“गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ”
दिल्ली: आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. मी बंगाल, तमिलनाडूच्या आणि केरळच्या जनतेचा आदरपूर्वक नमन करतो आणि धन्यवाद मानतो. आज भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. सगळ्या कार्यकर्त्यांनी कमाल केलीय, कमळ फुलवलंय. वर्षानुवर्षांची साधना विजयात बदलते तेव्हा होणारा हा आनंद आहे. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या निकालांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
” भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं नवा इतिहास घडवला आहे. नितीन नवीन यांच्या नियुक्तीनंतरची ही पहिली निवडणूक होती. आज लोकतंत्रच नाहीतर भारताचं संविधान देखील जिंकलं आहे. नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. पोटनिवडणुकांमध्येही जनतेनं एनडीएला कौल दिला आहे. एनडीएच्या सहकारी सुनेत्रा पवारांना जनतेनं कौल दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये ९३ टक्के ऐतिहासिक मतदानाची नोंद करण्यात आली आहे. लोकशाही हा आमच्या नसानसात घुमणारा आवाज आहे.आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे. हा केवळ भाजपचा विजय नाही, तर भारताच्या लोकशाहीचा आणि संविधानाचा विजय आहे,” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी बंगाल, तमिळनाडू आणि केरळमधील पक्षविस्तार आणि विजयानंतर मोदींनी जनतेचे आभार मानत कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे तोंडभरून कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, “आसाम,पुदुच्चेरी आणि केरळमध्येही मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आहे. भारताच्या लोकशाहीची प्रतिष्ठा जनतेनं कायम राखली. १४ नोव्हेंबरला मागच्या वर्षीच बिहारच्या निकालावेळी बंगालच्या विजयाचे संकेत दिले होते. मी तेव्हाच सांगितलं होतं की, गंगामातेनं मला बोलावलं आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता पश्चिम बंगालमध्येही एनडीए सरकार स्थापन झालं आहे. गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ फुललं आहे. गंगामातेसोबतच ब्रह्मपुत्र आणि कामख्या देवीचेही आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. आसाममध्येही भाजपला अभूतपूर्व यश मिळालं आहे. पुदुच्चेरी जनतेसमोर ठेवलेल्या व्हिजनवर विश्वास ठेवला.”

