शहरातील उद्यानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्या : श्रीनाथ भिमाले
पुणे : पु. ल. देशपांडे उद्यानातील वृक्षतोड व लाकूड चोरी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व महापालिकेच्या उद्यानांतील सुरक्षा व्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले.
भिमाले म्हणाले, “अशा प्रकारे नियमबाह्य वृक्षतोड किंवा लाकूड चोरीच्या घटना अत्यंत गंभीर आहेत. संबंधित प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी. प्रत्येक उद्यानात सक्षम सुरक्षा रक्षक नियुक्त करून देखरेख अधिक कडक करावी.”
यावेळी प्रशासनाने खुलासा केला की, पु. ल. देशपांडे उद्यानातील तुटलेले झाड एकत्र करून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या. मात्र, एका ठेकेदाराने परस्पर झाड तोडून टेम्पोमध्ये भरून नेत असताना नागरिकांनी संशय आल्याने वाहन अडविले. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित ठेकेदारासह एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित उद्यानातील सुरक्षा रक्षक बदलण्याचे आदेश देण्यात आले असून, शहरातील सर्व उद्यानांतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानातील जुने झाड परवानगीशिवाय तोडून त्याचे लाकूड नेल्याचा आरोप झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. स्थानिक नागरिक व पर्यावरण कार्यकर्त्यांनी टेम्पो अडवून कागदपत्रांची मागणी केल्यानंतर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महापालिकेच्या वृक्ष निरीक्षकासह संबंधितांवर पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महापालिकेनेही अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
एसआयआरचे ५५ टक्के काम पूर्ण ८ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी नोंदणी करावी –नोंदणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घ्या
–श्रीनाथ भिमाले
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झाले असून, मुदत ८ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने उर्वरित पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केले.
काम वेळेत पूर्ण करण्यासाठी महिला स्वयं-सहाय्यता बचत गटांप्रमाणेच “कमवा आणि शिका” योजनेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही आवश्यकता भासल्यास मदत घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.
भिमाले म्हणाले, “ही नागरिकांसाठी शेवटची महत्त्वाची संधी आहे. नावातील चुका दुरुस्त करणे, पत्ता बदल, तसेच विविध त्रुटी दूर करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत उपलब्ध आहे. बीएलओ नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. ज्या नागरिकांची भेट झालेली नसेल त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जवळच्या केंद्रावर जाऊन नोंदणी पूर्ण करावी. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनेही यासाठी व्यापक जनजागृती करावी.”
तसेच पुनरीक्षणासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे शिक्षण, आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवांवर काही परिणाम झाला आहे का, याची माहिती मागविण्यात आली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना आरोग्य विभागातील तांत्रिक मनुष्यबळावर ताण निर्माण झाला आहे का, याबाबतही प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आले.
प्रशासनाने बैठकीत सांगितले की, बीएलओच्या माध्यमातून सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झाले असून, ८ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. बीएलओ नागरिकांना भेटू शकले नसल्यास समाजमंदिर, शासकीय कार्यालये व इतर निश्चित केंद्रांवर ते उपलब्ध राहतील. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह तेथे जाऊन नाव नोंदणी, दुरुस्ती किंवा इतर आवश्यक बदल करून घ्यावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

