महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे-समाजाला वाहून घेतलेले एक समर्पित नेतृत्व असलेले आबा बागुल अनेक वर्षे नगरसेवक आहेत. आता यापुढे ते नगरसेवक नाही तर विधानसभेत त्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत.असे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आबा बागुल मित्रपरिवाराने महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी वडेट्टीवार बोलत होते. याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर कमल व्यवहारे, पूजा आनंद, संगीता तिवारी, जयश्री बागुल, वैष्णवी किराड, हेमंत बागुल यांच्यासह इंडिया फ्रंटचे सर्व पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले, देव माणसात पाहणारे आबा बागुल यांचे कार्य आदर्शवत आहे. आज ७० हजाराहून अधिक वृद्ध माता -पित्यांना ते काशीयात्रा घडवत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे. त्यांचे हे कार्य असेच निरंतर सुरु राहावे. आबांना जो हजारो वृद्ध माता -पित्यांचा आशीर्वाद आहे. ते पाहता आता आम्ही आबांसाठी विधानसभेचा आग्रह धरणार आहोत. आज दिल्लीची गाडी सुटली आहे मात्र आबांना मुंबईच्या गाडीतून विधानसभेत घेऊन जाणार आहोत हा आमचा शब्द आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.
मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, इंग्रजांनी दुधावर कर लावला नाही. त्याच्याही पुढे जाऊन मोदींनी दूधच काय जीवनावश्यक वस्तूंवर अगदी साड्या , कपड्यांवरही जीएसटी लावला आहे. अशी कोणतीही वस्तू नाही, ज्यावर जीएसटी नाही. त्यामुळे अशा या सरकारला हद्दपार करायचे आहे. आज देशात काय राज्यांमध्ये अगदी पुण्यातही महिलांवर अत्याचार वाढले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुण्यात पाच वर्षात किती मुलींचे अपहरण,खून झाले याची आकडेवारी पहा. पुण्याला ड्रग्सचा विळखा पडला आहे.त्यामुळे तुम्हीच ठरवा काँग्रेसचे सरकार हवे कि लुटमारीचे सरकार. मोदी हे देश विकत आहेत. भाजप विरोधात बोलले तर जेल हे काय चालले आहे. महागाईवर आंदोलन करणाऱ्या स्मृती इराणी आता एक शब्दही बोलत नाहीत. २०१४ ला विकासाच्या नावावर मत मागणारे मोदी सरकार २०१९ ला शहिदांच्या नावावर मते मागत होते.आता २०२४ ला प्रभू श्रीरामचंद्र यांच्या नावावर मत मागत आहेत. त्यामुळे आता मतदानातून या मोदी सरकारला हद्दपार करायचे आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले कि, आधी मी पुणेकरांचा उमेदवार आहे नंतर काँग्रेस पक्षाचा आहे. आता स्वाभिमानाची, विचारांची लढाई आहे . त्यामुळे येत्या १३ मे ला लोकशाहीचा विजय करायचा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल म्हणाले, आबाच उभे आहेत असे समजून हाताच्या पंजा या चिन्हासमोरील बटण दाबून रवींद्र धंगेकर यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्यायचे आहे. असे आवाहन त्यांनी केले. संतोष गेळे यांनी सूत्रसंचालन केले.