‘शनिशिंगणापूर येथे स्त्रियांना मिळालेला प्रवेश हा स्त्री-पुरुष समानतेचा विजय’ : विद्या बाळ
पुणे :
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त होणारा माझा सन्मान मोलाचा आहे. या सन्मानाने मला कृतार्थ वाटत आहे. स्त्रियांनी आणि दलितांनी डॉ. आंबेडकरांचे ऋण मानले पाहिजे. शनिशिंगणापूरच्या चौथर्यावर महिलांना प्रवेश आणि न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न केला. स्त्री-पुरूष समानतेचा कायदा झालेला होता, त्याबद्दल मला प्रख्यात वकील अनिल अंतूरकर, कल्याणी तुळणकर यांनी माहिती दिली. शनिशिंगणापूरच्या चौथर्यावर महिलांना प्रवेशाबाबत अॅड. नीलिमा वर्तक आणि मी याचिका दाखल केली. यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा लढा यशस्वी झाला आहे.’ असे प्रतिपादन विद्या बाळ यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित ‘महिला सामाजिक न्याय सन्मान’ गौरव कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृह, टीळक रोड येथे गुरुवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन संविधान पूजन करण्यात आले.
खासदार अॅड. शहराध्यक्ष वंदना चव्हाण आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अॅड. जयदेव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकूश काकडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, अशोक राठी, आनंद रिठे, कमलताई ढोले-पाटील, वासंती काकडे, डॉ.दत्तात्रय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. पंडीत कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. राकेश कामठे यांनी आभार मानले.
शनिशिंगणापूरच्या चौथर्यावर महिलांना प्रवेश मिळवून देण्याची लढाई लढून महिलांना सामाजिक न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल अभ्यासक आणि महिला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ यांना ‘महिला सामाजिक न्याय सन्मान’ने गौरविण्यात आले.
विद्या बाळ पुढे म्हणाल्या,‘शनिशिंगणापूर येथे स्त्रियांना प्रवेश मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्याही पेक्षा तो स्त्री-पुरुष समानतेचा विजय आहे. आज न्यायालयात मान्यता मिळाली तरीही ती मी हारच मानते. कारण अजुनही पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे. शनिशिंगणापूर येथे स्त्रियांना प्रवेश मिळाल्यानंतर शंकराचार्य जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबाबत मी तीव्र नाराजी व्यक्त करते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायला हवे होते, तरी त्यांनी याविषयी ताठर भूमिका घेतली. समानता ही स्त्री-पुरुषांना मिळाली पाहिजे. समानता प्रतिष्ठेची असते तर समता ही मूल्यांवर आधारलेली असते. देशात आज विविध पातळ्यांवर विषमता आहे. पण मुलभूत विषमता ही स्त्री-पुरुष विषमता आहे. स्त्री-पुरूष समानतेची सुरूवात घरापासूनच झाली तर समाजातील स्त्री-पुरूष विषमता दुर होण्यास मदत होईल.’
खासदार शहराध्यक्ष अॅड.वंदना चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचे पूजन आज आपण केले. ती घटना फक्त कायद्याची घटना नसून, ती मानवतेची व समानतेची घटना आहे. या समानतेच्या पार्श्वभूमीवर आज आपण महिला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ यांना सन्मानित केले आहे. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राबविण्यात येणार्या ‘अवयवदान जनजागृती उपक्रमा’बद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जयदेव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्य घटना याविषयी आपले विचार मांडताना म्हणाले,‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन शब्दातीत करणे अवघड आहे. आंबेडकरांची राज्य घटना म्हणजे शांततामय क्रांती आहे.’
या कार्यक्रमाला राकेश कामठे, बबलू जाधव, रूपाली चाकणकर, इक्बाल शेख, मनाली भिलारे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, शहर पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, ब्लॉग अध्यक्ष, सेल अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अवयव दान जनजागृती अभियानाचा प्रारंभ
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर च्या वतीने आयोजित अवयव दान जनजागृती अभियानाचा प्रारंभ आज झाला. यावेळी ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या आरती गोखले यांनी अवयवदानाविषयी अधिक माहिती सांगितली. उपक्रमाच्या प्रारंभाला प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ. संजीव जाधव उपस्थित होते.