पुणे : ‘आजची तरुण पिढी ‘सर्वकाही तत्काळ’ अशा काळात जन्माला आली आहे, हे समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आपल्याकडे एखादी कल्पना असेल तर तिची अंमलबजावणी आपल्याला त्याच क्षणी व्हायला हवी असते. या स्थितीत तंत्रज्ञानाचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यामुळे आता प्रत्येक गोष्ट बोटाच्या टोकावर उपलब्ध आहे. माहितीच्या प्रत्येक तुकड्याशी आपण क्षणार्धात संपर्क साधू शकतो. तरुणाईने सध्याच्या व्यवस्थेशी जुळवून घ्यावे, असे मला वाटत नाही. उलट तरुणाईतील ऊर्जा पातळ्या व विचारांचा मार्ग यांचा पुरेपूर वापर होण्यासाठी व्यवस्थेचे बदलायला हवे,’ असे प्रतिपादन ‘किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेड’च्या कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी किर्लोस्कर यांनी नुकतेच येथे केले.
‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’ने (एमसीसीआयए) ‘आयआयएम, अहमदाबाद’च्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘लीडरशिप इन इंडस्ट्री 4.0 कॉन्फरन्स’ या परिषदेत एक प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. दिवसभर चाललेल्या या परिषदेत सहभागी होऊन विविध उद्योगांतील नामवंत, सदस्य व पाहुण्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.
बिझनेस व यूथ आयकॉन असलेल्या मानसी किर्लोस्कर म्हणाल्या, “इंडस्ट्री 4.0 ही संकल्पना सायबर फिजिकल सिस्टिम, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), क्लाऊड कॉम्प्युटिंग व कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग या घटकांशी संबंधित आहे, जे आधुनिक कारखान्यांच्या निर्मितीसाठी ऑटोमेशनमध्ये सुधारणा घडवत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, तत्काळ संज्ञापन, बिग डाटा आणि सर्वदूर संपर्क आदी शक्ती या बदलाला चालना देत असून त्याचा परिणाम निर्मिती यंत्रणांत लक्षणीय क्षमता वृद्धी व अधिक लवचिकता येण्यात होईल. त्यामुळे उत्पादनातील कामगाराभिमुखता कमी होईल आणि संपूर्णपणे नव्या कौशल्य संचांची गरज भासेल. स्वस्त मनुष्यबळ व उत्पादनाचा आवाका या गोष्टी पूर्वीप्रमाणे स्पर्धात्मक आघाडीचा स्रोत राहणार नसल्याने इंडस्ट्री 4.0 सध्याच्या संकल्पनांत मुळापासून परिवर्तन घडवून आणेल.”
मानसी किर्लोस्कर यांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तरांचे सत्र झाले, ज्याचे सूत्रसंचालन सीईओ गेट थ्रू गाईड्सच्या ओबीई वंदना सक्सेना पोरिया यांनी केले.
मानसी किर्लोस्कर या उद्योग जगतातील प्रख्यात किर्लोस्कर घराण्याच्या पाचव्या पिढीतील वंशज असून शंतनुराव किर्लोस्कर यांच्या पणती आहेत. किर्लोस्कर घराण्याची उद्योग क्षेत्रातील दीडशे वर्षांची परंपरा त्या बुद्धिमत्ता, बांधीलकी व शैलीच्या जोरावर अत्यंत चैतन्यशीलतेने पुढे नेत आहेत.
मानसी किर्लोस्कर यांच्याबरोबरच या परिषदेत ‘टाटा सन्स’चे बिगर-कार्यकारी संचालक इशात हुसेन व ‘रोल्स रॉईस’चे भारत व दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष किशोर जयरामन या वक्त्यांचीही भाषणे झाली.