पुणे- अभिनयातील कृत्रिमता घालवून नैसर्गिक अभिनय कसा करावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्व. राजा परांजपे हे होते असे सांगून आज जे दर्जेदार चित्रपट आपण बघतो त्याचा पाया राजा परांजपे यांनी घातला असे गौरोद्गार जेष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी काढले.
राजा प्रतिष्ठानच्या वतीने ७ व्या राजा परांजपे महोत्सवाचे उद्घाटन व राजा परांजपे पुरस्कार सुहास जोशी यांच्या हस्ते अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री स्मिता तांबे, दिग्दर्शक अभिजीत पानसे, गायक स्वप्नील बांदोडकर यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. अभिनेते प्रवीण तरडे, राजा परांजपे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे, अजय राणे हे यावेळी उपस्थित होते.
सुहास जोश म्हणाल्या, राजा परांजपे, ग. दी. माडगुळकर व सुधीर फडके या त्रिकुटाने चित्रपट म्हणजे काय हे लोकांच्या गली उतरविले होते. या त्रिकुटाने मराठी माणसाची सांस्कृतिक बुद्धी वाढवली. राजा परांजपे यांचे चित्रपट पाहत आम्ही मोठे झालो. आपण नैसर्गिक अभिनयाच्या बाबतीत नेहेमी आरडा ओरडा करतो परंतु राजा परांजपे यांनी अभिनयातील कृत्रिमपण घालवून नैसर्गिक अभिनय कसा असतो हे आपल्या कसदार अभिनयातून दाखवून दिले. हातात कुठलेही तंत्र नसताना त्यांनी जे काम केले त्याला तोड नाही. आजचा जो मराठी सिनेमा आपण बघतो त्याचा पाया राजाभाऊंनी घातला असे त्या म्हणाल्या.
सचिन खेडेकर म्हाणाले, चित्रपट बनविताना सर्व पिढीतल्या लोकांना राजा परांजपे बरोबर घेऊन जात. चित्रपट बनवताना त्यांचा दूरदर्शी दृष्टीकोन असायचा लक्षात राहणारे काम आजच्या पिढीकडूनही होत आहे. आजचा मराठी प्रेक्षक हा मराठी, इंग्रजी, हिंदी चित्रपट बघतो. मात्र, त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो मराठी चित्रपटांनाच पराधान्य देतो. आजच्या चित्रपटातील कलात्मक दृष्टी जरी बदलली असली तरी सामाजिक जाणीव टिकवून प्रबोधनाबरोबरच मनोरंजन व्हावे हा प्रयत्न असतो.
अभिजीत पानसे म्हणाले, हा सन्मान मिळण्यासारखे मी फार मोठे काही केले असे मला वाटत नाही. राजा परांजपे यांच्यासारख्या थोर माणसाच्या नावाचा पुरस्कार मला ‘रेगे’ सारख्या एका चित्रपटाच्या दिग्दर्शनाला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो.
स्मिता तांबे व स्वप्नील बांदोडकर यांनी राजा परांजपे पुरस्कार मिळाला याचा खूप अनाद झाला असल्याच्या आणि जबाबदारी वाढल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
मराठी प्रेक्षकांनी अभिरुची जपून ठेवली म्हणूनच वेगळे काम करण्याची हिम्मत होते —सचिन खेडेकर
मराठी प्रेक्षकांनी आपली अभिरुची आजपर्यंत जपून ठेवली आहे त्यामुळेच माझ्यासारख्या कलाकाराला वेगळे काम करण्याची हिम्मत होते असे मत सचिन खेडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. चारही राजा परांजपे पुरस्कारार्थींची प्रवीण तरडे यांनी मुलाखत घेतली त्यावेळी खेडेकर यांनी हे मत व्यक्त केले.
‘काकस्पर्श’ या चित्रपटातील भूमिका शेवटपर्यंत कशी पेलली याबाबत बोलताना सचिन खेडेकर म्हणाले, यामध्ये गिरीश जोशी आणि महेश मांजरेकरांचा मोठा वाटा आहे. नट म्हणून नटाला बुद्धी असावी ती दिग्दर्शकाचा आदेश समजून घेण्याची. बऱ्याचदा नट स्वतंत्र, स्वयंभू असल्याचा विचार करतो तसे मी केले नाही म्हणून तो अभिनय चांगला झाला.
मात्र, हा सांघिक प्रकार आहे. सर्वांचा परिणाम म्हणून माझे काम चांगले झाले.
गाण्याबरोबरच अभिनय का केला नाही या प्रश्नाला उत्तर देताना स्वप्नील बांदोडकर म्हणाला, ‘प्ले बॅक’ गाताना मी अभिनय करतच असतो फक्त तो पडद्यामागचा असतो. नृत्य आणि अभिनय यापैकी काय आवडते याबाबत बोलताना स्मिता तांबे म्हणाल्या, नाच हे माझी आवड आहे आणि अभिनय ही ‘पॅशन, आहे. मला काम आवडते ते मला करायला मिळाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अभिनेत्री सर्वारी जमेनीस व त्यांच्या सहकलाकारांनी कथ्थक नृत्याद्वारे विविध बंदिशी सादर केल्या.