पुणे,दि. 11: राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्ह्यात महाखादी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागातील कारागिरांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाखादी’ ब्रँडचे अनावरण केले जाणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना विविध योजनांची माहिती देणे व ग्रामीण कारागीर व शेतकरी यांना लाभान्वित करून रोजगार निर्मिती करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या यात्रेचे आयोजन हातकागद संस्था, कृ.बा.जोशी पथ, शिवाजीनगर, पुणे येथे दि. 13 ते 17 ऑक्टोबर 2017 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 8291916634 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व अधिकाधिक नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, अशोक लाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.