रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात आपल्यावर झालेले आरोप फेटाळले
पुणे -राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अनेक नेत्यांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे भोंदू अशोक खरात प्रकरणातील नवे कंगोरे समोर येण्याची शक्यता वाढली आहे.
गत काही दिवसांपासून भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्याचे रान पेटले आहे. या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर नेत्यांना धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकर दहावी नापास कोंबडी चोराच्या भोंदू बाबाच्या ट्रस्टवर आहेत. त्यांच्या माध्यमातून महिलांवर लैंगिक अत्याचार झाले. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. पण त्यांना अजून का अटक झाली नाही? चाकणकर यांनी ज्या लोकांना भोंदू खरातकडे पुजेला नेले, तेच लोक त्यांना या प्रकरणात वाचवत आहेत. पुजेला गेल्यानंतर स्वतःच्या करंगळ्या कापणाऱ्या नेत्यांना चाकणकर त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे ते त्यांना वाचवत आहेत.
रुपाली ठोंबरे म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांना कायदा कळत नाही. संविधान कळत नाही. कसे वागावे हे ही कळत नाही. त्यांना महिला आयोगाचे पावित्र्य व प्रतिष्ठाही कळली नाही. त्यामुळे त्या 28 दिवसांनी बोलल्या काय? किवा 280 दिवसांनी बोलल्या काय? त्याने काहीही फरक पडत नाही. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही. रुपाली चाकणकरांनी पुरावे देऊन बोलावे. पोलिस चाकणकर व त्यांच्या कुटुंबीयांना वाचवत आहेत. अखेरीस त्यांच्या टोळीमध्ये ज्या कुणी महिला आहेत, त्या सर्वांवरही कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.
रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी एका पोस्टद्वारे भोंदू अशोक खरात प्रकरणात आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले होते. त्या म्हणाल्या होत्या, महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले.मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे.याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले.तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले ,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही,हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे . तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले,कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे.यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.केवळ तर्कवितर्क,अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय,बदनाम केले जात आहे,हे अत्यंत खेदजनक आहे.मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे.खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही.शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे.तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.







