पुणे: सरकारमधून बाहेर पडलो तर पोलिस त्रास देतील…सत्तेची उब मिळणार नाही… कामे होणार नाहीत… याची तयारी आहे कां? असे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी विचारले…कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला आणि सांगितले, दावी तोडा…त्यानंतर शेट्टींनी आजपासून केंद्र व राज्यातील भाजप सरकार व स्वाभिमानीचा कसलाही संबंध नसल्याचे जाहीर केले.
गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील भाजप सरकार व स्वाभिमानीत संघर्ष सुरु होता. संघटनेचे सरकारमध्ये प्रतिनिधीत्व करत असलेले कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपचे प्रतिनिधी असल्याप्रमाणे काम करत होते. राजू शेट्टी शेतकरी प्रश्नावर सरकारवर टीका करत असताना खोत सरकारच्या बाजूने उत्तर देत होत. या संघर्षात शेट्टींच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील उतरले होते. ते खोतांना पाठिंबा देत होते. भाजप प्रवक्ते शेट्टींवर तुटून पडत होते. हा वाद सुरु असतानाच शेट्टींनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून संघटनेवरील पकड मजबूत केली. गेले दोन महिने ते एनडीएमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत देत होते. पहिल्या टप्प्यात त्यांनी सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपपट्टी केली. हा निर्णय त्यांनी चौकशी समितीच्या माध्यमातून घेतला होता.
दुसऱ्या टप्प्याच्या निर्णयासाठी आज पुण्यात स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत स्वाभिमानी महायुतीबरोबर कां गेली, याचा वृत्तांत त्यांनी सांगितला. मोदींनी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन पाळले नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी अधिक कर्जबाजारी झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बाजूची धोरणे शासन राबवत नसल्याने एनडीएतून बाहेर पडत असल्याचे शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांना हमीभाव आणि सातबारा कोरा करण्याच्या उद्दिष्टाने यापुढे काम करणार आहे, तसेच सर्व पक्षांपासून समान अंतर ठेवणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.