Home Blog Page 63

अशोक खरात प्रकरणी कारवाईचे फडणवीसांनी दोन आठवडे आधीच दिले होते आदेश; पोलिसांची गुप्त मोहीम यशस्वी

मुंबई-नाशिकमधील तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने आधीपासूनच लक्ष घातल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती घेत पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर राज्याच्या पोलिस महासंचालकांनी यंत्रणा हलवली आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईची तयारी सुरू झाली. त्यामुळे ही कारवाई अचानक नसून पूर्णपणे नियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व महत्त्वाचे पुरावे आधीच गोळा करण्यात आले होते. अशोक खरातविरोधातील व्हिडिओ क्लिप्स आणि इतर संवेदनशील माहिती पोलिसांनी आधीच ताब्यात घेतली होती. या पुराव्यांच्या आधारे कारवाई अधिक मजबूत करण्यात आली. त्यानंतरच पोलिसांना कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. या सगळ्या प्रक्रियेमुळे आरोपीविरुद्ध ठोस केस तयार करण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अशोक खरातला पकडण्यासाठी सापळा रचला. अटकेची माहिती मिळताच तो पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेगळाच डाव आखला. परिसरात चोरी झाल्याचा बनाव करून पोलिसांनी कारवाई सुरू केली, ज्यामुळे कोणालाही संशय आला नाही. त्यानंतर एक पथक घरात शिरले, तर दुसरे पथक बाहेर तैनात होते. खरात घरात असल्याची खात्री होताच त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

या संपूर्ण घटनेमुळे नाशिकसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजातील अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची चर्चा जोर धरत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक केला असून, आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्रमक भूमिका घेत चाकणकरांनी पद सोडावे, असे म्हटले आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरून सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांची बाजू घेतल्याचे दिसत आहे, तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता अधिकच राजकीय रंग चढला आहे.

पतीच्या मृत्यूची भीती घालत महिलेवर 2 वर्षे अत्याचार; नाशिकला ज्याेतिषी खरात अटकेत

नाशिक -पतीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेला दैवी शक्तीचा खोटा दावा करत ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी पतीच्या निधनाची भीती घालून २ वर्ष अत्याचार करणाऱ्या ‘कॅप्टन’ अशोक खरातला गुन्हे शाखा १ च्या पथकाने मंगळवारी (दि. १८) रात्री ११.३० वाजता कर्मयोगीनगरमधील बंगल्यातून अटक केली. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बड्या नेत्यांसह सेलिब्रिटींचे भविष्य सांगणाऱ्या कॅप्टनच्या पेन ड्राईव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याच्या चर्चेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनुसार, अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ (तृप्ताबाला बंगला, रा. कर्मयोगीनगर) याने नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील ओक‌्स प्रॉपर्टीज‌्च्या ऑफिसमध्ये फिर्यादी महिलेला जाळ्यात ओढले. दैवी शक्ती असल्याचे भासवून मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या बहाण्याने महिलेला गुंगीकारक पदार्थ देऊन संमोहित केले. ‘तुझे आयुष्य बरबाद करेन’, ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी भीती घालून वारंवार इच्छेविरुद्ध अत्याचार केला.

नेव्ही कॅप्टननंतर खरात थेट ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष

खरातने मर्चंट नेव्हीत २२ वर्षाच्या कारकीर्दीनंतर अंकशास्त्र, ‘कॉस्मॉलॉजी’चा (विश्वशास्त्र) अभ्यास केला. ‘शिवनिका ट्रस्ट’चे नेतृत्व करत २०१० पासून मिरगाव (ता. सिन्नर) येथील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष झाला. २०२२ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मंदिरात गेले असता खरातने त्यांच्याशीही राजकीय भविष्यावर चर्चा केली. नेव्हीत असताना १५४ देशांचे दौरे केले. १३ भाषा शिकल्या.

सरकार म्हणाले- पॅनिक बुकिंगमध्ये घट; अमेरिकेकडून एलपीजीचा पुरवठा होतोय, किमतीत वाढ नाही

ऑनलाइन सिलेंडर बुकिंग 94% पर्यंत पोहोचली
नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या तेल आणि वायू संकटावरील सद्यस्थितीची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयातील (MEA) संयुक्त सचिव (गल्फ) असीम महाजन म्हणाले की, ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जागतिक समुदायासाठी एक कसोटीची वेळ आहे.

पेट्रोलियम मंत्रालयातील संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि तेल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी सांगितले की, युद्धामुळे एलपीजीची (LPG) स्थिती चिंतेचा विषय बनली आहे. तथापि, देशातील कोणत्याही एलपीजी वितरकाकडे सिलिंडरची कमतरता नाही.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या मते, देशात ऑनलाइन बुकिंग वाढून ९४% पर्यंत पोहोचले आहे. सुमारे ८३% रिफिल डिलिव्हरी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेट’ कोडद्वारे होत आहे. पॅनिक बुकिंगमध्ये घट होत आहे.

सुजाता शर्मा यांनी सांगितले की, भारतात सुमारे ७०% कच्चे तेल आता होर्मुज सामुद्रधुनीच्या बाहेरील प्रदेशातून येत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निश्चितच दबाव आहे, परंतु अद्याप किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.
पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले की, एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सामान्य आहे. 18 मार्च रोजी सुमारे 57,000 रिफिल बुकिंग झाल्या. सरकारने व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना सीएनजीवर शिफ्ट होण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, अनेक कंपन्यांनी यासाठी प्रोत्साहनपर योजनाही जाहीर केल्या आहेत.

सुजाता शर्मा म्हणाल्या की, मध्य पूर्वेतील परिस्थितीचा भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर थेट परिणाम होतो, त्यामुळे सरकार इतर ठिकाणांहूनही पुरवठा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान मोदींनी कुवेतच्या क्राऊन प्रिन्सशी चर्चा केली

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी बुधवारी रात्री कुवेतचे क्राउन प्रिन्स शेख सबाह यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आणि अलीकडील घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी कुवेतवरील हल्ल्यांचा तीव्र निषेधही केला.

पंतप्रधान मोदींनी क्राउन प्रिन्सना सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित आणि अखंडित वाहतूक भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधानांनी कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी क्राउन प्रिन्सचे आभारही मानले, कारण तेथे मोठ्या संख्येने भारतीय समुदाय राहतो.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव सी. सेंथिल राजन यांनी एलएनजी (LNG) सेवांशी संबंधित सोशल मीडिया फसवणुकीबाबत लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले- एलएनजी (LNG) ग्राहकांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या बनावट संदेशांपासून सावध राहावे. अशा संदेशांवर विश्वास ठेवू नका आणि गरज पडल्यास पोलिसांत तक्रार करा.

मध्य-पूर्वेतील तणावामुळे देशात एलपीजी (LPG) संकट

अमेरिका-इस्रायलच्या इराणसोबतच्या युद्धामुळे देशभरात एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे. गॅस एजन्सींच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस सिलेंडरची काळाबाजार आणि साठेबाजीही होत आहे.

याच दरम्यान बातम्या आल्या होत्या की, जर ग्राहकांनी ई-केवायसी (e-KYC) केले नाही, तर त्यांचे गॅस कनेक्शन कापले जाईल. ई-केवायसीशी संबंधित या बातम्यांनंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

तथापि, पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले होते की, हा कोणताही नवीन नियम नाही. ई-केवायसीची (eKYC) गरज फक्त त्याच ग्राहकांना आहे, ज्यांची पडताळणी (verification) अद्याप झालेली नाही.

मंत्रालयाने म्हटले होते की, याचा उद्देश फक्त एवढाच आहे की, जास्तीत जास्त गॅस ग्राहकांनी आपली बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी, जेणेकरून सिस्टीममध्ये फसवणूक होऊ नये.
LPG सिलेंडर बुकिंगचे नियम तीन वेळा बदलले

6 मार्च: घरगुती LPG बुकिंगसाठी लॉक-इन कालावधी 21 दिवसांचा करण्यात आला.

9 मार्च: मागणी वाढल्याने शहरांमध्ये लॉक-इन कालावधी वाढवून 25 दिवसांचा केला.

12 मार्च: ग्रामीण भागांमध्ये सिलेंडर बुक करण्यातील अंतर 45 दिवसांचे करण्यात आले.

पुरवठा संकटाचे कारण होर्मुझ सामुद्रधुनी (स्ट्रेट) जवळजवळ बंद होणे

अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर संयुक्त हल्ला केला, ज्यात अनेक लष्करी आणि अणु ठिकाणे लक्ष्य करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यासह अनेक अधिकारी मारले गेले. अमेरिकेने याला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ असे नाव दिले.

या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव निर्माण झाला आणि पुरवठा विस्कळीत झाला. येथून भारताची 80-85% एलपीजी आयात होते. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी आयातदार देश आहे आणि 60% पेक्षा जास्त एलपीजी बाहेरून येते.

यामुळे भारतात एलपीजीच्या तुटवड्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, परंतु भारत सरकारने लोकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. सरकारने सांगितले की, देशात एलपीजी आणि तेलाची कोणतीही कमतरता नाही.

होर्मुझची सामुद्रधुनी सुमारे 167 किमी लांबीचा जलमार्ग आहे, जो पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडतो. इराणमधील युद्धामुळे हा मार्ग आता सुरक्षित राहिलेला नाही. धोका लक्षात घेता, कोणतेही तेल टँकर तेथून जात नाहीत.

जगातील एकूण पेट्रोलियमपैकी 20% हिस्सा येथून जातो. सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतसारखे देशही त्यांच्या निर्यातीसाठी यावर अवलंबून आहेत.

प्रेक्षकांच्या विश्वासाचे संरक्षण करून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टाळण्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांचे आवाहन

मुंबई,

“जाहिरातींनी केवळ प्रसार लक्षात न घेता विश्वास निर्माण केला पाहिजे,” असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव संजय जाजू यांनी केले. मुंबई येथे आज आयोजित ॲडट्रस्ट 2026 शिखर परिषदेत बीजभाषण करताना ते बोलत होते. यावेळी, भारतात जबाबदार, पारदर्शक आणि विश्वासार्ह जाहिरात परिसंस्थेच्या उभारणीची तातडीची गरज केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी अधोरेखित केली. विशेषतः हे क्षेत्र प्रमाण, गुंतागुंत आणि प्रभाव यांच्या बाबतीत वेगाने वाढत असताना हे अधिक आवश्यक आहे. जाहिरात क्षेत्राने वृद्धी करत राहायला हवे, मात्र या क्षेत्रात, खास करून डिजिटल विश्वात, जबाबदारीने वागणे आवश्यक आहे यावर जाजू यांनी अधिक भर दिला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा दृष्टीकोन विश्वासाची उभारणी, विकासाला पाठबळ आणि जबाबदारीची सुनिश्चिती यावर केंद्रीत आहे, असे ते म्हणाले. 

भारतीय जाहिरात मानक परिषदेतर्फे (एएससीआय) आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच ॲडट्रस्ट 2026 शिखर परिषदेसाठी जाहिरात, माध्यमे, तंत्रज्ञान आणि सरकारी क्षेत्रातील प्रतिनिधींना जबाबदार जाहिरात क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमयासाठी एकत्र आले. या परिषदेतील चर्चा नव्याने उदयाला येणाऱ्या पद्धती, कायदेशीर चौकटी तसेच नवीन तंत्रज्ञानांचा जाहिरातींच्या पद्धतींवर होणारा परिणाम यांवर केंद्रीत होत्या.

या शिखर परिषदेत बोलताना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव जाजू यांनी सांगितले की, जाहिरात हे केवळ एक व्यावसायिक कृती नसून ते बाजारपेठांना आकार देणारे, ब्रँड निर्माण करणारे, ग्राहकांना माहिती देणारे, संस्कृतीचे दर्शन घडवणारे आणि आकांक्षांवर प्रभाव टाकणारे क्षेत्र आहे. भारतासारख्या मोठ्या आणि वेगाने डिजिटलीकरण होत असलेल्या देशात, जाहिरात हा नवोन्मेष, आर्थिक कृती, कार्यक्रम निर्मिती आणि समावेशन यांचा महत्त्वाचा चालक बनला आहे. डिजिटल मंच आणि कृत्रिम बुद्धीमत्ता हे घटक आता प्रवेशातील अडथळे कमी करून आणि सहभागाचा विस्तार करून ब्रँड्स, स्टार्टअप्स, स्थानिक व्यवसाय आणि सर्जकांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे शक्य करतात.

त्याचवेळी, जाजू यांनी आर्थिक घोटाळे, दिशाभूल करणाऱ्या गुंतवणूक जाहिराती तसेच फसव्या नोकरीच्या संधी यांच्यासह डिजिटल जाहिरातींशी संबंधित जोखमींच्या संदर्भात सावधानतेचा इशारा देखील दिला. अशा जाहिराती बहुतेकदा असुरक्षित जनतेला लक्ष्य करतात असे ते म्हणाले. व्यावसायिक भाषण हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग असला तरीही दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिरातींचे नियमन करता येते आणि ते केलेच पाहिजे यावर त्यांनी अधिक भर दिला.

जाहिरात क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका, डीपफेक, डार्क पॅटर्न्स तसेच प्रभावक-विरोधी विपणनाकडे वाढता कल यांसारख्या नव्याने उदयाला येत असलेल्या समस्यांबाबत सदर परिषदेत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्या. त्यांनी जाहिरातदारांना जाहिरातींची पोहोच लक्षात घेतानाच त्यांच्या विश्वासार्हतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या, तर सर्जक आणि प्रभावक यांना अस्सलपणा राखून आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टाळून प्रेक्षकांचा विश्वास सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या.

जाजू यांनी त्यानंतर जबाबदारीने जाहिरात करण्यासंबंधीची पाच प्रमुख तत्त्वे पुढे विषद केली, ती पाच तत्वे म्हणजे: i) सर्व संवादांमध्ये सत्याशी तडजोड करता कामा नये, ii) जाहिरात, प्रायोजकत्व आणि प्रचारात्मक संबंध ओळखण्यासाठी पारदर्शकतेची आवश्यकता, iii) सर्व आशयाची रचना आणि वितरण मार्गदर्शक असेल याची जबाबदारी, iv) दुर्बल गटांच्या, विशेषतः मुलांच्या संरक्षणाला प्राधान्य देण्याची आवश्यकता, v) विश्वासार्हतेसह नवोन्मेष करताना तांत्रिक आणि सर्जनशील प्रगतीमुळे विश्वास कमी होण्याऐवजी तो अधिक दृढ होईल याची खबरदारी घेण्याची आवश्यकता.

संजय जाजू यांनी शिखर परिषदेत, एएससीआय च्या सरचिटणीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कपूर, मॅडिसनचे अध्यक्ष सॅम बलसारा, एएससीआयचे अध्यक्ष आणि पिडीलाइट इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सुधांशू वत्स, एएससीआय संचालक मंडळाचे सदस्य प्रवीण त्रिपाठी आणि खैतान अँड कंपनीचे भागीदार इशान जोहरी आणि तनु बॅनर्जी यांच्यासमवेत ‘जाहिरात कायदा संकलन’ (अ‍ॅडव्हर्टाइजमेंट लॉ कम्पेडियम) चे संयुक्तरीत्या प्रकाशन केले. हे संकलन संपूर्ण जाहिरात उद्योगात अधिक जागरूकता, जाणीव आणि अनुपालनाला प्रोत्साहन देईल तसेच जाहिरातविषयक कायदे आणि नियमांच्या बाबतीत व्यावहारिक मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी एएससीआय च्या नेतृत्वासह, विपणनकर्ते, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि कायदेविषयक क्षेत्रातील सदस्यांसह जाहिरात उद्योगातील भागधारकांसोबतही बैठक घेतली.

”राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर केवळ चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित

थिएटरमध्ये गाजणार ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक टीझर; ‘धुरंधर द रिव्हेंज’ सोबत खास सादरीकरण

स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक! ‘धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर *

मुंबई: जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’ चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता प्रेक्षकांसमोर येणार असून, हा खास अनुभव केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा फर्स्ट लूक टीझर ‘धुरंधर-द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबत दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सशुल्क प्रिव्ह्यूद्वारेही प्रेक्षकांना या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची पहिली झलक पाहण्याची संधी मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाची सिनेमॅटिक झलक मोठ्या पडद्यावर नक्की बघा. रितेश विलासराव देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात भारतातील एका महान योद्धाची गाथा , त्याचा स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आता संपूर्ण जग या फर्स्ट लूक टीझर मधून बघेल.

या भव्य ऐतिहासिक कलाकृतीत संगीताची जादू अजय-अतुल यांनी दिली असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांनी आपल्या अप्रतिम छायाचित्रणातून या गाथेला भव्य दृश्यरूप दिले आहे. भाषिक आणि भौगोलिक सीमा ओलांडत भारताचा समृद्ध इतिहास आणि वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या चित्रपटाच्या निर्मात्यांचा उद्देश आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून शौर्य, सन्मान आणि स्वराज्याच्या जन्मास भव्य आदरांजली अर्पण करणारी ही ऐतिहासिक गाथा प्रेक्षकांना एका विलक्षण सिनेमॅटिक प्रवासावर घेऊन जाणार आहे.

भव्यतेचा नवा अध्याय, इतिहासाची थरारक गर्जना भारतासह जगभरात गाजण्यासाठी भव्य पडद्यावर सज्ज झाली आहे…

२० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासून

पुणे : भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अजरामर नाव असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित २० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ येत्या २०, २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे संपन्न होणार आहे.

तारंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात देशभरातील नामवंत तसेच युवा कलाकार आपली कला सादर करणार असून, शास्त्रीय गायन, वादन, नाट्यसंगीत आणि नृत्य यांचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा :
२० मार्च रोजी सायंकाळी  ‘स्वराभिषेक’ या संकल्पनेतून नाट्यभाव भक्ती संगीताची विशेष मैफल सादर होणार आहे. यामध्ये राजयोग धुरी, विश्वजित मैत्रेयी, अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड आदी कलाकार सहभागी होणार आहेत.

२१ मार्च रोजी सकाळी ९ वा. च्या सत्रात शर्वरी दिघेकर-फोकळे यांचे गायन, पार्थ भुमकर व प्रथ्मेश तारळकर यांचे जुगलबंदी सादरीकरण आणि श्रुती ढोकळकर यांचे गायन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता  पं. राम शंकर, डॉ. राजा काळे आणि पद्मविभूषण डॉ. एन. राजम (व्हायोलिन) यांचे सादरीकरण रंगणार आहे.

२२ मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सत्रात निवेद व्यास, अनुपम जोशी (सरगम) आणि जयंत केजकर यांचे गायन होणार आहे. सायंकाळच्या सत्रात नयनिका घोष यांचे कथक नृत्य, पं. सतीश व्यास यांचे संतूर वादन आणि विदुषी डॉ. श्रुती सडोलीकर-काटकर यांचे गायन हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’  मध्ये रसिकांना प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

ओळखा पाहू हे डोळे कुणाचे ?

तुंबाडची मंजुळा चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता !

झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र तुफान चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी होळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं ज्यामध्ये एका दारावर काही जणांचे हात आणि दाराआड दिसणाऱ्या एका आकृतीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आणि आता एका गावातील काही गावकऱ्यांचे डोळे आणि एका व्यक्तीच्या डोक्यावर बसलेला काळया रंगाचा पोपट असं नवीन पोस्टर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यातील डोळे नेमके कुणाचे आहेत? हे कलाकार कोण आहेत? या काळया पोपटाचे रहस्य काय ? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. सोबतीला “गावात सारी चर्चा रे गप्पांना आलाय ऊत! भुतानं झाडाला धरलंय की झाडानं धरलं भूत ” अशा गाण्याच्या ओळी ऐकायला येत आहेत. यामुळे या गावाबद्दलची यातील कलाकाराबद्दलची आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे.


या आगळ्यावेगळ्या पोस्टरबद्दल बोलताना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की,” तुंबाडची मंजुळा हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. अनेक वर्षानंतर पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट असणार आहे. चित्रपटाची कथा, त्याचा विषय अतिशय मनोरंजक असल्यामुळे याबद्दल प्रदर्शित होणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच उत्सुकतापूर्ण तथा वेगळी असावी या विचारानेच या पोस्टरची ही कल्पना आम्हाला सुचली. या पोस्टर मध्ये दिसणारे गाव आणि हे गावकरी सर्वच अतरंगी असून आता टप्प्याटप्प्याने यातील एक एक गोष्ट उघड करू ज्यामुळे सर्वांची उत्कंठा आणखीनच वाढेल हे निश्चित.”

झी स्टुडिओजच्या वतीने उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर विविध कोरगांवकर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. येत्या ५ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

महाडमध्ये शुक्रवारी काँग्रेसचा ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा शुभारंभ कार्यक्रम.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी, उल्का महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम.

मुंबई:
राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उद्या शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी महाड जि. रायगड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महात्मा गांधी यांचे पणतु ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्यासह अनेक मान्यवर नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच काँग्रेस पक्षाने कार्य केले आहे. काँग्रेस पक्षाने सत्तेचा वापर हा नेहमीच महिला, वंचित, शोषित, दलित, आदिवासी, बहुजनांच्या कल्याणासाठी केला आहे. ज्या ऐतिहासिक घटनेने बाबासाहेबांनी क्रांतीचा पाया रचला त्या क्रांतीकारी घटनेची शताब्दी काँग्रेस पक्षातर्फे साजरी करून बाबासाहेबांना व त्यांच्या क्रांतीला अभिवादन केले जाणार आहे. २० मार्च २०२६ ते २० मार्च २०२७ हे वर्ष काँग्रेस पक्षातर्फे “चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष” म्हणून साजरे केले जाणार आहे. सामाजिक न्यायाशिवाय समता प्रस्थापित होणार नाही आणि समतेशिवाय डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत लोकशाही प्रत्यक्षात अवतरणार नाही. हे लक्षात घेऊन “सामाजिक न्यायातून समतेकडे” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून हे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद?: हर्षवर्धन सपकाळ

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा.

रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट, पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा..

मुंबई,
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम बापू आहे. आसाराम बापू, राम रहिम यांनी जे केले तेच या अशोक खरातने केले असून ५८ व्हिडिओ नाही तर सखोल चौकशी केली तर शेकडो व्हिडिओ उघड होतील. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा तर झाली पाहिजे अशी मागणी करून आजपर्यंतचे त्याचे कारनामे पाहता त्याला कोणाचा तरी राजकीय आशिर्वाद असला पाहिजे, त्याच्या मागे ही कोणती राजकीय शक्ती आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेला समजले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे, राज्यात अंधश्रद्धेविरोधातील कायदा असतानाही अशोक खरात सारखा भोंदूबाबा त्याचे गोरखधंदे बिनदिक्कतपणे करतो व त्याची कोणालाच भनक लागत नाही हे विशेष. अशोक खरातच्या ट्रस्टवर असलेले व त्याला पाठबळ देणारे जे लोक आहेत त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. आसाराम बापू सोबत नरेंद्र मोदी अनेकदा दिसले होते तीच विकृती महाराष्ट्रात फोफावली आहे. नाशिकमध्ये जी विकृती दिसली त्याचे नवल वाटत नाही. पुरोगामी राज्यात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून असे विकृत लोक सत्तेच्या भरोशावर आपले धंदे राजरोसपणे करतात. भाजपाची खुशामतगिरी करणारी ही प्रवृती महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. अंधश्रद्धा थांबावी यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आयुष्यभर लढा दिला पण त्यांनाच गोळ्या घालून ठार करण्यात आले असे सपकाळ म्हणाले.

महिला आयोगाने महिला शोषणाच्या विरोधात काम करणे अपेक्षित आहे पण महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केली हे त्यांचे कृत्य खरातसारख्या भोंदूना पाठबळ देणारे आहे. असा प्रकार त्यांच्याकडून पहिल्यांदाच झालेला नाही तर पुण्यातील हगवणे प्रकरण असो वा साताऱ्यातील महिला डॉक्टरचे प्रकरण, चाकणकर आरोपीची पाठराखण करताना दिसल्य़ा आहेत. खरे तर त्यांचे कामकाज पाहता आतापर्यंत त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

रासपचे महादेव जानकरांनी घेतली सपकाळांची भेट..
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात या आधी नांदेड, पुण्यातील कसबा, देगलूर मतदारसंघात पोटनिवडणुका झालेल्या आहेत. नांदेड लोकसभा व देगलूरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेस विरोधात उमेदवार दिले होते त्याठिकाणी काँग्रेस विजयी झाली तर कसबा पोटनिवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे निवडणुका व सहानुभूती हे दोन वेगळे मुद्दे आहेत. अजित पवार यांचे अकाली व अपघाती निधन ही दुःखद घटना आहे. बारामतीचा विचार करता या मतदारसंघात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पवार विरु्दध पवार निवडणुका झाल्या आहेत व राज्यसभेलाही आठवा उमेदवार असता तर पवार विरुद्ध पवार निवडणूक झालीच असती. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागेवर आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकांसदर्भात त्यांच्याशी करू आणि त्यानंतर उमेदवार उभा करायचा की नाही, याचा निर्णय घेऊ असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

होर्मूज मधून भारतीय नौका सोडण्याचे श्रेय इराण कडून भारतीय जनतेस..!

इराण प्रतिनिधी मंडळाचा खुलासा सत्य वास्तवतेवर आधारित …..
⁃ काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे –

देशाचे (भाषणजीवी) पंतप्रधान मोदी हे देशहिताचे निर्णय तत्परतेने घेत नाही, तेंव्हा ‘जनता आणि विपक्ष विदेशनीती हातात घेऊन राष्ट्रहित जपते’ याचा प्रत्यय ईराण’च्या निर्णय प्रक्रियेतून आल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
इराणने भारताचे दोन जहाज होर्मुज मधून सोडताना भारत सरकार’चा स्पष्ट अनुल्लेख करून, संपूर्ण श्रेय स्पष्टरित्या ‘भारतीय जनतेला’ दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारताचा जुना मित्र इराणला जेंव्हा दुष्ट प्रवृत्तीचा इज्राइल धमक्या देत होता, तेंव्हा असंख्य देशांनी अटक वारंट काढलेल्या इज्राइलच्या नेतान्याहूने पंतप्रधान मोदींना तातडीने बोलावून घेतले व एक मेडल (पुरस्कार) *बहाल केला (गळ्यात बांधला) आणि आपल्या कुकर्मांना भारताची अप्रत्यक्ष स्वीकृती मिळवून घेत, दुसऱ्या दिवशी इराणवर इज्राइल आणि अमेरिकेने हल्ला केला, इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनींना मृत्यूस सामोरे जावे लागले, मात्र पारंपरिक मित्र असलेल्या भारत सरकारने, साधा शोक संदेश ही तत्परतेने दिला नसल्याचा तर *अत्यंत विलंबाने दिल्याचा आरोप ही त्यांनी केला.


भारतीय जनता’ मात्र इराणवर झालेल्या या अत्याचारामुळे दुखावली, इराणचे समर्थन आणि शहिद अली खोमेनी यांच्या समर्थनार्थ शोक संदेशांचा देशात पाऊस पडला.
भारत सरकारच्या अश्या वागण्यामुळे दुखावलेला इराण, ‘भारतीय जनतेच्या प्रेमाने’ मात्र निश्चितच सुखावला.
तसेच, इराण’चे पूर्णतः निशस्त्र युद्धक जहाज भारताच्या आमंत्रणावर विशाखापट्टण येथे आले होते, त्याच्या सैनिकांनी विशाखापट्टणमच्या रस्त्यावर भारतीय राष्ट्रपतींना सलामी दिली मात्र परतीच्या प्रवासात (भारताच्या जवळच) अमेरिकेने युद्ध नियम धाब्यावर ठेऊन, या निःशस्त्र जहाजाला बुडवले. जहाजातून आपत्तीचा एसओएस कॉल प्रथम भारताला देण्यात आला होता पण भारत सरकारला बुडणाऱ्या इराणी प्रवाशांना वाचवण्याची कदाचित अमेरिकडून अनुमती मिळाली नसावी म्हणूनच भारत सरकारने वा सैन्याने पावले उचलली नसावीत अशी उपहासात्मक टिका ही काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
त्याचवेळी लहानशा श्रीलंकेने मात्र कसल्याही अनुमतीची पर्वा न करता आपल्या छोट्याश्या कुवतीने जमेल तितक्या इराणी लोकांना वाचवले याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.


भारत सरकारने पुन्हा साधा ‘शोक संदेश’ ही दिला नाही का अमेरिकेच्या दबावाखाली भारत सरकार हे करू शकले नाही.. (?) असा संतप्त सवाल की काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
भारतीय जनता पुन्हा हळहळली, शोक संदेशांचा आणि आपल्याच सरकारच्या निर्भर्त्सनेचा देशात विविध माध्यमांवर पाऊस पडला. देशाच्या विदेशनीतीची व भारताच्या सार्वभौमत्वाची अशी दुर्गती पाहून, विपक्षाने सूत्रे आपल्या हातात घेतली.
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी यावर देशातील प्रमुख माध्यमातून विस्तृत लेख लिहून, ‘सद्य स्थितीतील भारत सरकारची नीती ही भारताची नीती नाही, भारतीय जनतेची ही नीती नाही, हा भारतीय जनमानसाचा दृष्टिकोन नाही, हे साऱ्या जगासमोर विशेषतः इराणसमोर स्पष्ट केले.
त्याचीच् परिणीती म्हणजे इराणने भारताचे दोन जहाज होर्मुजतून सोडले आणि हा ‘मित्रत्वाचा, संवेदनशीलता व आत्मियतेचा* भाव’ भारत सरकार मुळे नसून ‘भारतीय जनतेचा’ आहे हे अगदी इराण’ने स्पष्ट शब्दात सांगितले.
अश्या रितीने भारतातील जनता आणि विरोधी पक्ष’ यांनी विदेश नीतीत कृतीशील पुढाकार घेऊन युद्धजन्य परिस्थितीत ‘भारतास संभाव्य ऊर्जा संकटपासून काही काळ वाचवण्याचा प्रयत्न केला’ याचे श्रेय काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या व लोकसभेच्या माजी विरोधीपक्ष नेत्या श्रीमती सोनियाची गांधी यांना व देशातील संवेदनशील व मानवतावादी ईराणप्रेमी सामाजिक घटकांना जात असल्याचे काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

हिंदू नववर्षानिमित्त समाजात एकोपा, जिव्हाळा आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होण्याचे आवाहन

मुंबई, दि. १९ मार्च २०२६ : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक घरामध्ये गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता भारतातील विविध राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या पावन निमित्ताने सर्वांना वर्षभर यश, समृद्धी, उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि अष्टलक्ष्मीची प्राप्ती होवो, अशा शुभेच्छा डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. तसेच समाजामध्ये एकोपा, जिव्हाळा, आरोग्यदायी व उत्साहवर्धक वातावरण आणि सकारात्मक विचारांची वृद्धी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विविध आव्हानांना सामोरे जात नागरिकांना सुखी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे सकारात्मक परिणाम देशावर दिसून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कार्यरत असून सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्नांवर न्याय देण्यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण विधेयके मंजूर केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना नेत्या तसेच स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा या नात्याने डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे;उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील

पुणे- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक जिल्हा परिषद यांनी जाहीर केले.

जिल्हा परिषदेच्या पाचव्या मजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जिल्हा परिषदेची विशेष सभा आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूकीच्यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भुषण जोशी, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सभापती आदी उपस्थित उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६९ चे कलम ४५ (२) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व निवडणूक) नियम १९६२ प्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे, असे श्री. डुडी म्हणाले.

अध्यक्ष पदाकरिता विरधवल कृष्णराव जगदाळे आणि विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, त्यापैकी विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी माघार घेतली. तसेच उपाध्यक्ष पदाकरिता विवेक प्रतापराव वळसे पाटील आणि मंगेश गुलाबराव काकडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यापैकी मंगेश गुलाबराव काकडे यांनी माघार घेतली. त्यामुळे अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सुरुवातीला श्री. डुडी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता प्राप्त नामनिर्देशन पत्राचे वाचन केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता प्राप्त सर्व नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे जाहीर करुन ते मागे घेण्याकरिता १५ मिनीटांचा कालावधी देण्यात आला.

सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सांस्कृतिक कार्य विभागाचा गौरवशाली उपक्रम : प्रथम क्रमांकाचा चित्ररथ गिरगावात प्रदर्शनासाठी

0

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

मुंबई, दि. १९ मार्च : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर पार पडलेल्या भव्य संचलनात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे गिरगाव, मुंबई येथे नागरिकांसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन सर्वसामान्यांना घडत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती, संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या चित्ररथाने राष्ट्रीय पातळीवर विशेष छाप पाडत देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. विविध सांस्कृतिक घटकांचे सजीव आणि आकर्षक सादरीकरण या चित्ररथातून करण्यात आले असून, राज्याच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडविणारा हा उपक्रम ठरला आहे.

या चित्ररथाच्या साकार प्रक्रियेत विविध कलाकार, तंत्रज्ञ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी योगदान दिले असून त्यांच्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार या माध्यमातून पाहायला मिळतो. प्रजासत्ताक दिन संचलनात मिळालेल्या यशामुळे राज्याच्या सांस्कृतिक ओळखीला राष्ट्रीय स्तरावर नवे अधोरेखन प्राप्त झाले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. मा. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

गिरगाव परिसरातील या प्रदर्शनाला नागरिक, विद्यार्थी, सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई श्री. श्रीराम पांडे यांनी केले आहे.

तुळशीबाग राममंदिरात श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तीस गुढीपाडव्यानिमित्त पवमान अभिषेक

श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सवाला प्रारंभ ; उत्सवाचे २६५ वे वर्ष

पुणे : पेशवेकालीन ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराम मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त श्रीराम जय राम जयजय राम… च्या निनादात श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तीस पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर मूर्तींना पोशाख व दागिने घालण्यात आले. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होतो. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६५ वे वर्ष साजरे होत आहे.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात दि. १९ मार्च ते २ एप्रिल विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. 

उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरूषसूक्त पठण देखील मंदिरात झाले. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी सकाळपासून मंदिरात गर्दी केली होती. त्यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक आरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.

डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले म्हणाले, उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, रामायण प्रवचन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच रविवार, दि. २२ मार्च रोजी आनंद भाटे यांचे सुश्राव्य गायन, मंगळवार, दि. २४ मार्च रोजी अविष्कार क्रिएशन भाग्यश्री कुलकर्णी प्रस्तुत रामगान हे कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे

टिळेकर यांच्या भावाच्या भूमी ग्रीन एनर्जी कंपनीला काम मिळावे, यासाठी आयुक्तांवर दबाव: काँग्रेसचा आरोप

पुणे, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली आयुक्त नवल किशोर राम हे आमदार योगेश टिळेकर यांना मदत करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि महापालिकेतील गटनेते चंद्रकांत कदम यांनी बुधवारी केला.

स्थायीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या एका कंपनीचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला. त्यास समितीच्या सदस्यांनी विरोध केला. त्यावरून कॉंग्रेसने आज पत्रकार परिषदत घेत हे आरोप केले. मुख्यमंत्री हे टिळेकर यांच्या भावाच्या भूमी ग्रीन एनर्जी कंपनीला काम मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. आयुक्त देखील चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव आणत आहेत. कचरा आणि प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता यांची. तपासणी करावी, शहरातील सर्व प्रकल्पांचे ऑडिट करावे, अशी मागणी शिंदे आणि कदम यांनी केली.