पुणे : वीजबिलांची वाढती थकबाकी चिंतेची बाब असून ती वसुल करण्याशिवाय महावितरणकडे अन्य पर्याय नाही. पश्चिम महाराष्ट्रात थकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहे. थकबाकीदारांनी वीजबिलांची थकबाकी त्वरीत भरून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 16 लाख 82 हजार वीजग्राहकांकडे सद्यस्थितीत 235 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात पुणे जिल्ह्यात 7 लाख 80 हजार वीजग्राहकांकडे 151 कोटी 17 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 28 हजार वीजग्राहकांकडे 18 कोटी 87 लाख, सांगली जिल्ह्यातील 1 लाख 98 हजार ग्राहकांकडे 19 कोटी 59 लाख, सातारा जिल्ह्यात 2 लाख 12 हजार ग्राहकांकडे 17 कोटी 57 लाख तसेच सोलापूर जिल्ह्यातील 2 लाख 63 हजार ग्राहकांकडे 27 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे.
वाढत्या थकबाकीसह विविध मुद्द्यांवर प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी व्हीडीओ कॉन्फरंसींगद्वारे पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलातील वरिष्ठ अधिकार्यांशी नुकसाच संवाद साधला. यावेळी त्यांनी वाढत्या वीजबिलांच्या थकबाकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली व थकीत वीजबिलांच्या वसुलीची मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देश दिले. पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबतच्या उपाययोजना तसेच वीजबिलांची थकबाकी वसुल करण्यासंदर्भात प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी विविध सूचना केल्या. या दोन्ही कामांत दिरंगाई झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
थकबाकीदारांनी वीजबिलांची रक्कम न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यासाठी सुरु झालेल्या धडक कारवाईचे पर्यवेक्षण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची वेगळी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत देयकांचा त्वरीत भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून थकबाकीदारांना करण्यात आले आहे.