Home Blog Page 62

अग्निवीर सैन्य भरती (पुरुष) – २०२७ साठी ऑनलाइन नोंदणी सुरू

पुणे, दि. 20 : अग्निपथ योजनेअंतर्गत वर्ष २०२७ साठी अग्निवीर भरती प्रक्रियेकरिता अविवाहित पुरुष उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीची मुदत १ एप्रिल २०२६ अशी असून सामाईक प्रवेश परीक्षा जून २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.
पुणे भरती कार्यालय (मुख्यालय) कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांनी ०१ एप्रिल २०२६ पूर्वी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

अशोक खरातची सुमारे २०० कोटींची संपत्ती

नाशिक-येथील बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या संपत्तीची चौकशी सुरू असून, तपासात त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. घर व फार्महाऊस झडतीत पिस्तूल, काडतुसे आणि रोकड सापडली. नाशिक, सिन्नर व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी, फार्महाऊस व मालमत्ता आढळली. अंकशास्त्राच्या माध्यमातून प्रभाव निर्माण करत सुमारे २०० कोटींची संपत्ती जमवल्याचा अंदाज आहे. SIT तपास सुरू आहे.
भोंदुबाबा अशोक खरातच्या आतापर्यंत बाहेर आलेल्या संपत्तीचा तपशील

🔸 अंदाजे 150 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली नाशिकमधील पाथर्डी येथे 30 एकर जमीन

🔸2 कोटींवर किंमत असलेली सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी मीरगाव येथे 45 एकर जमीन

🔸30 कोटींहून अधिक बाजारभाव असलेले खरेदीखत, पत्नी आणि दोन मुलींच्या नावे पाथर्डी, गौळाणे शिवारात स्वतंत्र जमिनीचे खरेदीखत

🔸10 कोटींवर किंमत असलेलं सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथे मंदिराच्या मागे भव्य फार्महाऊस

🔸 अंदाजे 2 कोटी रुपये इशान्येश्वर मंदिर ट्रस्टची वर्षाला उलाढाल

🔸अंदाजे 5 कोटीच्या ओझर विमानतळाजवळ, जानोरी, दहावा मैल भागात जमिनी

🔸 अंदाजे 5 कोटीचा कर्मयोगीनगरचा बंगला, तर कॅनडा कॉर्नरचे ऑफिस 1 कोटीचे

🔸याव्यतिरिक्त शिर्डी येथे अतिशय मोक्याच्या ठिकाणी शेतजमीन आहे. या जमिनीची किंमतही करोडोंमध्ये आहे.

देवकर, भोसेकर, कुमार, गगन मलिक यांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’

0

पुणे : अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पाली भाषेत उल्लेखनीय व अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. महेश देवकर, अतुल भोसेकर, प्रा.बिमलेंद्र कुमार तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म प्रसारक गगन मलिक यांचा समावेश आहे.

रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले सभागृहात होणाऱ्या दुसऱ्या अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक राहुल डंबाळे व स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली.

पाली भाषेच्या संवर्धन व प्रसारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात आला असून, यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. पाली भाषेत अद्वितीय योगदान देणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना हा सन्मान प्रदान केला जात आहे.

या पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह, गौरवपत्र आणि रोख रक्कम असा समावेश असून, संमेलनाच्या माध्यमातून पाली भाषेच्या अभ्यासकांना आणि संशोधकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात येत आहे.

बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने 2 कोटींची फसवणूक

पुणे-पुण्यात बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका पेट्रोल पंप व्यावसायिकाची २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे हडपसर भागातील रहिवासी असून त्यांचे वस्त्रदालन आहे. आरोपी आणि फिर्यादी व्यावसायिक एकमेकांच्या ओळखीचे होते.

आरोपींनी फिर्यादीला बाटलीबंद शुद्ध पाणी विक्री व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवले. यानुसार, १७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्यात भागीदारी करार झाला. या व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली फिर्यादीकडून १ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपये घेण्यात आले.

जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बाटलीबंद पाणी विक्री व्यवसायातून मिळालेले ५५ लाख ४८ हजार रुपये आरोपींनी स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पेट्रोल पंप व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक बाबर पुढील तपास करत आहेत.

लंडनमध्ये 2 भारतीय रस्त्यावर पान खाऊन थुंकले:दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला

लंडनच्या ब्रेंट परिसरात सार्वजनिक ठिकाणी पान थुंकल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या दोन व्यक्तींना 1,391 पाउंड (सुमारे 1.45 लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही व्यक्तींना पहिल्यांदाच 100 पाउंड दंड भरण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी तो भरला नाही. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि दंड अनेक पटींनी वाढला.

ब्रेंट सिटी कौन्सिलने पान थुंकण्याविरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की यामुळे सार्वजनिक जागा अस्वच्छ होतात आणि स्वच्छतेवर खूप खर्च वाढतो. रिपोर्टनुसार, कौन्सिलला दरवर्षी सुमारे 30,000 पाउंड (जवळपास 30 लाख रुपये) फक्त पानाचे डाग साफ करण्यासाठी खर्च करावे लागतात.

पहिले प्रकरण एडग्वेअर परिसरात राहणाऱ्या अक्षीतकुमार भद्रे पटेल यांचे आहे. त्यांनी जून 2025 मध्ये किंग्सबरी रोडवरील एका मेट्रो स्टेशनजवळ पान थुंकले होते. ते कोर्टात हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरुद्ध निकाल सुनावण्यात आला. वेळेवर दंड न भरल्यामुळे त्यांची रक्कम 10 पटींहून अधिक वाढली.

दुसरे प्रकरण रुईस्लिप परिसरात राहणाऱ्या हितेश पटेल यांचे आहे. त्यांनी वेम्बली हिल रोडवर पान थुंकले होते. तेही न्यायालयात हजर झाले नाहीत आणि त्यांच्याविरुद्धही गैरहजेरीतच निकाल लागला, त्यामुळे त्यांनाही मोठा दंड ठोठावण्यात आला.

वायव्य लंडनच्या ब्रेंट आणि आसपासच्या परिसरात पान थुंकण्याची समस्या वाढत आहे, ज्यावर स्थानिक प्रशासन कठोर झाले आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, पानाचे डाग काढणे कठीण आणि महागडे असते, यासाठी खास पद्धतीने स्वच्छता करावी लागते.

कौन्सिलने ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहनशीलता) धोरण अवलंबले आहे. या अंतर्गत जागोजागी इशारा देणारे फलक लावले जात आहेत, अधिकारी गस्त घालत आहेत आणि जागेवरच 100 पाउंडपर्यंतचा दंड आकारला जात आहे.

लैंगिक शोषण आरोपी अशोक खरातचे ५८ नव्हे १०० व्हिडिओ सापडले, SIT च्या तपासात धक्कादायक माहिती

नाशिकच्या बड्या पत्रकारांना कसा लागला नाही थांगपत्ता ? हाही सवाल झाला उपस्थित

नाशिक-येथील लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी अशोक खरातवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आता आणखी व्हिडिओ समोर आले आहेत. लैंगिक शोषणाचे ५८ नाहीतर १०० व्हिडिओ असल्याची धक्कादायक बाबत समोर आली आहे.नाशिकमध्ये सुरु असलेल्या एसआयटीच्या बैठकीतील पोलिस सूत्रांची माहिती आहे. आयपीएस तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थितीत ही बैठक सुरु आहे. यामध्ये आरोपी कॅप्टन अशो खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप आहे. खरातच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहेत. शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधवने हे व्हिडीओ काढल्याचा संशय आहे. SIT च्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील १२ वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे.कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरु आहे. व्हिडीओतून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आले आहे.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाचा पीएमआरडीए महानगर आयुक्तांकडून ‘ऑन ग्राउंड’ आढावा!

मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट!

पुणे : पुणेकर आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘मेट्रो लाईन ३’ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्याचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीए प्रशासनाने निश्चित केले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (दि. १९) प्रत्यक्ष ‘ऑन ग्राउंड’ जात पाहणी केली, व या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, या प्रकल्पाचे काम आता ‘मिशन मोड’वर सुरू झाले आहे. पीएमआरडीएच्या औंध येथील कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीनंतर, गुरुवारी सकाळी महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह माण ते शिवाजीनगर या मार्गावरील २३ स्थानकांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि ‘पीआयटीसीएमआरएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी उपस्थित होते. “कामाचा वेग वाढवताना सुरक्षितता आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका,” अशा कडक सूचना महानगर आयुक्तांनी कंत्राटदार कंपन्यांना दिल्या आहेत. त्यांनी २३.२ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गिकेची पाहणी केली. केवळ कागदोपत्री अहवालावर अवलंबून न राहता, त्यांनी प्रत्यक्ष कामाचा दर्जा, तांत्रिक अडचणी आणि स्थानकांची सद्यस्थिती जाणून घेतली. पहिल्या टप्प्यात १२ स्थानके कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यादृष्टीने कामाला गती देण्याचे निर्देशही महानगर आयुक्तांनी दिले आहेत.

हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे आयटी कर्मचाऱ्यांना होणारा मनस्ताप कमी करण्यासाठी ही मेट्रो धावणे आवश्यक आहे. मेट्रोमुळे खासगी वाहनांवरील ताण कमी होऊन शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करणे शक्य होईल. सध्या प्रकल्पाचे ९४.२० टक्के काम पूर्ण झाले असून, सिग्नलिंगची तांत्रिक चाचणी सुरू आहे. तसेच आरडीएसओ (RDSO) आणि सीएमआरएस (CMRS) तपासणीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

“मे २०२६ पर्यंत १२ स्थानकांचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने सर्व स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी ‘पीएमआरडीए’कडून सर्व आवश्यक सहकार्य तत्परतेने दिले जाईल.”

— डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
१. स्वरूप: सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावरील देशातील पहिली मेट्रो.
२. मार्गिका: हिंजवडी ते शिवाजीनगर (२३.२ किमी, उन्नत मार्ग).
३. भागीदार: टाटा समूहाची ‘टीआरआयएल’ (TRIL) आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स.
४. एकूण खर्च: ८,३१३ कोटी रुपये.

शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत सिंग

पिंपरी येथे “शहीद भगत सिंग आणि आर्य समाज” विषयावर व्याख्यान

पुणे शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. आत्ताचे स्वातंत्र्य हे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भ्रष्टाचार मान्य नव्हता. आता होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथीत झाले असते. शहीद भगत सिंग यांच्या तीन पिढ्यांना बलिदानाचा इतिहास आहे. २७ सप्टेंबर १९०७ साली भगत सिंग यांचा जन्म झाला. बालपणी त्यांच्यावर गुरुगोविंद सिंग, आर्य समाज संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांचा प्रभाव होता. आत्ताच्या पिढीने अशा महान क्रांतिकारकांचे चरित्र अभ्यासावे आणि महर्षी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आर्य समाजाचे विचार पुढे न्यावे असे आवाहन भगत सिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांनी पिंपरी येथे केले.
शुक्रवारी (दि.२० मार्च) पुणे, पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन येथे “शहीद भगत सिंग आणि आर्य समाज” या विषयावर सिंग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पिंपरी आर्य समाज अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, मंत्री हरेश तिलोकचंदानी, सचिव संजय वासवानी, समन्वयक उत्तम दंडीमे, डॉ. नयनकुमार आचार्य, नलिनी देशपांडे, राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, अतुल आचार्य, सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
शहीद भगत सिंग १२ वर्षाचे असताना ब्रिटिश सरकारने १३ एप्रिल १९१९ रोजी मार्शल लॉ लागू केला. त्यावेळी जालियनवाला बाग येथे जनरल डायर याने हजारो निरपराध नागरिकांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर भगत सिंग हे लाहोर येथून जालियनवाला बाग येथे आले आणि तेथील माती स्वतःच्या घरी घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली. कानपूर येथे एका वृत्तपत्रात काम करीत असताना चंद्रशेखर आझाद आणि इतर क्रांतीकारकांशी त्यांचा संपर्क झाला. ब्रिटिशांनी नेमलेल्या सायमन कमिशनमध्ये एकही हिंदू प्रतिनिधी नाही. याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये लाला लजपतराय सारख्या ज्येष्ठ क्रांतीकारकांचा बळी गेला. या घटनेमुळे भगतसिंग खूप व्यथीत झाले.
बलिदानाशिवाय संघर्ष पूर्ण होणार नाही. एका भगत सिंगाला फाशी दिली, तरी लाखो भगत सिंग जन्म घेतील आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देतील यावर त्यांचा विश्वास होता. भगत सिंग, सुखदेव, राजगुरू या क्रांतिकारकांना २४ मार्च १९३१ रोजी फाशी देण्याचे आणि त्यांच्या बरोबरच्या इतर १५ क्रांतीकारकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे देशभर तीव्र आंदोलन सुरू झाले. यानंतर ब्रिटिश सरकारने घाबरून भगत सिंग यांना एक दिवस अगोदरच फाशी दिली. फाशी देण्यापूर्वी भगत सिंग यांच्या आईला त्यांची भेट घेऊ दिली नाही आणि इतर कुटुंबीयांना अनेक अटी घातल्या. त्यावेळी पुण्यातून शहीद क्रांतीकारक राजगुरू यांच्या मातोश्री पार्वतीबाई लाहोर तुरुंगात या क्रांतीकारकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. परंतु भगत सिंग यांच्या आईला भेटू दिले नाही याच्या निषेधार्थ राजगुरू यांच्या आई देखील राजगुरू यांना भेटल्या नाही. देश प्रेमासाठी आणि एका मातेचा सन्मान राखण्यासाठी पार्वतीबाई या मातेने राजगुरू या स्वतःच्या मुलाची अंतिम भेट घेतली नाही. पार्वतीबाई या राष्ट्रप्रेमी मातेला नमन करण्यासाठी आणि त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी पुणे मुक्कामी आलो आहे असे भावूक उद्गार किरणजीत सिंग यांनी काढले.
प्रास्ताविक, स्वागत सुरेंद्र करमचंदानी, सूत्रसंचालन उत्तम दंडीमे आणि आभार अतुल आचार्य यांनी मानले.

प्रीमियम पेट्रोल ₹2.35 प्रति लिटरपर्यंत महागले: सामान्य पेट्रोल जुन्या दरानेच मिळत राहील

नवी दिल्ली- सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) स्पीड आणि पॉवरसारख्या प्रीमियम पेट्रोलच्या किमती शुक्रवारी ₹2.09-₹2.35 प्रति लिटरपर्यंत वाढवल्या आहेत. अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ही वाढ करण्यात आली आहे.ही वाढ वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये वेगवेगळी असू शकते. प्रीमियम पेट्रोलच्या वाढलेल्या किमती तात्काळ प्रभावाने लागू झाल्याचे मानले जात आहे.

प्रीमियम पेट्रोल BPCL चे स्पीड, HPCL चे पॉवर आणि IOCL चे XP95 या नावाने विकले जाते. तर सामान्य पेट्रोल जुन्या दरानेच मिळत राहील. सध्या त्यांच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

प्रीमियम पेट्रोलच्या किमती वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि प्रीमियम इंधनात मिसळल्या जाणाऱ्या ॲडिटीव्ह्जची वाढलेली किंमत हे मानले जात आहे. सामान्य पेट्रोलच्या तुलनेत ते आधीच 5 ते 10 रुपये महाग असते. आता या वाढीनंतर हा फरक आणखी वाढेल.

सामान्य जनतेसाठी दिलासादायक बाब ही आहे की, बेस इंधन म्हणजेच सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींना हात लावण्यात आलेला नाही. तेल कंपन्यांनी शेवटची मार्च 2024 मध्ये सामान्य पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 2 रुपयांची कपात केली होती. प्रीमियम इंधनाची विक्री एकूण पेट्रोल विक्रीचा एक छोटा भाग असते, त्यामुळे या वाढीचा परिणाम अशा लोकांवर जास्त होईल ज्यांच्याकडे लक्झरी कार किंवा हाय-परफॉर्मन्स स्पोर्ट्स बाईक्स आहेत.

प्रीमियम पेट्रोलचा ऑक्टेन नंबर 95 किंवा त्याहून अधिक असतो. हाय-एंड इंजिन असलेल्या गाड्या याच इंधनावर उत्तम परफॉर्मन्स देतात. किमतीत 2 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाल्याने अशा ग्राहकांचे मासिक इंधन बजेट वाढेल जे आपल्या गाड्यांच्या इंजिनच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या पिकअपसाठी प्रीमियम इंधनच वापरतात. दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रीमियम पेट्रोलचे दर आता विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचू शकतात.

बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या काही काळापासून मार्केटिंग मार्जिनमध्ये घट झाल्यामुळे तेल कंपन्या दबावाखाली होत्या. प्रीमियम इंधनाच्या किमती डी-रेगुलेटेड (बाजार आधारित) श्रेणीत येत असल्याने, कंपन्या त्यांच्या किमती बदलण्यासाठी स्वतंत्र आहेत. प्रीमियम इंधन सेगमेंटमध्ये मार्जिन चांगले असते, त्यामुळे कंपन्यांनी तोटा भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आणि मध्य-पूर्वेतील तणावावर सर्वांचे लक्ष असेल. जर कच्च्या तेलाच्या किमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या वर राहिल्या, तर येत्या काळात सामान्य पेट्रोल-डिझेलच्या किमतीही वाढवल्या जाऊ शकतात.

युद्धाच्या कारणामुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती वाढल्यामुळे कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलचे दर वाढवले आहेत. ब्रेंट क्रूड तेलाचे दर आज प्रति बॅरल 109.54 डॉलर आहेत. एक दिवसापूर्वी कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 117.98 डॉलरवर पोहोचला होता.

तर, भारतात क्रूड तेलाच्या किमती जवळपास दुप्पट होऊन 146 डॉलरवर पोहोचल्या आहेत. भारत इराक, सौदी अरेबिया, रशिया, यूएईकडून तेल खरेदी करतो. या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांच्या किमतींची जी सरासरी काढली जाते, त्यालाच ‘इंडियन बास्केट’ म्हणतात.

जगभरात कच्च्या तेलाची ओळख आणि विक्री प्रामुख्याने तीन मोठ्या बेंचमार्कच्या आधारावर केली जाते, ज्यांना ब्रेंट, WTI आणि OPEC बास्केट म्हणतात. ब्रेंट क्रूड उत्तर समुद्रातील (युरोप) सागरी विहिरींमधून काढले जाते आणि जगातील दोन-तृतीयांश तेल व्यापार याच दरावर अवलंबून आहे.

तर WTI अमेरिकेच्या भूभागातून काढले जाते आणि त्याच्या शुद्धतेमुळे अमेरिकन बाजाराचे मुख्य मानक आहे. OPEC बास्केट हे सौदी अरेबिया, इराण आणि इराकसारख्या आखाती देशांच्या संघटनेने (OPEC) उत्पादित केलेल्या वेगवेगळ्या कच्च्या तेलांचे सरासरी मिश्रण आहे.

सामान्य कार/बाईक: जर तुमची गाडी 100cc ते 1500cc च्या दरम्यान असेल आणि सामान्य इंजिन असलेली असेल, तर प्रीमियम पेट्रोलची गरज नाही.

लक्झरी/स्पोर्ट्स कार: जर गाडीच्या मॅन्युअलमध्ये 95 ऑक्टेन इंधन असे लिहिले असेल, तर प्रीमियमच टाका, अन्यथा इंजिनमध्ये ‘नॉकिंग’ची समस्या येऊ शकते.

जुनी गाडी: जुन्या गाड्यांच्या इंजिनच्या स्वच्छतेसाठी कधीकधी प्रीमियम इंधन वापरणे फायदेशीर ठरू शकते.

पेट्रोलची गुणवत्ता ‘ऑक्टेन’ने मोजली जाते. सामान्य पेट्रोल 91 ऑक्टेनचे असते. प्रीमियम पेट्रोल 95 किंवा 97 ऑक्टेनचे असते. उच्च ऑक्टेन इंधन इंजिनमधील नॉकिंगला प्रतिबंध करते, त्यामुळे इंजिन सुरळीत चालते.

लोकांमध्ये वाद निर्माण करणा-या रा. स्व. संघाच्या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच गाडून टाका: तुषार गांधी.

महाडमध्ये ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा थाटात शुभारंभ, शंभराव्या वर्ष पूर्तीचा कार्यक्रमही धडाक्यात करणार..

मुंबई/महाड, दि. २० मार्च २०२६ :

मनुवादी व्यवस्थेने जसे अनेक घटकांवर नियंत्रण ठेवले होते तसेच पाण्यावरही नियंत्रण ठेवून समाजातील एका घटकाला पाण्यापासून वंचित ठेवले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीने जातीयवादी, स्पृश्य अस्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश दिला. महाडच्या चवदार तळ्यातील पाणी हे ‘समतेचे अमृत’ असून या चवदार तळ्याचे पाणी घेऊन गावा-गावतील तलाव, नदी , धरणात सोडून ‘समतेचा संदेश’ सर्वदूर पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

महाडमध्ये ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा शुभारंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महात्मा गांधी यांचे पणतु, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उल्का महाजन, गांधीवादी नेते जयंत दिवाण, काँग्रेसच्या एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाह आलम शेख, ॲड. श्रद्धा ठाकूर, अमर खानापुरे, फिशरमन काँग्रेसचे मार्तंड नाखवा, प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, पनवेल युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येना उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सभागृहापासून चवदार तळ्यापर्यंत पदयात्रा करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व चवदार तळ्यातील पाणी कलशात भरून काँग्रेस पदाधिका-यांना दिले. हे पाणी सर्व जिल्ह्यांमध्ये गावागावात जाऊन नदी, तलाव व धरणातही सोडले जाणार आहे.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे यासाठी महाडचा सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अप्रिय घटनांचा सामना करावा लागला पण त्यांनी कशाचीही पर्वा न करता हा सत्याग्रह केला. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशावेळीही बाबासाहेब यांना अशाच अप्रिय घटनांचा सामना करावा लागला होता. महाडच्या चवदार तळ्याच्या क्रांतीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी यांचा विचार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर मनुवादी प्रवृत्तींनी या चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले होते, त्याच विचाराचा वारसा महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, आजही या मनुवादी विचाराचा सामना आपल्याला करावा लागत आहे, आजही हा विचार अनेक व्यवस्थेपासून बहुजन समाजाला वंचित ठेवत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यावेळी म्हणाले की, चवदार तळ्याची क्रांती ही लोकशाही व संविधानासाठी अत्यंत महत्वाची घटना आहे. अहिंसेच्या मार्गाने ही ऐतिहासिक क्रांती घडवून आणली. महाड मधील चवदार तळ्याची क्रांती ही स्वातंत्र्य व समतेसाठी होती. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये पाण्यासाठी सत्याग्रह केला तर त्यानंतर तीन वर्षांनी महात्मा गांधी यांनी मीठासाठी सत्याग्रह केला, या दोन घटनांमध्ये खूप महत्वाचा अर्थ आहे. आजही समाजात समता दिसत नाही. एखादा कार्यक्रम करून हा प्रश्न सुटणार नाही तर गावोगावी हा समतेचा संदेश पोहचला पाहिजे. आजचे सरकार हे काम करणार नाही. महाडच्या घटनेलाही रा. स्व. संघाचे स्वरूप देण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे. समतेची ही लढाई सर्वांनी मिळून लढली पाहिजे. काँग्रेस एक विचार आहे तसाच रा. स्व संघाचा विचार आहे. संघाचा विषारी विचार संपवला पाहिजे. लोकांमध्ये वाद निर्माण करूनच त्यांचा विचार जिवंत राहू शकतो पण लोकांमध्ये वाद निर्माण करणा-या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच मध्ये गाडून टाका. असे आवाहन तुषार गांधी यांनी केले.

कोणताही पक्ष कार्यकर्त्यांमुळे असतो, काँग्रेसचा कार्यकर्ता समाजसेवक, सत्याग्रही, व काँग्रेसच्या विचाराचा असतो, आज मात्र यातील पहिले दोन गुण लुप्त पावले आहेत. दुस-या पक्षातील कार्यकर्ते आदेशावर काम करतात पण काँग्रेसचा कार्यकर्ता आदर्शावर काम करतो, असेही तुषार गांधी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज व डॅा.आंबेडकरांना जातीच्या चौकटीत बंद करू नका…
सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यावेळी म्हणाल्या की, 20 मार्च 1927 च्या आधी 19 मार्चला महाडच्या गाडीतळावर एक परिषद घेतली होती, त्यात अनेक प्रस्ताव पारित करण्यात आले, त्यावेळी सर्व जातीचे लोक सहभागी झाले होते आता मात्र चवदार तळे सत्याग्रह कार्यक्रम हा केवळ एकच समाज साजरा करतो, हे दुर्दैवी आहे. रायगड जिल्ह्य़ातच महाराष्ट्राचे दोन मानबिंदू आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. ‘शिवराय ते भिमराय’ असा उपक्रम आम्ही मागील 9 वर्षापासून करत आहोत, हा संगर सर्व जाती व धर्मांनी मिळून केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मध्ये ज्या ऐतिहासिक गाडी तळावर परिषद घेतली त्या जागेचे संवर्धन झाले पाहिजे. संविधानाबद्दल भाजपा अपप्रचार केला जातो तो खोडून काढला पाहिजे. संत विचाराचा धागा पुढे आणला पाहिजे. संविधानाची बिजे याच मातीत रुजलेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज एकाच जातीचे नाहीत ते सर्व समाजाचे आहेत, त्यांना जातीच्या चौकटीत बंद करण्याचे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन उल्का महाजन यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांनी केले. चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष राज्यभर साजरे केले जाणार आहे, अशी माहिती हत्तीअंबिरे यांनी दिली व शंभराव्या वर्षी भव्य प्रमाणात हा कार्यक्रम साजरा करू असेही त्यांनी सांगितले.

राजस्थानातील नागौर येथे नवीन हरितक्षेत्र एकात्मिक सिमेंट प्रकल्पात उत्पादनाला सुरुवात

उत्तर भारतात प्रवेश करत JSW सिमेंट विस्तारत आहे आपला ठसा

एकूण जोडणी ग्राइंडिंग क्षमता 24.1 MTPA पर्यंत वाढवली

मुंबई/नागौर (राजस्थान): भारतातील आघाडीच्या हरित सिमेंट उत्पादकांपैकी एक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत JSW समूहाचा एक भाग असलेल्या JSW सिमेंटने आज त्यांच्या राष्ट्रीय विस्ताराच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून राजस्थानातील नागौर जिल्ह्यात अत्याधुनिक, हरितक्षेत्र, एकात्मिक सिमेंट उत्पादन प्रकल्पात उत्पादनास प्रारंभ केला आहे. उत्तर भारतातील त्यांचा हा पहिलाच असा प्रकल्प आहे.

उत्तर भारतात या प्रवेशासह कंपनीची एकूण सिमेंट ग्राइंडिंग क्षमता 24.1 MTPA झाली आहे आणि एकूण क्लिंकर उत्पादन क्षमता (कंपनीच्या JSW सिमेंट FZC या संयुक्त उपक्रमासहित क्लिंकर क्षमता) 9.74 MTPA झाली आहे.

नागौर येथील एकात्मिक प्रकल्प 3.30 MTPA क्षमतेचे क्लिंकरायझेशन युनिट आणि 2.50 MTPA क्षमतेच्या सिमेंट ग्राइंडिंग युनिटने सुसज्ज आहे. याशिवाय, या ठिकाणी अतिरिक्त 1.00 MTPA सिमेंट ग्राइंडिंग युनिटचे बांधकाम सुरू आहे. महत्त्वाच्या ठिकाणी वसलेल्या या प्रकल्पामुळे राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि नॅशनल कॅपिटल रिजन (NCR) या उच्च-वाढीच्या बाजारपेठांना सेवा पुरवता येईल.

नागौर युनिटसाठी इक्विटी आणि दीर्घकालीन डेब्ट यांच्या धोरणात्मक मिश्रणातून निधी उभारण्यात आला आहे. कंपनीने आपल्या प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) मधून मिळालेल्या फ्रेश इश्यूच्या निधीतून 800 कोटी रु. या प्रकल्पाच्या अंशतः वित्तपुरवठ्यासाठी विशेषतः राखून ठेवले होते.

याबद्दलची घोषणा करताना JSW सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल म्हणाले: “राजस्थानातील नागौर येथील प्रकल्पात उत्पादनास सुरुवात होणे हा JSW सिमेंटसाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनीला अखिल भारतीय स्तरावरील प्रमुख कंपनी बनविण्याच्या मार्गावर दृढपणे उभे करणे हे आमचे उद्दिष्ट आम्ही आमच्या आयपीओ प्रक्रियेच्या वेळी स्पष्ट केले होते. या प्रकल्पाच्या कार्यान्वयनामुळे कंपनीने जलदगतीने वाढणाऱ्या उत्तर भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. आम्ही या प्रदेशाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यास आणि राजस्थान, हरियाणा, पंजाब तसेच एनसीआर क्षेत्राच्या आर्थिक विकासात योगदान देण्यास उत्सुक आहोत. मला अत्यंत आनंद आहे की कंपनीने केवळ 21 महिन्यांत हा ग्रीनफिल्ड एकात्मिक प्रकल्प कार्यान्वित करून आपल्या प्रकल्प अंमलबजावणी क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. या कामाची सुरुवात करून कंपनी आर्थिक वर्ष 29 पूर्वी किंवा तोपर्यंत 41.85MTPA क्षमता साध्य करण्याच्या मार्गावर ठामपणे वाटचाल करत आहे.”

JSW सिमेंटचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश नार्वेकर यांनी पुढे सांगितले: “वेगाने वाढणाऱ्या उत्तर भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणे ही आमच्यासाठी एक धोरणात्मक प्राधान्याची गोष्ट आहे. या राज्यांमध्ये उच्च वाढ दर आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकास होत आहे. नागौर प्रकल्पाद्वारे, आम्ही आमच्या ग्राहकांना उच्च-गुणवत्तेचे, पर्यावरणपूरक सिमेंट आणि जागतिक दर्जाचा सेवा अनुभव पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच जगातील सर्वात शाश्वत सिमेंट उत्पादकांपैकी एक म्हणून आपले स्थान आम्ही कायम राखत आहोत. या विस्तारासह, कंपनी भारतातील 41.85 MTPA मिड टर्म क्षमता लक्ष्याच्या जवळ पोहोचत आहे आणि 60 MTPA क्षमतेच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाकडेही वाटचाल करत आहे.”

हा प्रकल्प शाश्वत उत्पादनाचे आदर्श उदाहरण म्हणून डिझाइन करण्यात आला आहे. या सुविधा केंद्रामध्ये किल्नमध्ये पर्यायी इंधनांच्या सह-प्रक्रियेसाठी तरतूद आहे तसेच खाणीतून चुनखडी वाहून नेण्यासाठी 7 किमी लांबीचा ओव्हरलँड बेल्ट कन्व्हेयर आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीमुळे होणारा पर्यावरणीय परिणाम कमी होतो. या जागतिक दर्जाच्या प्रकल्पात लवकरच 16 MW क्षमतेचा वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम (WHRS) देखील समाविष्ट होणार आहे. त्यायोगे उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारी उष्णता पुनर्प्राप्त करून पुन्हा वापरली जाईल आणि त्यामुळे कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी होईल.

अशोक खरात याच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर फरार:रुपाली पाटील-ठोंबरेंच्या आक्रमक पोस्टने खळबळ

पुणे -अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच आता या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप खरातवर आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असताना, त्याच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडिओ आणि विविध कार्यक्रमांतील छायाचित्रे समोर आल्यानंतर चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर फरार… बजाव ताली…, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली असून, त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नसून महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशोक खरातशी संबंधित ट्रस्टमध्ये चाकणकर यांची भूमिका असल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, त्यामुळेच पोलिसांनी कारवाई उशिरा केली का? तसेच, जप्त करण्यात आलेल्या 58 व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर किती महिलांवर अत्याचार झाले असतील, याबाबतही त्यांनी गंभीर शंका व्यक्त केली.

पाटील-ठोंबरे यांनी पुढे सांगितले की, चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा निष्पक्ष तपास होऊ शकणार नाही. त्या पदावर राहिल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय, हा मुद्दा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर राजीनामा दिला नाही, तर राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा,काळी जादू ? अशोक खरातवर संशय:,देवगिरी बंगल्याबाहेर सापडल्या संशयास्पद वस्तू

मुंबई-तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्यानंतर या प्रकरणात नवनवीन दावे समोर येत आहेत. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, त्याच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली असून या प्रकरणाला आणखी एक नवा आयाम मिळाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर मागणी करत, खरातचा संबंध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी आहे का, याचा तपास व्हावा असे म्हटले आहे. त्याचवेळी शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने यांनी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर तसेच बारामतीतील निवासस्थानाबाहेर जादूटोण्याशी संबंधित वस्तू सापडल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर या कृत्यामागे अशोक खरात किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तींचा हात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या दाव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर आढळलेल्या वस्तूंचा आणि खरातचा काही संबंध आहे का? त्याने कोणत्याही प्रकारची काळी जादू केली होती का? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या सर्व दाव्यांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसून, याबाबत सखोल तपासाची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, 18 मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त आहे. अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या या व्यक्तीकडे अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी मार्गदर्शनासाठी जात असल्याचेही सांगितले जाते. मात्र, त्याच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे आणि नव्याने समोर आलेल्या दाव्यांमुळे राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

अमिर चंद जगदीश कुमार (एक्सपोर्ट्स) लिमिटेड तर्फे 4,400 दशलक्ष रु. ची प्राथमिक समभाग विक्री 24 मार्च रोजी खुली होणार

10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअर साठी (“इक्विटी शेअर”) किंमतपट्टा 201 रु. ते 212 रु. निश्चित

  बोली मंगळवार 24 मार्च 2026 रोजी सुरु होईल आणि शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदारांच्या बोलीचा दिनांक सोमवार, 23 मार्च 2026 असणार आहे.

बोली प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 70 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 70 इक्विटी शेअर्सच्या पटीत करता येतील.

पुणे- 19 मार्च 2025: अमिर चंद जगदीश कुमार (एक्सपोर्ट्स) लिमिटेड (the “Company”) आपली इक्विटी शेअर्ससाठीची प्राथमिक समभाग विक्री संदर्भातील बोली/ इश्यू मंगळवार 24 मार्च 2026 रोजी खुली करणार असून शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी बंद होणार आहे. हा आयपीओ पूर्णपणे 4,400 दशलक्ष रु. चा फ्रेश इश्यू आहे.

आतापर्यंत 10 रु. दर्शनी मूल्य असलेले 82,796,840 इक्विटी शेअर्स आहेत.

कंपनीने अंदाजे 4,400 दशलक्ष रु. इतक्या निव्वळ निधीचा उपयोग आपल्या खेळत्या भांडवलाच्या गरजा आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (एकत्रितपणे, the “Object of Issue”) करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कीनोट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“Book Running Lead Managers” किंवा “BRLMs”) आहेत. केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

कंपनीचे इक्विटी शेअर्स 12 मार्च 2026 रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे (“RHP”) रजिस्ट्रार ऑफ कंपनिज, नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली-II, सेंट्रल दिल्ली (the “RoC”) यांच्याकडे दाखल करण्यात आले असून हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”, एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी पुण्यात …

पुणे-
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम शनिवार, दि. २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता, सिम्बायोसिस महाविद्यालय ऑडिटोरियम, जुना कॅम्पस, विमाननगर, पुणे – ४११०१४ येथे संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य राहणार आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या महान ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, प्रेमभाव आणि मानवतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम संत परंपरेच्या स्मरणार्थ तसेच अध्यात्मिक विचारांच्या प्रसारासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमात “मोगरा फुलला” या आध्यात्मिक-सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा परिचय करून देण्यात येणार असून श्री. गणेश शिंदे (व्याख्याते, स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार) यांचे विशेष प्रबोधनपर सादरीकरण होणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. श्री. ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

पुणे व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संत साहित्य अभ्यासक तसेच रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.