पुणे : शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृतरित्या पशुबळी व कत्तलीचे प्रकार आयोजित केले जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिस प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिलेआहे.
यासंदर्भात त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की, मीराभाईंदर परिसरासह पुण्यातील काही भागांमध्ये सार्वजनिक स्वरूपात पशुबळी आणि कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असून सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची प्रशासकीय परवानगी, आरोग्य विभागाचा परवाना किंवा कायदेशीर प्रक्रिया न पाळता अशा कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याची बाब पुढे आली आहे.

मिसाळ म्हणाल्या, “पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक सलोखा जपणारे शहर आहे. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या महत्वाचे निर्देश
- सार्वजनिक ठिकाणी किंवा निवासी सोसायट्यांमध्ये परवानगीविना पशुकत्तल करू नये
- अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी
- पुणे पोलिस, महापालिका आरोग्य विभाग, संबंधित समाजघटक आणि स्थानिक प्रतिनिधी यांची तातडीची समन्वय बैठक बोलवावी

