सोलापूर : साखरेचा भाव जागतिक बाजारपेठेत ठरत असल्याने साखर उद्योगाने जागतिक स्पर्धेत उतरुन अन्य खर्चात काटकसर करुन साखरेबरोबरच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार अन्य उपपदार्थांचे उत्पादन घेण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्री संत दामाजी सहाकरी साखर कारखान्याच्या 24 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार विलासराव जागताप उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऊसापासून केवळ साखर उत्पादन ही बाब आता गौण ठरत आहे. भविष्यात साखर हा उपपदार्थ होऊन सध्या जे उपपदार्थ म्हणून घेतले जातात ते मुख्य उत्पादन होणार आहे. यासाठी साखर कारखान्यांनी आत्तापासून या उपपदार्थांच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. को-जनरेशन ऐवजी इथेनॉल निर्मितीमध्ये मोठा वाव आहे. भविष्यात शहरी बस वाहूतक इथेनॉलवर चालवली जाणार असून यामुळे प्रदूषणही कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शासनाने शेतकऱ्यांच्या हाती बाजारपेठ दिली असून यासाठी शेतक-यांनी उत्पादकता वाढविणे गरजेचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, येत्या 3 वर्षात संपूर्ण ऊसाची शेती ठिबक सिंचनावर आणण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. साखर कारखाने, शासन आणि शेतकरी यांच्या समन्वयाने ऊस शेती ठिबकवर आण्यासही प्रयत्न केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असून शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची एफआरपी मिळावी यासाठी कारखान्यांना मदत केली आहे. मदत करुनही जे कारखाने एफआरपी देणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कारखाने चांगले चालावेत, सहकार चळवळ टिकावी यासाठी सहकारात संस्कार आणण्याचे काम शासन करीत आहे.
सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर देण्यासाठी कारखान्यांना शासनाने मदत केली आहे. जे कारखाने मदत करुनही एफआरपी देणार नाही त्यांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही. नजिकच्या काळात कारखान्याचे वजन काटे तपासण्याची मोहीम सहकार विभागामार्फत हाती घेण्यात येणार असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी या प्रसंगी बोलतांना सांगितले.
पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले, कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेती करण्याबरोबरच ऊस शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. ग्रामविकास, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, साखर कारखाना हा त्या-त्या परिसरातील विकासाचे रोपटे असून कारखान्यामुळे आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक विकासही साधला जात आहे.
प्रारंभी कारखान्याचे चेअरमन समाधान अवताडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास माजी मंत्री लक्ष्णमराव ढोबळे, संजय शिंदे, शहाजी पवार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि सभासद शेतकरी उपस्थित होते.