Home Blog Page 28

अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीने भरा; योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 3 जून : शिक्षण, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत तातडीने भरण्याची प्रक्रिया गतीमान करावी. तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अबू आझमी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले, तर आमदार सना मलिक-शेख, आमदार रईस शेख उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख उपस्थित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय आणि परिणामकारक पद्धतीने कार्य करणे आवश्यक आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, विशेषतः मुलींसाठी उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे, ही काळाची गरज आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असून त्याद्वारे समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळू शकते.

बैठकीत ‘मार्टी’ (MARTI) संस्थेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या कामकाजाला अधिक बळकटी देणे, प्रशिक्षण व शैक्षणिक उपक्रमांची व्याप्ती वाढविणे तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.

अल्पसंख्याक समाजातील युवकांना आधुनिक शिक्षण प्रणाली, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाशी जोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उद्योजकता विकास आणि कौशल्यवृद्धी कार्यक्रमांच्या माध्यमातून युवकांना सक्षम करण्यावर शासनाचा विशेष भर राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

याशिवाय, हज समितीमधील जागेबाबत आवश्यक कार्यवाही करण्यासाठी केंद्र शासनाशी पत्रव्यवहार करावा, तसेच प्रलंबित विषयांचा पाठपुरावा करून त्यांचा लवकरात लवकर निपटारा करावा, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

कात्रज कोंढवा रुंदीकरणातील जागा आता सक्तीने पोलीसांमार्फत ताब्यात घेणार

पुणे शहरातील सातारा रस्ता ते सोलापूर रस्ता यांना जोडणाऱ्या कात्रज कोंढवा रस्त्यावर अत्यंत गंभीर बनलेली वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे आणि धाडसी पाऊल उचलले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या कात्रज कोंढवा रस्तारुंदीकरण प्रकल्पाला थेट गती देण्याचा निर्णय घेऊन भूसंपादनासाठी मनपा निधीतून प्रथमच भरीव तरतूद महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केल्याने तसेच शासनाकडून काही निधी उपलब्ध झाल्याने सदरच्या भूसंपादनासाठी निवाडा जाहीर झाला. विशेष भूसंपादन अधिकारी क्र.१५ श्रीमती श्वेता दारुणकर यांचेकडून सदर निवाड्यानुसार रस्त्याखाली जाणाऱ्या जागांचा महापालिका भूसंपादन व मालमत्ता व्यवस्थापन विभागांकडे ताबा घेण्याची कार्यवाही गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. ती बहुतांशी पूर्ण झाली आहे. आज दिनांक ०३.०६.२०२६ रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, विशेष भूसंपादन अधिकारी क्र.१५ श्रीमती श्वेता दारुणकर व अतिक्रमण प्रभारी रमेश शेलार, मालमत्ता व्यवस्थापन, भूसंपादन व व्यवस्थापन या विभागांसह राजस सोसायटी चौकापासून ते पिसोळी हद्दीपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून व रस्ता विकसनात येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करून संबंधित विभागांना काम त्वरित करणेबाबत निर्देश देण्यात आले.

• या रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या किंवा नकार देणाऱ्या मालमत्ताधारकांवर आता सक्तीने पोलीसांमार्फत ताबा घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तसेच या जागांवरील असलेली अतिक्रमणे / अनधिकृत बांधकाम पुढील दोन दिवसांत हटविणेबाबत उप आयुक्त (अतिक्रमण) रमेश शेलार यांना निर्देश दिलेले आहेत.
• ज्या जागा आधीच महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या सर्व कात्रज-कोंढवा रस्त्यावरील लहान-मोठी स्ट्रक्चर हटवली जाणार असल्याची स्पष्ट माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या धडक मोहिमेअंतर्गत रस्त्याच्या हद्दीत येणारी सर्व प्रकारची अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी महापालिकेचे विशेष पथक सक्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
• ताब्यात आलेल्या सर्व मोकळ्या जागेवर रस्ता विकसनाचे काम दर्जेदार व गतीने करणेबाबत पथ विभाग प्रमुख यांना सूचना देण्यात आल्या. कात्रज कोंढवा रस्त्याच्या विकासनासाठी पथ विभाग, भूसंपादन विभाग, मालमत्ता व व्यवस्थापन विभाग या सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्यवाही करावयाची आहे. या कामात कुठल्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) यांनी दिला आहे.
• प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाच्या कामाला आता मोठी गती मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असून, नागरिकांचा रोजचा प्रवास अत्यंत सुलभ आणि गतिमान होणार आहे.

या पाहणीदरम्यान उपस्थित अधिकारी
१.श्री.राजेश बनकर, मुख्य अभियंता (पथ विभाग)
२.श्री रमेश शेलार, उप आयुक्त (अतिक्रमण विभाग)
३.श्री प्रशांत ठोंबरे, उप आयुक्त (मालमत्ता व्यवस्थापन व भूसंपादन व्यवस्थापन)
४.श्री अजय वायसे, अधीक्षक अभियंता (पथ)
५.श्री अनिल सोनावणे, कार्यकारी अभियंता (पथ)
६.श्री संतोष लांजेकर, कार्यकारी अभियंता (बांधकाम)
७.श्री दिगंबर बांगर, उप अभियंता (भूसंपादन व व्यवस्थापन)
८.श्री बागवान, उप अभियंता (मालमत्ता व्यवस्थापन )
९. श्रीमती श्वेता दारुणकर, विशेष भूसंपादन अधिकारी क्र.१५

मान्सूनपूर्व सर्व कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश – अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजित नायर

पुणे, दि. ३ जून, २०२६ : पुणे शहरातील मान्सूनपूर्व नाले, कल्व्हर्ट व जलनिस्सारण व्यवस्थेशी संबंधित विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व परिमंडळ उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या नाले रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणे, कल्व्हर्ट दुरुस्ती व बांधकाम, जलनिस्सारण व्यवस्थेची क्षमता वाढविणे तसेच पूरजन्य परिस्थिती टाळण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक परिमंडळनिहाय कामांची सद्यस्थिती, प्रलंबित बाबी, अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व नियोजित कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी कामांची गती अपेक्षेपेक्षा कमी आहे, तेथे आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच, पुढील आठवड्यापासून विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील नाले व कल्व्हर्ट कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात येणार असून, सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेची व प्रगतीची तपासणी करण्यात येणार असल्याचे मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री. प्रजित नायर यांनी सांगितले. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी तात्काळ दूर करून नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

पुणे महानगरपालिका शहरातील पूरस्थिती टाळणे, पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून नियोजनबद्ध कामे राबवत असून, सर्व संबंधित यंत्रणांनी कामांच्या अंमलबजावणीत अधिक गती आणावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी, परिमंडळ अधिकारी उपायुक्त विजयकुमार थोरात, उपायुक्त अरविंद माळी, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त श्री. अविनाश सकपाळ, उपायुक्त श्रीमती आशा राऊत, गणेश सोनुने आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पुण्याच्या वाहतूक समस्येबाबत काँग्रेस पक्षातर्फे ‘पुणे ट्रॅफिक परिषदेचे’ आयोजन

पुणे-

       पुण्यातील वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनत असून त्यासाठी विचारविनिमय करून मार्ग शोधण्यासाठी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे शनिवार दिनांक ६ जून रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत पत्रकार भवन नवीपेठ येथे ‘पुणे ट्रॅफिक परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाहतूक संबंधी विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, तज्ञ, पत्रकार व नागरिक सहभागी होणार आहेत. नागरिकांनी देखील या परिषदेत आवर्जून यावे असे या परिषदेच्या आयोजिका पुणे शहर काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी सांगितले.

      त्या म्हणाल्या की या परिषदेतील ‘शिफारसी व निष्कर्ष यांचा एकत्रित अहवाल तयार करून त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी हा अहवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांना सादर करून त्याचा पाठपुरावा केला जाईल. तसेच या ट्रॅफिक परिषदेतील सहभागी वरिष्ठ शासकीय अधिकारी व तज्ञ यांच्या चर्चेचा गोषवारा व शिफारसी यावर आधारित पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे’ असे त्यांनी सांगितले.  

      या परिषदेत अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (वाहतूक) संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, मनपा पथविभाग प्रमुख रोहितदास गव्हाणे, पुणे मनपाचे मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे, पी.एम.आर.डी.ए. च्या चीफ इंजिनिअर श्रीमती पठाण, पी.एम.पी.एम.एल.च्या जॉइंट एम.डी. श्रीमती पोरे, पुणे मेट्रोचे प्रोजेक्ट डायरेक्टर अतुल गाडगीळ, सी.आय.आर.टी चे तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. ढोले तसेच सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, पुणे वाहतूक समस्यांचे अभ्यासक पत्रकार मंगेश कोळपकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे सर्वजण सहभागी होऊन विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करतील. असे दीप्ती चवधरी यांनी सांगितले.

      १९९२ ते २००७ या काळात कॉंग्रेस पक्ष पुणे महानगरपालिकेत सत्तेत होता. पुण्याची भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि वाहतूक या संदर्भात कॉंग्रेस पक्षाने विचारपूर्वक अनेक प्रकल्प राबवले. रस्ता रुंदीकरण, सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते, मोठे फुटपाथ, बहुमजली वाहनतळ, उड्डाणपूल, भुयारीमार्ग, नदीकाठचा रस्ता, सिन्क्रोनाइज्ड सिग्नल सिस्टीम आदि पायाभूत विकासावर भर दिला. तसेच सतत १३ वर्षे पाठपुरावा करून सन २०१३ मध्ये पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी मिळवली. या प्रकारेच सातत्याने पाठपुरावा करीत पुण्याच्या वाहतूक समस्यांबाबत उपाययोजना शोधली जावी व त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी कॉंग्रेस पक्ष सदैव प्रयत्नशील राहील. त्यासाठीच या ट्रॅफिक परिषदेचे आयोजन केले आहे असे त्या म्हणाल्या.

‘८ वाजून १३ मिनिटे’ ही वेबसीरिज OTT वर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर पहिल्यांदाच एकत्र, सस्पेन्सने भरलेली मालिका चर्चेत

मुंबई,: आयुष्यातील काही क्षण असे असतात, जे सगळंच बदलून टाकतात… आणि जर त्या क्षणासोबत मृत्यूची चाहूल जोडली गेली, तर? अशाच रहस्य, भावना आणि अनपेक्षित घटनांनी भरलेली ‘८ वाजून १३ मिनिटे’ ही बहुचर्चित मराठी वेब सिरीज २९ मे २०२६ पासून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.

प्रदर्शनापूर्वीच आपल्या थरारक ट्रेलरमुळे चर्चेत आलेल्या या वेब सिरीजची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता ही सिरीज प्रेक्षकांना रहस्य, मानसिक संघर्ष आणि भावनिक गुंतागुंत यांचा वेगळाच अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘८ वाजून १३ मिनिटे’मध्ये एका साध्या आणि प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांमुळे निर्माण होणारा तणाव, नात्यांमधील बदल आणि वाढत जाणारे रहस्य प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. प्रत्येक भागामध्ये सस्पेन्ससोबतच मानवी भावनांचीही तीव्रता जाणवते, त्यामुळे ही सिरीज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

‘सौभाग्यवती सरपंच’, ‘आयपीसी’, ‘राख’ आणि ‘खोताची वाडी’ यांसारख्या वेगळ्या आशयाच्या ओरिजिनल्सनंतर ‘अल्ट्रा झकास’ पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि हटके कंटेंट घेऊन आले आहे. या वेब सिरीजमध्ये पहिल्यांदाच सुनील बर्वे आणि ऐश्वर्या नारकर ही लोकप्रिय जोडी एकत्र झळकत असून, त्यांच्या दमदार अभिनयाची विशेष चर्चा होत आहे.

दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या वेब सिरीजमध्ये शरद पोंक्षे, उदय सबनीस, संजीव जोटांगिया आणि विनीत शर्मा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.

रहस्य आणि भावनिक नाट्य यांचा उत्तम समतोल साधणारी ‘८ वाजून १३ मिनिटे’ ही वेब सिरीज आता ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास
महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी केली जाहीर

मुंबई- विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी श्री.चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या घटक पक्षांतर्फे घेण्यात आलेल्या या संयुक्त पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, शिवसेना नेते राहुल शेवाळे, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार उत्तम प्रकारे काम करत असताना राज्यात महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदशनाखाली घोडदौड करत आहे. शेतकरी, कष्टकरी या वर्गाच्या हिताचे निर्णय धडाक्याने घेतले जात आहेत. त्यामुळे 18 जून रोजी होणारी विधान परिषदेची निवडणूक महायुतीतर्फेच लढण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी या जागांबाबत एकत्र बसून चर्चा केली आणि जागांचे वाटपही केले. या नेत्यांनी जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या संबंधित मतदारांना देण्यात आल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
या निवडणुकीत अनेक वर्षे काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत. बंडखोरी करत कुणी अर्ज भरले असतील त्यांनी वरिष्ठांशी बोलून आपले अर्ज मागे घ्यावेत. त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा निर्णय कालच्या बैठकीत झाल्याचे श्री. चव्हाण म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले, महायुतीतर्फे समन्वय साधत सर्वांना सामावून घेण्याची भूमिका घेण्यात आली आहे. महायुतीच्या 17 अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन त्यांनी संबंधित महापालिकांचे नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती आणि नगर पंचायतीच्या नगरसेवकांना केले. उद्या उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने त्यानंतर महायुतीचे केवळ अधिकृत उमेदवार रिंगणात राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून त्यांच्या कार्याचा सन्मान केला जाईल. त्यामुळे महायुतीचेच सर्व उमेदवार निवडून येतील, असे राहुल शेवाळे यांनी ठामपणे सांगितले.

भाजपा च्या संघर्ष काळातील “गोपीनाथराव मुंडे साहेब हे मोठ्या मनाचे उत्तुंग नेतृत्व” – संदीप खर्डेकर.

“साहेबांच्या” पुण्यतिथी निमित्त वृंदावन शैक्षणिक प्रकल्पास क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध वस्तू भेट.

पुणे–भारतीय जनता पार्टीच्या संघर्षाच्या काळातील मोठ्या मनाचे व उत्तुंग नेतृत्व म्हणून गोपीनाथराव मुंडे साहेब सदैव स्मरणात राहतील अश्या शब्दात संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 2002/2003 च्या चांदा ते बांदा ह्या संघर्ष यात्रेदरम्यान अनुभवलेले मुंडे साहेब यांच्या अनेक आठवणी सांगता येतील मात्र मुंबईतील गुन्हेगारी विरुद्ध, नक्षलवाद्यावर कठोर कारवाई करणारे कणखर साहेब हे वैयक्तिक जीवनात तितकेच हळवे होते हे वेगळेपण विसरता येणार नाही. गोर गरीब व शेतकऱ्यांप्रती कणव असणारे मुंडे साहेब हे संवेदनशील नेतृत्व होते व कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे आणि त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणारे लोकनेते होते असेही संदीप खर्डेकर म्हणाले.


आज गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त सेवाव्रत फाउंडेशन संचालित वृंदावन शैक्षणिक प्रकल्पा अंतर्गत कर्वेनगर च्या कामना वसाहत, वारजे च्या म्हाडा वसाहत आणि पानमळा वसाहतीतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे शैक्षणिक व क्रीडा साहित्य भेट देण्यात आले त्या प्रसंगी खर्डेकर यांनी ह्या आठवणींना उजाळा दिला.या वेळी वस्तीतील मुलं पत्र्याच्या शेड मध्ये उकाड्यात अभ्यास करत असल्याचे लक्षात आल्यावर संदीप खर्डेकर यांनी शेड मध्ये गारवा रहावा यासाठी त्वरित कुलर भेट दिला.
या प्रसंगी नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, सेवाव्रत फाउंडेशन चे संचालक प्रदीप देवकुळे, क्रिएटिव्ह चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, सौ. प्रणेती लवंगे, पतित पावन संघटनेचे उपाध्यक्ष राहुल पडवळ, कोथरूड पतित पावन संघटनेचे विभाग प्रमुख अण्णा बांगर, श्री.अश्विन लवंगे, भाजपा महिला आघाडी सरचिटणीस कल्याणी खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुंडे साहेब हे सातत्याने सामान्यांच्या उत्कर्षाचा ध्यास घेतलेले लोकनेते होते त्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ज्या घटकांकडे काही कमी आहे त्यांना मदत करावी असे क्रिएटिव्ह फाउंडेशन ने ठरविले असल्याचे विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
सेवाव्रत फाउंडेशन वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी निस्पृह वृत्तीने कार्यरत असून क्रिएटिव्ह फाउंडेशन ह्या प्रकल्पांना वेळोवेळी मदत करते याबद्दल प्रदीप देवकुळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संयोजन विश्वस्त प्रतीक खर्डेकर व प्रणेती लवंगे यांनी केले.

मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ठरलेला  ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय थरार आणि रहस्याचा नवा अनुभव!

मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न होत असतो. याच धडपडीतून अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. आता अशाच एका आगळ्यावेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह ‘घबाडकुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातील रहस्य, भय आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. ट्रेलरमधील प्रत्येक दृश्य थराराची पातळी उंचावत नेतं आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. धक्कादायक वळणं आणि अनपेक्षित रहस्यांनी भरलेला हा चित्रपट प्रत्येकाला एक मोठं ‘सरप्राईज’ देईल, असा विश्वास निर्माते डॉ. रसिक कदम यांनी व्यक्त केला आहे.

‘घबाडकुंड’मधून कल्पनेच्या पलीकडचं एक वेगळंच ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या प्रकल्पाला लाभली आहे. ‘आयकॉन दी स्टाईल’ प्रस्तुत मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स असलेला ‘घबाडकुंड’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

रहस्यमय आणि गूढ गोष्टींबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सुप्त आकर्षण असते. याच गूढतेचा आणि थराराचा अनुभव ‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना मिळणार आहे. या गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठी सहा जण एका धोकादायक प्रवासाला निघतात; मात्र या शोधयात्रेत त्यांच्यासमोर उभं राहतं भीती, थरार आणि अनाकलनीय घटनांचं भयावह वास्तव! ‘घबाडकुंड’ मध्ये नेमकं काय दडलं आहे? आणि या अंधाऱ्या गूढतेमागचं सत्य काय आहे? अशा प्रश्नांची उत्सुकता वाढवणारी कथा, रहस्यमय वातावरण आणि अंगावर काटा आणणाऱ्या थरारक घटनांनी सजलेला ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांना एका वेगळ्याच अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाणार आहे.

रहस्य, भय, थरार आणि अनोख्या सिनेमॅटिक अनुभवाचा संगम असलेला ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणार आहे. शशांक शेंडे,  संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची दमदार फौज ‘घबाडकुंड’ चित्रपटात आहे.

‘घबाडकुंड’मधील रहस्य, थरार आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातील. १९ जूनपासून हा अनोखा सिनेमॅटिक प्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की चित्रपटगृहात यावे,’  असे आवाहन कलाकारांनी केले.

आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांची सीआयडी कडून तातडीने अंमलबजावणी; विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग

0

पुणे.दि.३: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुरुवातीपासूनच गंभीर दखल घेतली असून, त्यांच्या सूचनांची गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) तातडीने अंमलबजावणी सुरू केल्याचे समोर आले आहे. डॉ. गोऱ्हे यांनी मंगळवार दि.२ जून रोजी सीआयडी पुणे कार्यालयाला भेट देऊन तपासाचा सविस्तर आढावा घेतला होता. या बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी तपास अधिक व्यापक करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या.

सीआयडी पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, दापोडी व हडपसर येथे विषारी हातभट्टीची दारू पिल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणातील दोन्ही गुन्ह्यांचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला असून तपासासाठी १० विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. दापोडी प्रकरणातील सहाही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी आणि आर्यन संजय धोत्रे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना सीआयडी च्या तपासातही अटक करून चौकशी केली जात आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाने ठाणे येथे दाखल केलेल्या संबंधित गुन्ह्यातील आरोपींना देखील सीआयडी तपासात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तपासादरम्यान विविध घटनास्थळांवरील CCTV फुटेज, दारूचे नमुने आणि इतर पुरावे जप्त करून न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून मेथेनॉल पुरवठा साखळीतील दोन महत्त्वाचे संशयित निष्पन्न झाल्याची माहिती सीआयडीने दिली आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती व पुरावे मिळविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक शामराव काळे (8237229208)आणि सचिन चव्हाण (9011334580)यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून नागरिकांनी या गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती असल्यास तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट:
पुणे विषारी दारू प्रकरणात सीआयडी अधिकाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करून माझ्या सूचनांची दखल घेत अंमलबजावणी सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार मानते. या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी आणि पारदर्शकपणे व्हावा, ही जनतेची अपेक्षा आहे. सामान्य नागरिकांच्या मनात सीआयडी विषयी कायमच विश्वास आणि आदर राहिला आहे. हा विश्वास अधिक दृढ करत दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी मला खात्री आहे.

‘सूर्यकांत मांडरे : एक कलासक्त तेजस्वी कलाकार’

पुणे : किशोरवयात मी सूर्यकांत यांना प्रथम पाहिले, तेव्हा भारल्याप्रमाणे झाले होते. काही काळाने रूपेरी पडद्यावर मी त्यांची नायिका होईन, असे स्वप्नातही वाटले नव्हते. सूर्यकांत यांच्यासारख्या कलाकारासोबत मला काम करण्याची संधी मिळाली, हा मला भाग्ययोग वाटतो, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी मंगळवारी येथे काढले. सूर्यकांत अभिनेते म्हणून तर श्रेष्ठ होतेच, पण माणुसकीच्या नात्यानेही ते महान होते, असेही त्या म्हणाल्या.

पूना गेस्ट हाऊस आणि प्रकाश सूर्यकांत मांडरे व परिवार यांच्या वतीने मंगळवारी (दि. २) आयोजित सूर्यकांत मांडरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त ‘सूर्यकांत मांडरे : एक कलासक्त तेजस्वी कलाकार’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. कवयित्री प्रतिभा शाहू मोडक, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ज्येष्ठ नृत्यांगना लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, प्रकाश सूर्यकांत मांडरे, पूना गेस्ट हाऊसचे डॉ. किशोर सरपोतदार आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

उपस्थित सर्वच कलाकारांनी सूर्यकांत यांच्या आठवणींचा पट यावेळी उलगडला. आशा काळे म्हणाल्या, मी सूर्यकांत यांना प्रथम पाहिले, तेव्हा ते उषा किरण यांच्यासह चित्रीकरण करत होते. मी त्यांच्याकडे भारल्यासारखी बघत होते. कालांतराने भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटात मी सूर्यकांत यांची नायिका झाले. नंतरही अनेक चित्रपटांत आम्ही भूमिका केल्या. ‘गनिमी कावा’ चित्रपटात एक प्रेमगीत चित्रित करण्यासाठी मला गजरा हवा होता, ती मागणी सूर्यकांत यांनी पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिवेषात ते उभे राहिले, की साक्षात महाराजांची ऊर्जा पोचल्यासारखे वाटत असे, असेही त्या म्हणाल्या.

लीला गांधी म्हणाल्या, ‘प्रीतीसंगम’ या चित्रपटाच्या वेळी सूर्यकांत यांच्याशी पहिली भेट झाली. ते प्रसंग छान समजावून सांगत असत. प्रत्येकाला सांभाळून घेण्याची वृत्ती आणि खेळीमेळीचे वातावरण, हे त्यांचे वेगळेपण होते.

प्रतिभा शाहू मोडक म्हणाल्या, आम्ही १९९३ मध्ये पुण्यात आलो, तेव्हा सूर्यकांत आणि चारुकाका सरपोतदार ही दोनच माणसे परिचयाची होती. आम्ही नेहमी भेटत असू. शाहू मोडकांनंतर सूर्यकांत सातत्याने मला दिलासा देत असत.

रामदास फुटाणे यांनी सूर्यकांत आणि मी चित्रपट महामंडळाच्या निमित्ताने भेटलो आणि स्नेही झालो, अशी आठवण सांगितली. ते उत्तम चित्रकार होते. भालजी पेंढारकर आम्हा सर्वांचे गुरू आणि चारुकाका सरपोतदार हा आम्हाला जोडणारा दुवा होता, असेही ते म्हणाले.

उल्हास पवार यांनी सूर्यकांत यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख केला. कोल्हापूर तेव्हा कलाकारांचे आगार होते. पुण्यात असले, की सूर्यकांत स्कूटरवरून आमच्या घरी येत असत आणि मनमोकळ्या गप्पा रंगत असत, असे ते म्हणाले.

कलेप्रती, गुरुंप्रती सदैव ईमान हे सूर्यकांत यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी काढले. देखणे व्यक्तिमत्त्व, उत्तम अभिनय, मैत्रीला जागणारा, सगळ्यांना सांभाळून घेणारा आणि चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून दूर राहणारा कलाकार म्हणजे सूर्यकांत. त्यांच्या भूमिकांमधील वैविध्य उल्लेखनीय आहे. मदतीला धावून जाणारा, माणुसकीचे नाते जपणारा मोठा कलावंत, अशा शब्दांत त्यांनी सूर्यकांत यांचे वर्णन केले.

मांडरे यांच्या नातसून युगंधरा मांडरे आणि डॉ. किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले. शिल्पकार सुरेश राऊत यांनी कार्यक्रम सुरू असताना सूर्यकांत यांचा अर्धपुतळा साकारला. सूर्यकांत यांच्या चित्रपट कारकिर्दीवर आधारित ध्वनीचित्रफित सुरवातीला दाखवण्यात आली. प्रकाश मांडरे यांनी आभार मानले. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात सूर्यकांत यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम पल्लवी आनदेव, प्रा. रवींद्र शाळू यांनी सादर केला. संहितालेखन सुलभा तेरणीकर यांचे होते.

दहावी-बारावीनंतर करिअर निवडताना आत्मविश्वास, कौशल्यविकास आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक : आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

0

धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यासवर्ग, चर्चा सत्रे, समुपदेशन शिबिरे आणि रोजगाराभिमुख मार्गदर्शन उपक्रम राबविणार

पुणे.दि.१: शिवसेना पुणे शहर व धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष यांच्या वतीने शिवसेना भवन येथे इयत्ता दहावी व बारावीनंतरच्या करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ गुणांवर किंवा पारंपरिक करिअर पर्यायांवर अवलंबून न राहता बदलत्या काळानुसार कौशल्यविकास, संवादकौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याची गरज असल्याचे सांगितले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सध्या स्पर्धात्मक वातावरणामुळे विद्यार्थी आणि पालक या दोघांवरही मोठा मानसिक ताण निर्माण होत आहे. दहावी-बारावी, नीट, जेईई, एमपीएससी, यूपीएससी यांसारख्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आणि निराशा वाढताना दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य वेळी समुपदेशन, मार्गदर्शन आणि संवादाची संधी उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकत पुढे जाण्याची वृत्ती विकसित करावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

आजच्या काळात रोजगाराच्या संधी केवळ पारंपरिक क्षेत्रांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. सेवा क्षेत्र, तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, आरोग्यसेवा, डिजिटल सेवा, परदेशी भाषा आणि कौशल्याधारित व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि कौशल्ये ओळखून करिअरची दिशा निश्चित करावी, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनेकदा विद्यार्थ्यांकडे ज्ञान असते; मात्र ते प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य नसते. मुलाखतीत आत्मविश्वास, सकारात्मकता आणि प्रभावी संवाद या बाबी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन, चर्चासत्रे, वक्तृत्व आणि संवाद यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.

विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यासवर्ग, चर्चा सत्रे, समुपदेशन शिबिरे आणि रोजगाराभिमुख मार्गदर्शन उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन देण्याचा मानस व्यक्त केला. युवकांच्या मनातील प्रश्न समजून घेऊन त्यांना योग्य दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

यावेळी विजय कचरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर अनिल गुंजाळ यांनी व्यवस्थापन विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमास अनिल गडकरी, वैभव वाघ, संदीप शिंदे, प्रकाश ढमढेरे, सुधीर जोशी, सुदर्शना त्रिगुणाईत यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकपात्री महोत्सवाला सुरुवात

पुणे : एकपात्री या कलाप्रकाराला आजच्या काळात भरपूर वाव आहे. त्यामुळे एकपात्री कलाकाराने आलेली कुठलीही संधी न दवडता कार्यक्रमाची उत्तम तयारी व प्रभावी सादरीकरण केल्यास यश नक्कीच मिळेल, असा सल्ला सुप्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य श्याम भुर्के यांनी दिला.  स्व. मधुकर टिल्लू यांनी आपल्याला कायम प्रोत्साहित केल्याची आठवण जागवत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

मराठी रंगभूमीवर एकपात्री कलाप्रकार रुजवणारे पहिल्या पिढीतील ज्येष्ठ एकपात्री कलाकार स्व. मधुकर टिल्लू यांचा १ जून हा स्मृतिदिन. या निमित्ताने दरवर्षी हा दिवस एकपात्री कलाप्रसार दिन म्हणून साजरा केला जातो. एकपात्री कलाकार परिषद, राष्ट्रसेवा दल सांस्कृतिक विभाग, निळू फुले कला अकादमी यांच्या सहकार्याने एकपात्री कलाप्रसार दिनाचे औचित्य साधून एकपात्री महोत्सवाचे बॅरिस्टर नाथ पै सभागृह, साने गुरुजी स्मारक, राष्ट्रसेवा दल येथे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्‌घाटन आज (दि. १) प्राचार्य श्याम भुर्के यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. दि. १, दि. २, दि. ३ व दि. ५ या कालावधीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्ताने ‘आर्टिस्ट ऑफ द इयर’ या पुरस्काराने नाना गुजराथी (संगमनेर) आणि लक्ष्मीकांत रानडे (पुणे) यांचा गौरव करण्यात आला. या वेळी निळू फुले अकादमीचे सुरेश देशमुख, मकरंद टिल्लू, एकपात्री कलाकार परिषदेच्या उपाध्यक्ष मंजुषा जोशी मंचावर होते. शाल, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्राचार्य श्याम भुर्के यांनी आपली कला कशी बहरत गेली हे सांगताना, नकलाकार म्हणून काम करताना नाटकाकडे वळलो आणि पुढे नोकरीत असताना व्याख्याने देऊ लागलो. हा प्रवास साकारताना प्राचार्य शिवाजीराव भोसले, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, पु. ल. देशपांडे अशा दिग्गज व्यक्तींच्या सहवासातून आपले व्यक्तिमत्त्व घडत गेले. मधुकर टिल्लू यांचा वारसा टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्या ही कला जोपासत आहेत. मकरंद टिल्लू उत्तम संघटकाच्या भूमिकेतून सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रास्ताविकात मकरंद टिल्लू म्हणाले, विनोदी प्रसंगांची गुंफण करत एकपात्री कला सादर करण्याची कला मधुकर टिल्लू यांनी विकसित केली होती. महाराष्ट्रातील एकपात्री कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी ते सातत्याने कार्यशील होते. आज एकपात्री कलेला सुवर्णकाळ आलेला आहे, अशा काळात कला आणि गुणवत्ता वाढवत समोरच्याला अवाक करण्याचे कसब साधणे आवश्यक आहे. एकपात्री कलाकार परिषद कलाकारांना एकत्र आणून एकमेकांना मदत करत कार्यशील राहण्याचे प्रयत्न करत आहे.

उद्घाटन समारंभानंतर भाग्यश्री देशपांडे, अतुल कुलकर्णी, राहुल भालेराव या कलाकारांचे सादरीकरण झाले.

पुरस्काराला उत्तर देताना नाना गुजराथी आणि लक्ष्मीकांत रानडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप रत्नपारखे, सतिश कारेकर यांनी केले. पल्लवी परब, नरेंद्र लवाटे यांनी आयोजन केले. सुरुवातीस नटराज पूजन आणि मधुकर टिल्लू यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

पानशेत वसाहतीजवळील मोठा पूल वाहतुकीसाठी बंद;पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे, दि. 1 :राजगड तालुक्यातील खानापूर ते पानशेत मार्गावरील (प्र.जि.मा. ३७) कि.मी. १४/०४५ येथे पानशेत वसाहतीजवळील मोठा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने तो सर्व प्रकारच्या जड व हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत बंद करण्यात आल असल्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गजानन पाटील यांनी जारी केले आहेत.

सदर पूल ६८ वर्षांहून अधिक जुना असून विशेष तांत्रिक परीक्षणात त्याची स्थिती अत्यंत कमकुवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आगामी मान्सून काळात मुठा नदीच्या विसर्गामुळे दुर्घटना व जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

लवासा, वरसगाव व आसपासच्या भागातून पानशेतकडे जाणारी वाहतूक निळकंठेश्वर रस्ता–डवजे–कोंढूर–बहुली–कातवडी–मांडवी–कुडजे–खडकवासला धरणमार्ग–गोऱ्हे–खानापूर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच पानशेत व वरसगाव धरण परिसरातून पुणेकडे येणारी वाहतूक कुरण खुर्द–राणवडी–सोनपूर–ओसाडे–खानापूर–गोऱ्हे–खडकवासला धरणमार्ग–कुडजे–मांडवी–कातवडी–बहुली–कोंढूर–डवजे–निळकंठेश्वर मार्गे वळविण्यात येत आहे.

नागरिकांनी प्रशासनाने निर्धारित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.
000

मुठा नदीवरील धोकादायक पूल कायमस्वरूपी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश

पुणे, दि. 1 : हवेली तालुक्यातील कातवडी–कॉदूर–निळकंठेश्वर मार्गावरील (ग्रामा-४५ कि. तर. 1/000) मुठा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तो कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी जारी केले आहेत.

मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. पूल बंद झाल्यामुळे कातवडीकडून डावजे–कुरणकडे जाणारी वाहतूक कातवडी–बहुली–कोंढूर–डावजे–जांभळी–कुरण या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच कुरण–डावजे बाजूकडून कातवडीकडे येणारी वाहतूक कुरण–जांभळी–डावजे – कोंढूर–बहुली–कातवडी या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा.

वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांद्वारे सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
000

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

0

पुणे, दि. १: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पुणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली; यामध्ये १९ लाख ३ हजार ३७९ लाख रुपयाचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे विभागाचे सहायक आयुक्त (अन्न्) दि.वा. भोगावडे यांनी दिली आहे.

आंबेगाव तालुक्यात मंचर येथे साईराज पान अँड टी हाऊस व समीक्षा कोल्ड्रिक जनरल अॅड किराणा स्टोअर यांच्या पाठीमागील छोट्या गोदामामध्ये दोन ठिकाणी ३० हजार ३९५ रुपयाचा गुटखा, पानमसाला व इतर तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करत असल्याचे आढळून आले. संबंधितावर भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार पोलीस स्टेशन, मंचर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर येथे खेमराज फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही आस्थापना विनापरवाना नोंदणी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. तसेच येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला मैदा, बेसन, आटा व इतर अन्नपदार्थ असा १९ हजार ८८६ किलोचा १० लाख ४९ हजार ३६४ रुपये किमतीचा साठा नमुना विश्लेषणासाठी घेऊन जप्त करण्यात आला.

खेड तालुक्यातील खालची भांबुरवाडी येथील उज्वल सुपारी ही आस्थापना विनापरवाना, नोंदणी व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. या आस्थापनेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेली सुपारी ही अप्रमाणित अथवा असुरक्षित असल्याच्या संशयावरून १ हजार ८९८ किलो वजनाचा आणि ८ लाख १६ हजार १४० रुपयाचा साठा जप्त करण्यात आला.

नरे येथील ओम साई फरसाण या आस्थापनेची तपासणीदरम्यान फाईड ग्रीन वाटाणा या अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर करत असल्याचे आढळून आले. त्या अनुषंगाने फाईड ग्रीन वाटाणा या अन्न पदार्थाचे व यात वापरला जाणारा कृत्रिम रंगाचे नमुने तपासणीसाठी घेऊन ६८ किलो असे ७ हजार ४८० रुपयाचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला.

या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती मरके, सुप्रिया जगताप, संतोष सावंत, सतीश हाके, प्रकाश कचवे, लक्ष्मीकात साळवे, अभिजीत झोडगे, आदित्य जोशी, सकेत सूर्यवंशी व नमुना सहाय्यक साळवे याच्या पथकाने या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त (अन्न) नारायण सरकटे प्रदीप आंबरे यांच्या उपस्थितीत व पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) दि.वा. भोगावडे यांच्या निर्देशान्वये पार पडली. अन्न व औषध प्रशासनामार्फत ग्राहकाच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या तसेच निकृष्ट भेसळयुक्त व बेकायदेशीर अन्न उत्पादन करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध अशा मोहिमा सुरूच राहणार असून नागरिकानी याबाबतची माहिती प्रशासनास उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.