ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांचे मत; आदिश जैन फाउंडेशनतर्फे हास्यकविता महोत्सवात हास्यकवी बंडा जोशी यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद
पुणे : ज्येष्ठांनी शिकणे थांबवले तर त्यांना भवितव्य नाही. जगण्यात अस्सलियत असेल तर गझलेत गझलियत आपोआप येते. साध्या-साध्या गोष्टींतून विनोद टिपता आला पाहिजे. हास्यातून आयुष्याला न्याय देता येतो, असे मत ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.
आदिश जैन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त नवी पेठेतील लोकमान्य वाचनालयाजवळील अक्षरवेल सभागृहात हास्यकविता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ हास्यकवी बंडा जोशी, श्रीपाल ललवाणी, वंदना ललवाणी, आदिश जैन फाउंडेशनच्या प्रमुख, कवयित्री मृणाल जैन उपस्थित होते.
आदिश जैन फाउंडेशनतर्फे खुली हास्यकविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला देश-विदेशातून मोठा प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध हास्यकवी बंडा जोशी यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
महोत्सवाच्या पहिल्या सत्रात स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी विजेत्या हास्यकवितांचे अभिवाचनही करण्यात आले. हास्यकविता स्पर्धेत प्रथम क्रमांक राजेश पारसनीस (सुरत), द्वितीय क्रमांक कल्पना मोडक (ठाणे), तर उत्तेजनार्थ अनिल घोटकर (पुणे) आणि शुभदा अभ्यंकर (पुणे) यांनी मिळविला. गझल स्पर्धेत प्रथम क्रमांक हेमंत डांगे (कोल्हापूर), द्वितीय क्रमांक प्रविण बोधुलकर (पनवेल), तर उत्तेजनार्थ मनोहर वाळींबे (ठाणे) यांना पारितोषिक मिळाले. विडंबन स्पर्धेत प्रथम क्रमांक मुकुंद देशपांडे (वर्धा), द्वितीय क्रमांक मकरंद घाणेकर (पुणे), तर उत्तेजनार्थ वर्षा बालगोपाल (पुणे) आणि डॉ. मनोज वराडे (सांगली) यांना गौरविण्यात आले.
बंडा जोशी म्हणाले, कविता लिहिणे ही सर्वांत अवघड गोष्ट आहे. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय मांडणे अत्यंत कठीण असते. कविता लिहिण्यासाठी कला, कौशल्य आणि समृद्ध शब्दसंपदा आवश्यक असते. योग्य शब्दांचा योग्य ठिकाणी वापर करता आला पाहिजे. जितके अधिक वाचन कराल, तितके चांगले लिहिता येईल. वाचन आणि कविता ऐकण्याच्या सरावातून हे कौशल्य विकसित होते. आपल्याकडे विडंबन कवितेची मोठी परंपरा आहे. विनोदी कविता आणि विडंबनांचे नियमित वाचन केल्यास या साहित्यप्रकाराची जाण वाढण्यास आणि ही कला विकसित करण्यास मदत होते.
मृणाल जैन म्हणाल्या, आदिश जैन फाउंडेशनच्या वतीने वर्षभरात विविध उपक्रम घेण्यात आले. संस्थेच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत करण्यात येते. तसेच गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्वही घेण्यात आले आहे. यापुढील काळात देखील मराठी साहित्याचे दर्जेदार कार्यक्रम फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येतील.
महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात अष्टपैलू साहित्यिक कै. आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त हास्यकवी बंडा जोशी यांनी विडंबन गीतांची झेंडूची नवी फुले ही हास्यमैफल सादर केली. त्यांच्या सादरीकरणाला पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

