मुंबई दि.४ : ‘एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य’ योजनेचे कामकाज २४ फेब्रुवारी २०२६ पासून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या टीएमएस २.० या प्रगत संगणक प्रणालीवर आहे. ही प्रणाली रुग्णाच्या बायोमॅट्रीक उपस्थितीची नोंद घेणे, कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित गैरप्रकार रोखणारी यंत्रणा, तसेच संपूर्ण ऑनलाईन पारदर्शक आधुनिक संगणकीय प्रणाली आहे. तसेच ही प्रणाली लागू झाल्यापासून उपचारांच्या संख्येत १३५६ वरुन २३९९ पर्यंत वाढही झालेली आहे.
टीएमएस २.० प्रणालीद्वारे रुग्ण नोंदणी करताना लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण होऊन आयुष्मान कार्ड तयार झालेले असणे बंधनकारक आहे. यासाठी रूग्ण व्यक्तीचे आयुष्मान कार्ड अगोदरच तयार करुन घेतलेले असल्यास अंगीकृत रुग्णालयात रूग्ण दाखल झाल्यावर त्यांची रुग्ण नोंदणी होऊन उपचार सुरु होण्यात कोणतीही अडचण येत नाही. तथापि, आयुष्मान कार्ड तयार नसल्यास, रुग्ण उपचारासाठी अंगीकृत रुग्णालयात आल्यास सर्व प्रथम त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यासाठी रुग्णाचे अद्ययावत रेशन कार्ड, आधार क्रमांक, रेशन कार्ड नसल्यास तहसिलदार यांचे कुटुंब प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक असतात. रेशनकार्ड आणि आधारवरील मजकुरात तफावत असणे किंवा रेशनकार्ड आधार संलग्न केलेले नसणे अशा कारणांनीही ई केवायसी मंजुरी प्रक्रियेस थोडा विलंब लागू शकतो. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होवून कार्ड मंजूर झाल्यावर त्या आधारे टीएमएस २.० प्रणालीवर रुग्ण नोंदणी प्रक्रीया सुरु करता येते.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन आयुष्मान कार्ड मंजूर होण्यापर्यंतचा बहुमूल्य वेळ वाचविता यावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी आयुष्मान कार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आयुष्मान कार्ड तयार केल्यानंतर टीएमएस २.० प्रणालीवर रुग्ण नोंदणी करण्यास कोणतीही अडचण येत नाही. आयुष्मान कार्ड तयार करण्याची कार्यपद्धती अत्यंत सोपी असून लाभार्थी आयुष्मान अॅपद्वारे किंवा https://beneficiary.nha.gov.in/ या संकेतस्थळावरून स्वतःचे कार्ड स्वतः तयार करू शकतात किंवा कोणत्याही आशा सेविका, रेशन दुकानदार आणि आपले सरकार सेवा केंद्र येथूनही आपले कार्ड तयार करून घेऊ शकतात.
आयुष्मान कार्ड, ई-केवायसी न झालेले रुग्ण उपचारासाठी अंगीकृत रुग्णालयात आल्यास त्यांना देण्यात यावयाचे उपचार योजनेत समाविष्ट असल्याची खात्री करुन त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेऊन उपचाराची सुरुवात करण्याचे निर्देश आहेत. पुढील तीन दिवसापर्यंत ई-केवायसीसह रुग्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन घेण्याची मुभा रूग्णालयांना देण्यात आली आहे. या कालावधीत रुग्णास उपचार नाकारले जाऊ नयेत किंवा पैशांची मागणी करण्यात येऊ नये अशा सक्त सूचना सर्व अंगीकृत रुग्णालयांना देण्यात आलेल्या आहेत. अशा तक्रारी आल्यास संबंधित आरोग्यमित्र, योजनेचे जिल्हा समन्वयक आणि प्रादेशिक व्यवस्थापक यांनी रुग्णास तात्काळ मदत करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याबरोबरच निःशुल्क उपचार त्वरित सुरू करून घेण्यासाठी सहाय्य करावे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक
रुग्णालयात नियुक्त आरोग्यमित्र आणि योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक व जिल्हा समन्वयक यांचे दूरध्वनी क्रमांक रुग्णालयातील योजनेच्या कक्षात प्रदर्शित करण्यात आले असून त्यांना संपर्क साधून मदत घेता येईल. तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या support@jeevandayee.gov.in या ईमेलवर किंवा टोल फ्री क्रमांक १५५३८८/१८००२३३२२००, १४५५५/१८००१११५६५ यावर संपर्क साधता येईल.”
टीएमएस २.० प्रणालीमुळे राज्यातील आरोग्य योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होत आहे. असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

