‘अवामी महाज ‘ आयोजित अल्पसंख्य समाजातील विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय गुणगौरव समारंभ साजरा
पुणे :’शैक्षणिक कार्यात ‘आझम कॅम्पस ‘देशात आदर्श आहे . अल्पसंख्य आणि मागास समाजातील ३० हजार विद्यार्थ्यांना बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण दरवर्षी देण्याचे आझम कॅम्पस चे काम शैक्षणिक -सामाजिक क्षेत्रातील महत्वाचा मानदंड आहे . या कार्याचा देश पातळीवर गौरव झाला पाहिजे ‘ असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग -वक्फ-अल्पसंख्य मंत्री महमद अरिफ नसीम खान यांनी केले .
‘अवामी महाज ‘सामाजिक संस्थेने आणि हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट आयोजित अल्पसंख्य समाजातील दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा राज्य स्तरीय गुणगौरव समारंभ रविवारी साजरा झाला ,त्यावेळी अरिफ नसीम खान बोलत होते .९७ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या ८ विभागीय मंडळातील ६० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .
महात्मा फुले सभागृह (वानवडी ) येथे झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ पी ए इनामदार होते . या कार्यक्रमात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विनोद मथुरावाला आणि ‘ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन ‘चे अध्यक्ष इकबाल अन्सारी यांना ‘फक्र -ए -पुणे ‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
.’फ्रेंडशिप सॅटेलाईट ‘या ‘नासा ‘ च्या प्रकल्पासाठी निवड झालेल्या ओ . एस . इनामदार आणि बाकीर सय्यद यांचाही गौरव करण्यात आला . ‘ कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर राजू सेठी ,लतीफ मगदूम ,अतुल गायकवाड ,झुबेर शेख ,शेख चांद सरदार ,एड . अयुब शेख ,वाहिद बियाबानी ,मुनावर शेख व्यासपीठावर उपस्थित होते .
अरिफ नसीम खान म्हणाले ,’पी ए इनामदार यांच्या नेतृत्वाखाली आझम कॅम्पस ने शैक्षणिक क्षेत्रात अद्भुत कार्य केले आहे . पिचलेल्या वर्गाला प्रगतीच्या वाटेवर आणून मोठे काम करून दाखवले आहे . हे काम उल्लेखनीय असून त्याचा देशपातळीवर गौरव व्हायला हवा . आझम कॅम्पस ‘देशात आदर्श आहे . अल्पसंख्य आणि मागास समाजातील ३० हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण देण्याचे आझम कॅम्पस चे काम शैक्षणिक -सामाजिक क्षेत्रातील महत्वाचा मानदंड आहे
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ . पी ए इनामदार म्हणाले ,’दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी यशाने समाधान न मानता पिढ्यानपिढ्या लक्षात राहील असे काम करण्याचे ध्येय ठेवावे . आझम कॅम्पस मध्ये आम्ही सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांना उमेद देण्याचे काम केले ,त्यामुळे ते आपापल्या कार्यक्षेत्रात झेप घेत आहेत . आपला देश अल्पसंख्यकांना बरोबर घेऊन चालणारा देश आहे . गेली ७० वर्षे देशात प्रचंड काम झाले आहे ,जे मागील ५ हजार वर्षात झाले नव्हते . त्यामुळे अल्पसंख्य समुदायाने नकारात्मक दृष्टिकोन न ठेवता प्रयत्नांवर जोर द्यावा ‘
प्रा . ऋषी आचार्य यांनी प्रास्ताविक केले . शेख चांद सरदार यांनी आभार मानले . खालिद अन्सारी ,रोशन आरा ,उझ्मा शेख यांनी सूत्र संचालन केले . मानपत्राचे वाचन हमीद शेख ,वाहिद बियाबानी यांनी केले .