सामाजिक न्याय विभाग सेल चे अध्यक्ष पंडित कांबळे म्हणाले ,’स्वतः ला आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेणारा आर पी आय पक्ष आज भाजप बरोबर सत्तेत सहभागी आहे. त्यांना महापौरांचे हे विधान मान्य आहे काय? सत्तेच्या मस्तीमध्ये त्यांना आंबेडकरांचा विसर पडला आहे. यावर आरपीआय जर मूग गिळून गप्प असेल तर मग त्यांनी दलित बांधवांशी गद्दारी केली आहे.’
महापौरांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी
पुणे:
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या ‘आरक्षणामुळेच ब्राह्मणांना परदेशात जावे लागले’ या जातीयवादी विधानाचा निषेध नोंदविण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष अॅड.खा. वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन महापौर मुक्ता टिळक यांच्या निवास्थानासमोर केसरीवाडा, नारायण पेठ येथे झाले. या आंदोलनामध्ये चेतन तुपे, रवींद्र माळवदकर, सुभाष जगताप, अशोक राठी, प्रिया गदादे -पाटील, पंडित कांबळे, राकेश कामठे, शैलेश बडदे, श्वेता होनराव, सचिन पासलकर, नामदेव पवार, प्रमोद राणा, शिवाजी पाडळे, शिवाजी क्षीरसागर, फईम शेख, अमोघ ढमाले, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘भारतीय जनता पार्टीची आरक्षणाबाबत कायम दुटप्पी भूमिका राहिलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत असो किंवा मा. गो. वैद्य यांनी वेळोवेळी आपली आरक्षण विरोधी भूमिका मांडली आहे. याच ओळीत आता पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचा समावेश झाला आहे. चित्पावन ब्राह्मण संघाच्या कार्यक्रमात ‘आरक्षणामुळेच ब्राह्मणांना परदेशात जावे लागले’ असे वक्तव्य करून आपला खरा जातीयवादी चेहरा समोर आणला आहे. महिला आरक्षणाचा लाभ मिळवून आपण पुण्याच्या महापौरपदी आहात, आपणच आरक्षणाविरोधात असाल तर आपण या पदाचा त्याग कराल का ? ‘असा प्रश्न विरोधी पक्ष गटनेते चेतन तुपे यांनी आंदोलना दरम्यान केला. भाजपने या प्रकरणी महापौरांचा राजीनामा घ्यावा आणि महापौरांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
माजी आमदार रवींद्र माळवदकर म्हणाले ,’आंबेडकर आयुष्यभर मनुवादाच्या विरोधात लढले, देशातील दलितांना न्याय देण्यासाठी आरक्षणाची घटनात्मक तरतूद केली. एकीकडे त्यांना प्रात: स्मरणीय म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्या विचारांची अवहेलना करायची, हा दुटप्पीपणा फक्त भाजपचे नेतेच करू शकतात.’