पुणे –शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन व आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावीपणे वापर करावा असे प्रतिपादन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्यावतीने येथील आयुका संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पणन संचालक डॉ.किशोर तोष्णिवाल, पणन सरव्यवस्थापक मिलींद आक्रे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्रीमहोदय म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान व शेती एकत्र आणून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. शेतकरी मजबूत झाला तर समाज मजबूत होईल. शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे असे ते म्हणाले.
राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्याचे मोठे जाळे उभे राहीले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून कृषि पणनअंतर्गत मोठी सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे. या क्षेत्रातील स्पर्धेमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता निर्माण झाली आहे असे सहायक
सरव्यवस्थापक भास्कर पाटील यांनी प्रशिक्षणाचा समारोप करताना सांगितले.
या कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपन्याच्या सभासदांना थेट पणन, खाजगी बाजार, शेतकरी आठवडे बाजार, निर्यात, आंतरराज्य व्यापार, बाजारपेठेची नवी दिशा, कृषि पणन क्षेत्रातील नविन बदल, नविन तंत्रज्ञान यासंदर्भात माहिती देण्यात आली. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत कृषि पणन क्षेत्रात येणाऱ्या अडचणी तसेच व्यवसाय विकास या विषयावर चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेस राज्यातून पणन मंडळाचे अधिकारी, शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.