Home Blog Page 35

अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई, : महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.

याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.

शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील -पणनमंत्री जयकुमार रावल

राजधानी नवी दिल्ली येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करणार -पणन मंत्री जयकुमार रावल

पणन पणन मंत्र्यांच्या हस्ते ‘आंबा महोत्सव-२०२६’चे उद्घाटन

पुणे-‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा आंबा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्राची राजधानी मुबंई आणि देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, याकरीता शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. एकूणच राज्याचा शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने मार्केट यार्ड येथे आयोजित ‘आंबा महोत्सव-२०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सभापती प्रकाश जगताप, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे आदी उपस्थित होते.

श्री. रावल म्हणाले, सन २००१ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालय आवारात देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था, देवगड आणि महामँगो यांच्या माध्यमातून सुरू झालेली उत्पादक ते ग्राहक थेट आंबा विक्रीची संकल्पना आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालेली आहे. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक बदल टप्प्याने बदल करुन या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत.

यावर्षीचा महोत्सव सुमारे ४० दिवस सुरू राहणार असून यामध्ये एकूण ६० स्टॉल असून प्रत्येक दोन शेतकरी आंबा विक्री करीत आहे. येत्या काळात पणन मंडळाच्यावतीने सुमारे १५० स्टॉल उभे करण्याचा प्रयत्न आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी आपला आंबा थेट ग्राहकांना विकून कायमची शृखंला निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये कायमचे संबंध निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

महोत्सवात कोकणातील पाच जिल्ह्यांमधील भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी आणि इतर विविध वाणांचे आंबे उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना हापूस आंब्यासाठी जीआय मानांकन मिळाले आहे.भौगोलिक मानांकनामुळे अस्सल हापूस ओळखता येतो व फसवणूक कमी होते.

बदल्या काळानुसार ‘क्यूआर कोड’च्यामाध्यमातून आंबा फळाला नव्याने ओळख करुन देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर ‘नो युवर फार्मर’ (एनयुएफ) ही संकल्पनेच्या माध्यमातून ग्राहकांना थेट शेतकऱ्यांची माहिती मिळणार आहे, ज्यामुळे विश्वासार्हता अधिक वाढेल. आगामी काळात समाज माध्यमाचा प्रभावीपणे वापर करुन मोठ्या प्रमाणात या महोत्सवाचे मार्केटिंग करण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून राज्यात उत्पादकांना थेट ग्राहकांशी जोडण्याच्या उद्देशाने मिलेट महोत्सव, संत्रा महोत्सव, आंबा महोत्सव, काजू-बेदाणा महोत्सव अशा विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, पणन संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सीएमआरसी तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग असतो.

आंबा महोत्सवाचा उद्देश शेतकरी आणि ग्राहक या दोघांचे हित साधणारा आहे, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री वाढवणे, मध्यस्थ कमी करणे आणि आंबा उत्पादकांना थेट ग्राहक उपलब्ध करून देणे. मध्यस्थांना वगळून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात उत्तम, दर्जेदार, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले, भौगोलिक मानांकन असलेले आंबे या महोत्सवामुळे मिळतात.

उष्णकटिबंधीय व उपोष्णकटिबंधीय हवामानामुळे आपल्या देशात आंब्याच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुमारे १ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. हापूस आंबा त्याच्या चव, सुगंध आणि गुणवत्तेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. तसेच लातूर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर या भागात केशर आंबा उत्पादन घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा मालाला अधिकाधिक भाव मिळून त्याची आर्थिक स्थर्यता मिळू शकेल.

आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत व्यापार वृद्धीसाठीही पणन मंडळाच्या माध्यमातून दिल्ली, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार आहे. या दौऱ्याचा उद्देश देशातील महत्त्वाच्या बाजारपेठांचा अभ्यास करणे, विविध राज्यांमध्ये शेतमाल विक्री व्यवस्थेत राबविण्यात येणाऱ्या नवकल्पनांची माहिती घेणे तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या, व्यापारी, निर्यातदार आणि प्रक्रिया उद्योग यांच्याशी संबंधित माहिती संकलित करणे हा आहे.

मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील फळे, भाजीपाला आणि फुलांच्या मूल्यसाखळी विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र राज्यात निर्माण करण्यात येणार असून ती समुद्र, रेल्वे, विमानतळ आणि महामार्गाशी जोडण्यात येणार आहे, याकरिता जागा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा माल बांधापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जलदपुरवठा साखळी विकसित करण्याचा प्रयत्न आहे.

केळीचे कलस्टर निर्मिती तसेच कांदा प्रक्रिया संदर्भात योजना आखण्यात येत आहे. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाचे मूल्यवर्धन करून आपल्या शेतकऱ्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विविध फळांची ब्रॅण्डिंग करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असेही श्री.रावल म्हणाले.

श्री. जगताप म्हणाले, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने आंबा महोत्सवाकरिता अधिकाधिक आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होऊन आंबा खरेदी करावा, असे आवाहन श्री. जगताप यांनी केले.

श्री. कदम म्हणाले, या वर्षीचा आंबा महोत्सव १० एप्रिल ते ३१ मे २०२६ या कालावधीत पुणे मार्केटयार्ड येथे आयोजन करण्यात आला असून या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गेल्यावर्षी ३४ लाख डझन आंबा विक्री झाली असून सव्वा दोनशे कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मागील ३ वर्षांपासून विभागीय आंबा महोत्सव आयोजित करण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पणन मंत्री यांच्या निर्देशानुसार आगामी काळात मंत्रालय, महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र मंडळ येथे आंबा महोत्सव आयोजन करण्यात येणार आहे, असेही श्री.कदम म्हणाले.

उद्घाटनंतर मंत्री श्री. रावल यांनी स्टॉल भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Jaykumar Rawal

खानवडीत ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय ,हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मुळगाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, शिक्षण राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावात उभारलेली ही अत्याधुनिक शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे. सीबीएसई पॅटर्नवरील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यास हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक स्तरावर झेप घेण्याची क्षमता निर्माण होत असून काही विद्यार्थिनी इस्रो आणि नासासारख्या संस्थांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून या शाळेची उभारणी झाली असून त्यांनी शाळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष घातल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फ्रेंच व जर्मनसारख्या परकीय भाषा आत्मसात केल्या आहेत, हे बदलत्या शिक्षण व्यवस्थेचे द्योतक असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य विकासाची एक हजार केंद्रे उभारणार

पुणे जिल्हा परिषदेकडून ‘इंडस्ट्री ४.०’ अंतर्गत १०० शाळांमध्ये १०० अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असून भविष्यात अशी एक हजार केंद्रे उभारण्यात येतील असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महात्मा फुले हे दूरदृष्टीचे विचारवंत आणि थोर समाजसुधारक

महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते प्रगतशील शेतकरी, यशस्वी उद्योजक आणि दूरदृष्टीचे विचारवंत होते. शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पन्न मिळवून देणारे मॉडेल त्यांनी तयार केले. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. मुंबई महानगरपालिकेची इमारत, खडकवासला धरण, येरवडा कारागृह आणि कात्रज बोगदा यांसारख्या प्रकल्पांमध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.

स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देत विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी करण्याचे कार्यही महात्मा फुले यांनीच केले, असे त्यांनी सांगितले. आजचा शिक्षणाचा अधिकार कायदा ही त्याच विचारांची फलश्रुती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राज्य शासन ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ राबवत असून त्याअंतर्गत नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. ‘महाज्योती’च्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांच्या जन्मतिथीबाबत संशोधनातून ११ एप्रिल १८२७ ही तारीख निश्चित झाली आहे. सावित्रीबाई फुले यांनी १८९१ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ या ग्रंथात या तारखेचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच होते. त्याच विचारातून खानवडी येथे उभारलेली ही आधुनिक सीबीएसई शाळा ही त्यांच्या कार्याची पुढची पायरी आहे. महात्मा फुले हे ‘नेशन बिल्डर’ होते तसेच अंधश्रद्धा आणि ब्राह्मण्यवादी प्रवृत्तींच्या विरोधात लढणारे विचारवंत होते. त्यांच्या कार्यात विविध समाजघटकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समतेचा आदर्श निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा त्यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली असल्याचे श्री. भुजबळ म्हणाले.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महात्मा फुले यांच्या जन्मगावातून द्विशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. खानवडी येथे महात्मा फुले यांच्या मूळ घराची प्रतिकृती तसेच नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे १० ते १२ कोटी रुपयांचा प्रकल्प कटगुण येथे तर नायगाव येथे सुमारे १५० कोटी रुपयांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल घोरपडे यांनी या शाळेच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार होणार असून ग्रामीण विद्यार्थ्यांना नवे दालन उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. खानवडी येथे १२ एकर जागेवर उभारलेल्या या शाळेत प्रयोगशाळा आणि सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. ही शाळा ज्युनिअर केजी ते इयत्ता १२ वीपर्यंतची सीबीएसई पॅटर्नची असून गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाणार आहे. पुढील वर्षापर्यंत २८० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे वसतिगृह पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्ताने महात्मा फुले स्मारकात जाऊन अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. फडणवीस यांनी शाळा संकुलास भेट देत विविध सुविधा पाहणी केली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सायकल बँक योजनेचे लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण असलेल्या शैक्षणिक दालनास मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतली. जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या ८८ विविध लॅब्सचे उद्घाटनही मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार योगेश टिळेकर, राहुल कुल, शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे,उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त अमित सैनी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला:पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅड ऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले

पुणे-राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी पायलकडून एक मोठी चूक झाल्याची घटना आज पुण्याच्या पुरंदर तालुक्यात घडली. पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवले. या घटनेमुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पण भुजबळ हा प्रकार बाजूला सोडून आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या दिशेने पुढे निघून गेले.

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री छगन भुजबळ या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने आले होते. त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. पण पायलटचा खानवडी गावातील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा समज झाला आणि त्याने त्या मैदानातच भुजबळांचे हेलिकॉप्टर उतरवले. या मैदानापासूनच काही अंतरावरच हेलिपॅड होते. हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरल्याचे पाहून तिथे हजर असलेल्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.

पोलिसांनी तत्काळ पायलटला योग्य ती माहिती दिली. त्यानंतर हेलिकॉप्टर तेथून हलवण्यात आले. तत्पूर्वी, भुजबळ कारने तेथून कार्यक्रमाच्या दिशेने निघून गेले.

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आीहे. हेलिपॅड आकाशातून स्पष्ट दिसत होते का? पायलटकडून नेमकी कशी वा का झाली? काही तांत्रिक अडचण होती का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या प्रकरणी शोधली जाणार आहेत. दरम्यान, या घटनेमुळे व्हिआयपी लोकांची सुरक्षा व समन्वय या प्रकरणी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते एका पोस्टमध्ये म्हणाले, छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळंच मी सातत्याने सांगतोय की, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये देखभालदुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवाने अपघात टळला पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. विमान, हेलीकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढं काळजी घेईल, ही अपेक्षा.

विधान भवनात महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभनिमित्त अभिवादन

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समतेचा संदेश

मुंबई, दि. ११ एप्रिल २०२६ : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभी आज विधान भवन येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “ज्या महिलांना शिक्षणाचा लाभ झाला, त्यांच्यापैकी मी स्वतः एक आहे. आम्ही सर्वजणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मानसकन्या आहोत. आज माझ्या हस्ते येथे अभिवादन होत आहे, हे सर्व त्यांच्या आणि सर्व समाजसुधारकांच्या कार्याचे श्रेय आहे. मी त्यांना मनापासून नतमस्तक होऊन अभिवादन करते.”

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. कार्यक्रमास विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-४ शिवदर्शन साठ्ये, उपसचिव श्री. विजय कोमटवार, उपसभापतींचे खासगी सचिव श्री. अविनाश रणखांब, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक व जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या मनोगतात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत शिक्षण, समता आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश अधोरेखित केला. त्यांनी सांगितले की, फुले दांपत्याच्या प्रयत्नांमुळे समाजात परिवर्तनाची चळवळ उभी राहिली.

त्या पुढे म्हणाल्या की, द्विशताब्दी वर्षानिमित्त समाजात समता, बंधुभाव आणि सर्वसमावेशक विकासासाठी नव्याने संकल्प करण्याची गरज आहे. शिक्षण, विकास, तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या माध्यमातून प्रगत समाज घडविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा ज्योतिराव फुले

एप्रिल 11, 2026

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे. समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे. त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.

मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार

महात्मा फुले यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे “मानव हा सर्वात मोठा धर्म आहे” ही भूमिका. त्यांनी धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला. त्यांच्या लेखनात आणि कृतीतून सतत दिसून येते की, समाजातील अन्याय आणि विषमता दूर केल्याशिवाय खरी प्रगती होऊ शकत नाही. त्यांनी मांडलेली समतेची संकल्पना ही केवळ तात्त्विक नव्हती, तर ती प्रत्यक्ष कृतीतून साकारलेली होती.

शिक्षणाची ज्योत : अज्ञानातून मुक्तीचा मार्ग

महात्मा फुले यांनी घेतलेला सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे शिक्षणाचा प्रसार. त्यांनी प्रथम स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले आणि त्यानंतर १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनीही समाजाच्या विरोधाला न जुमानता स्वतःला शिक्षणासाठी वाहून घेतले. शेण गोट्याचा मार सहन करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. जोतीबा आणि सावित्री या दांपत्याच्या त्या काळातील सामाजिक बंडामुळे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली.त्या काळात स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध असतानाही त्यांनी मागे हटणे स्वीकारले नाही. शिक्षण हेच शोषणाविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ही त्यांची धारणा होती. या कार्यातून त्यांनी समाजातील अज्ञानाची बेडी तोडण्याचा प्रयत्न केला.अविद्या हेच शोषणाचे मुख्य कारण आहे हे सांगताना त्यांनी समाजाला याबाबतचा कठोर संदेश दिला…

‘विद्येविना मती गेली,

मतीविना नीती गेली,

नितीविना गती गेली,

गती विना वित्त गेले,

वित्तविना शूद्र खचले,

इतके अनर्थ एका अविद्येने केले’…

अन्यायाविरुद्ध बंड

त्या काळातील समाज रुढी-परंपरांच्या कठोर बंधनात अडकलेला होता. बालविवाह, सतीप्रथा, स्त्रीदास्य आणि अस्पृश्यता यांसारख्या प्रथांनी समाजाला जखडून ठेवले होते. महात्मा फुले यांनी या सर्व प्रथांविरुद्ध उघडपणे आवाज उठवला. त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थळे उभारली, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या कृतीतून समाजातील महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळाली.

सत्यशोधकांचा मार्ग : समतेची संघटित चळवळ

सन १८७३ मध्ये त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद,अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध संघटित लढा उभारला. सत्यशोधक समाजाने समाजाला विचार करण्याची नवी दिशा दिली. ज्यामध्ये सत्य, समता आणि बंधुता यांना केंद्रस्थानी ठेवले आहे.सत्यशोधक समाजाच्या मार्फत त्यांनी एक समांतर विज्ञानवादी भूमिका समाजापुढे मांडली.तत्कालीन ब्राह्मण्यवादाला झुगारून नव्या चालीरीती समाजाला दिल्या.

शेतकऱ्यांचा आवाज : अन्यायाविरुद्धचा प्रहार

महात्मा फुले यांनी केवळ सामाजिकच नव्हे, तर आर्थिक विषमतेवरही भाष्य केले.त्यांच्या “शेतकऱ्यांचा आसूड” या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाचे अत्यंत वास्तव चित्रण केले आहे. महसूल व्यवस्थेतील अन्याय, सावकारशाहीचे शोषण आणि प्रशासनातील दुर्लक्ष यावर त्यांनी कठोर टीका केली. शेतकरी हा समाजाचा कणा असूनही त्याचे जीवन दारिद्रयात का अडकले आहे, हा प्रश्न त्यांनी समाजासमोर उभा केला.

विचारांची शस्त्रे: लेखनातून घडवलेले परिवर्तन

महात्मा फुले हे केवळ कृतीशील समाजसुधारक नव्हते, तर प्रभावी लेखकही होते. “गुलामगिरी” या ग्रंथातून त्यांनी जातीव्यवस्थेवर प्रखर प्रहार केला, तर “सार्वजनिक सत्यधर्म” मधून मानवतावादी धर्माची संकल्पना मांडली. त्यांच्या लेखनातून समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य झाले. यातून त्यांच्या विचारांची व्यापकता स्पष्ट होते.याशिवाय त्यांनी गुलामगिरी,शेतकऱ्यांचा आसूड,ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न,सार्वजनिक सत्य धर्म,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा लिहून शिवरायांच्या कार्यकर्तुत्वाची ओळख करून दिली.रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीची स्वच्छता केली.शिवाजी महाराजांच्या स्मृती पुनरुज्जीवनाच्या प्रारंभीच्या प्रयत्नांपैकी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व त्यांना मानले जाते.

सार्वजनिक जीवनातील योगदान

महात्मा फुले यांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेच्या कार्यातून त्यांनी नागरी प्रश्नांवर काम केले. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांनी ब्रिटिश प्रशासनाशी संवाद साधून सामाजिक प्रश्न मांडले आणि वंचित घटकांसाठी न्यायाची मागणी केली. शासन कोणतेही असो, ते न्याय्य आणि लोकहितकारी असले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी निवेदन सादर केले. सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला.

सामाजिक सुधारणा स्वीकारल्या

इंग्रजांच्या काही सामाजिक सुधारणांना स्वीकारताना त्यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक नीतीवर सडकून टीका केली. एवढेच काय इंग्रजांना समजेल अशा भाषेत त्यांनी त्याची उत्तरे दिली. कोणताही पहिला प्रयोग स्वतःच्या घरी, स्वतःच्या कुटुंबावर करून ‘बोले तैसा चाले ,त्याची वंदावी पाऊले’, असा आदर्श त्यांनी समाजामध्ये निर्माण केला आहे. स्वतःच्या पत्नीला शिकवले. स्वतःची विहिर मागास वर्गीयांसाठी खुली केली. ब्राह्मण्यवादाचा आयुष्यभर विरोध करुनही त्यांनी  एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला.त्या मुलाचे आंतरजातीय लग्न लावून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. महात्मा जोतीबा फुले यांनी घेतलेले निर्णय अशा प्रकारे कायम प्रेरणादायी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह करणारे पहिले पालक ठरले आहेत. काळाची पावले ओळखून नवनव्या प्रयोगाद्वारे सामाजिक सुधारणा करण्यात भारतातल्या सर्व सामाजिक सुधारणा करणाऱ्या थोर पुरुषांमध्ये त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले वेगळे ठरले आहेत.

यशस्वी व्यावसायिक

सामाजिक कार्य, संघटना सुरु ठेवण्यासाठी आर्थिक स्त्रोत मजबूत असणे आवश्यक असते. त्यासाठी अंगी व्यावसायिक कसब बाळगणे खूप गरजेचे असते. संघटना, चळवळी, सुधारणांचा डोलारा चालविण्यासाठी पैशाची गरज असते. त्यासाठी आदर्श पद्धतीने व्यवसाय करुन स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सोदाहरणासह मांडून ठेवले. त्यांनी कंत्राटदार म्हणून अतिशय उत्तमपणे काम केले.  आजही त्यांच्या सहभागात तयार झालेल्या वास्तू प्रेरक आहेत. पूल, धरणे, कालवे या बांधकामात कंत्राटदार म्हणून त्यांनी काम केले.

आजच्या काळातील विचारांची प्रासंगिकता

महात्मा फुले यांच्या कार्याला दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही तितकीच आहे. शिक्षणातील विषमता, सामाजिक भेदभाव आणि स्त्रीसमानतेचे प्रश्न अद्यापही पूर्णतः संपलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार आणि आचरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास केल्यास समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेली दृष्टी मिळते.

ज्योतिराव परिवर्तनाची अखंड प्रेरणा

महात्मा ज्योतिराव फुले हे एक व्यक्तिमत्त्व नसून एक चळवळ, एक विचारधारा आणि एक प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या कार्यातून राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेरणा घेतली.त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्राला फुले–शाहू–आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ओळख प्राप्त झाली आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे केवळ आदर व्यक्त करणे नव्हे, तर त्या मूल्यांना आपल्या जीवनात रुजवण्याचा संकल्प करणे होय.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात विशेष समिती स्थापन केली असून वर्षभर महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याला साजेशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार आहे.

०००

प्रवीण टाकेउपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर 9702858777

कर्तृत्वाचा महामेरू : नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळा

मुख्यमंत्र्यांनी जागवल्या ऋणानुबंधाच्या आठवणी; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लोकनेत्याचा गौरव

सिंधुदुर्गनगरी, :- “महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ज्यांनी माझ्या पहिल्याच भाषणावर ‘छान बोललास’ अशी चिठ्ठी पाठवून मला शाबासकी दिली, ते नारायण राणे साहेब माझ्या राजकीय वाटचालीत सदैव मार्गदर्शक राहिले आहेत,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कणकवली येथे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी राणे साहेबांच्या संसदेतील आणि विधानसभेतील अभ्यासू वृत्तीचा गौरव करताना सांगितले की, अर्थसंकल्पावर भाषण करताना राणे साहेब एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे आकड्यांची जी चिरफाड करायचे, त्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध व्हायचे. माझ्या संसदीय यशाचे आणि मी लिहिलेल्या ‘बजेट कसं वाचावं’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे श्रेयही राणे साहेबांच्या पुढाकारालाच जाते, अशी कृतज्ञता मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कणकवली येथे माजी मुख्यमंत्री,  खासदार नारायण राणे यांच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्यासाठी  उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ उदय सामंत, खासदार सुनील तटकरे,आमदार दीपक केसरकर , आमदार रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, निलेश राणे आदी उपस्थित आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खासदार नारायण राणे यांच्या जीवनपटावर आधारित ‘तुफान’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पार पडले.

राणे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उलगडताना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, साहेब म्हणजे एक अत्यंत ‘दिलदार’ व्यक्तिमत्त्व असून त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. त्यांच्या प्रत्येक कामात कमालीची शिस्त आणि गुणवत्तेला प्राधान्य असते, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज आणि गोशाळा होय. साहेबांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या पत्नी नीलम ताई यांचा मोठा सहभाग असून, निलेश आणि नितेश राणे यांनी त्यांचा राजकीय वारसा योग्य प्रकारे पुढे चालविला आहे. स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा ही साहेबांची ओळख असली, तरी त्यांच्या मनात कार्यकर्त्यांबद्दल आणि माझ्यासारख्या सहकाऱ्यांबद्दल नेहमीच मायेची ओढ राहिली आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

या सोहळ्याला उपस्थित असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही राणे साहेबांच्या जिद्दीचे कौतुक केले. राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आले तरी राणे साहेबांनी कधीही हार मानली नाही, उलट प्रत्येक संकटावर जिद्दीने मात केली, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. एक प्रभावी आणि आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून आजही त्यांची ओळख कायम असून, त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणांचा अभ्यास नवीन सदस्यांनी करायला हवा, इतके ते मार्गदर्शनपर असल्याचे त्यांनी सांगितले.

 उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितले की, कोकणातील जनतेने राणे साहेबांना आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याप्रमाणे मान दिला आहे. त्यांच्या धाकातही माया आहे आणि मार्गदर्शनातही आपुलकी आहे. माझ्या राजकीय प्रवासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्यासारखा मार्गदर्शक लाभणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अशा या लोकनेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असेही त्यांनी नमूद केले.

खासदार सुनील तटकरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, वरवडे सारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेली राणे साहेबांची वाटचाल ही प्रेरणादायी आहे. शाखा प्रमुखापासून ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जिद्दीचा आणि कर्तृत्वाचा आदर्श नमुना आहे. त्यांनी दिलेले मार्गदर्शन माझ्यासाठी अमूल्य ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाची नवी ओळख मिळाली असून, मेडिकल कॉलेजसारख्या प्रकल्पांमुळे जिल्ह्याची प्रगती अधिक वेगाने झाली आहे. अशा या जननेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे त्यांनी सांगितले.

आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, राणे साहेबांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे, त्यांना उभारी देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला प्रेरणा आणि दिशा मिळते. त्यांच्या नेतृत्वामुळेच अनेक कार्यकर्ते आज आत्मविश्वासाने काम करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे काम राणे साहेबांनी केले असून, त्यांच्या स्पष्ट विचारांमुळेच या भागाचा कायापालट झाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

खासदार नारायण राणे यांनी यावेळी अत्यंत भावनिक शब्दांत या गौरव सोहळ्यानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, आयुष्य हे केवळ यश-अपयशाचा प्रवास नसून, प्रामाणिक प्रयत्नांची एक अखंड साधना आहे. प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांना प्रामाणिकपणाची जोड दिली, तर यश नक्कीच आपल्या पावलांशी येते. मी राजकारणात जे काही मिळवलं, ते कोणाच्या आधारावर नाही, तर माझ्या जिद्दीवर आणि कठोर परिश्रमांवर मिळवलं आहे. मी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, अनेक प्रसंगांना सामोरे गेलो, पण एक गोष्ट कधीच सोडली नाही—ती म्हणजे हार मानण्याची वृत्ती. संकटे आली, अडचणी आल्या, पण प्रत्येक वेळी नव्या उमेदीने उभा राहिलो. आज जे माझं कौतुक होत आहे, ते माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी अमूल्य संपत्ती आहे. हा सन्मान, हे प्रेम मी कधीच विसरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श माझ्या आयुष्याचा आधार राहिला आहे. त्यांच्या विचारांनी आणि कर्तृत्वाने मला नेहमीच प्रेरणा दिली. त्यांच्या शिकवणुकीतूनच मी माणुसकी, कर्तव्य आणि स्वाभिमान यांना सर्वोच्च स्थान दिलं आहे.  माझ्या आयुष्यात मी नेहमी माणुसकीला महत्व दिलं, कारण माणूस म्हणून जगणं हेच खऱ्या अर्थाने मोठं यश आहे. राज्यातील जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहा, लोकांच्या हिताचा विचार करा—यश तुमच्या पाठीशी उभं राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

पुणे,दि.११: सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयाच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे.

यावेळी सहायक आयुक्त विशाल लोंढे, ज्ञानेश्‍वर जावळे, समाज कल्‍याण अधिकारी, माधुरी वाघमोडे, समाज कल्‍याण अधिकारी, प्रमुख अतिथी रवींद्र पठारे, समतादूत, विद्यार्थी उपस्थित होते.

याच पार्श्वभूमीवर आज आयोजित कार्यक्रमात “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य” या विषयावर प्रा. डॉ. शैलेश द्रौपदा विश्वनाथ त्रिभुवन उपप्राचार्य, सिद्धिविनायक महाविद्यालय, कर्वेनगर, यांचे व्याख्यान झाले. तसेच श्रीमती उषा कांबळे समतादूत, बार्टी, पुणे यांनी “मी सावित्री बोलतेय” हा प्रभावी एकपात्री प्रयोग सादर केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र पठारे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त विशाल लोंढे होते. यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, समतादूत, प्रकल्प अधिकारी तसेच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रस्ताविकामध्ये समाज कल्याण अधिकारी श्रीमती माधुरी वाघमोडे यांनी सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

श्री. पठारे यांनी महामानवांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. तर श्री. लोंढे यांनी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाज कल्याण अधिकारी ज्ञानेश्वर जावळे यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेंद्र शेलार तालुका समन्वयक, पुणे यांनी केले.

“ए आय चा विवेकी वापर  व्हावा” :संवाद कार्यक्रमातील सूर 

 सत्यशोधक विचार आणि एआय’ विषयावर संवाद कार्यक्रम 

 महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजन 

पुणे :

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त  एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने “सत्यशोधक विचार आणि एआय च्या जमान्यातील आव्हाने” या विषयावर आयोजित विशेष संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता फाऊंडेशन च्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या अखंडाचे सामूहिक गायन करण्यात आले.  

या संवादात प्रा. प्रविण चव्हाण ,अभिजित अनाप आणि साथी सुभाष वारे यांनी प्रमुख संवादक म्हणून सहभाग घेतला. उपेंद्र टण्णू यांनी सूत्रसंचालन केले.आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक विचारांची आजची उपयुक्तता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांची भूमिका यावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांशी संवाद साधताना वक्त्यांनी विवेकनिष्ठ विचार, अंधश्रद्धा निर्मूलन आणि तंत्रज्ञानाचा सामाजिक भल्यासाठी उपयोग यावर भर दिला.”ए आय चा विवेकी वापर  व्हावा”असा सूर या संवाद कार्यक्रमात उमटला.अभिजित अनाप म्हणाले,’महात्मा फुले हे कॉर्पोरेट सोशल रिस्पोन्सबिलिटीचा विचार पहिल्यांदा अमलात आणणारे द्रष्टे आणि काळाच्या पुढे पाहणारे व्यक्तिमत्व होते.एआय च्या जगात वावरताना त्यांच्या सत्यशोधनाच्या भूमिकेचा आग्रह धरला पाहिजे.कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे लोकशाहीकरण झाले पाहिजे.प्रा. प्रविण चव्हाण  म्हणाले,’कृत्रिम प्रज्ञेच्या पलीकडे मानवी प्रज्ञा आहे.म्हणून ती वापरून तथ्य आणि सत्याचा शोध घेतला पाहिजे.सुभाष वारे म्हणाले,’कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून असत्य आणि भ्रामक माहिती पसरवली जाऊ नये म्हणून आपण विवेकनिष्ठ वापर करून एआय वर स्वार झाले पाहिजे.बहुजनांनी अंगभूत  निर्मितीच्या कौशल्यासहीत कृत्रिम प्रज्ञेची आधुनिक  कौशल्ये आत्मसात करून संतुलित,समन्यायी  मानवी प्रगती साधली पाहिजे.संगणकाला विरोध झाला तसा एआय ला विरोध करणे योग्य ठरणार नाही. 

कार्यक्रमाला संदीप बर्वे,महेश तनपुरे,शीतल यशोधरा,विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. संवादानंतर उपस्थितांनी प्रश्नोत्तरांद्वारे सहभाग घेतला आणि विषयावरील आपले विचार मांडले. आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि अशा प्रकारचे विचारप्रवर्तक उपक्रम पुढेही आयोजित करण्यात येतील, असे सांगितले.सामाजिक विचार, विज्ञाननिष्ठता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणणारा हा संवाद तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरला.

एमआयटी एडीटीचा बेंटली सिस्टिम्ससोबत करार

डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’ उत्कृष्टता केंद्र सुरू
पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी) आणि जागतिक स्तरावरील इन्फ्रास्ट्रक्चर अभियांत्रिकी सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बेंटली सिस्टिम्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याचवेळी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स’ या उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणाला चालना देणे आणि उद्योग-संलग्न शिक्षण अधिक सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्सेस अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमास बेंटली सिस्टिम्सचे दक्षिण आशिया विभागीय कार्यकारी कमलकन्नन तिरुवडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक संचालक हर्ष नागपाल, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक मोनिका जेधे आणि परमर्थ सैनी हे मान्यवर उपस्थित होते.एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून कार्याध्यक्ष व प्र-कुलपती डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. युवराज भिरूड आदी उपस्थित होते.या प्रसंगी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स’ तसेच बेंटली स्टुडंट क्लबचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट कन्स्ट्रक्शन तंत्रज्ञान आणि शाश्वत अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगत शिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना ६५ हून अधिक उद्योगमान्य सॉफ्टवेअर, जागतिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि विशेष तांत्रिक प्रशिक्षण सुविधांचा लाभ मिळणार आहे.प्रमुख पाहुणे कमलकन्नन तिरुवडी यांनी आपल्या भाषणात स्मार्ट शहरीकरणासाठी सॉफ्टवेअर-आधारित बुद्धिमान पायाभूत सुविधांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.कार्याध्यक्ष व प्र-कुलपती डॉ. मंगेश कराड यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील डिजिटल अभियांत्रिकी कौशल्ये प्रदान करणारा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले.

निरोगी, समृद्ध व विकसित भारत’ संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी – डॉ. मनसुख मांडविया

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ‘जन सेहत सेतू’ शिबीराचे व पोर्टलचे लोकार्पण

नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्याला शासनाचे प्राधान्य – आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर

पुणे: ‘निरोगी भारत, समृद्ध भारत व विकसित भारत’ ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायींसह प्रत्येकाचे योगदान आवश्यक असून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे. त्यादृष्टीने महिन्यातून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्याच्या ‘जन सेहत सेतू’ आरोग्य शिबीर कार्यक्रमात वैद्यकीय व्यवसायी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले.

‘जन सेहत सेतू’ शिबीराचे उद्घाटन व पोर्टलच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख बोलत होते. सिम्बॉयसिस ऑडिटोरियम विमाननगर येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, फोर्स वनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. कृष्णप्रकाश, आरोग्य अधिकारी नीना बोराडे, न्यूरोमायलिटिस ऑप्टिकाचे अध्यक्ष अमोल लुंकड, संघटक प्रशांत चौधरी, विविध संघटना, रोटरी क्लब, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, आशा सेविका उपस्थित होत्या.

केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मांडविया पुढे म्हणाले, वैद्यकीय व्यवसायींवर देशाच्या नागरिकांना निरोगी ठेवण्याची जबाबदारी आहे. ७५ वर्षांपूर्वी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसत. त्यावेळी वेदशाळांच्या माध्यमातून नागरिकांचा उपचार होत असे. त्यावेळी उपचारासाठी पैशाला प्राधान्य दिले जात नव्हते. त्यामुळे डॉक्टरांचे काम म्हणजे व्यवसाय नसून एक जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

डॉ. मांडविया पुढे म्हणाले, पुणे शहरातील विविध संघटना व संस्थांच्या पुढाकाराने तज्ज्ञ वैद्यकीय व्यवसायींनी पुढे येऊन दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने ‘जनसेहत सेतू अभियान’ राबविण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. प्रत्येकाने आपापल्यापरीने वेळ, संपत्ती व ज्ञानाचे दान देऊन समाजाची सेवा करावी. या शिबिरांबाबत आशासेविका, सेवाभावी संस्था तसेच संघटनांनी पुढाकार घेऊन जनजागृती करुन अभियानाला राष्ट्रव्यापी बनवावे. अशाच प्रकारचा उपक्रम देशभरात राबविण्यासाठी वैद्यकीय व्यवासायींनी पुढाकार घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्याला शासनाचे प्राधान्य – आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर
श्री. आबिटकर यावेळी म्हणाले, राज्यातील नागरिकांना वैद्यकीय सेवा तत्पर, दर्जेदार व मोफत मिळाव्यात अशी शासनाची भूमिका आहे. नागरिकांच्या मनात आजारांचे स्वरूप आणि खर्चाच्या अनुषंगाने वैद्यकीय सेवा व दवाखान्याबाबत भिती असते. त्यामुळे ‘जन सेहत सेतू’ अभियानाच्या माध्यमातून एक दिवस सेवा समर्पित करणे हे महाराष्ट्रातील व देशातील आदर्श उदाहरण ठरेल. देशातील महत्त्वपूर्ण अशी आरोग्य सेवा शिबीरांच्या माध्यमातून देण्याची सुरुवात पुण्यातून होत आहे याचा आनंद आहे. सर्व डॉक्टर्सनी या अभियानाची सुरुवात करावी. वैद्यकीय सेवेत अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. परंतु, उपचारापेक्षा प्रतिबंध हाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. जन सेहत सेतू शिबीरांची सुरुवात संपूर्ण देशात व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा राज्यातील अधिकाधिक नागरिकांना व्हावा असा प्रयत्न आहे. भारत सरकारच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) महाराष्ट्रातील काम गतिमान करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये १ कोटी रुपयांपर्यंतचे मोफत उपचार ईएसआयसीच्या दवाखान्यात होतात. ईएसआयसीच्या सर्वाधिक सेवा राज्यातील नागरिकांना मिळाव्यात अशी विनंती केंद्र शासनाला केली आहे.

श्रीमती नागपुरे म्हणाल्या, सर्वोत्तम मनुष्यबळ ही राष्ट्राची शक्ती आहे. आरोग्याची निगा राखण्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैली, चौरस आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासोबत नियमित आरोग्य तपासणीला महत्त्व आहे. विशेषत: महिलांना आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. महिलांनी आरोग्य तपासण्यांना न घाबरता नियमित आरोग्य तपासणी करावी. ‘जन सेहत सेतू’ शिबीरांची जास्तीत जास्त जनजागृती करावी, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी या शिबीरांमध्ये सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर्स, सेवाभावी संस्थांचा सन्मान करण्यात आला.
0000

लोहगाव पाणीप्रश्नावर ठोस पावले; आमदार बापूसाहेब पठारे यांची बैठक व पाहणी

पुणे: लोहगाव परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या व नगरसेवकांसमवेत बैठक घेतली. बैठकीत सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेत विविध अडचणी, प्रलंबित कामे व भविष्यातील गरजा यावर सखोल चर्चा पार पडली.

बैठकीनंतर वॉटर पार्क रोड परिसरात प्रस्तावित पाणीपुरवठा टाकीसाठी उपलब्ध जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या ठिकाणी नवीन टाकी उभारल्यास परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम व नियोजित पद्धतीने करता येईल, या दृष्टीने अधिकाऱ्यांना पठारे यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच हरणतळे, लोहगाव बाजारतळ, पवार वस्ती स्मशानभूमी परिसर, लोहगाव ईव्ही बस डेपो तसेच निंबाळकर नगर या भागांमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा टाक्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. लोहगावमध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत व नागरिकांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळावा, यासाठी कामांना गती देण्याचे पठारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

लोहगाव भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा नलिकांच्या कामांबाबतही चर्चा करण्यात आली. नलिका जाळे अधिक सक्षम करून पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करण्यावर भर देण्यात आला. आमदार पठारे पुढे म्हणाले, “लोहगावमधील पाणीप्रश्न सोडवणे ही आपली प्राथमिकता आहे. नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून हा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल.”

या प्रसंगी नगरसेविका ऐश्वर्या पठारे, नगरसेवक रामदास दाभाडे, प्रितम खांदवे तसेच महानगरपालिकेचे विरेंद्र केळकर (अधिक्षक अभियंता), एकनाथ गाडेकर (कार्यकारी अभियंता), सुनिल मुळे (उपअभियंता), राजेंद्र नगरे (उपअभियंता), अमृता खाडे (कनिष्ठ अभियंता), शुभम घाटकर (कनिष्ठ अभियंता) व लोहगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

पाषाण तलाव प्रदूषित: महापालिका आयुक्तांची धडक: चार अधिकारी सस्पेंड

पुणे दि. १०.०४.२०२६ : मैलापाणी थेट पाषाण तलावात मिसळून प्रदूषित झाल्याने शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज थेट घटनास्थळी पाहणी करून तात्काळ 4 अधिकाऱ्यांना सस्पेंड केले आहे. त्यांची आता खातेनिहाय चौकशी होईल.

या संदर्भात सामान्य प्रशासन, उपायुक्त विजय थोरात यांनी सांगितले की,अजयकुमार दत्तात्रय वायसे, कार्यकारी अभियंता व श्री.अतुल कुमार पांडुरंग कडू, कनिष्ठ अभियंता, मलनिःसारण व देखभाल दुरुस्ती विभाग, पुणे महानगरपालिका यांना पुणे मनपा सेवेतून तूर्तातूर्त निलंबित करण्यात आले आहे.तसेच तसेच आरोग्य निरीक्षक श्री चोपडे आणि विभागीय आरोग्य निरीक्षक श्री भोईर यांना देखील खाते स्तरावरून निलंबित केले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पाषाण तलाव परिसरास महापालिका आयुक्त यांनी दि.१०/०४/२०२६ रोजी समक्ष भेट दिली असता, सदर कार्यक्षेत्रातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शुद्धीकरण न झालेल्या मैलापाण्याचे थेट तलावात मिसळले गेले असल्याने सदर परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन पाषाण तलावातील पाणी दूषित झाल्याने मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत पाषाण तलावातील पाण्यामध्ये आढळले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची मानून आयुक्तांनी तातडीने यावर कारवाई केली.महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार या आदेशाचे दिनांकापासून श्री. अजयकुमार दत्तात्रय वायसे, कार्यकारी अभियंता, व श्री.अतुल कुमार पांडुरंग कडू ,कनिष्ठ अभियंता, मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभाग यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६(२) (फ) नुसार खातेनिहाय चौकशी कामी मनपा सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच आरोग्य निरीक्षक श्री चोपडे आणि विभागीय आरोग्य निरीक्षक श्री भोईर यांना देखील खाते स्तरावरून निलंबित केले आहे.

आयुक्तसाहेब,’त्या सर्व’ पत्रकारांवर कारवाई कराच..

एकीकडे पोलिसांनीच खोटा पोक्सो दाखल करण्याची धमकी देऊन प्राचार्याकडून तब्बल ७ लाख उकळल्याची बातमी येते ना येते तोच पुण्यात पत्रकारांच्या कारवाया हि आता पुढे येऊ लागल्या आहेत. मिडिया आपले काम चोख बजावत नाही म्हणून सोशल मिडिया वर काही फटके फुटू लागलेले असताना मीडियातील कालच्या मोठ्या बातमीने खूपच मोठा धक्का पुण्यातील पत्रकारितेच्या प्रतिष्ठेला बसतो आहे. त्यामुळे केवळ कुणा तरी एखाद्याला बळीचा बकरा न करता यामागील कुणालाही सोडता कामा नये अशी भूमिका आता घेण्यात येऊ लागली आहे.

पुणे – बुधवार पेठेमध्ये एका लॉज मध्ये एका पत्रकाराने महिलेसोबत विनयभंग केला हे प्रकरण अतिशय घृणास्पद आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक पत्रकारांची बदनामी होते आहे. या पत्रकारांना आणि त्यांच्या सुटकेसाठी त्यांना साथ देणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात श्रमिक पत्रकार संघ उभा असून या सर्वावर कडक कारवाई करा अशी मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे एका पत्रानव्ये केली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाने पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नेमके काय म्हटले आहे वाचा जसेच्या तसे


श्री. अमितेश कुमार
पोलीस आयुक्त
पुणे शहर

विषय : घृणास्पद कृत्य करणाऱ्या पत्रकारावर कारवाई करणे बाबत.

महोदय,
तीन दिवसांपूर्वी बुधवार पेठेमध्ये एका लॉज मध्ये एका पत्रकाराने महिलेसोबत विनयभंग केला हे प्रकरण अतिशय घृणास्पद आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक पत्रकारांची बदनामी झालेली आहे. हा प्रकार पुणे श्रमिक पत्रकार संघासाठी मनस्ताप करणार आहेत. त्यामुळे या प्रकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.

हे प्रकरण बाहेर आल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून एक यंत्रणा कार्यरत होती अशी चर्चाही आहे. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे पत्रकार व अन्य मंडळी यांच्याशी पुणे श्रमिक पत्रकार सहमत नाही.

गुरुवारी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पत्रकार संघ कोणताही अडथळा आणणार नाही असे भेटून सांगितले आहे. त्यानंतर आता आम्ही आपणास पत्र देऊन हीच भूमिका स्पष्टपणे मांडत आहोत. या प्रकरणात पुणे श्रमिक पत्रकार संघ चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराच्या पाठीशी उभा राहणार नाही. उलट त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी आहे.
पुण्यातील पत्रकारांची सुरक्षा, त्यांचा मानसन्मान यासाठी कायमच पत्रकार संघाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. वेळोवेळी त्या संदर्भात पत्र व्यवहार देखील केलेला आहे. पोलिसांनी त्यास प्रतिसाद ही चांगला दिलेला आहे. मात्र अशा प्रवृत्तीच्या विरोधात पत्रकार संघ उभा असून यातील आरोपी व त्यास मदत करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना पत्रकार संघ कोणताही पाठिंबा देत नाही. याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

ब्रिजमोहन पाटील
अध्यक्ष
मंगेश फल्ले
सरचिटणीस

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये माजी सैनिक व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळावा

पुणे, दि. १० – १३२ इन्फंट्री बटालियन टीए (इको) राजपूत मध्ये माजी सैनिक तसेच (एमओईएफ व सीसी) आणि महाराष्ट्र राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी (अकाली निवृत्तीसह) भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा २० एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे होणार असून भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी २० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसह शारीरिक तंदुरुस्ती चाचणीसाठी उपस्थित राहावे.

भरतीसाठी रिक्त पदे जेसीओ-2, सोल्जर जीडी २२, लिपिक-१, सोल्जर चिफ-१, सोल्जर स्टेवार्ड १ असून याकरिता माजी सैनिकांसाठी किमान वयोमर्यादा नाही, मात्र सेवानिवृत्ती/डिस्चार्ज झाल्यापासून ५ वर्षांच्या आत अर्ज करणे आवश्यक राहील, माजी महिला कर्मचाऱ्यांसाठीही समान अट लागू राहील, अशा पात्रता व अटी शर्ती आहेत. माजी सैनिक यांना ५० वर्षे व माजी सैनिक यांना ५५ वर्षांपर्यंत सेवा करता येणार आहे. आवश्यक कागदपत्रे निवृत्तीवेतन आदेश, डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे ८ रंगीत फोटो, शैक्षणिक व जात प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल सतीश दै. हंगे (नि.) यांनी केले आहे.
0000