Home Blog Page 61

हिंदुजा फाउंडेशनच्या ‘जल जीवन’ उपक्रमाचा महाराष्ट्रातील 1.5 लाख लोकांना फायदा; दरवर्षी 690 दशलक्ष लिटर पाण्याची बचत

  • पाणलोट क्षेत्र विकासनदी पुनरुज्जीवन आणि पर्जन्यजल संधारणाद्वारे सुमारे 690 दशलक्ष लिटर वार्षिक जलसंवर्धनाची क्षमता निर्माण करण्यात आली आहे.

मुंबईजागतिक जल दिनाच्या निमित्ताने, हिंदुजा समूहाची सामाजिक उपक्रम राबवणारी शाखा असलेल्या ‘हिंदुजा फाउंडेशन’ने आपल्या ‘जल जीवन’ या प्रमुख जल-व्यवस्थापन कार्यक्रमाचा किती लोकांना फायदा झाला, त्याची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाणलोट क्षेत्र विकास, भूजल पुनर्भरण, नदी पुनरुज्जीवन आणि पर्जन्यजल संचयन यांसारखे प्रकल्प राबवून, 1.5 लाखांहून अधिक लोकांना लाभ पोहोचवण्यात आला आहे.

चेक डॅम्स, पुनर्भरण संरचना, जलाशयांचे पुनरुज्जीवन आणि पर्जन्यजल संचयन प्रणाली अशा एकत्रित उपक्रमांद्वारे, या फाउंडेशनने दरवर्षी सुमारे 69 कोटी लिटर पाण्याची बचत साध्य केली आहे. या उपाययोजनांमुळे पाणीटंचाईग्रस्त भागातील 1,020 एकरांहून अधिक शेतजमिनीसाठी सिंचन व्यवस्था भक्कम झाली आहे; त्याच वेळी, ग्रामीण आणि आदिवासी समुदायांना पिण्याच्या पाण्याचा खात्रीशीर पुरवठा उपलब्ध होणेही सुनिश्चित झाले आहे.

हिंदुजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), श्री. रमन कल्याणकृष्णन म्हणाले: “शाश्वत ग्रामीण विकासासाठी जलसुरक्षा ही एक मूलभूत बाब आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या आमच्या कामाचा मुख्य भर हा नैसर्गिक जलप्रणालींचे पुनरुज्जीवन करणेभूजल पुनर्भरणात सुधारणा घडवून आणणे आणि शेतीघरगुती वापर तसेच भावी पिढ्यांसाठी पाण्याची खात्रीशीर उपलब्धता सुनिश्चित करणारेसमुदायाच्या पुढाकाराने साकारले जाणारे उपाय विकसित करण्यावर आहे. पाणलोट क्षेत्र विकासनद्यांचे पुनरुज्जीवन आणि पर्जन्यजल संवर्धन या माध्यमातूनपाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागांमध्ये दीर्घकालीन जलसक्षमता निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

या विविध उपक्रमांमुळे भूजलाची उपलब्धता सुधारली आहे, हंगामी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे आणि पावसावरील अवलंबित्व कमी झाले आहे; परिणामी, शेतीची उत्पादकता आणि सामाजिक परिस्थिती सुधारली आहे.

विभागवार प्रभाव:

  • धाराशिव: पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प
  • सातारा: नदी पुनरुज्जीवन उपक्रम
  • भंडारा: भूजल पुनर्भरण उपाययोजना
  • पालघर: जलसुरक्षा कार्यक्रम
  • पुणे: पर्जन्यजल संवर्धन आणि सांडपाणी पुनर्वापर प्रणाली

या प्रतिष्ठानचे प्रयत्न हे समुदाय सहभाग, तांत्रिक नियोजन आणि दीर्घकालीन देखरेख यावर आधारित आहेत. जलस्रोतांच्या स्थानिक व्यवस्थापनाला चालना देऊन, जल जीवन उपक्रम शाश्वत जलवापरास सातत्याने पाठिंबा देत आहे आणि हवामान बदलांविरुद्धची लवचिकता अधिक बळकट करत आहे.

पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला, ईदच्या शुभेच्छा दिल्या

नवी दिल्ली- आज शनिवारी, पंतप्रधानांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना ईद व नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली.

पंतप्रधानांनी लिहिले, “मी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पाझाश्कियान यांच्याशी बोललो. या सणासुदीच्या काळात मध्य-पूर्वेत शांतता आणि स्थैर्य नांदेल, अशी आशा आम्ही व्यक्त केली.”

इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणात, मोदींनी मध्य-पूर्वेतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील (जसे की तेल, वीज इत्यादी) हल्ल्यांचा निषेध केला, कारण याचा परिणाम प्रदेशातील शांततेवर आणि जागतिक पुरवठ्यावर होतो.

ते म्हणाले की, सुरळीत व्यापारासाठी सागरी मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या संरक्षणासाठी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी इराणचे आभारही मानले.

ट्रम्प यांनी NATO देशांना भित्रे म्हटले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धात साथ न दिल्याबद्दल NATO सहयोगी देशांवर नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प म्हणाले की NATO देश भित्रे आहेत आणि अमेरिकेशिवाय ही युती फक्त कागदी वाघ आहे.

ट्रम्प यांनी होर्मुज स्ट्रेटचा उल्लेख करत म्हटले की, ते खुले ठेवण्यासाठी लष्करी मदत देणे सोपे आहे, परंतु सहयोगी देश यातही मागे हटत आहेत. ते म्हणाले, “ही एक खूप सोपी लष्करी कृती आहे, ज्यात खूप कमी धोका आहे, पण त्यांना मदत करायची नाही. ते भित्रे आहेत आणि आम्ही हे लक्षात ठेवू.”
अमेरिकेने म्हटले- तेल विकूनही इराणला फारसा फायदा होणार नाही.
अमेरिकेने म्हटले आहे की, इराणला तेल विकण्याची परवानगी दिली तरी, त्याला फारसे पैसे मिळणार नाहीत. अमेरिकेने इराणला अंदाजे १४० दशलक्ष बॅरल तेल विकण्याची तात्पुरती परवानगी दिली आहे, परंतु ही परवानगी केवळ जहाजांवर आधीच भरलेल्या तेलालाच लागू होते.

अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी म्हटले आहे की, इराणला हे पैसे मिळवणे कठीण जाईल. ही सूट केवळ अल्प कालावधीसाठी असून ती १९ एप्रिलपर्यंत लागू राहील.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेलाच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अहवालानुसार, इराणचे बहुतेक तेल चीनला पाठवले जाते, परंतु आता ते इतर आशियाई देशांनाही पाठवले जाऊ शकते.
इराणचा हिंद महासागरातील अमेरिकी तळावर हल्ला
इराणने शुक्रवारी सकाळी हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटन संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सियावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकी अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, इराणने दोन क्षेपणास्त्रे डागली, परंतु त्यापैकी एकही तळावर आदळले नाही. हा तळ इराणच्या किनारपट्टीपासून सुमारे ३,८१० किलोमीटर आणि तेहरानपासून ५,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे.

डिएगो गार्सिया हा अमेरिकेसाठी एक महत्त्वाचा लष्करी तळ आहे. त्याचा वापर अमेरिकी बॉम्बर्सद्वारे केला जातो. येथून मोठी टँकर विमाने (जसे की KC-135) आणि निगराणी विमाने देखील कार्यरत राहू शकतात.

आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आसावरी जगदाळे यांचा डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार

पुणे. दि.२१: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी आसावरी यांचा सत्कार केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल २०२५ मध्ये कुटुंबाला भेट देऊन शासकीय सेवेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी विशेष प्रक्रिया राबवून आसावरी जगदाळे यांना प्रशासकीय अधिकारी (वर्ग-२) पदावर नियुक्ती दिली. या पार्श्वभूमीवर २० मार्च रोजी आसावरी यांनी उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी आसावरी यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांनी पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातही कुटुंबाला पूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले. आसावरीने नोकरी मिळाल्याबद्दल कुटुंबीयांच्या भावना व्यक्त करत डॉ. गोऱ्हे यांचे विशेष आभार मानले.याप्रसंगी बाळासाहेब भांडे, आनंद गोयल, एकनाथ ढोले, विठ्ठल तांबे, ज्योती गाडे, सोनाली लांडगे, रिंकू मोरे आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

२६ मार्च हा संतोष जगदाळे यांचा स्मृतिदिन असून, सरकारने दिलेली ही नोकरी त्यांना आदरांजली असल्याचे जगदाळे कुटुंबीयांनी सांगितले.

पहलगाम हल्ल्यात २२ एप्रिल २०२५ रोजी संतोष जगदाळे यांच्यासह २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले की, पहलगाम हल्ला असो वा इराण युद्धासारखे संकट असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच पीडित नागरिकांच्या मदतीला धावून जातात आणि त्यांना सुखरूप बाहेर काढतात.

फुलगावमध्ये शाळेच्या मैदानासाठी माजी आमदार दीपक पायगुडे यांचे धरणे आंदोलन नवव्या दिवशीही सुरू

रस्ता प्रकल्प व अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन; प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद नसल्याचा आरोप

पुणे :  प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याने माजी आमदार दीपक पायगुडे यांचे फुलगाव, पुणे येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानातून जाणाऱ्या रस्त्याबाबत तसेच अतिक्रमणाबाबत धरणे आंदोलन सलग नवव्या दिवशीही सुरूच आहे.

दीपक पायगुडे यांनी फुलगाव येथील शाळेच्या जागेच्या प्रश्नावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने शाळेची शैक्षणिक जागा रस्ता बांधकामासाठी ताब्यात घेतल्याच्या तसेच विविध भागात अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन सुरू केले होते. दीपक पायगुडे गेल्या नऊ दिवसांपासून फुलगावमधील शाळेच्या परिसरात धरणे आंदोलन करत आहेत. स्थानिक नागरिक आणि पालकांच्या मते, ही जागा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठी राखीव होती. मात्र, रस्ता प्रकल्पासाठी ती घेण्यात आल्याने व अतिक्रमण केल्याने भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुविधांवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या निर्णयाचा निषेध करत पायगुडे यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. मात्र नऊ दिवस उलटूनही प्रशासन किंवा सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, धरणे आंदोलनामुळे दीपक पायगुडे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तरीदेखील सरकारकडून अद्याप कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान तेथे होऊ शकते पण याच अतिक्रमण आणि बेकायदेशीर रस्त्यामुळे ते होऊ शकणार नाही, अशी भितीदेखील दीपक पायगुडे यांनी व्यक्त केली आहे.
या आंदोलनाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

खरातबरोबर अनेकांचे फोटो, मलाच का टार्गेट केले ? त्यांची दुसरी बाजू मला माहिती नव्हतीच

अवघ्या एका दिवसांत घेतला राजीनामा , अजीतदादा असते तर चित्र वेगळे दिसले असते, अजितदादांच्या विश्वासातल्या पहिल्या महिला नेत्याचा राजकीय बळी,कसलीही शहानिशा न करता केवळ दिवसभर चालविलेल्या बातम्या च्या आधारे राजीनाम्याचे आदेश

पुणे- भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की एक महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. मी व माझ्या कुटुंबाने खरातला गुरु मानले होते. परंतु, त्यांची दुसरी बाजू आम्हाला माहीत नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, शिवनिका संस्थान या संस्थानात जे महादेव मंदिराचे ट्रस्ट आहे, मी प्रदेशाध्यक्ष होते तेव्हापासून सदस्य म्हणून काम केले आहे. माझ्यासमवेत समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, अनेक मान्यवर ट्रस्टवर होते. त्यानंतर मी आयोगाची अध्यक्षा झाले. आणि मला हे सांगायचे आहे की या ट्रस्टचा कार्यकाल हा 8 ऑगस्ट 2025 रोजी संपलेला आहे.

पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, समाजात आपण आयुष्य जगत असताना कोणाला तरी गुरु मानत असतो. खरात पती-पत्नीला आमच्या कुटुंबाने गुरु मानले होते. काही वेळा तिथे होत असलेला कार्यक्रम, मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमेचा असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप असेल, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहत होतो. यात एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आहे आणि त्या निमित्ताने आम्ही संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित राहत होतो.

माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे फोटो किंवा व्हिडिओ हे काही वर्षांपूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांनी पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील केली होती. 5-6 वर्षांपूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो, ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचे आयुष्य, कृत्य, वागणूक याबाबत आपल्याला कल्पना नसते. आज आपण ज्यांच्यासोबत असतो, ते पुढे जाऊन कसे वागणार आहेत, ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्यामुळे मी ही घटना समजली तेव्हा मला धक्का बसला. त्यामुळे मी सुरुवातीला ट्विट देखील केले होते की या ट्रस्टसोबत आमचे संबंध आहे. पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहीत असायचे कारण नव्हते. यात पोलिसांनी खोलवर निष्पक्ष तपास करावा. त्यासाठी आज मी पोलिस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या घटनेचा तपास पारदर्शकपणे व्हावा, अशी मागणी केल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी केली.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा असते. माझे संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टीने होती आणि त्यामुळेच आम्ही त्या देवस्थानशी जोडले गेलो होतो. पण याची दुसरी जी बाजू आहे, ती कधी आमच्यासमोर आली नाही. आम्ही कार्यक्रमांसाठी काही काळासाठीच तिथे असायचो. त्यामुळे जे काही घडले आहे, ते अत्यंत चुकीचे आणि घाणेरडे कृत्य आहे. पोलिसांनी सखोल तपास करावा आणि आरोपीला कठोर कारवाई करावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली.

पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, एका दैनिकाचे पत्रकार आहेत, त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात एक बातमी दिली होती 19.03.2025 रोजी. ही बातमी आमच्या समुपदेशकांकडे आली. त्यानंतर समुपदेशकाने त्यांना एक पत्र पाठवले होते 8 तारखेला. त्या पत्रात स्पष्ट दिले आहे की, आपल्या बातमीमध्ये काही मोघम गोष्टी आल्या आहेत. या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती असेल तर सविस्तर आयोगाला कळवावी. दुसरे पत्र आहे पोलिस आधीक्षकांना, त्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यानुसार कारवाई करावी. तसेच आम्ही कोणाला काही अडचण असेल तर थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार करावी. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आम्हाला सांगितले की कोणतीही तक्रार आली नाही, कोणत्याही महिलेची तक्रार नाही. त्यानंतर त्या पत्रकाराने पत्र पाठवले की आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. मागील दोन दिवसांपासून ज्या बातम्या चालवल्या, त्याचा मी तीव्र निषेध करते.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, दुसरी गोष्ट मला दाखवायची आहे म्हणजे माझ्याकडे 5 तारखेला एका मुलीचा मेल आला. या मेलमध्ये त्या मुलीने खरातच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका माणसाच्या संदर्भात तक्रार होती. खरातचा यात कुठेही उल्लेख नाही. तातडीने त्याच दिवशी आमचे पत्र पोलिसांना गेले आहे. मी स्वतः हे पत्र पाठवले. यात जे कोणी असेल त्याचा तपास करावा, अशी सूचना आम्ही दिली. त्यानंतर पोलिसांनी स्वतः पत्र दिले की आम्ही कारवाई करत आहोत. कोणालाही, कुठल्याही संस्थेला पाठीशी घातले नाही. तोपर्यंत खरातचे कुठेही नाव नव्हते. त्यानंतर 17 तारखेला तेजस्वी सातपुते यांचे पत्र आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही कारवाई करत आहोत.

चुकीच्या बातम्या सुरू आहेत. त्या व्यक्तीसोबत अनेकांचे फोटो आहेत. पण केवळ महिला म्हणून सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. काही लोकांनी पत्रकार परिषद घेत चुकीच्या बातम्या पसरवल्या, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. माझे फोटो चुकीच्या तारखेला दाखवण्यात आले आहेत. माझ्या सोशल मीडियावर अजूनही ते फोटो आहेत, तुम्ही पाहू शकता. कायद्याच्या चौकटीतून आम्ही या लोकांना नोटीस पाठवू, खोट्या बातम्या पसरवणे या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा राजीनामा:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सोपवला

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. तसेच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी लावून धरली होती. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकरांनी राजीनामा दिला असल्याचे समोर आले आहे. तसेच वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपले पद गमवावे लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी सकाळीच त्यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार चाकणकर यांनी प्रथम महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, आता त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रुपाली चाकणकर यांनी नुकतीच पुणे डीजींची भेट घेतली होती. तसेच सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर रात्री उशिरा चाकणकर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली व या भेटीत त्यांनी राजीनामा दिला आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार रस्त्यांवरील खड्डे आणि चेम्बर यामुळे अपघात होता कामा नये-नवल किशोर राम यांचे स्पष्ट आदेश

पुणे- उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार रस्त्यांवरील खड्डे आणि चेम्बर, वा वाळू तदनुषंगिक बाबी यामुळे अपघात होता कामा नये, त्या दृष्टीने शहर आणि परिसरातील सर्व रस्त्यांची कामे वेगाने आणि उत्कृष्ट रित्या पूर्ण करा असे स्पष्ट आदेश आज महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनि महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहर परिसरातील रस्त्यां वरील चेंबर्स समपातळीत करणे, पदपथ दुरुस्ती करणे इत्यादी कामाबाबत आज दि.२०.०३.२०२६ रोजी मा. नवल किशोर राम, महापालिका आयुक्त यांचेमार्फत बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष)ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (विद्युत)मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता (पथ)राजेश बनकर अधीक्षक अभियंता अशित जाधव (पथ), बांबळे इत्यादी तसेच पथ व विद्युत विभागाकडील अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरात मध्यंतरी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या मार्गावर २ हजार सर्व प्रकारचे चेंबर्स झाकणे रस्त्याच्या समपातळीत आणून मार्ग व्यवस्थित करण्यात आला आहे. मात्र, स्पर्धेच्या मार्गापुरतेच काम मर्यादित राहिले आहे. शहरातील इतर भागातील रस्त्यावरील पावसाळी व ड्रेनेजची झाकणे समपातळीत न आल्याने त्यांच्या खड्ड्यात वाहने आदळून अपघात होत आहेत.पुणे महानगरपालिके मार्फत सुरु असलेल्या कार्यवाही बाबतची वस्तुस्थिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी खालीलप्रमाणे सांगितले :
• पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत रस्त्यावरील खड्ड्यांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्थाना दिलेल्या निर्देशांनुसार रस्ते खड्डे मुक्त अभियान पुणे महानगरपालिकेने सुरु केले.
• या बरोबरच रस्त्यावरील पावसाळी लाइन चे चेंबर्स रस्त्याच्या सम पातळीत आणणे याबाबतचे या अभियानाचे रितसर उद्घाटन दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले असून त्या दिवसापासून संपूर्ण शहरभर पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत या बाबतचे कामकाज सुरु आहे.
• पुण्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या वेळी चेंबर समापतळीत आणण्याबाबतची जी एस.ओ.पी. तयार करण्यात आली होती, त्यानुसारच चेंबर समापतळीत आणण्याची कार्यवाही सुरू आहे.
• संपूर्ण शहरात पथ विभागाकडील कडील झोन वाईज वेगवेगळ्या ठेकेदार यांना महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम 5 2.2 अन्वये नेमणुकी करून चेंबर समापतळीत आणण्याचे कामकाज सुरू आहे. याबाबत दैनंदिन केलेल्या कामाचा आढावा घेऊन केलेल्या कामाची आकडेवारी दरोरोज महापालिका आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येत आहे.
• दिवसा असलेली वाहतूक विचारत घेऊन रात्री एस.ओ.पी नुसार चेंबर समपातळीमध्ये आणण्याचे काम करीत असताना, रस्ता कटरच्या साह्याने व ब्रेकरच्या साह्याने कट करीत असताना होणा-या आवाजाचा नागरिकांना, विद्यार्थ्यांना परीक्षा कालवधी असल्याने त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने रात्री काम करताना अडचणी निर्माण होत आहेत.आवश्यक त्या दक्षता घेऊन ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी कामे करण्यात येत आहेत.
• सद्यस्थिती संपूर्ण शहरात पावसाळी ,लाईन वरील आज मितीस सुमारे १२८३ एवढे चेम्बर्स समपातळी घेण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. पावसाळी वाहिन्यांवरील चेम्बर्स पथविभागामार्फत तर ड्रेनेजची गोल चेम्बर्स ड्रेनेज विभागाकडून समपातळीवर करण्यात येत आहेत.
• रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर अस्तित्वातील चेम्बर्सची पातळी खाली गेल्याने त्याठिकाणी निर्माण होणा-या खड्यांमुळे होणारे अपघात हे यामुळे टाळता येणार आहेत.
• महापालिका आयुक्त यांनी आज दिनांक २० मार्च २०२५ रोजी स्वतः या विषयाची बैठक घेऊन दररोज जास्तीत जास्त चेंबर्स सम पातळीवर आणण्याची कार्यवाही अधिक गतीने करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ वृद्धाश्रमाला ७५ हजारांची मदत

डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात मदत

पुणे : डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात त्यांच्या वर्गमित्रांकडून ‘सहजीवन’ या वृद्धाश्रमासाठी ७५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत वृद्धांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या या उपक्रमाला या मदतीमुळे एक आगळावेगळा पंचाहत्तरीचा सोहळा साजरा झाला.

शहरातील प्रसिद्ध फॅमिली डॉक्टर आणि ‘सहजीवन’ या वृद्धाश्रमाचे संस्थापक डॉ. दिलीप देवधर यांच्या पंचत्तरीनिमित्त त्यांच्या रुग्णांकडून व चाहत्यांकडून कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध कार्यालय येथे भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सतीश आळेकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी माजी खासदार व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, डॉ. अविनाश भोंडवे, तसेच ज्येष्ठ गायक रविंद्र साठे आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

सतीश आळेकर म्हणाले, वैद्यकीय सेवेबद्दल विविध प्रवाद होत असताना डॉ. देवधर यांच्यासारखे अचूक निदान करून अनावश्यक चाचण्या टाळणारे डॉक्टर दुर्मिळ होत आहेत. कोविड काळात कोणतीही बुवाबाजी न करता त्यांनी रुग्णांना दिलेला आधार अत्यंत मोलाचा ठरला, असेही त्यांनी सांगितले.

ग्राहक पेठेचे संचालक आणि डॉ. देवधर यांचे वर्गमित्र सूर्यकांत पाठक म्हणाले, चार-पाच पिढ्यांचे कौटुंबिक डॉक्टर म्हणून देवधर यांनी असंख्य कुटुंबांशी स्नेहाचे नाते निर्माण केले आहे. अनेक रुग्णांना आर्थिक अडचणीतही त्यांनी विनामूल्य उपचार देऊन मोठा आधार दिला, याचीही त्यांनी उदाहरणे सांगितली.

डॉ. दिलीप देवधर म्हणाले, पंचाहत्तरीनंतर काय करणार, असा प्रश्न अनेक जण विचारतात. पण माझे उत्तर एकच अजून कामच करणार. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबासाठी, रुग्णांसाठी आणि वृद्धाश्रमातील बांधवांसाठी कार्यरत राहण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलोक देवधर आणि सुप्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील यांनी केले.

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत गुढी

पुणे : नवीन वर्षात उत्तमोत्तम नाट्य कलाकृतींची निर्मिती व्हावी आणि रसिकांना त्यांचा भरभरून आनंद घेता यावा. कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिक यांना सांस्कृतिकदृष्ट्या हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो, अशा शुभेच्छा प्रसिद्ध अभिनेते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण, प्रसिद्‌ध अभिनेते आनंद इंगळे यांनी दिल्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे गुरुवारी (दि. १९) कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दरवर्षीप्रमाणे यंदाही कलावंत गुढी उभारण्यात आली. त्या वेळी सोमण आणि इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या. ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते सारंग मांडके, सारंग भोईरकर यांच्यासह नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह सत्यजित धांडेकर, उपाध्यक्ष समीर हंपी, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते, अनुराधा हटकर, गणेश भोसले आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात समीर हंपी यांनी उपक्रमाविषयी माहिती विशद केली तर सत्यजित धांडेकर यांनी आभार मानले. कलाकरांचा सत्कार सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते, सुनील महाजन, अनुराधा हटकर, गणेश भोसले यांनी केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल, योगेश सोमण,  सुनील महाजन यांचा सत्कार आनंद इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.

रा.स्व.संघाची – संघ शताब्दीच्या माध्यमातून यशोगाथा मांडत मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजन ; विविध चित्ररथांचा सहभाग

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संघाची यशोगाथा सांगणारा संघ शताब्दी रथ…जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष रथ…क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मराठी शाळा याविषयी माहिती देणारा समरसता रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांचा रथ अशा एकापाठोपाठ एक आलेल्या चित्ररथांचा सहभाग गुढीपाडव्याच्या मंगलमय सकाळी पुण्यात अनुभवायला मिळाला. याचसोबत पारंपारिक नगारा, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, मल्लखांब, वेत्रचर्म पथक, लहान मुलींचे साहसी आणि धाडसी खेळ इ. या भव्य शोभायात्रेत सहभागी झाले होते.

गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेचे आयोजन  करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्ताने यंदाच्या वर्षी संघाचे ज्येष्ठ प्रचारक पंत फडके आणि भाऊराव क्षीरसागर यांच्या हस्ते तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे गुढी उभारण्यात आली. त्यांच्यासोबत कसबा भागाचे संघचालक प्रशांत यादव, मोतीबाग नगराचे संघचालक शरद चंद्रचूड, मोतीबाग नगराचे कार्यवाह प्रमोद वसगडेकर, अश्विन देवळणकर, प्रदीप कदम इ. मान्यवर उपस्थित होते.

या भव्य दिव्य शोभायात्रेत खा. मेधा कुलकर्णी, आ. हेमंत रासने, नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, स्वरदा बापट, निवेदिता एकबोटे इ. मान्यवर उपस्थित होते. त्याचसोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, गजानन मित्र मंडळाचे सागर दहिभाते, जोगेश्वरी मंदिराचे बेंद्रे, जिलब्या मारुती मंडळाचे राजाभाऊ धावडे, सो. क्ष. कासार कालिका माता देवस्थान समितीचे भांडेकर, नवनीत मित्र मंडळाचे संतोष फडतरे, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समितीचे निलेश खडके, अमर भालेराव, इ. चा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक चैतन्य कुसुरकर, यात्रा प्रमुख गौरव पावटेकर, अथर्व दातार यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

एकत्र होऊनिया सारे… गुढी उभारु हिंदुत्वाची असे म्हणत पारंपरिक वेशात सहभागी पुणेकरांनी शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. परिसरातील गणेश मंडळांचाही तितकाच उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट, मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ, नवनीत मित्र मंडळ, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समिती, कालिका माता देवस्थान समिती, अखिल शनिवार पेठ रामनवमी उत्सव समिती, श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, ट्रस्ट यांनी देखील सहभाग घेतला. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरु झालेली शोभायात्रा तुळशीबाग राममंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर पर्यंत काढण्यात आली.  यावेळी गुढी देखील उभारण्यात आली.

‘पिंक रिक्षा’ योजनेत ४०० कोटींचा घोटाळा; महिलांच्या नावावर निकृष्ट ई-रिक्षे थोपवून शासनाची व लाभार्थ्यांची फसवणूक – डॉ. बाबा कांबळेंचा आरोप

पुणे: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘पिंक रिक्षा’ योजनेत गंभीर तांत्रिक उल्लंघन आणि कोट्यवधींच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केला आहे. ४०० कोटी रुपयांच्या या निविदा प्रक्रियेत (RFP) नमूद केलेल्या अटींचे सर्रास उल्लंघन करून लाभार्थी महिलांना सुरक्षिततेची कोणतीही खात्री नसलेली निकृष्ट वाहने पुरवण्यात आली आहेत, असा आरोप डॉ. बाबा कांबळे यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.

नेमका प्रकार काय?

डॉ. बाबा कांबळे म्हणाले की, “या योजनेअंतर्गत १०,००० महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात संबंधित कंपनीने (Kinetic Green) निकृष्ट दर्जाची वाहने देऊन महिलांची फसवणूक केली आहे. 3.98, लाख रुपये किंमत असूनही या रिक्षे साध्या चढणीवरही मागे येतात. एकदा चार्ज केल्यावर ११० किमी चालणे अपेक्षित असताना अवघ्या ७० ते ८० किमीमध्ये बॅटरी संपते. अनेक रिक्षेंना तर अद्याप RTO पासिंगही मिळालेले नाही. हा थेट ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असून याची CBI किंवा उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे.”

पिंक ‘ऑटो’ ऐवजी ‘ई-रिक्षा’ देऊन फसवणूक: योजनेचे नाव ‘पिंक रिक्षा’ असताना व शासनाचा जो पहिला जीआर आहे त्यामध्ये तीन प्लस वन रिक्षा असा उल्लेख असताना , नंतर टेंडर मध्ये मात्र ई रिक्षाचा उल्लेख करून, टेंडर मध्ये मोठा घोळ करण्यात आला आहे,.

महिलांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम “L 5 , ‘ऑटो रिक्षा’ मिळणे अपेक्षित होते, परंतु त्यांना अत्यंत कमी क्षमतेच्या L 3,’ई-रिक्षा’ देण्यात आल्या. यामुळे महिलांना रस्त्यावर व्यवसाय करणे अशक्य झाले असून, कमाई शून्य आणि बँकेचे हप्ते मात्र सुरू, अशा कात्रीत त्या अडकल्या आहेत.

या रिक्षांमुळे आमच्या आयुष्य उध्वस्त झाले.

यावेळी उपस्थित पीडित महिलांनी रडत आपले अनुभव कथन केले. “स्वावलंबनाचे स्वप्न दाखवून भंगार गाड्या आमच्या गळ्यात मारल्या,” अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. शासनाने पुढील १५ दिवसांत या प्रकरणाची दखल घेऊन तांत्रिक ऑडिट करावे आणि आम्हाला रिचार्ज चेंज करून ठेवा,L5, ऑटो रिक्षा मिळाव्यात आणि दोषींवर कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पिंक रिक्षा चालक महिलांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

योजनेतील तांत्रिक व टेंडर घोटाळ्याचे प्रमुख मुद्दे (Technical Highlights):
शासकीय निविदा (RFP No: CWCD/WD/01/2024) आणि प्रत्यक्ष पुरवलेली वाहने यात खालील गंभीर तफावत आढळली आहे:

  • आर्थिक तफावत: बाजारात उपलब्ध असलेल्या दर्जेदार ई-रिक्षेंच्या तुलनेत या रिक्षेची किंमत बाजार भाव मूल्य दोन लाखापेक्षा अधिक कमी असताना, प्रत्यक्ष मात्र (₹३,९८,००३) जवळपास दुप्पट आकारून सरकारी तिजोरीची लूट करण्यात आली.
  • बॅटरी व रेंज: टेंडरनुसार १०० Ah क्षमतेची बॅटरी अनिवार्य आहे, मात्र प्रत्यक्षात कमी क्षमतेची बॅटरी दिल्याने अपेक्षित ११० किमी ऐवजी केवळ ७० ते ८० किमीच रेंज मिळत आहे.
  • सुरक्षा मानके (AIS-156): ई-रिक्षेसाठी अनिवार्य असलेली बॅटरी सुरक्षा मानके पूर्ण केलेली नाहीत, ज्यामुळे उन्हाळ्यात बॅटरीला आग लागण्याचा धोका वाढला आहे.
  • चढणीची क्षमता (Gradeability): नियमानुसार ७ डिग्री चढण चढणे आवश्यक आहे, परंतु या रिक्षे पुलावर अर्ध्यावरच बंद पडतात, जो प्रवाशांच्या व महिलांच्या जीवाशी खेळ आहे.
  • बॉडी व मजबुती: ३५० किलो म्हणजेच L5 कॅटेगरी वजनाचे निकष असताना गाड्या अत्यंत हलक्या “L3,पत्र्याच्या आहेत, ज्याचा अपघात झाल्यास मोठा धोका संभवतो. ई रिक्षाचे सतत अपघात होत आहे ,अनेक महिला रिक्षा पलटी होऊन अपघातामध्ये जखमी झाल्या आहेत,
  • कायदेशीर अडथळे: ARAI/ICAT प्रमाणपत्राच्या अभावामुळे शेकडो रिक्षेंची RTO नोंदणी रखडली असून महिलांना रस्त्यावर दंड भरावा लागत आहे.

स्वारगेट–कात्रज मेट्रोचा विस्तार शिवापूर टोलनाका ते प्रस्तावित रिंगरोडपर्यंत : शहर सुधारणा समितीची महत्त्वपूर्ण शिफारस

नगरसेविका वर्षा तापकीरांची मागणी पूर्ततेच्या दिशेने मार्गस्थ

पुणे: पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणारा स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्ग पुढे शिवापूर टोलनाका परिसरातून प्रस्तावित रिंगरोडपर्यंत वाढविण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावास पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीने आज झालेल्या बैठकीत मंजुरी दिली असून अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव मुख्य सभेकडे शिफारस करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांनी सांगितले की, “दक्षिण पुणे, कात्रज परिसर तसेच शिवापूर टोलनाका आणि प्रस्तावित रिंगरोडलगत झपाट्याने वाढणारी वसाहत व वाढता वाहतूक ताण लक्षात घेता मेट्रो विस्तार अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “प्रस्तावित रिंगरोडशी मेट्रोचे प्रभावी कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्यास शहरातील वाहतूक वितरण अधिक संतुलित होईल आणि भविष्यातील शहरी नियोजनाला मोठी चालना मिळेल.”

या विस्तारामुळे कात्रजच्या पुढील भाग, शिवापूर टोलनाका परिसर तसेच रिंगरोडलगतच्या विकसित होत असलेल्या भागांना मोठा फायदा होणार असून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून शहर सुधारणा समितीने सदर प्रस्तावास मंजुरी देऊन अंतिम मान्यतेसाठी तो मुख्य सभेकडे शिफारस केला आहे,अशी माहिती समितीकडून देण्यात आली.

विमाननगरमध्ये प्रथमच सामूहिक गुढी उभारणीचा सोहळा उत्साहात संपन्न

पुणे: गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘मराठी माझा अभिमान असोसिएशन, विमाननगर’ यांच्या वतीने आयोजित सामूहिक गुढी उभारणीचा सोहळा दत्त मंदिर चौक येथे उत्साहात पार पडला. सकाळी ९ ते ११ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलिस अधिक्षक विमानतळ पोलिस स्टेशन गोविंद जाधव सर, माजी नगरसेवक अर्जुन जगताप,सामाजिक कार्यकर्त्या मीना काकी सातव,उद्योग पती श्रीराम माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, प्रथमच संस्थेतील पुरुष सभासदांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
पारंपरिक वेशभूषेत गुढी उभारून विधीपूर्वक पूजा करण्यात आली. शंखनादाने वातावरण मंगलमय झाले असून सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे कार्यकारिणी सदस्यांचे नियोजन व समन्वय महत्त्वाचा ठरला. स्नेहा सांडभोर अनिता लोखंडे, रेखा वाबळे, वृषाली मिरजगावकर, मुक्ताताई जगताप, ॲड. नीलिमा चव्हाण आणि अश्विनी देसाई कार्यकारणी सदस्य तसेच संस्थेचे सभासद प्रशांत देशपांडे यांच्या योगदानाने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. कार्यकर्मा दरम्यान दरवर्षी हा कार्यक्रम करावा अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.
अशा प्रकारे मोठ्या थाटामाटात मराठी नववर्षाच्या स्वागताचा सोहळा पार पडला.

एमआयटी एडीटी विद्यापीठ–रायन समूहात शैक्षणिक सहकार्याचा करार

विद्यार्थ्यांना नवोन्मेष, डिझाईन व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची नवी दारे खुली
पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी-काळभोर, पुणे आणि रायन आंतरराष्ट्रीय संस्था समूह यांच्यात शैक्षणिक सहकार्य, नवोन्मेषाधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. एमआयटी शैक्षणिक संकुलातील इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या प्रा. एच. के. व्यास सभागृहात दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा करार औपचारिकरीत्या संपन्न झाला.

या सहकार्याद्वारे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण यांमध्ये शैक्षणिक दुवा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असून, डिझाईन थिंकिंग, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा प्रारंभिक शिक्षणात समावेश करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून कार्यशाळा, प्राध्यापकांचे मार्गदर्शन, शैक्षणिक भेटी तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठातील मेकर्स्पेस व इनोव्हेशन लॅब्ससारख्या आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास रायन इंटरनॅशनल ग्रुपतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद शर्मा, समूहाच्या शैक्षणिक बाबींच्या उपाध्यक्षा निधी थापर, उपाध्यक्ष तथा व्यवसाय प्रमुख जॉन अ‍ॅलेक्स उपस्थित होते. एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दंडेश्वर बिसोयी, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे सर्व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स ही देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून, देशातील २० राज्ये व ४० शहरांमध्ये १५० हून अधिक शाळांद्वारे सुमारे २.५ लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शैक्षणिक गुणवत्ता, व्यक्तिमत्त्व विकास आणि क्रीडा, कला, नेतृत्व व सामाजिक सहभाग यांसारख्या सहशैक्षणिक उपक्रमांद्वारे सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी ही संस्था ओळखली जाते.

यावेळी विनोद शर्मा म्हणाले, “उत्कृष्ट शिक्षण हे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांना व्यापक अनुभव देणे तितकेच महत्त्वाचे आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठासोबतचे हे सहकार्य विद्यार्थ्यांना डिझाईन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारे ठरेल. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, याचा आम्हाला अभिमान आहे.”

याप्रसंगी बोलताना डॉ. नचिकेत ठाकूर म्हणाले, “विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सामंजस्य करारातून दोन्ही संस्थांची भविष्योन्मुख, सर्जनशील व कौशल्याधारित शिक्षण देण्याची सामायिक दृष्टी स्पष्ट होत असून, विद्यार्थ्यांना डिझाईन-आधारित समस्या निराकरण पद्धती आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लवकर परिचय मिळणार आहे. बदलत्या जागतिक करिअर संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रन्शिल मल्होत्रा यांनी परिश्रम घेतले.

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणासाठी माजी सैनिकांची आवश्यकता

पुणे, दि. 20 : समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील २१ हजार २७९ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वीतील मुलींसाठी ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत स्वसंरक्षण, जीवनकौशल्य, योगा, सैनिकी प्रशिक्षण व प्रेरणादायी व्याख्याने यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
सदर प्रशिक्षणाची अंमलबजावणी M/s. Indus Edutrain Private Limited यांच्यामार्फत करण्यात येत असून, राज्यातील शाळांमध्ये सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिकांची आवश्यकता आहे.
यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नोंदणीकृत माजी सैनिकांची यादी संबंधित संस्थेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे आपली नोंद करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी प्रोजेक्ट मॅनेजर श्री. प्रफुल हिवाळे (मो. ८६५७४६८७९५) किंवा ईमेल bd.edu@indusecutrain.com वर संपर्क साधावा.