पुणे-“शहराचे नियोजन करण्यासाठी २० वर्षे लावणारे नगर विकास खाते हे ‘होपलेस’ असून अशी ‘भुक्कड’ संस्था मी अद्याप पाहिली नाही”, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नगर विकास खात्यावर सडकून टीका केली. दरम्यान, त्यांनी सिंगापूरच्या धर्तीवर नगर विकासाचे नियोजन व्हायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेष म्हणजे राज्याचे नगरविकास खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे.
शहरातील पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणा-या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येणा-या उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, विजय शिवतरे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गडकरी पुढे म्हणाले की, पैसा ही समस्या नाही अधिकारी काम करत नाहीत ही समस्या आहे. डंडा घेऊन मागे लागल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत, अशी मिश्कील टीकाही गडकरी यांनी अधिका-यांच्या कारभारावर केली. तसेच मुळा-मुठा नदीत काम करायला सरकारने एनओसी द्यावी जलमार्ग, ड्राय पोर्ट बांधून वाहतूक सुरू करू त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पुणे सातारा रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम हा काळा डाग आहे. समस्या आहेत त्या सोडवून 6 महिन्यात काम पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. पुण्याची मेट्रो नागपूरपेक्षा चांगली होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले,वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. त्याच्या जोडीला प्रदूषणाची मोठी समस्या पुण्याला भेडसावत आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची देशात 22 टक्यांनी वाढ झाली आहे पुण्यात यापेक्षाही अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याला पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी शिवाय पर्याय नाही, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. गडकरी म्हणाले, देशातील दहा नद्यांचे जलमार्गात रुपांतर करण्यात येत असून लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल. त्या धर्तीवर पुण्यातही मुळा-मुठा जलमार्ग विकसित झाल्यास शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच पुणे, सांगली, कोल्हापूर येथे ड्रायपोर्ट बांधण्यास राज्य शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. पाटस ते बारामती आणि बारामती ते इंदापूर पालखी मार्गाचा डीपीआर तयार झाला असून लवकरच त्या कामास प्रारंभ होईल. नागपूरपेक्षाही चांगली मेट्रो पुण्यात निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शरद पवार म्हणाले, रस्ते हे विकासाचे साधन असते. सुलभ आणि मर्यादित वेळेत दळणवळणाचे साधन उपलब्ध असणे परिसराच्या विकासासाठी आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेंगाळलेल्या अनेक प्रकल्पांना गती मिळाल्याचा आनंद आहे.
पालकमंत्री बापट म्हणाले, पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातील रस्ते विकासांच्या कामासाठी तब्बल 15 हजार 139 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. चांदनी चौक येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाद्वारे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. नियोजित वेळेत पुलाचे काम पुर्ण करण्यास प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मेट्रोचे काम सुरु झाल्याने आनंद व्यक्त केला. जिल्ह्यातील विविध पालखी मार्ग लवकरच पुर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
महसुल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, चांदणी चौकातील पुलामुळे वाहतुकीला सोपेपणा येईल व सौंदर्यात वाढ होईल. सध्या राज्यात 1 लाख 6 हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरु आहेत. रस्त्यांचा सर्व नागरिकांना उपयोग होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी डि.ओ.तावडे यांनी तर आभार राजीव सिंह यांनी मानले.
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय मार्गासह पुणे-पौड रस्ता आणि कोथरूड-बावधनकडे जाणाऱ्या रस्त्यांमुळे चांदणी चौकात कायम वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या भागातील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी हा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने हा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ४१९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. चांदणी चौकातून मुंबई, मुळशी, सातारा, कोथरूड, बावधन आणि एनडीएकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीकोनातून या उड्डाणपूलाची रचना करण्यात आली असून पाषाण-बावधन ते कोथरूड मार्गासाठी दोन उपमार्ग बांधण्यात येणार आहेत. नियोजित उड्डाणपूलासाठी तब्बल सत्तावीस हेक्टरची जागा आवश्यक असून त्यापैकी साडेबारा हेक्टर जागेचे संपादन महापालिकेतर्फे केले जाणार आहे. त्यामध्ये खासगी जागा, वनविभाग, महापालिका आणि संरक्षण विभागाच्या जागेचा समावेश आहे.