पुणे-येथील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात एका 48 वर्षीय आयटी अभियंत्याने वरिष्ठ महिला सहकारी आणि एका मित्राकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमित ब्राम्हे असे या मृत अभियंत्याचे नाव असून, या गंभीर प्रकरणी एका नामांकित आयटी कंपनीतील दोन वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील आयटी क्षेत्रात खळबळ उडवून देणारी ही अत्यंत दुर्दैवी घटना 2 जून रोजी घडली असून, अमित ब्राम्हे (वय 48) या आयटी अभियंत्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी अमित यांनी लिहून ठेवलेली दोन पानांची सुसाईड नोट समोर आली असून, त्यामध्ये त्यांनी कंपनीतील अंतर्गत छळाची भीषणता मांडत आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे स्पष्टपणे नमूद केली आहेत.
या सुसाईड नोटमध्ये अमित यांनी त्यांच्या कंपनीतील वरिष्ठ महिला सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्यावर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. आपल्याकडील चांगले प्रोजेक्ट्स काढून घेणे, जाणीवपूर्वक अत्यंत कठीण कामे सोपवणे, इतर कर्मचाऱ्यांसमोर वारंवार अपमानित करणे आणि नोकरी सोडण्यासाठी सतत दबाव टाकणे, असा प्रचंड त्रास या दोघींकडून दिला जात असल्याचे त्यांनी या चिठ्ठीत म्हटले आहे. वरिष्ठ सहकाऱ्यांकडून होणाऱ्या याच मानसिक जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आता उघड झाले आहे.
या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ महिला सहकाऱ्यांसोबतच अमित यांचा मित्र विनोद पाली याचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. विनोदने अमित यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून कंपनीत त्यांची नाहक बदनामी केली आणि त्यांना मानसिक त्रास दिला, असे या चिठ्ठीत नमूद केले आहे. याच सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळून आपण स्वतःचे जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अमित यांनी यात म्हटले आहे.
अमित ब्राम्हे यांनी लिहून ठेवलेल्या या सुसाईड नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर असणारा वाढता मानसिक तणाव, कंपनीतील वाढते अंतर्गत राजकारण आणि सहकाऱ्यांच्या वागणुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

