पुणे: महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे समानतेचे विचार रुजवून त्यांना अभिप्रेत असणारी सामाजिक समता समाजात निर्माण करुया, असे प्रतिपादन सामाजिक न्याय, विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्म दिनानिमित्त विभागीय सामाजिक न्याय पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त वानवडी येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय, विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, नगरसेविका कालिंदा पुंडे, मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर, समाज कल्याण विभागाचे आयुक्त मिलींद शंभरकर, प्रादेशिक उपआयुक्त पी.एस.कवटे, सहाय्यक आयुक्त हरिष डोंगरे आदि उपस्थित होते.
श्री.बडोले म्हणाले, पुरोगामी विचार आत्मसात करुन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. राजर्षी शाहु महाराजांनी करवीर संस्थानात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन, मागासवर्गीयांना आरक्षण असे विचार कृतीतून मांडले. मागासवर्गीयांना सक्षम बनविण्यासाठी सामाजिक न्याय विभाग विविध योजना राबवित असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
श्री.कांबळे म्हणाले, समाजातील गरजू मागासवर्गीयांना आर्थिकदृष्टया मदत करण्यासाठी शासन सदैव पाठीशी राहील. यावेळी मुक्ता पुणतांबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अमृत कटकम, अतुल माने, धनश्री कदम, अजित आढाव आदि सत्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आंतरजातीय विवाह केलेल्या तसेच शारिरीकदृष्टया सक्षम असणाऱ्यांनी दिव्यांग व्यक्तींशी विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार श्री.बडोले व श्री.कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अनुसूचित जातीच्या परदेशी व देशांतर्गत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून यशस्वी झालेल्या, 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपुण्य मिळविलेल्या दिव्यांग व गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. याबरोबरच विविध मंडळांकडून अनुदान घेवून यशस्वी झालेल्या व्यावसायिकांचा, शेतकऱ्यांचा सन्मानही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पी.एस.कवटे यांनी प्रास्ताविक केले तर कोल्हापूरचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी आभार मानले यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी, विद्यार्थी, लाभार्थी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.