचे वंशज मालोजीराजे छत्रपती, आ. योगेश टिळेकर, भाजपचे ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विकास लवटे, माजी शहराध्यक्ष नामदेव माळवदे, रिपाइंचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह अनेक दिग्गज विविध पक्षांचे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होऊन महात्मा फुलेंना अभिवादन केले. त्यामुळे हा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नसून महात्मा फुलेंच्या पुरोगामी विचारांची उजळणी करणारा एक ऊर्जादायी उत्सव ठरला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

मुंबई, दि. 11 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ, पुणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

या सामंजस्य कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बालकांचे मानसिक आरोग्य हे राज्याच्या उज्ज्वल भविष्याचे पायाभूत तत्व आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून आपण बालकांच्या भावनिक आणि मानसिक सक्षमीकरणासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येत आहेत.याचा फायदा भविष्यात होणार असून प्रत्येक बालक आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करू शकेल.

हा करार एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ, पुणे यांच्यासोबत करण्यात आला आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये केअरगिव्हर-लेड सेल्फ हेल्प ग्रुप्स च्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवा अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. ऑफलाइन आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे, जनजागृती वाढवणे आणि मानसिक आजारांबाबतचा कलंक कमी करणे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (डीएमएचपी) सोबत समन्वय साधून राबवला जाणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून करण्यात आलेला हा सामंजस्य करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित असणार आहे. या करारामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेत गुणवत्ता, उपलब्धता आणि सर्वसमावेशकता वाढवण्यास मोठी चालना मिळणार आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव विलास बेंद्रे तसेच एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थचे संस्थापक-संचालक, डॉ. प्रा. अनिल वर्तक, उपाध्यक्ष प्राची बर्वे, सचिव स्मिता गोडसे, खजिनदार मंजिरी चव्हाण, आजीवन सदस्य संध्या वर्तक यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

अश्व क्षेत्राला मिळेल उभारी,राज्य सरकार संस्थाशी करणार सामंजस्य करार:मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा


इक्वाइन कलेक्टिव्ह आयोजित द इक्वेस्ट्रियन राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पुणे, ११ एप्रिल ः अश्व क्षेत्रांच्या परिसंस्थेला उभारी देण्यासाठी राज्य सरकार विविध संस्थाशीं सहकार्य करण्यास आणि विद्यापीठांशी जोडले जाण्यास तत्पर असेल. त्यासाठी संस्थांशी सामंजस्य करार करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिच्या अधिपत्याखालील द इक्वाईन कलेक्टिव्ह या संस्थेच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या द इक्वेस्ट्रियन फोरम २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
या परिषदेचे उदघाटन प्रसंगी राज्य सरकारच्या पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच द इक्वाइन कलेक्टिव्हच्या संस्थापिका  गायत्री कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कार्यकारी संचालिका  डॉ. आदिती राहुल कराड, नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. एफ. एफ. वाडिया व जयपाल सिंग रावल उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या, या क्षेत्रात केवळ क्रीडा नाही तर ग्रामीण विकास, पर्यावरण आणि रोजगार निर्मितीमध्ये प्रचंड क्षमता दडलेली आहे. नव्या कल्पना नेहमीच आव्हानात्मक असून ते शक्तीशाली असते. अश्व क्षेत्रासाठी सामूहिक दृष्टिकोन स्वीकारण्याची ही संकल्पना अत्यंत समायोचित आणि आवश्यक आहे.
गायत्री कराड म्हणाल्या, देशात अश्व क्षेत्र हे तिनशे अब्ज डॉलर्सचे मूल्य असलेले जागतिक अश्व परिसंस्थेचा एक भाग आहे. परंतू ते अद्याप ही असंघटित अवस्थेत आहे. या क्षेत्रातील कार्यरत मुनष्यबळाला औपचारिक प्रशिक्षण आणि प्रमाणिकरणाचा अभाव दिसून येत आहे. द इक्वेस्ट्रियन फोरमच्या माध्यमातून कौशल्य, विकास कामाचे प्रमाणीकरण आणि दीर्घकालीन करिअरच्या संधी उपलब्ध करुन देणारे एक व्यासपीठ उभारू. या क्षेत्रात कार्यरत हजारो लोकांसाठी शाश्वत संधी निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

जयकुमार रावल म्हणाले,  “मानव आणि घोडे यांच्यातील नाते हे विश्वास, शिस्त आणि भावनिक बंधावर आधारलेले आहे. भारताला अश्व क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभला आहे; या क्षेत्राचे आधुनिकीकरण करतानाच, हा वारसा जतन करणे आणि त्याचा प्रचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अश्व पैदास, अश्व पर्यटन, पशुवैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये विकासाची मोठी क्षमता उपलब्ध आहे.”

डॉ. राहुल व्ही. कराड म्हणाले, “‘द इक्वेस्ट्रियन फोरम’  सारख्या मंचांच्या माध्यमातून, एमआयटी डब्ल्यूपियूचे उद्दिष्ट शिक्षण, प्राणी कल्याण, क्रीडा विज्ञान आणि नाविन्य  यांना परस्परांशी जोडून भारताची ‘इक्वेस्ट्रियन इकोसिस्टम’ अधिक बळकट करणे हे आहे. शाश्वत विकासासाठी शैक्षणिक संस्था, शासन आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्य अनिवार्य आहे.”

उद्घाटन सत्रानंतर ‘धोरण आणि प्रशासन’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये अश्व उद्योगाचे ‘रीब्रँडिंग’ (पुर्न प्रतिष्ठापना) आणि सक्षमीकरण करण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार सायरस मदन यांनी सूत्रसंचालन केलेल्या या चर्चासत्रात पंकजा मुंडे,  जयकुमार रावल, ‘नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. फारुख वाडिया आणि चंदीगड येथील अश्व शल्यचिकित्सक डॉ. अनहद सिद्धू यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रविकुमार साहू यांनी केले.

मार्केट यार्ड परिसरातील खाजगी कोचिंग क्लास मध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत भयानक कृत्य…!

पुणे- येथील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम येथील ‘मनशील अ‍ॅकॅडमी’ या खाजगी कोचिंग क्लास मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी विकास दिलीप गायकवाड (वय ३०) या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मात्र, अ‍ॅकॅडमीच्या मालकांवर किंवा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल न झाल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या विषयात लक्ष घातले असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विकास गायकवाड हा गेल्या तीन महिन्यांपासून पीडित विद्यार्थ्याचे शारीरिक शोषण करत होता. शिकवणी वर्गाच्या परिसरातच हा सर्व किळसवाणा प्रकार सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी केवळ अश्लील चाळे करून थांबला नाही, तर त्याने या सर्व कृत्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केले होते. या व्हिडिओचा वापर करून आरोपी पीडित मुलाला ब्लॅकमेल करत होता का, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.

बाल हक्क कार्यकर्त्यांच्या मते, अशा घटना रोखण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद वाढवणे गरजेचे आहे. जर मुलाच्या वागण्यात अचानक बदल झाला, तो एखाद्या ठिकाणी जाण्यास घाबरत असेल किंवा चिडचिडा झाला असेल, तर त्याच्याशी संवाद साधावा. तसेच, क्लासेसमध्ये प्रवेश घेताना तिथल्या सुरक्षिततेची आणि सीसीटीव्ही कव्हरेजची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

मनशील अकॅडमी’ मधील ही घटना संपूर्ण पुणे शहरासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी एक काळा डाग आहे. आरोपीला अटक झाली असली, तरी जोपर्यंत संस्थाचालकांची जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत अशा प्रवृत्तींना आळा बसणार नाही. पोलीस प्रशासन या प्रकरणात पारदर्शक तपास करून पीडित मुलाला न्याय मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पालक आपल्या पोटाला चिमटा काढून हजारो हजारो रुपये फी भरून त्यांना खासगी शिकवणी वर्गांना पाठवतात. मात्र, ज्यांच्याकडे विश्वासाने पाल्याला सोपवले जाते, तिथेच जर आपली मुले सुरक्षित नसतील, पालकांनी कोणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न निर्माण होतो.

सध्या आरोपी विकास गायकवाड पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्याचे मोबाईल फोन जप्त केले असून त्यातील व्हिडिओ क्लिप्स आणि चॅटिंगची तपासणी सुरू आहे. मात्र, या प्रकरणात संस्थेच्या मालकांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पीडित मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून केवळ कर्मचाऱ्यावरच नाही, तर ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडले, त्या संस्थेवरही कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.

घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी ‘मनशील अकॅडमी’ गाठून तिथल्या संचालकांना जाब विचारला. मुलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या अशा संस्थांच्या निष्काळजीपणामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढते, असा आरोप पालकांनी केला आहे. पालकांनी तातडीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपी विकास गायकवाडला बेड्या ठोकल्या.

मात्र, या प्रकरणात एक मोठा पेच निर्माण झाला आहे. ज्या संस्थेच्या आवारात हा प्रकार घडला, त्या अकॅडमी’च्या व्यवस्थापनाने सुरक्षा व्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही यंत्रणा असूनही तीन महिने हा प्रकार कोणाच्या लक्षात कसा आला नाही? संस्थेच्या संचालकांवर हलगर्जीपणा गुन्हा का दाखल झाला नाही? असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यावर नकार दिला.

पीडित मुलगा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होता. तो अचानक शिकवणीला आणि शाळेला जाण्यासाठी टाळाटाळ करू लागला. जो मुलगा अभ्यासात हुशार होता, तो अचानक गप्प राहू लागल्याने पालकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पालकांनी त्याला विश्वासात घेत विचारपूस केली असता, त्याने आपल्यावर ओढवलेला हा भयंकर प्रसंग सांगितला. मुलाने सांगितलेली हकीकत ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने खासगी क्लासेससाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणे, कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी करणे आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा असणे अनिवार्य आहे. मात्र, ‘मनशील अकॅडमी’मध्ये या नियमांचे पालन झाले होते का? जर कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य करत असेल, तर व्यवस्थापनाचे नियंत्रण कुठे होते? या प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहेत.

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. दरवर्षी हजारो विद्यार्थी विविध परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात येतात. गंगाधाम आणि मार्केट यार्ड परिसर हा अशा शिकवणी वर्गांसाठी ओळखला जातो. मात्र, ‘मनशील अकॅडमी’मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “आम्ही लाखोंची फी भरतो ती केवळ शिक्षणासाठी नाही, तर आमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठीही. जर क्लासमध्येच मुले सुरक्षित नसतील, तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा?” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत .

पुणे महापालिकेला मंत्री पंकजा मुंडेंचा सल्ला:नदी सुशोभिकरणापेक्षा पर्यावरणाला,प्रदूषणमुक्तीला महत्व द्या

पुणे, दि. ११: राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन कामासाठी स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून नदी सुशोभीकरण करताना पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्तीला प्राधान्य द्यावे असे निर्देश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत पुणे शहरातील मुळा- मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे,स्थायी समितीचेअध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मुंडे म्हणाल्या, अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले जातात; मात्र योग्य देखभालीअभावी ते बंद अवस्थेत असतात. पुणे शहरातील सर्व सुरु असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवले जातील, त्याबाबत कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची महानगरपालिकेने काळजी घ्यावी.

त्या पुढे म्हणाल्या, औंध येथील बोटॅनिकल गार्डनच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी कृषी विभागाची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्यासाठी विविध जिल्ह्यांचा, विभागांचा अभ्यास करुन नवीन धोरण आणले जाईल. बारामती येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्यालय पुणे येथेच राहील यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शहरातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल.

बैठकीत नवल किशोर राम यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी महानगरपालिका हद्दीत निर्माण होणारे मैलापाणी व प्रक्रिया क्षमता,अंमलबजावणी आणि निधी पुरवठा, मुख्य मलवाहिन्या व कामाची सद्यस्थिती, प्रकल्पाची आर्थिक स्थिती,प्रकल्पातील अडथळे, वारजे,वडगाव, मुंढवा, मस्त्यबीज केंद्र हडपसर, खराडी, धानोरी, बाणेर, तानाजीवाडी भैरोबा मैलापाणी शुद्धीकरण केंद्राची माहिती सादर करण्यात आली.

सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत मंत्री अदिती तटकरेंनी साधला ‘आपुलकीचा संवाद’

पुणे, दि. ११ एप्रिल: मायेच्या उबेत वाढणाऱ्या निरागस चेहऱ्यांमध्ये जेव्हा सत्तेचा नव्हे तर स्नेहाचा स्पर्श मिसळतो, तेव्हा तो क्षण केवळ औपचारिक राहत नाही तो हृदयात साठवून ठेवावा असा अनुभव ठरतो. अशाच भावुक वातावरणात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन बालगृहातील अनाथ मुलींमध्ये रमल्या.

‘आपुलकीचा संवाद’ या उपक्रमातून माईंच्या कार्याला अभिवादन करत त्यांनी मुलींच्या कलागुणांना दाद दिली आणि त्यांच्या इतिहासप्रेमाला मनापासून सलाम केला.
संस्थेत आगमन होताच प्रवेशद्वाराजवळ चिमुकल्या मुलींनी स्वागत ताई म्हणत गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांनी माईंच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. त्या क्षणी वातावरणात एक वेगळीच भावूकता दाटून आली होती. माई आज आपल्यात नसल्या, तरी त्यांच्या कार्याच्या रूपाने त्या प्रत्येक हृदयात जिवंत आहेत, ही भावना सर्वांच्या मनात दाटून आली.

मुलींमध्ये मिसळून, त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री अदिती तटकरे या अक्षरशः त्या निरागस जगात रमल्या होत्या. त्यांनी सांगितले की, “संस्कार आणि विचार रुजविणे आजच्या काळात अतिशय कठीण झाले आहे. पण माईंच्या सर्व संस्थांमध्ये हे काम अत्यंत सुंदर आणि प्रभावी पद्धतीने सुरू आहे. अनेक संस्था संगोपन करतात, पण माईंची संस्था समानतेने, मायेने आणि संस्कारांनी अनाथ मुलांचे संगोपन करत असल्याचे पाहून मनाला प्रचंड समाधान मिळते, असेही श्रीमती तटकरे म्हणाल्या.

कार्यक्रमादरम्यान कु. सारिका आणि कु. पावनी यांनी माईंच्या जीवनावर प्रकाश टाकत अत्यंत हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या शब्दांतून माईंच्या आयुष्याची वेदना, संघर्ष आणि मातृत्वाचे दर्शन घडले. यानंतर चिमुकल्या मुलींनी सादर केलेला ऐतिहासिक पोवाडा हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या पोवाड्यातून मुलींनी युद्धकाळातील प्रसंग जिवंत केले. इतिहासाची इतकी सखोल जाण आजच्या पिढीतील मुलींमध्ये पाहून मंत्री तटकरे या भारावून गेल्या.

श्रीमती तटकरे म्हणाल्या, आजच्या चिमुकल्या पिढीला आपला संपूर्ण इतिहास माहिती आहे, ही अतिशय अभिमानाची आणि महत्त्वाची बाब आहे.” माईंच्या सहवासाच्या आठवणी सांगताना त्या भावूक झाल्या. माझ्या वयाचे फार कमी लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना माईंचा सहवास लाभला. २००९ पासून मी माईंचे अनेक कार्यक्रम घेतले आहेत. आज त्यांच्या संस्थेत आल्यावर मन गहिवरून आले. माई आज हयात नाहीत याचे दुःख आहे, पण त्यांच्या कार्यातून त्या कायम आपल्या सोबत आहेत,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी मंत्री श्रीमती तटकरे यांच्या हस्ते बालगृहातील मुलींना फळांचे वाटप करण्यात आले.

संस्थेच्या अध्यक्षांनी शाल श्रीफळ आणि तुळशीचे रोप भेट देऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळणचे अध्यक्ष दिपक गायकवाड, ममता सपकाळ, विनय सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य रुपाली अमोल झेंडे, सभापती अमित झेंडे, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, बालगृहातील मुली आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन मुकेश चौधरी यांनी केले. ‘आपुलकीचा संवाद’ हा कार्यक्रम केवळ औपचारिक नव्हता, तर तो मायेच्या सावलीत घडलेला एक भावनिक मिलाफ होता ज्यात माईंच्या आठवणी, मुलींचे निरागस हास्य आणि संस्कारांची श्रीमंती एकवटली होती.

ममता बाल सदन, कुंभारवळण येथे झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष दिपक गायकवाड यांनी अनाथ मुलांच्या आधार नोंदणीतील अडचणींबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी अनाथ मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना सुचविणारे ५१ पानांचे सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनाची गांभीर्याने दखल घेत मंत्र्यांनी हा विषय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मांडण्याची ग्वाही दिली. तसेच आपल्या सचिवांना बोलावून संबंधित बैठकीत हे निवेदन सादर करण्याच्या सूचना दिल्या. अनाथ मुलांच्या प्रश्‍नांबाबत शासन पातळीवर सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बाल विकास मंत्र्यांसमोर गप्पांचा रंग अधिकच खुलला…

ममता बाल सदन, कुंभारवळण येथे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी चिमुकल्या मुलींशी मनमोकळा संवाद साधला. “तुम्हाला काय आवडते, कोणते खेळ खेळता, कोणती पुस्तके वाचता?” असे अनेक प्रश्न त्यांनी मुलींना विचारले. मुलींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंदाने आपल्या आवडी-निवडी व्यक्त केल्या. मंत्र्यांसमोर आपण आहोत याचे भान न राहता गप्पांचा रंग अधिकच खुलला. या आपुलकीच्या संवादातून मुलींच्या चेहऱ्यावर निरागस आनंद आणि आत्मीयतेची झलक दिसून आली.