मुंबई : वीजहानीचे प्रमाण जास्त असलेल्या मराठवाडा विभागातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, जालना, लातूर, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक श्री. अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 27 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत धडक कृती कार्यक्रम राबविण्यात आला.
या धडक कृती कार्यक्रमात वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी प्रामुख्याने हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट, लॉज यांची तपासणी करून या मोहिमेत एकूण 1 हजार 421 वीजसंचांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 269 वीजचोऱ्या उघडकीस आल्या असून अनधिकृत वीजवापर करणाऱ्या 53 वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय 153 वीज ग्राहकांच्या मिटर्सची कार्यप्रणाली संशयास्पद आढळून आल्याने सदर मीटर्स अंतिम चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यावर सदर ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर मोहिमेत कोंकण, पुणे व नागपूर परिक्षेत्र कार्यालयातील उपसंचालक सर्वश्री सुमित कुमार, शिवाजी इंदलकर आणि मंगेश वैद्य यांनी भाग घेतला तर औरंगाबाद विभागाचे उपसंचालक श्री. बत्तलवाड यांनी या मोहिमेचा नोडल ऑफीसर म्हणून कार्यभार सांभाळला. या मोहिमेत महाराष्ट्रातील 36 भरारी पथके व संबंधित संचलन व सुव्यवस्था मंडल कार्यालयात कार्यरत असलेले 46 सहाय्यक अभियंते प्रामुख्याने सहभागी झाले होते. यापुढेही महाराष्ट्रात सुरक्षा व अंमलबजाणी विभागाच्या धडक मोहिमा अधिक जोमाने राबवून वीजचोरांवर जरब बसविण्यात येईल असे कार्यकारी संचालक श्री. अरविंद साळवे यांनी यावेळी सांगितले.