पुणे : कोजागिरीच्या संध्येला नितळ चांदण्याच्या साक्षीने प्रसिद्ध गायिका डॉ. आश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायकीची सुरेल मैफल आणि या मैफलीला आपल्या नृत्यविष्कारातून ‘चार चाँद’ लावायला रंगमंचावर अवतरलेले पद्मविभूषण पं. बिरुजू महाराज असा जणू कलावंतांचा दरबारच काल रंगला होता. निमित्त होते तालायन म्युझिक सर्कलतर्फे पद्मभूषण पं. साजन मिश्रा यांच्या षट्यब्दी हर्षोत्सव सोहळ्याचे.
कथकसम्राट पं. बिरजू महाराज यांच्या शुभहस्ते पं. साजन मिश्रा यांचा खास पुणेरी थाटात सत्कार झाला. पुणेरी पगडीबरोबरच मोत्याची बिगबाळीही देऊन त्यांचा झालेला सन्मान उपस्थितांना विशेष भावला. “ पं. राजनजी हे केवळ माझे ज्येष्ठ बंधू नसून गुरु आणि मार्गदर्शकही आहेत. आमचे शरीर वेगळे असले तरी आत्मा एक आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासांपर्यंत आम्ही असेच गात राहू असा आशीर्वाद तुमचा हवा आहे,” अशा भावना यावेळी पं. साजन मिश्रा यांनी व्यक्त केल्या. यावेळी प्रसिद्ध कथक नृत्यांगना शाश्वती सेन, पं. राजन मिश्रा, पं. अरविंकुमार आजाद यावेळी उपस्थित होते. प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
‘मधुवंती’ रागातील ‘शिव आद्य मध्य अंत’ ही झपतालाची आणि ‘शिवशंकर पार्वतीपती’ ही द्रुत त्रितालातील बंदिश सादर करून आश्विनी भिडे देशपांडे यांनी आपल्या गायकीने कार्यक्रमाची सुरेल सुरुवात केली. संत नामदेवांच्या ‘ सब घट राम बोले रे’ या निर्गुणी भजनाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीची सांगता केली. त्यांना सुयोग कुंडलकर(संवादिनी), प्रशांत पांडव(तबला), स्वरांगी मराठे आणि मेघा भट (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
वयाच्या 80 व्या वर्षीही तरुणाला लाजवेल अशी प्रचंड ऊर्जा असलेले पं. बिरजू महाराज रंगमंचावर अवतरताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट त्यांचे स्वागत केले. कथक परंपरेनुसार नृत्य सादर करतानाही त्यांच्या प्रत्येक अविष्कारातून नृत्यकलेतील प्रगल्भतेचे दर्शन घडत होते. कधी प्राणी-पक्षी, निसर्ग यांच्या रुपात तर कधी नायिकेचे रूप घेऊन नृत्याबरोबरच अभिनयाचा विलक्षण अनुभव त्यांच्या कलेच्या रुपाने प्रेक्षकांना अनुभवता येत होता. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांची भरभरून दाद लाभत होती. घुंगरू म्हणजे नायिका आणि तबला म्हणजे नायक अशी जुगलबंदी ते सध्या चर्चेत असलेल्या सर्जिकल स्ट्राईकसारख्या विषयातून त्यांनी आपल्या कलेची अनुभूती दिली. पं. बिरजू महाराज यांचे नृत्य, अरविंद आजाद यांची तबल्यावर पडणारी जादुई बोटे आणि आश्विनी भिडे देशपांडे यांचे सुरेल गायन यामुळे ताल-सूर-लय असा अनोखा त्रिवेणी संगमच या कार्यक्रमातून रसिक पुणेकरांना अनुभवता आला.
माझे नृत्य माझ्याकडून कोणी तरी करवून घेते
वयाच्या पाचव्या वर्षांपासून नृत्य करतो आहे गेली 78 वर्षे हा प्रवास सुरूच आहे. पण मीही तुमच्यासारखेच नृत्य पाहतो. माझे नृत्य माझ्याकडून कोणी तरी करवून घेते. ते कोण हे मला दिसत नाही आणि माहितही नाही, अशा शब्दांत पं बिरजू महाराज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.