पुणे- : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास कार्यक्रमावर भर दिला आहे. पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्य विकसित झाले तर अधिक पैसे मिळतात त्यामुळे कौशल्य विकास अत्यंत गरजेचा आहे असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले.
‘यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल्स’ आणि श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या ‘श्री संतमाई कौशल्य विकास केंद्राचे’ उद्घाटन शिरोळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्टचे सुनील रुकारी, यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, बाबरे बाबा मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुनीलकुमार गर्ग हे यावेळी उपस्थित होते.
शिरोळे यावेळी पुढे म्हणाले की,२०१४ पासून मोदींनी देशाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून देशातील संपूर्ण वातावरण बदलले आहे. गेल्या काही काळात वातावरण बदलले असून लोकांची देण्याची प्रवृत्ती वाढली आहे.आपण आपल्या समाजाचं देणं लागतो या भावनेतून समाजातील दुर्बल घटक, महिला आणि वंचित युवकांना प्रगतीची साधने व संधी उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील प्रत्येकाने आपापल्यापरीने मदतीचा हात पुढे केला पाहिजे, देण्याची, दातृत्वाची भावना वाढली पाहिजे.
कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे उद्योजक तयार व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे. भारत देश श्रेष्ठ व समर्थ झाला पाहिजे त्यासाठी समाज स्वावलंबी झाला पाहिजे हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. समाज स्वावलंबी कौशल्य विकासातूनच होईल. ‘यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल्स’ हेच कार्य करते आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी आपल्या मनोगतात सुनील रुकारी म्हणाले की, आपली मुले घडली पाहिजे यासाठी श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्टची स्थापना झाली. महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे ते ‘यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल्स’ या संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्यांना भांडवलाची गरज आहे. त्यांना बँकेतून भांडवल मिळू शकते. १० लाखापर्यंत कुठल्याही जामीनदाराची त्यासाठी गरज नाही. उद्योग सुरु करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. उद्योजक घडले पाहिजे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
याप्रसंगी सुनीलकुमार गर्ग म्हणाले की, कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्थिक सहाय्याची आवश्यकता असते. ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशांना सहाय्य करणे हे बाबरे बाबा मंदिर ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट आहे. आम्हाला या माध्यमातून ती मदत करण्याची संधी मिळाली असून पहिल्या १०० महिलांना मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल.
विश्वेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन अमला करंदीकर यांनी केले तर आभार यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी मानले.
याप्रसंगी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे व नीलिमा खाडे यांनीही या कौशल्य विकास केंद्राला भेट देऊन प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत माहिती घेतली. तसेच कार्यक्रमाला बाबरे बाबा मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त रितू गर्ग, श्री काशी विश्वनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.महादेव सगरे, सचिव रामेश्वर करजखेडे, खजिनदार श्रीकांत तोडकर, संस्थेचे सदस्य भगवान कोठावळे यांच्यासह विविध पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संजय तांबोळकर, सचिन मोरे, प्राची राऊत, मीनाक्षी हिरेमठ,प्रसाद शाळीग्राम, शाम वायचळ आदींनी विशेष सहकार्य केले.