पुणे, दि. 1 :राजगड तालुक्यातील खानापूर ते पानशेत मार्गावरील (प्र.जि.मा. ३७) कि.मी. १४/०४५ येथे पानशेत वसाहतीजवळील मोठा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने तो सर्व प्रकारच्या जड व हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत बंद करण्यात आल असल्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गजानन पाटील यांनी जारी केले आहेत.
सदर पूल ६८ वर्षांहून अधिक जुना असून विशेष तांत्रिक परीक्षणात त्याची स्थिती अत्यंत कमकुवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आगामी मान्सून काळात मुठा नदीच्या विसर्गामुळे दुर्घटना व जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
लवासा, वरसगाव व आसपासच्या भागातून पानशेतकडे जाणारी वाहतूक निळकंठेश्वर रस्ता–डवजे–कोंढूर–बहुली–कातवडी–मांडवी–कुडजे–खडकवासला धरणमार्ग–गोऱ्हे–खानापूर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच पानशेत व वरसगाव धरण परिसरातून पुणेकडे येणारी वाहतूक कुरण खुर्द–राणवडी–सोनपूर–ओसाडे–खानापूर–गोऱ्हे–खडकवासला धरणमार्ग–कुडजे–मांडवी–कातवडी–बहुली–कोंढूर–डवजे–निळकंठेश्वर मार्गे वळविण्यात येत आहे.
नागरिकांनी प्रशासनाने निर्धारित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.
000

