सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई, दि. 16 आँगस्ट
महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तसेच आपल्या गोविंदांना स्पेनलाही पाठवणार आहोत, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली. तसेच उत्सव साजरे करताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहनही त्यांनी उत्सव मंडळांना केले.
महाराष्ट्रातील दहीहंडी पथक, गोविंदा आणि दहीहंडी उत्सवासाठी कार्यरत असलेल्या विविध संघटनांच्या सहभागातून.स्थापन झालेल्या “महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या” वतीने आयोजित करण्यात आलेला ‘कृष्णानंद सोहळा’ रविवारी (१६ ऑगस्ट) परळ येथील राष्ट्रीय मजदूर मिल संघ, मजदूर मंदिर येथे आज उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन अध्यक्ष बाळा पडेलकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, सचिव गीता झगडे, अभिषेक सुर्वे यांसह महाराष्ट्रातील महिला व पुरुष दहीहंडी पथके, गोविंदा तसेच दहीहंडी उत्सवासाठी कार्यरत विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहीहंडी उत्सवाचे नियोजन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करणे, गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह द्विगुणित करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामुहिक श्रीकृष्ण आरतीही करण्यात आली.
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या पथकांनी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे, आवश्यक खबरदारी घ्यावी, रहदारीचे, वाहतूकीचे नियम पाळा, पादचारी, नागरिक यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि उत्सवाचा आनंद सुरक्षित वातावरणात घ्यावा, असे आवाहन यावेळी या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक मंत्री अँड आशिष शेलार यांनी आले.
यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात गोविंद पथकांची सर्वोच्च न्यायालयापर्यंत जी लढाई कशी लढावी लागली त्याचे संपूर्ण विवेचन केले. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अत्यंत खंबीर पणे उभे राहिले. न्यायालयाला सरकारने ठणकावून सांगितले म्हणूनच लढाई जिंकता आली, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ते पुढे म्हणाले की,माझा थेट आरोप आहे. महाराष्ट्रात आम्ही सातत्याने पाहतो आहोत, काही संघटना या कधी गणपती मूर्त्यांच्या विसर्जनावर बंदी आणा,गणपती मूर्त्या कशाच्या बनल्या पाहिजेत यावर मर्यादा आणा,गणेशोत्सव साजरे करताना असलेले परंपरागत मंडप यांना परवानगी मिळता कामा नये,गणेशोत्सवाच्या काळात असलेल्या मंडपांबरोबर ध्वनी परवानग्या अगदी आरतीपासून याच्यावर मर्यादा आणा, नागपंचमीचा आमचा खेळ या पूजनावर मर्यादा आणा, गोविंदा दहीकाला उत्सव यांच्या उंची, थर, वय आणि आयोजन यावर मर्यादा आणा, विसर्जन गणेशोत्सवाचं कुठे झालं पाहिजे यावर मर्यादा आणा. या मर्यादांच्या मागण्या करणारी लोकं कोण आहेत?
होय, पर्यावरणाची चिंता, नागरिकांची चिंता, वाहतुकीची चिंता आम्हाला केलीच पाहिजे, याबद्दल काही दुमत नाही.
पण मर्यादा आणत आणत आणत आमच्या उत्सवांवर बंदीच्या दिशेने नेणे ही भूमिका मांडणारे इथे आहेत. मराठी मातीतल्या, मराठी माणसाचे, हिंदू सण याच्यावर रोक लागण्याचीच भूमिका या लोकांची सातत्याने दिसते आहे. मला कुठल्याही अन्य धर्माबद्दल बोलायचं नाही, कुठल्याही अन्य पंथाबद्दल बोलायचं नाही.त्यांची जशी मुभा आहे तशी आमची पण मुभा आहे.
काळजी जरूर घेऊ, चिंता जरूर करू, पण बंदीचा निर्णय मान्य नाही. अशा मर्यादा आणि बंदी आणण्यापर्यंत भूमिका मांडणारी ही लोकं शहरी नक्षलवादाशी जोडली आहेत का ? हाच माझा थेट आरोप आहे. आणि म्हणून या मराठी महाराष्ट्रातल्या आणि हिंदू सणांची बाजू सर्व चिंता काळजींसहित आम्ही घेऊ, ही जबाबदारी आम्ही घेतली आहे, एवढंच माझा म्हणणं आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

