नागपूर-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अत्यंत अश्लाघ्य शब्दांत टीका केली आहे. त्यातून त्यांची नीच प्रवृत्ती दिसून येते. त्यांनी आपली भाषा सुधारली नाही, तर भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाहीत, असा इशारा भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी महायुतीच्या विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाची घोषणा उद्या किंवा परवा होईल असेही सांगितले.
विरोधी पक्षांनी मंगळवारी चांदवड येथे शेतकऱ्यांचा मोर्चा आयोजित केला होता. यावेळी भाषण करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत आगपाखड केली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बोलताना त्यांच्या या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, ते म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेली टिप्पणी अत्यंत अश्लिल आहे. त्यातून हर्षवर्धन सपकाळ यांची नीच प्रवृत्ती दिसून येते. त्यांची बुद्धी बुद्धीहिन झाली आहे.
विरोधी बाकावर असल्यामुळे सपकाळांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे अशी विधाने करून ते गावागावात व समाजात तेढ निर्माण करणे, वाद निर्माण करणे व समाजातील चांगले वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी असे विधान करून खूप मोठी चूक केली आहे. भाजपचा कार्यकर्ता हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. ते सुधारले नाही तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे सोडले पाहिजे. त्यांनी चांगल्या भाषेत बोलले पाहिजे. त्यांची नीच व नालायक टीकेला आम्ही सोडणार नाही.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादग्रस्त घटनाक्रमावरही भाष्य केले. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरे व छगन भुजबळ यांच्यात वाद झाला असेल असे मला वाटत नाही. छगन भुजबळ काल रात्री उशिरापर्यंत माझ्यासोबत होते. त्यामुळे वाद झाल्याची बातमी तुमच्याकडे कुठून आली हे मला माहिती नाही, असे ते म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छाही व्यक्त केली. ते म्हणाले, विधान परिषदेच्या विविध मतदारसंघांत भाजप व मित्रपक्षांचे 70 टक्क्यांपर्यंत मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने उन्हाळ्याच्या काळात अनावश्यक खर्च न करता निवडणूक बिनविरोध करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. गरज भासल्यास मी या प्रकरणी काँग्रेस नेत्यांशीही चर्चा करेन. दुष्काळी परिस्थितीत निवडणूक लढवण्यापेक्षा ती बिनविरोध झालेली बरी. महायुतीच्या जागावाटपाची बैठक दिल्लीत घेण्याची गरज नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री व दोन्ही मित्रपक्षांचे नेते आपसात बसून निर्णय करतील.उद्यापर्यंत महायुतीचे जागावाटप होईल. महायुतीची जागावाटपाची चर्चा 99 टक्के पूर्ण झाली आहे. फक्त तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बसून निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब करायचा आहे, असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ काल म्हणाले होते, सरकार तुपाशी शेतकरी उपाशी अशी अवस्था आहे. मी तुमचा कांदा खाल्ला आहे, मी बेइमानी करणार नाही. नालायक म्हणायचे ह***र म्हणायचे, कांदाखोर म्हणायचे, असे हे नालायक सरकार आहे. फडणवीस तर गद्दार माणूस आहे. 24 रुपयांनी कांदा खरेदीचे आश्वासन दिलेले होते. फडणवीस म्हणाले होते वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही आणि लग्न केले. त्यामुळे ते महाराष्ट्राचे खोटारडे मुख्यमंत्री आहेत.
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, मोदी यांनी आजू-बाजूच्या देशांसोबत भांडण घेतले आहे. जो पर्यंत **** खुर्चीवर आहे तो पर्यंत कांदा आयात होणार नाही. बांगलादेश श्रीलंका आपला कांदा घेणार नाही. नरेंद्र हा **** आहे. एपस्टीन फाईलमध्ये मोदींनी काय – काय केले, ज्यामुळे ते ट्रम्प यांचे ऐकत आहेत? मोदींमुळे आपले चांगले होऊ शकत नाही. कांदा खरेदी आता एपीएमसी मधेच झाली पाहिजे. झोपेच सोंग करणारे खोट सरकार आहे. मोदींना बैलगाडीत बसून त्यांची हिमालयात विल्हेवाट लावा, असे ते म्हणाले होते.

