साहित्याला लोकचळवळीचे स्वरूप देणार : योगेश सोमण
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साहित्य परिषदेच्या शाखांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा उत्साहात
पुणे : आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे पुण्याच्या ‘पुस्तकांची नगरी’ या ओळखीवर शिक्कामोर्तब होईल. मराठीचा प्रचार-प्रसार हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मुख्य उद्देश असून, या निमित्ताने विद्यापीठातील मराठी भाषा भवनालाही नवी झळाळी मिळेल. हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम न राहता व्यापक सांस्कृतिक उत्सव ठरेल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या ९९ साहित्य संमेलनांच्या नियोजनासाठी विद्यापीठात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखा पदाधिकाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी डॉ. गोसावी बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे, प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, मसापचे प्रदीप निफाडकर, प्रसाद मिरासदार, सुनील महाजन, बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत परिषदेच्या शाखा आणि संस्थांचे २०० पेक्षा अधिक सदस्य सहभागी झाले.
डॉ. गोसावी म्हणाले, विद्यापीठाला मराठी साहित्याची समृद्ध परंपरा लाभली असून, शंभरावे साहित्य संमेलन येथे होत असल्याचा अभिमान आहे. मराठीत एक हजार पुस्तकांच्या लेखनासाठी नोडल संस्था म्हणून विद्यापीठाची निवड झाली असून, संमेलनाच्या यशस्वी आयोजनात विद्यापीठ सक्रिय सहभाग घेणार आहे.
सोमण म्हणाले, लोकसहभागातूनच साहित्य संमेलन अधिक चांगले आणि भव्य होणार आहे. संमेलन काळात चार दिवस संपूर्ण विद्यापीठ परिसर साहित्याच्या उत्सवाने उजळून निघेल आणि देश-विदेशातील मराठी भाषिकांना या ऐतिहासिक सोहळ्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
पांडे म्हणाले, ९९ साहित्य संमेलने यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राज्यातील शाखा अधिक बळकट होतील. स्थानिकांचा सहभाग वाढवत साहित्य संमेलन समाजाचा उत्सव बनविण्यासाठी युवा कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात महाळंक यांनी संमेलनाची प्रभावी वातावरणनिर्मिती करण्यासाठी शाखांनी स्थानिक पातळीवर विषय निश्चित करून मुख्यालयाशी सातत्याने समन्वय ठेवण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले, तर आभार प्रसाद मिरासदार यांनी मानले.
साहित्याला लोकचळवळीचे स्वरूप देणार : योगेश सोमण
१००वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे पहिले संमेलन असल्याने त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. समाजाला जोडणारे ९९ विषय, विविध बोलीभाषा, लोकसाहित्य, नवोदित लेखकांना मुख्य प्रवाहात स्थान आणि जगभरातील मराठी भाषिकांना एका धाग्यात जोडण्याचा संकल्प या संमेलनातून साकारला जाणार आहे. साहित्याचा उत्सव हा समाजाचा उत्सव व्हावा, मराठीला ज्ञान, संस्कृती, अस्मिता आणि रोजगाराची भाषा म्हणून अधिक सक्षम करण्याबरोबरच भावी पिढीसाठी सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा निर्धारही या संमेलनातून व्यक्त होणार असल्याचे योगेश सोमण यांनी सांगितले.
देशभरातील ९९ साहित्य संमेलनांच्या माध्यमातून प्रत्येक भागात साहित्याचा उत्सव उभा राहणार आहे. यातून बोलीभाषा, लोकसाहित्याचे ‘मॅपिंग’ करण्यात येईल. या उपक्रमामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केवळ चार दिवसांचा कार्यक्रम न राहता त्यातून मराठी भाषा आणि साहित्याची लोकचळवळ उभी राहणार आहे. देशभरात होणाऱ्या संमेलनामध्ये स्थानिकांचा सहभाग वाढवून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखा अधिक बळकट होतील. त्या माध्यमातून जानेवारीतील मुख्य संमेलनात लाखो मराठी रसिकांना जोडण्यात येणार आहे. भावी पिढीसाठी सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा संकल्प असून, शब्दातून समाज, साहित्यातून संस्कृती आणि विश्वाशी जाते जोडण्याचा संकल्प आहे.यासाठी संयोजक संस्था म्हणून समर्थ युवा फाउंडेशन पूर्ण क्षमतेने काम करेल.
– राजेश पांडे, विश्वस्त, समर्थ युवा फाउंडेशन

