पुणे, दि. १७ ऑगस्ट २०२६ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील रस्ते, वीज, पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडीसह नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. शहरातील विविध प्रलंबित विकासकामे आणि नागरी समस्यांबाबत डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
या भेटीत शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, उद्याने, पथदिवे तसेच विविध प्रलंबित विकासकामांचा मुद्दा प्रशासनासमोर मांडण्यात आला.
शहरातील अनेक भागांमध्ये विकासकामे प्रलंबित असून काही ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा दर्जा आणि कामांची गती याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. संबंधित विभागांनी कामांना गती द्यावी, गुणवत्तेशी तडजोड करू नये आणि नागरिकांना कमीतकमी त्रास होईल अशा पद्धतीने प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.
“पुणे शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत नागरी सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. विकासकामांमध्ये दिरंगाई किंवा निष्काळजीपणा होता कामा नये. विशेषतः गणेशोत्सवापूर्वी रस्ते, वीज, पाणी आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक आहे,” अशी भूमिका डॉ. विश्वजित कदम यांनी मांडली.
शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता भविष्यातील गरजांचा विचार करून पाणी, वाहतूक, ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
काँग्रेस शिष्टमंडळाने शहरातील सर्व खड्ड्यांची शास्त्रीय पद्धतीने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची प्रमुख मागणी केली. फुटपाथवरील अतिक्रमणे हटवून ते पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करावेत, तर वाढत्या वाहतूक कोंडीवर तातडीचा कृती आराखडा तयार करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
शहरातील सर्व भागांना समान आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी शास्त्रीय पाणी नियोजन करण्याबरोबरच टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली. ड्रेनेज, नाले आणि पावसाळी पाण्याच्या निचरा व्यवस्थेची प्रत्यक्ष तपासणी करून आवश्यक कामे पूर्ण करण्यावरही शिष्टमंडळाने भर दिला.
सिंहगड रोडसह शहरातील सर्व पूरप्रवण भागांसाठी कायमस्वरूपी पूरनियंत्रण आराखडा तयार करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. याशिवाय अनधिकृत जाहिरात फलक आणि होर्डिंग्ज हटवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
महापालिकेच्या निविदा प्रक्रियेवरही शिष्टमंडळाने प्रश्न उपस्थित केले. तक्रारी आणि संशय असलेल्या निविदांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, निविदा प्रक्रियेत पारदर्शकता, खुली स्पर्धा आणि समान संधी सुनिश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली. विकासकामांची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करून निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांसह संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन पुणे शहर खड्डेमुक्त, अतिक्रमणमुक्त आणि वाहतुकीच्या दृष्टीने सुरळीत करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी प्रमुख मागणी डॉ. कदम यांनी प्रशासनाकडे केली.
या निवेदनातील मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात आणि पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने गतिमान पावले उचलावीत, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.
यावेळी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, गटनेते ॲड. रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम, शहराध्यक्ष (पूर्व) दीप्ती चवधरी, शहराध्यक्ष (पश्चिम) प्रशांत जगताप, काँग्रेसचे सभासद, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

