Home Blog Page 60

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

1. भारत निवडणूक आयोगाने (इसीआय) 15 मार्च 2026 रोजी आसाम, केरळ, पुडुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे तसेच 6 राज्यांतील पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.

2. इसीआयने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (सीईओ) निर्देश दिले आहेत की, प्रत्येक 2,18,807 मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा (एएमएफ) आणि मतदानाच्या दिवशी मतदार सहाय्य उपलब्ध करून द्यावे.

3. एएमएफ अंतर्गत पिण्याचे पाणी, सावलीसह प्रतीक्षा क्षेत्र, पाण्याची सुविधा असलेले स्वच्छतागृह, पुरेसे प्रकाश, दिव्यांग मतदारांसाठी योग्य उताराचा मार्ग, मानक मतदान कक्ष आणि योग्य दिशादर्शक फलक यांचा समावेश आहे. तसेच, रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना विश्रांती घेता यावी यासाठी ठराविक अंतरावर बाक ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

4. मतदार जागरूकता वाढवण्यासाठी, प्रत्येक मतदान केंद्रावर चार एकसमान आणि प्रमाणित मतदार सुलभता भीत्तीपत्रक (व्हीएफपी) ठळकपणे प्रदर्शित केले जातील. यामध्ये मतदान केंद्राची माहिती, उमेदवारांची यादी, करावयाच्या आणि टाळावयाच्या गोष्टी, मान्य ओळखपत्रांची यादी आणि मतदान प्रक्रिया यांचा समावेश असेल.

5. प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदार सहाय्य केंद्रे (व्हीएबी) स्थापन केली जातील. येथे मतदान केंद्र स्तर अधिकारी (बीएलओ) किंवा इतर अधिकारी मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा क्रमांक आणि मतदार यादीतील अनुक्रमांक शोधण्यात मदत करतील. व्हीएबीवर स्पष्ट दिशादर्शक फलक असतील आणि मतदान केंद्राकडे येताना ते सहज दिसतील.

6. मतदारांच्या सोयीसाठी इसीआयने घेतलेल्या उपक्रमांपैकी एक म्हणून, मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराबाहेर मोबाईल फोन ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. मतदार मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी आपला फोन (बंद अवस्थेत) नियुक्त स्वयंसेवकाकडे देऊ शकतात आणि मतदान केल्यानंतर तो परत घेऊ शकतात.

7. आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की एएमएफ आणि संबंधित सुलभता उपायांची अंमलबजावणी अनिवार्य आहे आणि सर्व मतदान केंद्रांवर त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मतदानाच्या तारखेपूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून सर्व मतदारांना सुरळीत आणि आनंददायी मतदानाचा अनुभव मिळेल.

एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी:केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

पुणे-सध्या जगभरात युद्धग्रस्त परिस्थिती असल्याचे आढळून येत आहे. एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी असून या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘युद्ध नको, बुद्ध हवा’, हा संदेश जगासाठी उद्बोधक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पाली व बौद्ध अध्ययन विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या पाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या पाली विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बिमलेन्द्र कुमार, गगन मलिक, भदंत हर्षबोधि महाथेरो, डॉ योजना भगत, धम्मदीप वानखेडे, डॉ. करुणा जाधव, डॉ नीरज बोधी, स्वागताध्यक्ष डॉ सिद्धार्थ धेंडे, डॉ. गौतम चाबुकस्वार, उपमहापौर परशुराम वाडेकर, संयोजक राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

पाली भाषेने जगाला ज्ञान प्रदान केले आहे. विज्ञानवाद, समानता, मानवता आणि शांततेचे ज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान पाली भाषेतूनच जगभरात पोहोचले आहे. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले असून यापुढे पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा यासाठी शासकीय पातळीवर सर्व प्रकारची मदत करू, अशी ग्वाही आठवले यांनी यावेळी दिली. जगभरातील युद्धस्थिती, समाजातील असमानता, हिंसाचार दूर करण्यासाठी पाली भाषेचा प्रसार आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि समृद्ध भारतीय परंपरेचे भांडार पारिभाषेत उपलब्ध असून दुःखातून बाहेर पडून समाधान प्राप्त करण्याचा, चित्तशुद्धीचा मार्ग पाली भाषाने दाखवला आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमापासून पालीचा समावेश ऐच्छिक भाषा म्हणून होणे आवश्यक आहे, असे मत बिमलेंद्र कुमार यांनी व्यक्त केले. बौद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणेच सामाजिक, आर्थिक, राजनैतिक अशा सर्व विषयांवरील व्यापक साहित्य पाली भाषेत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी त्याचे संवर्धन व प्रसार व्हावा यासाठी कोणताही कार्यक्रम हाती घेण्यात आला नाही. राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या धर्तीवर पाली भाषेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय विद्यापीठ किंवा संस्थेची स्थापना करण्यात यावी. महाविद्यालयांमध्ये पाली भाषेच्या प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त असून ती ताबडतोब भरण्यात यावी, अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.

सध्याच्या काळात केवळ पाली भाषाच नव्हे तर बौद्ध धम्म धोक्यात आला असल्याची भीती गगन मलिक यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. सर्वसामान्यांना ज्ञान देण्याची जबाबदारी असलेल्या प्रथम पाली भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बौद्ध धर्माचे संवर्धन व प्रसार करणाऱ्या भिक्षूची संख्या मर्यादित आहे. समाजातील सुशिक्षित आणि कर्तृत्ववान युवक भिक्षू होण्यास तयार नाहीत, अशी खंत व्यक्त करतानाच मलिक यांनी भिक्षू होण्याची तयारी असलेल्या युवकांच्या थायलंड मधील पंधरा वर्षाच्या प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी देखील दर्शविली.

पाली भाषा ही माणसांना जोडणारी, मैत्रीची आणि परिवर्तनाची भाषा असल्याचे भदंत हर्षबोधी महाथेरो यांनी नमूद केले. बौद्ध धर्माचा, गौतम बुद्धांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा, विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिख्खू संघाने एकत्र येऊन पुढाकार घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पाली भाषेतील समृद्ध साहित्य सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे चिवर धारण न केलेले संन्यासी होते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी हाती घेतली पाहिजे, असे आवाहन सुवर्ण डंबाळे यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाली भाषेच्या प्रसारासाठी निधी मिळावा आणि प्राथमिक शिक्षणात पाली भाषेचा समावेश करावा, अशा मागण्या केल्या. राहुल डंबाळे यांनी पाली भाषेच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य पालीमध्ये अनुवादित करण्याची घोषणा यावेळी केली. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.  त्याचप्रमाणे पाली भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणारे गायक पावा, गगन मलिक, अतुल भोसेकर आणि संमेलन अध्यक्ष बीमलेन्द्र कुमार यांचाही सत्कार करण्यात आला.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे पुणे विमानतळावर स्वागत

पुणे, दि. २२ – भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आज पुणे विमानतळ येथे आगमन झाले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी उपराष्ट्रपती महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.

यावेळी राज्यसभेचे उप सभापती हरिवंश सिंग, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

पकडला गेला तरच ‘भोंदू’ का ? भक्तांच्या आंधळेपणाचे काय? डोळस श्रद्धा की वैचारिक गुलामगिरी ?

नाशिकच्या खरात प्रकरणावरून अतुल कुलकर्णींचा सवाल

मुंबई-स्वत:ला देवाचा अवतार सांगून महिलांचे शोषण करणारा भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात सध्या गजाआड आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 58 व्हिडिओ जप्त केले असून, यात अनेक बडे नेते आणि हस्तींचे चेहरे उघडे पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती करत समाजाला आरसा दाखवला आहे.

अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला पहिलाच प्रश्न काळजाला भिडणारा आहे. ते विचारतात, एखादा बाबा पकडला गेला कीच त्याला ‘भोंदू’ का म्हणायचे? त्याआधी तो काय असतो? आणि जे कधीच पकडले जात नाहीत, त्यांचे काय? हा प्रश्न केवळ खरातपुरता मर्यादित नसून, गल्लीबोळात उभे राहिलेल्या स्वयंघोषित महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे.
अतुल कुलकर्णी म्हणाले की, जेव्हा एखाद्या महाराजाचे काळे कारनामे चव्हाट्यावर येतात, तेव्हा त्याचे अनुयायी स्वतःला ‘पीडित’ मानतात. पण , हे भक्त नेमके कोण असतात? भागीदार, पीडित, अंधळे, अंधश्रद्धाळू की मूर्ख?अंध होण्याला कारणीभूत कोण? फसवणारा की स्वतःहून फसणारा? असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे. हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं, तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का?” ज्याप्रमाणे आपण डोळे मिटून एखाद्या बाबावर विश्वास ठेवतो, तसाच विश्वास आपण राजकीय नेत्यांवरही ठेवतो का? असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे.

ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम- 48 तासांत होर्मुझ उघडा:नाहीतर पॉवर प्लांट उद्ध्वस्त करू; इराण म्हणाला- अमेरिका-इस्त्रायलचे वॉटर प्लांट उडवून देऊ

तेहरान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, जर ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केली नाही, तर अमेरिका इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करेल.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रविवारी लिहिले, ‘जर इराणने ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर अमेरिका इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त करेल आणि सर्वात मोठ्या प्रकल्पापासून सुरुवात होईल.’

त्याचबरोबर, इराणने इशारा दिला आहे की, जर त्याच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले गेले, तर तो मध्य पूर्वेतील अमेरिका आणि इस्त्राईलशी संबंधित सर्व ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करेल.

इराणच्या खातम अल-अनबिया सेंट्रल कमांडचे प्रवक्ते इब्राहिम झुल्फाघारी यांनी सांगितले की, इराण अमेरिका आणि इस्त्राईलशी संबंधित समुद्राचे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पांवर (डिसेलिनेशन प्लांट) आणि आयटी पायाभूत सुविधांवरही हल्ला करेल.
इराणचा इस्रायली शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला

इराणने शनिवारी रात्री इस्रायलच्या दक्षिणेकडील डिमोना शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला, ज्यात सुमारे 20 लोक जखमी झाले. डिमोना हे तेच शहर आहे जिथे इस्रायलचे अणु कार्यक्रम केंद्र आहे.
राणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेशकियान यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, ब्रिक्सने इराणवर होणारे हल्ले रोखण्यात भूमिका बजावली पाहिजे.

ते म्हणाले की, ब्रिक्सने कोणत्याही दबावाशिवाय, स्वतःच्या बळावर काम केले पाहिजे आणि या प्रकरणात पुढे आले पाहिजे.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी असेही सुचवले की, मध्य पूर्वेतील देशांनी एकत्र येऊन एक नवीन सुरक्षा प्रणाली तयार केली पाहिजे. यामुळे या प्रदेशात शांतता आणि स्थिरता टिकून राहील आणि बाहेरील देशांचा हस्तक्षेप कमी होईल.
इराणकडून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यात आली
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून नवीन क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.

लष्करी निवेदनानुसार, हा धोका टाळण्यासाठी हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून, क्षेपणास्त्रांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

इस्रायलमधील इराणी हल्ल्यांमध्ये १५० हून अधिक लोक जखमी
इस्रायलच्या आर्मी रेडिओनुसार, दिमोना आणि अराद येथील हल्ल्यांनंतर १५० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इस्रायलमधील हल्ल्यानंतर हे सर्व लोक उपचारासाठी सोरोका रुग्णालयात दाखल झाले आहेत. जखमींची प्रकृती आणि हल्ल्यांमुळे झालेल्या एकूण नुकसानीची माहिती अद्याप उपलब्ध नाही.
इराणमध्ये ११० गॅस-आधारित वीज प्रकल्प, अमेरिकेकडून हल्ल्याचा इशारा
ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर ४८ तासांच्या आत होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही, तर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला जाईल. इराणच्या वीज पायाभूत सुविधांविषयी माहिती समोर आली आहे.

या माहितीनुसार, इराणमध्ये अंदाजे ११० गॅस-आधारित वीज प्रकल्प आहेत, त्यापैकी काही हायब्रीड आहेत. याव्यतिरिक्त, देशात सौर, जल, पवन, तेल, डिझेल, कोळसा, भू-औष्णिक आणि अणुऊर्जेवर चालणारे प्रकल्प देखील आहेत.

इराणचे तीन सर्वात मोठे वीज प्रकल्प गॅसवर चालणारे आहेत:

दमावंद कंबाईन्ड सायकल पॉवर प्लांट: तेहरानच्या आग्नेयेला सुमारे ७० किमी अंतरावर स्थित, क्षमता २,८६८ मेगावॅट.

शहीद सलीमी पॉवर प्लांट: माझंदरान प्रांतात कॅस्पियन समुद्राजवळ स्थित, क्षमता २,२१५ मेगावॅट.

शहीद रझाई पॉवर प्लांट: तेहरानच्या ईशान्येला सुमारे ११० किमी अंतरावर स्थित, क्षमता २,०४३ मेगावॅट.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील वेस्ट काउंटी एनर्जी सेंटर हा ३,७५० मेगावॅट क्षमतेचा सर्वात मोठा गॅस ऊर्जा प्रकल्प आहे.

इराण आपल्या विजेचा बहुतांश भाग जीवाश्म इंधनातून निर्माण करतो. २०२३ मध्ये, यातून अंदाजे ३४०,००० गिगावॅट-तास वीज निर्माण झाली, तर अंदाजे २८,००० गिगावॅट-तास वीज नवीकरणीय ऊर्जेतून मिळाली.

अणुऊर्जेबद्दल माहिती अशी कि , इराणमध्ये सध्या फक्त एकच कार्यरत अणुभट्टी आहे – बुशेहर अणुऊर्जा प्रकल्प. इराण सध्या आणखी एका अणुभट्टीचे बांधकाम करत आहे. २०२३ मध्ये, इराणने अणुऊर्जेतून ५,७४० गिगावॅट-तास वीज निर्माण केली.

शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीमधील १२० फुटी डीपी रस्त्यांचे काम सुरु करणार -नगरसेवक स्वप्नील दुधानेंना आश्वासन

0

पुणे- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधील विविध कामे तसेच शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीमधील १२० फुटी डीपी रस्त्यांचे काम जिथे जिथे भूसंपादन झालेले आहे ,किंवा महापालिकेच्या मालकीची जागा आहे तिथे तिथे तातडीने सुरु करण्याची कार्यवाही करू असे आश्वासन येथे पुणे महापालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांनी त्यांच्या सर्व पथ विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत या प्रभागातील विविध रस्त्यांची तब्बल दोन ते अडीच तास पाहणी केल्यानंतर दिले,

महापालिका शहर सुधारणा समितीचे सदस्य , नगरसेवक स्वप्नील देवराम दुधाने यांनी सांगितले कि अधिकाऱ्यांनी आपल्या समवेत केलेल्या पाहणी दरम्यान खालील कामे सत्वर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरु करत असल्याचे आश्वस्त केले आहे.

पहा नेमकी कोणती कामे.

  • शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीमधील १२० फुटी डीपी रस्त्यांमधील नव्याने ताब्यात आलेल्या जागेवर रस्त्याचे काम चालू करण्यात यावे. तसेच सनसिटी ते कर्वेनगर या उड्डाणपूलाच्या अनुषंगाने कर्वेनगर हद्दीमधे विविध उपाययोजना खालील प्रमाणे करण्यात याव्या.
  • ट्री हाउससमोरील १२ मी. डीपी रस्ता तसेच भालेकर उद्यानासमोरील १२ मी. डीपी रस्ता वनवे करण्याकरिता वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी.
  • जावळकर वस्तीमधील ३० मी. रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोडणे
  • शाहू कॉलनी लेन नं. १ मधील १२ मी. रस्ता पूर्ण करणे
  • शंभर फुटी डीपी रोडलगत असणाऱ्या कुलश्री कॉलनी, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी, विदिशा सोसायटी या रस्त्यांवर जड वाहतूक बंद करण्याकरिता वाहतूक विभागास पत्रव्यवहार करावा व त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी.
  • ⁠वारजे महामार्ग चौक ते कात्रजकडे जाणाऱ्या १२ मी. रस्त्यावरील ओढ्यावरील बॉक्स कलव्हर्ट रस्त्याचे काम दि. ३१ मे २०२६ म्हणजेच पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे
  • तिरुपतीनगर येथील लाईटहाऊस समोरील अर्धवट डीपी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे.
  • वारजे हद्दीमधील सागर हॉटेल ते अक्षय कॉलनीपर्यंत उर्वरित पदपथचे काम चालू करण्यात यावे.
  • ⁠पश्चिम रंग सोसायटी बाहेरील २४ मी. रस्ता पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या असल्याने सदर रस्त्याचे काम सुरू करणे
  • शाहू कॉलनी लेन नंबर २ ते लेन नंबर ११ पर्यंत बरेच दिवस रखडलेला पाणंद रस्ता पूर्ण करणे
  • कर्वेनगर स्मशानभूमीच्या बाहेर चालू असलेल्या आरसीसी बॉक्स कलव्हर्टचे काम ३१ एप्रिल २०२६ पूर्वी पूर्ण करणे

केदार शिंदे – सना शिंदे घेऊन येत आहेत ‘आई भाड्याने हवी?’

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

सनफ्लॉवर स्टुडिओ निर्मित या चित्रपटाची कथा आणि लेखन वैशाली शशी नाईक आणि ओंकार वसुंधरा दत्त यांनी केले असून छायांकन व संकलनाची जबाबदारी मयुर संजिवनी हरदास यांनी सांभाळली आहे. विशेष म्हणजे ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’नंतर निर्माती सना शिंदे, दिग्दर्शक केदार शिंदे, लेखिका वैशाली शशी नाईक, लेखक ओंकार वसुंधरा दत्त ही चौकडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे सांगतात, “स्त्रीप्रधान विषय हाताळणे ही नेहमीच जबाबदारीची आणि आव्हानात्मक गोष्ट असते. जोपर्यंत एखादी कथा मनापासून भिडत नाही, तोपर्यंत अशा चित्रपटाची सुरुवात करायची नाही, असा माझा ठाम निर्धार होता. ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आणि ‘आई भाड्याने हवी?’ या दोन्ही चित्रपटांचे काम २०२३ पासून सुरू झाले. ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट मी ज्यांना आदर्श मानतो त्या राजकुमार हिरानी यांच्या शैलीची झलक देणारा आहे. हा केवळ विनोदी चित्रपट नाही, तर ‘आई’ या नात्याचा गाभा मांडणारा, मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणं हे माझं ध्येय असतं आणि या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवेल. शीर्षकातूनच आजच्या काळातील भावनिक तगमग जाणवते. सध्या कलाकारांची निवड सुरू असून, विविध वयोगटातील ‘आई’ प्रेक्षकांना पाहायला मिळतील. जून-जुलैमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होईल.”

निर्माती सना शिंदे म्हणतात, “पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे या नव्या चित्रपटाबद्दलही तितकीच उत्सुकता आहे. पहिला चित्रपट भावनिक अंगाने साकारण्यात आला होता, तर ‘आई भाड्याने हवी?’ हा पूर्णपणे मनोरंजनप्रधान, रंगतदार आणि मल्टीस्टारर आहे. यात नातेसंबंध, भावना आणि विनोद यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळेल. मला वैयक्तिकरित्या स्त्रीकेंद्री कथा आवडतात, त्यात ‘आई’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सक्षम आणि प्रभावी व्यक्तिरेखा असते. प्रेक्षकांना आशयघन आणि मनाला भिडणारे चित्रपट देण्याचा आमचा प्रयत्न कायम असतो, आणि हा चित्रपट त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.”

‘आई भाड्याने हवी?’ या वेगळ्या शीर्षकातूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण होत आहे. आजच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत ‘आई’ या नात्याची गरज, त्याची उणीव आणि त्यामागची भावनिक पोकळी यावर हा चित्रपट हलक्याफुलक्या तरीही परिणामकारक पद्धतीने भाष्य करणार असल्याचे दिसते. एकीकडे धमाल, हसवणूक आणि मनोरंजन, तर दुसरीकडे अंतर्मुख करणारा आशय या दुहेरी ताकदीमुळे ‘आई भाड्याने हवी?’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार, यात शंका नाही. आता या ‘आई’च्या शोधाची कथा नेमकी कशी उलगडते, हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एपस्टिन फाईल प्रकरणी संघाच्या नागपूर मुख्यालयावर सोमवारी काँग्रेस-‘वंचित’चा मोर्चा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात धडक मोर्चा.

मुंबई, दि. २१ मार्च २०२६

एपस्टिन फाईलमध्ये आलेला नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख व अमेरिकेशी तडजोड करणारे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर कायम का ठेवले? याचा जाब विचारण्यासाठी सोमवार दिनांक २३ मार्च रोजी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांचा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. नागपुरातील संविधान चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हजारो पदाधिकारी या मोर्चात सहभागी होणार आहेत.

अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टिन फाईलची जी माहिती जाहीर केली आहे, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री हरदीप पुरी यांचेही अनेकवेळा एपस्टिन फाईलमध्ये नाव आलेले आहे. अमेरिकेशी केलेल्या व्यापारी करारानेही भारतातील शेतकरी व शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. भारताने अमेरिकेशी तडजोड केली असून नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व व स्वाभिमान गहाण ठेवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एपस्टिन फाईलच्या निमित्ताने नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे चाल, चलन, चेहरा व चारित्र्य उघड झाले आहे. रा. स्व. संघ ही भाजपाची मातृसंस्था असून भाजपासाठी निवडणूक प्रक्रियेत सक्रीय भाग घेत असते. भारताची जगात नाच्चकी होत असताना रा. स्व. संघाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधापदावर अद्याप का ठेवले आहे, या मागणीसाठी हा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.

युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रंगले  पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे दुसरे सत्र

पुणे – विविध रागांनी नटलेले शास्त्रीय गायन, मन तल्लीन करणारी पखवाज वादनाची जुगलबंदी आणि रसिकांच्या टाळ्या-वाहव्यांच्या गजरात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवातील ‘युवोन्मेश’ ही खास युवा कलाकारांची मैफिल रंगली.

तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्राची सुरुवात गायिका डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांच्या सुरेल गायनाने झाली. त्यांनी राग गुजरी तोडीमध्ये विलंबित ख्याल आणि द्रुत बंदिश सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाला गीत इनामदार, उमेश पुरोहित (तबला) आणि सुकन्या जोशी (तानपुरा) यांनी समर्पक साथ दिली.

यावेळी बोलताना डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे म्हणाल्या, “या प्रतिष्ठित महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे हे माझे भाग्य असून, हे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे आशीर्वादच आहेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश रामदासी यांनी केले, तर रश्मी अभिषेकी यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, “अभिजात संगीताचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी मोठे योगदान दिले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीत तरुणांपर्यंत पोहोचावे, यासाठी ‘युवोन्मेश’ हा विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे.”

या प्रसंगी देवश्री कचरे आणि मंगल गवळी यांच्या हस्ते डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांचा सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या सत्रात पखवाज वादक पार्थ भूमकर आणि प्रथमेश तारळकर यांनी दमदार पखवाज वादन सादर केले. त्यांच्या प्रत्येक थापेसह मैफिल रंगत गेली आणि सभागृहात भक्तीमय वातावरणाची अनुभूती निर्माण झाली. अथर्व कुलकर्णी (संवादिनी) यांनी त्यांना साथ दिली.

महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात आसामच्या गायिका श्रुती बुजरबारूआ यांनी अप्रतिम गायन सादर केले. त्यांनी राग शुद्ध सारंगमध्ये ‘धरणी धरोहर’ ही रूपक मध्य तालातील बंदिश सादर करत रसिकांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाला पार्थ ताराबादकर (तबला) आणि सौमित्र क्षीरसागर (संवादिनी) यांनी समर्थ साथ दिली.

यावेळी भावना व्यक्त करत श्रुती बुजरबारूआ म्हणाल्या, “या महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. आसामहून महाराष्ट्रात आल्यानंतर मी पंडित विजय कोपरकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. त्यामुळे पुण्यात सादरीकरण करणे म्हणजे माझ्यासाठी माहेरच्या ठिकाणी संगीत सेवा करण्यासारखे आहे.”

युवा कलाकारांच्या उत्स्फूर्त आणि दर्जेदार सादरीकरणामुळे ‘युवोन्मेश’ मैफिलीने महोत्सवात विशेष रंग भरला.

व्हायरल फोटो खरातच्या मुलीच्या लग्नातील… मात्र, त्यांच्या वैयक्तिक दूषकृत्यांबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती.

0

केवळ फोटो आले म्हणून आरोप करणे चुकीचे:अशोक खरातसोबतच्या फोटोबाबत दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

महिला लैंगिक अत्याचारातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने टीकेचे धनी ठरलेले माजी मंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी अखेर या प्रकरणावर मौन सोडले आहे. “अशोक खरातचे कृत्य घृणास्पद असून त्याचा मी निषेधच करतो, मात्र केवळ फोटोंच्या आधारे राजकीय नेत्यांवर आरोप करणे चुकीचे आहे,” असे स्पष्टीकरण केसरकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे.

अशोक खरातसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि दीपक केसरकर यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर स्पष्टीकरण देताना दीपक केसरकर म्हणाले, मी मुंबईच्या बाहेर असल्याने अशोक खरात प्रकरणावर काही खुलासे करु शकलो नाही. त्यामुळे, व्हिडिओच्या माध्यमातून मी माझी भूमिका मांडत आहे.

दीपक केसरकर महणाले, नाशिकमधील ईशान्येश्वर मंदिरासाठी रस्ता बनवण्याच्या संदर्भात अशोक खरात हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी माझी त्यांची पहिली ओळख झाली. खरात यांचा खगोलशास्त्रात (Astronomy) चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांच्याशी ओळख होती. व्हायरल झालेला दुसरा फोटो त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहे. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा कृत्यांबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती.
या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. “दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना अशोक खरात हा बाबा शिक्षण खात्यात लक्ष घालायचा. बदल्या, बढत्या आणि महत्त्वाची कामे करण्यासाठी हा बाबा केसरकरांना सांगायचा. ‘ट्रायडंट’ हॉटेलमध्ये बसून ही सर्व कामे व्हायची आणि खरातच शिक्षण खाते चालवायचा,” असा खळबळजनक आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले, “संजय राऊत यांचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. अशोक खरात कधीही माझ्या कार्यालयात किंवा मंत्रालयातील दालनात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी माझे खाते चालवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या कार्यकाळात शिक्षण आणि मराठी भाषा विभागात जे ऐतिहासिक निर्णय झाले, ते यापूर्वी कधीही झाले नव्हते. केवळ एखाद्या कार्यक्रमातील फोटोंवरून अशा प्रकारचे गंभीर आरोप करणे राजकीय संस्कृतीला धरून नाही.”

अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाद्वारे (SIT) सुरू आहे. या तपासात खरातच्या राजकीय संबंधांबाबत काही ठोस निष्पन्न होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, केसरकर यांच्या या स्पष्टीकरणामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.

खरात फाईल ओपन करा .. चाकणकरसह सर्वांवरच कारवाई करा

पुणे शहर महिला काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन

पुणे : भोंदूबाबा खरात यांच्याशी संबंध असलेल्या मंत्र्यांची त्वरीत चौकशी करा आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांना अटक करा, अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने आज शनिवारी सकाळी फर्ग्युसन कॉलेज रोड येथे आंदोलन करण्यात आले. या बाबाच्या अनेक गैरकृत्यात सहभागी असलेल्या सर्व मंत्र्यांची त्वरीत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केली.

स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. रूपाली चाकणकर यांनी महिलांच्या चारित्र्याशीच खेळ केला, हा गुन्हा अक्षम्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा भंग आणि महिलांचे शोषण केलेल्या खरात या भोंदू बाबाला संरक्षण दिल्याबद्दल रुपाली चाकणकरांना अटक झालीच पाहिजे.त्याचबरोबर बाबाच्या अनेक गैरकृत्यात सहभागी असलेल्या सर्व मंत्र्यांची त्वरीत चौकशी झाली पाहिजे, महाराष्ट्रातील एपस्टीन खरात याची ३० दिवसांत चौकशी करा.

फुले, शाहू, आंबेडकर यांची परंपरा मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकावे, अशी मागणी स्वाती शिंदे यांनी आंदोलकांच्या वतीने केली.

आंदोलन फर्ग्युसन कॉलेज रोड येथे जोषपूर्ण झाले. ‘मंत्र्यांनो खुर्चा खाली करा’, ‘भोंदूबाबा खरातला कडक शासन करा’, अशा आशयाच्या घोषणांचे फलक आंदोलकांनी हाती घेतले होते. भोंदूबाबा खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमांना जोडे मारण्यात आले.

पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अर्चना शाह, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, रेखा जैन, अंजली सोलापूरे, राजश्री दामले-चव्हाण, रुपाली पवार, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, अंजली देसाई, सुवर्णा माने, सुरेखा मारणे, गीतांजली तसेच इतर महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी केले.

भूमी ग्रीन एनर्जीला कचरा प्रकल्प विनानिविदा देण्याचा प्रस्ताव मागे….

पुणे, : देवाची उरुळी येथे ५०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विनानिविदा काढण्यात आलेला प्रस्ताव मागे घेण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी येथे दिली.कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते चंद्रकांत कदम यांनी याप्रकरणी आयुक्त नवल किशोर राम यांच्यावर ते दबावाखाली काम करत असल्याचे आरोप केले होते .
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ऐनवेळी उरुळी येथील कचरा डेपोच्या आवारात ओल्या कचऱ्यावर ५०० टन क्षमतेचा प्रकल्प करण्याचे काम भूमी ग्रीन एनर्जी या कंपनीला देण्याचा प्रस्ताव ऐनवेळी आणला होता. २० वर्षे ६९० रुपये प्रति टन टिपिंग फी व दरवर्षी १० टक्के वाढ असे या प्रस्तावात नमूद केले होते. परंतु ऐनवेळी बैठकीत काँग्रेस सदस्य प्रशांत जगताप यांनी एवढ्या दीर्घकाळासाठी विनानिविदा प्रस्ताव आणण्यास विरोध करत, तो कार्यपत्रिकेवर घेण्याची मागणी केल्याने हा विषय बारगळला. मात्र, विनानिविदा आणलेल्या या प्रस्तावावरून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
यासंदर्भात आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, “हडपसर येथील उघड्यावरील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून, याबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची असल्याने तातडीने प्रक्रिया करणे गरजेचे आहे. प्रकल्प उभारण्यासाठी येणारा ४० ते ५० कोटी रुपये खर्च संबंधित ठेकेदारानेच करायचा आहे. परंतु यासाठी १० वर्षे अधिकचे काम देण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कालावधी जास्त होत असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय झाला होता. परंतु तत्पूर्वीच प्रस्तावावर माझी स्वाक्षरी झाल्याने तो स्थायी समितीमध्ये गेला होता.”

सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा लग्नमुहूर्त ठरला:पवार कुटुंबात सोहळ्याची लगबग; रेवती सुळे 20 जूनला विवाहबंधनात

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योगपती सारंग लखानी यांचा विवाह 20 जून रोजी मुंबईत पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहसोहळ्यामुळे पवार कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तयारीलाही वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा मुंबईतील एका प्रतिष्ठित ठिकाणी भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील आणि देशातील अनेक नामांकित राजकीय नेते, उद्योगपती तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवार आणि लखानी कुटुंबीयांकडून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून प्रत्येक गोष्ट विशेष ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

विवाहानंतरही विविध ठिकाणी स्वागत समारंभांचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिला रिसेप्शन मुंबईत पार पडेल, तर वरपक्ष नागपूरचा असल्याने तेथेही खास कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, पवार कुटुंबाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व लक्षात घेता दिल्लीतही एक भव्य स्वागत समारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा केवळ कौटुंबिक न राहता राजकीय आणि सामाजिक दृष्ट्याही चर्चेचा विषय ठरणार आहे.

सारंग अरुण लखानी हे नागपूरचे रहिवासी असून ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. सारंग हे केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही सक्रिय असून ते एक कुशल बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विवाह जुळवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जाते.

पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण

रेवती सुळे यांनीलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्या शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असून बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले सुप्रिया सुळे यांना आहेत. आता रेवती सुळे यांच्या विवाहामुळे पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण असून हा सोहळा राज्यातील चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणात अधिवेशनापूर्वीच SIT:पण अर्धे मंत्रिमंडळ अडकण्याच्या भीतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, भास्कर जाधवांचा दावा

मुंबई-भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमली. पण निम्मे मंत्रिमंडळ यात अडकण्याची शक्यता असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी उपरोक्त दावा केला आहे. ते म्हणाले, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला हे चांगलेच झाले. पण हे प्रकरण केवळ त्यांच्यापुरतेच मर्यादित नाही. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी आहेत.

भास्कर जाधव म्हणाले, अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमण्यात आली. पण निम्मे मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचे नव्हते. केवळ पत्रकार व पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आले. अन्यथा हे प्रकरण सरकारने केव्हाच दाबले असते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही एसआयटी केव्हा स्थापन केली? याची माहिती द्यावी.
सरकारने अधिवेशन काळात या प्रकरणाची वस्तुस्थिती मांडणे गरजेचे होते. कारण, यात फक्त रुपाली चाकणकर किंवा इतर राजकीय पुढारी आहेत असे नाही. यात उच्चपदस्थ अधिकारीही आहेत. अशोक खरातची उठबस करण्यात ते गुंतलेत. त्यामुळे केवळ चाकणकरांचा राजीनामा घेऊन सरकारने या विषयावरील लक्ष इतरत्र वळवू नये. राजीनामा झाला म्हणजे हे प्रकरण संपणार नाही. सरकारमधील अनेक मंत्री व अधिकारी यात असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणात आयएएस, आयपीएस अधिकारी असल्याचे पोलिसांनाही ठावूक होते.

आता हे प्रकरण तडीस जावे असा आमचा प्रयत्न आहे. पण सरकारची एकूण वृत्ती पाहता या प्रकरणात काही पुढारी व अधिकाऱ्यांच्या फायली आपल्या बुडाखाली दाबून त्याचा राजकीय स्वार्थासाठी केला जाईल, असे ते म्हणाले.

भास्कर जाधव पुढे म्हणाले, राजकीय पुढाऱ्यांना अघोरी विद्या व अघोरी प्रकार का लागतात हे कळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन असे शेण खाणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे. या सरकारकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. आमचा महाराष्ट्र पुरोगामी असल्याचे आम्ही सांगतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून उर बडवतो. अंधश्रद्धा निर्मुलनाचे कायदे करतो. आणि दुसरीकडे हे काय सुरू आहे याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. या प्रकरणाचे धागेदोर खोलवर गुंतले असून, राज्यकर्ते अनेकांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

पावसाळी अधिवेशनात नाशिकच्या हॉटेलचा उल्लेख झाला तेव्हा राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या प्रकरणात क्लीनचिट दिली. नाशिकचे प्रकरण समजण्यास एवढा उशीर का? असा सवालही भास्कर जाधव यांनी या प्रकरणी उपस्थित केला.

तुळशीबाग राम मंदिरातील स्वर मैफलीत रसिकांना ‘ध्यान लागले रामाचे’ 

गायिका सानिका कुलकर्णी यांचे गायन ; श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सव ; उत्सवाचे २६५ वे वर्ष

पुणे : ठुमक चलत रामचंद्र… राम रतन धन पायो…ध्यान लागले रामाचे… यांसह प्रभू श्रीरामांचे वर्णन करणाऱ्या विविध गीतांचा आनंद घेताना रसिकांनी जणू श्रीरामांचे ध्यान लागले. पेशवेकालीन ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराम मंदिरात आयोजित स्वरमैफलीत गायिका सानिका कुलकर्णी यांच्या गायनाने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले. 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे अखंडीत २६५ वे वर्ष साजरे होत आहे. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवाराने उत्सवाचे आयोजन केले आहे. 

‘वंदे गणपतीम’ या गणेश वंदनेने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘रूप पाहता लोचनी’ या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचे सानिका कुलकर्णी यांनी केलेले सादरीकरण रसिकांच्या विशेष पसंतीस पडले. ‘जानकी नाथ सहाय करे जब’ या भजनाला उपस्थितांनी टाळ्यांनी साथ दिली. संत तुकाराम महाराजांच्या ‘लक्ष्मी वल्लभा’ या रचनेच्या सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध झाले. 

डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले म्हणाले, पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेले हे देखणे मंदिर आहे. यंदा दि. २ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, रामायण प्रवचन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे