पुणे- केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपने महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी धूर्त राजनीतीचा अवलंब करण्याचे ठरविले असून या अंतर्गत सेना, मनसे सह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडी धेंडे भाजपच्या रडारवर आले आहेत . ज्यांच्याविरोधात यापुढील काळात मोठे कटकारस्थान आरंभले जाणार असल्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे बोलले जाते आहे .
याबात असे समजते की , पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह खासदार अनिल शिरोळे यांना देखील टाळून मुंबईतील भाजपच्या एका नेत्याच्या सांगण्यावरून एका बड्या उद्योजकाने पुण्यातील ३ विद्यमान नगरसेवकांची काही दिवसांपूर्वी एक खाजगी बैठक घेतली .विशेष म्हणजे या बैठकीला भाजपचे शहरातील एकही आमदार उपस्थित नव्हते . आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचीच कशी सत्ता येईल यासाठी धूर्त राजनीती ला प्रारंभ करण्याचे संकेत या बैठकीतून दिल्याचे समजले आहे . भाजप व्यतरिक्त अन्य पक्षातील बड्या नगरसेवकांची आणि नेत्यांची नावे या बैठकीत चर्चिली गेली . आणि माहिती अधिकार कायद्याचे वापर करणारे काही कार्यकर्ते यांच्या नावांचा हि उल्लेख झाला .त्यांचा काही उपयोग होईल काय ? यावर चर्चा झाल्याचे समजते आहे . मनसे,सेना, काँग्रेस आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी ला रोखण्यासाठी रडारवर घेतलेल्या ‘बड्यांची ‘जंत्री काढून त्यांना जेरीस आणण्याची नीती अवलंबणे असा या बैठकीचा बहुधा उद्देश असावा असा संशय आहे . कदाचित काहींना भाजप प्रवेशाचे आमंत्रण हि दिले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बैठकीला नेमके पुण्यातील कोण कोण होते याबाबत कानोसा घेतला असता , दारूच्या धंद्यावर मोठा होवून पालिकेत प्रवेश केलेला पूर्व भागातील एक आणि कधी काळी आर्यभूषण वर रमणारा कार्यकर्ता आणि आजचा पालिकेतील एक प्रबळ यांचा त्यात समावेश असल्याचे सांगण्यात आले . मात्र तिसऱ्याबद्दल ची माहिती समजू शकली नाही.
एकंदरीत महापालिका निवडणुकीचे पडघम आता जोरदार वाजायला सुरुवात होणार असल्याची चाहूल अशा बातम्यांनी लागू लागली आहे .
दरम्यान काँग्रेस चे स्थानिक नेतृत्व ज्यांच्या कडे आहे ते एका मोठ्या शैक्षणिक संस्थेशी निगडीत असल्याने भाजपच्या या रणनीतीला सामोरे जावू शकतील काय ? याबाबत शंका घेतली जाते आहे , तर राष्ट्रवादीत दोन माजी महापौरांच्या नेतृत्वामुळे त्यांच्याच पक्षातील बड्या बड्या हस्ती सध्या तरी ‘देखते रहो’ च्या भूमिकेत आहेत.दक्षिण भागातील मनसेची एक हस्ती बरीच मोठ्ठी झाली आहे. या हस्ती ला भाजपचे निमंत्रण नाहीतर .. ‘लेखा जोखा ‘यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे हि सांगण्यात येते .