पुणे- संवाद निर्माण झाला तर प्रगती होत असते. शासनाचे उपक्रम विविध घटकांमध्ये संवाद होऊन प्रगती व्हावी यासाठी आहेत. रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा हे त्याचेच प्रतीक असून हा एक अभिनंदनीय उपक्रम आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी केले. प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयात रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे उपसंचालक शरद आंगणे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्राचार्य डॉ. संजय खरात, डॉ. प्रकाश दीक्षित, केंद्राच्या सहायक संचालिका अनुपमा पवार, डॉ. वर्षा बापट आदी उपस्थित होते.
डॉ. शाळीग्राम म्हणाले, तांत्रिक शिक्षणामुळे व्यवसायाच्या विविध संधी प्राप्त झाल्या आहेत. शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांवर संस्कार करुन त्यांना समाजात परत पाठवण्याचे काम करतात. उद्योजक हे ग्राहक आहेत. शिक्षण संस्थामधील मुलांचा पुढे कसा उपयोग करुन घ्यायचा हे ते ठरवतात. विद्यार्थ्यांनी आपल्या कला-गुणांचा उपयोग करुन व्यक्तिमत्व विकास साधावा, असेही त्यांनी आवाहन केले.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे उपसंचालक शरद आंगणे यांनी केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. केंद्राच्या संकेतस्थळावर या योजनांची संपूर्ण माहिती असून रोजगार मेळाव्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राच्या सहायक संचालिका अनुपमा पवार यांनी रोजगारमेळाव्याचा उद्देश सांगितला. शिक्षण संस्था आणि केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मेळावे यशस्वी होत असून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळत आहे. त्यांनी स्कील इंडिया, स्टार्टअप इंडिया या योजनांचीही माहितीही दिली. प्राचार्य डॉ. संजय खरात यांचेही यावेळी समयोचित मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक डॉ. वर्षा बापट यांनी केले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मेळाव्यास 30 हून उद्योजक सहभागी झाले होते. या सर्वांना स्मृतिचिन्हे देऊन गौरवण्यात आले. आभारप्रदर्शन श्रध्दा अवसरे यांनी केले. महाविद्यालय परिसरात महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉललाही प्रमुख पाहुण्यांनी भेट देऊन पहाणी केली. जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी त्यांना लोकराज्य मासिकाचा अंक भेट दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी विजय कानिटकर, श्री. तु. डगळे, मिलिंद भिंगारे, विशाल तामचीकर आदी प्रयत्नशीलहोते.