: पुणे प्रार्थना समाजाच्या चैत्रोत्सवात विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर व्याख्यान
पुणे : मानवता हे अध्यात्माचे प्रमुख अंग आहे. विज्ञानाचे उपयोजन करताना मानवतेचे भान राखणे आवश्यक आहे. विज्ञानाला मानवापासून अलिप्त ठेवू नये. विज्ञानाला अंतरंगात झिरपू दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. पार्थ घोष यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने बुधवार पेठेतील हरी मंदिरात आयोजित चैत्रोत्सवातील ज्ञान विज्ञान तरंग कार्यक्रमात विज्ञान आणि अध्यात्म या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप कान्हेरे, पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्षा डॉ. सुषमा जोग, विश्वस्त आणि सचिव डॉ. दिलीप जोग उपस्थित होते. पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिराच्या ११६ व्या प्रवेशदिन ‘चैत्र वद्य षष्ठी’ या दिवसाच्या निमित्ताने चैत्रोत्सव साजरा करण्यात आला.
डॉ. दिलीप जोग यांनी प्रास्ताविकात पुणे प्रार्थना समाजाच्या समाजाभिमुख उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप कान्हेरे यांनी “प्रयोगांतून विज्ञान शिक्षण” ह्या पद्धतीचे महत्त्व सांगितले. अध्यक्ष डॉ. सुषमा जोग यांनी प्रार्थना समाजाची विचारसरणी विज्ञानाशी सुसंगत आहे असे प्रतिपादन केले.
ज्ञान-विज्ञान-तरंग कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पुण्यातील “उपासना ग्लोबल फोरम” संस्थेतर्फे रवींद्रनाथ टागोर यांच्या आध्यात्मिक आशयाच्या रचनांचे सुश्राव्य गायन तसेच रवींद्र संगीतावर आधारित नृत्य-उपासना यांचे सादरीकरण झाले.