भावगीत युगाच्या सुरेल स्मरणरंजनाला रसिकांची दाद
स्व. गजानराव वाटवे जन्मशताब्दी निमित्त ‘पुणे फेस्टिव्हल’च्या ‘गगनी उगवला सायंतारा’ !
पुणे :
भावगीत आणि कवितांना सुरेल चाली लावून लोकाभिमुख करणार्या स्व. गजानराव वाटवे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सादर करण्यात आलेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’ मधील ‘गगनी उगवला सायंतारा’ या विशेष कार्य्रक्रमाला मंगळवारी सायंकाळी रसिकांची वाहवा मिळवली !
‘अंतरंग, पुणे’ निर्मित हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झाला. वाटवे यांच्या समवेत काम करणार्या गायिका अनुराधा मराठे, गझलकार रमण रणदिवे, वादक डॉ. नरेंद्र चिपळूणकर, कवयित्री संगीता बर्वे, गायक राजीव बर्वे यांचा ‘पुणे फेस्टिव्हल’ संयोजन समितीच्यावतीने मोहन टिल्लू, अतुल गोंजारी यांनी सत्कार केला.
रविकिरण मंडळाने मराठीत कविता गायनाची परंपरा सुरु केली आणि गजाननराव वाटवे यांनी संगीताच्या, गायनाच्या माध्यमातून भावगीते, कविता लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि भावगीत युगच सुरु झाले. शास्त्रीय संगीत, नाट्यगीतांच्या खासगी मैफली होत असण्याच्या काळात भावगीतांच्या सार्वजनिक कार्यक्रमांचे युग सुरु झाले . सर्व सामान्यांना काव्य गीतांची शाखा खुली करणार्या संगीतकार, गायक स्व. गजाननराव वाटवे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘गगनी उगवला सायंतारा’ या कार्यक्रमात सुरेल मागोवा घेण्यात आला आणि तो काळच रसिकांसमोर पुन्हा उभा राहिला.
‘पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले’, ‘मोहुनीया तुझ्या संगे नयन खेळले जुगार’, ‘वारा फोफावला’, ‘नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू’,‘आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात’, चंद्र मागू कसा उधार तुझा’, ‘चंद्रावरती दोन गुलाब, सहज दृष्टीला घडला लाभ’ इथपासून ‘रानात सांग कानात, आपुले नाते, मी भल्या पहाटे येते’ अशा अनेक सुरेल चालींच्या गीते, कविता, भावगीते आणि गझलांची बरसात या कार्यक्रमात झाली.
दयानंद घोटकर यांनी या कार्य्रक्रमाची निर्मिती केली होती. राजीव बर्वे, राजेश दातार, चैत्राली अभ्यंकर, दयानंद घोटकर, सावनी लाड, मैत्रयी बर्वे यांनी गीते गायली. डॉ. नरेंद्र चिपळूणकर यांनी संगीत संयोजन केले. सुभाष देशपांडे, अवधूत धायगुडे, राजेंद्र हसबनीस यांनी साथ संगत केली. प्राची घोटकर यांनी सूत्र संचालनातून वाटवे युगाला उजाळा दिला.
यावेळी श्रीकांत कांबळे आणि नव्या जुन्या पिढींचे प्रतिनिधित्व करणारे रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते