‘विकसित भारत’ संकल्पनेवर पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा ४९वा स्थापना दिन साजरा
पुणे : शाश्वत विकास ही भारतीय विकासाची मूलभूत रचना आहे. निसर्गाकडून जितके घ्याल तितकेच त्याला परत करा ही भारतीय तत्त्वज्ञानातील शिकवण जगासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. कर्मयोगाचा सिद्धांत समजून त्यानुसार व्यवस्थापन केल्यास, मानव जातीसह निसर्गातील प्रत्येक घटकाला एक कुटुंब मानल्यास निश्चितच विकसित भारताचे स्वप्न साकारले जाईल, असा विश्वास निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.
पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा (पीएमए) ४९वा स्थापना दिन ‘विकसित भारत’ या प्रेरणादायी संकल्पनेवर बुधवारी सीपीआर ऑडिटोरियम, पाषाण रोड गणेशखिंड येथे साजरा करण्यात आला. त्या वेळी अविनाश धर्माधिकारी बोलत होते. समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पित्ती, पूना ॲब्रेसिव्हजचे संस्थापक व अध्यक्ष वीरेंद्र सूद, बँक ऑफ महाराष्ट्रचे संचालक प्रसेनजीत फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. पीएमएचे अध्यक्ष बाळ पाटील, उपाध्यक्ष प्रदिप तुपे, राहुल जोशी मंचावर होते. उत्कृष्ट कार्याबद्दल उत्कृष्ट शैक्षणिक संस्था – आयएमडीआर, उद्योजकांना सहाय्य करणारी उत्कृष्ट संस्था – टाय (द इंडस आंत्रप्रेन्युअर्स), वर्षातील उत्कृष्ट निर्यातदार प्रशांत बोरा, सामाजिक प्रभाव निर्माण करणारी संस्था – स्वरूपवर्धिनी, नेतृत्व क्षेत्रातील उल्लेखनीय महिला – श्वेता शालिनी, प्रथम पिढीतील यशस्वी उद्योजक – गौरव त्रिपाठी, वर्षातील उत्कृष्टता केंद्र – महाट्रेनर्स यांचा गौरव करण्यात आला.
सुरुवातीस पीएमएचे अध्यक्ष बाळ पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि सुवर्णमहोत्सवी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती दिली.
मानवाचा विकास साधताना भौतिक आणि आर्थिक कल्याणाव्यतिरिक्त मानसिक, मनोवैज्ञानिक आणि आध्यात्मिक कल्याणाला महत्त्व दिल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात कोणताच अडथळा येणार नाही, असे सांगून अविनाश धर्माधिकारी म्हणाले, विकास साधताना पाश्चत्यांच्या अंधानुकरणामुळे मानव जात विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. निसर्गाच्या अनिर्बंध लुटीमुळे संपूर्ण जग आज पर्यावरणाच्या ऱ्हासाशी झगडत आहे. परंतु विकासाचा भारतीय दृष्टीकोन असा नाही. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने योगदान देणे आवश्यक आहे.
प्रसेनजीत फडणवीस म्हणाले, विकसित भारत २०४७चे ध्येय गाठण्यासाठी शिक्षण आणि बँकिंग क्षेत्राची मदत होणार आहे. कारण बॅकिंग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या युवा पिढीकडून २०४७च्या विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मदत होणार आहे.
विकसित भारताचे स्वप्न साकारताना सरकारचे विविध उपक्रम, त्याविषयी सखोल विश्लेषण, धोरणात्मक आराखडा याविषयी आदित्य पित्ती यांनी माहिती दिली. विकसित भारताचे स्वप्न साकर करण्यात विकसित पुण्याचा मोलाचा वाटा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वीरेंद्र सूद म्हणाले, देशाला जर विकसित व्हायचे असेल तर आज पर्यायी ऊर्जांवर काम करायला सुरुवात करावी लागेल. सौर, पवन आणि जलऊर्जा याविषयी तांत्रिकदृष्ट्या अधिक विकास साधणे गरजेचे आहे. जो पर्यंत भारताची बँकिंग प्रणाली जागतिक प्रणालीशी समन्वय साधत नाही, तसेच संशोधन आणि विकास क्षेत्रात भरीव कार्य घडत नाही तोपर्यंत पुरेसा विकास साधला जाणार नाही.
मान्यवरांचे स्वागत बाळ पाटील, प्रदीप तुपे, राहुल जोशी यांनी तर परिचय प्रसाद मिरासदार, भाग्येश अभ्यंकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन पायल गिल यांनी केले.

