पुणे : शहरातील कचरा प्रकल्पासाठी ठिकठिकाणी आणखी काही जागा संपादित करण्याची गरज असून त्या मिळवण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहे. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी शहरातील विविध कचरा प्रकल्पांची पाहणी केल्यावर दिली.
पालकमंत्री बापट यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त कुणाल कुमार, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती सभापती मुरलीधर मोहळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या सह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कचरा प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांची गाऱ्हाणेही ऐकली.
उरळी देवाची , फुरसुंगी येथील ग्रामस्थांकडून वारंवार तेथे कचरा टाकण्यास विरोध होत आहे. यामुळे पुण्यातला कचऱ्याचा प्रश्न गंभीर होवू लागला आहे. यासाठी शहरातील कचरा प्रकल्पांची क्षमता वाढवून शहरातल्या कचऱ्याची शहरातच विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी सुस रोड, वडगाव, धायरी, रामटेकडी आदी प्रकल्पांना भेटी देवून प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली.
सुस रस्ता येथील भेटी दरम्यान तेथील नागरिकांनी या प्रकल्पामुळे आम्हाला त्रास होत असून हा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली. पालकमंत्री बापट यांनी त्यांची तक्रार ऐकून घेत यावर मध्यमार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तसेच स्थानिकांना त्रास होवू नये म्हणून कचऱ्याचे विघटन करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना केली.
वडगाव येथील प्रकल्पाला भेट दिल्यानंतर या प्रकल्पाच्या बाजूला असणारी जमीन प्राप्त करून या प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे धायरी येथे सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. सध्या तेथे दरदिवशी २५ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. येथे आणखी यंत्रसामग्री वाढवून प्रकल्पाची क्षमता वाढवण्याची सूचना त्यांनी दिल्या.
हडपसर रामटेकडी येथील आणखी २३ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही जागा ताब्यात आल्यानंतर या ठिकाणी आणखी कचरा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येवू शकतात, त्यामुळे या जागा ताब्यात घेण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अश्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.