नसरापूर :आरोपीस फाशीचीच शिक्षा हवी— रमेश बागवे
पुणे, दि. ४ मे २०२६ :
मौजे नसरापूर (ता. भोर) येथील चार वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणी आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच शक्ती कायद्याची अमलबजावणी तत्काळ करावी अशी ठाम मागणी मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक व माजी मंत्री रमेश बागवे यांनी आज केली आहे .पुणे शहर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात महिलांवर व अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नसरापूर येथील ही घटना अत्यंत अमानवीय व संतापजनक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
याचबरोबर खेड-खालुंब्रे परिसरातील तीन वर्षांच्या बालकावर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणाचाही उल्लेख करत, अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आले. गुन्हेगारांवर तात्काळ व कठोर कारवाई होत नसल्याने कायद्याची भीती उरलेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
संघटनेने दोन्ही प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पीडित कुटुंबांना तात्काळ न्याय मिळवून देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक व कार्याध्यक्ष अविनाश बागवे, मुख्य समन्वयक विठ्ठल थोरात ,अरुण गायकवाड, मधुकर चांदणे, श्याम पाटोळे, सागर मोरे, रवि पाटोळे, सुनील बावकर, ॲड पुष्पा लोंढे, नारायण पाटोळे, हुसेन शेख, मारुती कसबे, राहुल चिंदम ,महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. राजश्री अडसूळ तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील मातंग एकता आंदोलनाचे प्रमुख पदाधिकारी,युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

