पुणे, ता. १ – कविश्रेष्ठ कालिदासरचित ‘मेघदूत’ या अभिजात खंडकाव्याचे रंगमंचावर नाट्य स्वरूपात सादरीकरण करताना पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या संयोजनातून ‘प्रवेश’ या संस्थेने नाट्यस्वरुपात सादर केला होता.
पाणी हे जीवन आहे. पाणी वाचविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी ‘मेघदूत’सार‘या नाटकांचे प्रयोग महत्वाचे असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. कोथरुड मतदारसंघात पाणी बचतीसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रकल्प राबविण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात केली. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी पाण्याचे महत्व सांगून पाणी बचत करण्यासाठी सर्वांनी कटिबध्द होण्याचे आवाहन केले.
इ. स. चौथ्या ते सहाव्या शतकादरम्यान ‘मेघदूता’ची निर्मिती झाली. नृत्य व संगीत स्वरूपात विविध भाषांमध्ये त्याचे प्रयोग सादर केले गेले. ‘प्रवेश’ संस्थेने पहिल्यांदाच १११ कडव्यांच्या या रचनेचे ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ अशा दोन भागात नाटक स्वरूपात सादरीकरण केले.
रामगिरीतील विरह व्याकुळ यक्षाने अलकापुरीला जाऊन आपल्या प्रेयसीला आपले क्षेमकुशल सांगणारा संदेश घेऊन जाण्याची वर्षा ऋतूतील मेघाला केलेली विनंती, या मार्गातील डोंगरदर्या, नद्या, तिथला निसर्ग, रम्य परिसर याचे वर्णन पूर्वमेघात करण्यात आले आणि उत्तरमेघात यक्षाने विरहवण्यात होरपळणार्या आपल्या पत्नीला द्यावयाचा उत्कट संदेश कथन केला.
भरत नाट्यम व कथक अशी मिश्र नृत्य शैली आणि सारंगी, सतार, सरोद, तबला, पखवाज अशा केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर हे या नाटकाचे एक वैशिष्ट्य होते. प्रथम पटवारी यांनी लेखन केले असून, निखिल शेटे निर्माता व दिग्दर्शक आहे. जयदीप वैद्य आणि शमिका भिडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रसिकांनी या प्रयोगाला मोठी गर्दी केली होती.
पाणी बचतीचा संदेश देत ‘मेघदूता’चे सादरीकरण
Date: