पुणे: जागतिक मानसिक आरोग्य दिन संपूर्ण जगभरात १० आॅक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त नित्यानंद पुनर्वसन केंद्रातर्फे जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ आॅक्टोबर (रविवार) रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत, ‘मनोबल- ताकद आत्मविश्वासाची’ हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्षश्री. योगेश गोगावले उपस्थित असतील तसेच ह्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी डॉ. विद्याधर वाटवे (past president IPS), डॉ. दत्तात्रय ढवळे (Senior consultant Psychiatrist), डॉ. शिरीषा साठे, अनुराधा करकरे मादाम, श्री. श्रीरंग उमराणी व डॉक्टर दलाया ही उपस्थित असतील अशी माहिती आज पत्रकार परिषदेत मेडिकल संचालक डॉ. नितीन दलाया यांनी दिली.
मनोबल हा सर्वांसाठी मोफत कार्यक्रम असून स्क्रीझोफ्रेनिया आणि व्यसनाधीनता यांसारख्या महत्त्वाच्या विषयावर माहिती दिली जाणार आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकी १०० मागे एकजण स्क्रीझोफ्रेनिया पासून ग्रस्त आहे तर प्रत्येकी ७ मागे एकजण व्यसनाचे बळी ठरत आहे.
नित्यानंद पुनर्वसन केंद्र २००२ साली सुरू करण्यात आले. त्यावेळी ४० मनोविकार पिडीत व्यक्ती येथे उपचार घेत होत्या. आज या केंद्राच्या दोन शाखा असून साधारणपणे ३०० जणांवर निवासी उपचार केले जात आहेत. हा उपचार शारीरिक-मानसिक-सामाजिक तत्वांवर आधारीत आहे. यामध्ये औषधोपचार, समुपदेशन आणि ग्रुप थेरपी व या व्यक्तींच्या कलागुणांना वाव देता येईल या नुसार प्रशिक्षित केले जाते. ज्यामुळे रुग्नांना घरात आणि समाजात वावरताना विचार आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यास व त्यांच्यातील कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते.
यावेळी डॉ. दलाया म्हणाले, “एकविसावे शतक अनेक आव्हाने आणि ताणतणावांचे असणार आहे. मानसिक आजाराचा प्रार्दुभाव आणि प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे याबद्दल जागरूकता निर्माण करणे फार गरजेचे आहे. यामाध्यमातून मानसिक आजार आणि त्यावरील उपचार आणि उपलब्ध सुविधा याबद्दल माहिती दिली जाणार आहे. लवकर निदान आणि वेळेवर हस्तक्षेप यावर आमचा विश्वास आहे.”
केंद्रात २००६ साली दरमहा सुमारे १६ जणांनी प्रवेश घेतला होता तर २०१५ पर्यंत प्रवेश घेणार्यांची संख्या दरमहा ६० झाली. यावरून असे दिसून येते की मानसिक रूग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रातर्फे २०१२ मध्ये साधारण ९०० ओपीडी करण्यात आल्या होत्या तर २०१३ मध्ये ही संख्या १५०० पर्यंत पोहोचली तर २०१५ मध्ये हा आकडा ३००० झालेला आहे.
पूर्वी ३०-४० वयोगटतील लोक व्यसनाचे बळी ठरत होते परंतू, आता १५-२० वयोगटातील मुले व मुलीसुद्धा व्यसनाधीन होत आहेत. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतल्यास व्यसनाधीन व्यक्ती लवकर बरा होऊ शकतो. मनोबल हे त्यासाठी उचललेले पहिले पाऊल असून जागरूकता निर्माण करण्यात सर्वांची मदत मिळेल हि अपेक्षा.